बोधिचित्तासाठी सात भागांमध्ये कार्यकारणभावात्मक साधना

सर्वतोपरीने इतरांना मदत करण्यासाठी बुद्धत्व प्राप्त करण्याचं ध्येय म्हणजे बोधिचित्त. हे ध्येय साध्य करण्यासाठी आणि एकदा का ते साध्य झालं की दृढ करण्यासाठी सात भागांची कार्यकारण पद्धती इथे दिली आहे. समतोल वृत्तीपासून सुरुवात करून प्रत्येक जण आपली माता आहे हे लक्षात घेणं, मातृत्वप्रेम आठवणं आणि कृतज्ञतेने या दयाभावाची परतफेड करण्याची इच्छा ठेवणं- अशा भावनांच्या व समजुतीच्या मालिकेतून आपल्याला घेऊन जाणारी ही पद्धती आहे. या पद्धतीमुळे प्रत्येकाविषयी समान प्रेम व करुणा आणि अपवादात्मक निश्चय विकसित होतो, आणि या सहज क्रमाचा परिणाम म्हणून बोधिचित्ताचं ध्येय साध्य होतं.

प्रास्ताविक

सर्व प्रकारची सवड व संपन्नता असलेलं अमूल्य मानवी जीवन आपल्याकडे आहे, त्यामुळे बौद्ध मार्ग अनुसरण्याचा वाव आपल्याला मिळतो. परंतु, ही स्वातंत्र्यं आणि संधी कायमस्वरूपी टिकणार नाहीत. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या संधींचा पूर्ण लाभ आपण घ्यायला हवा.

आपल्या अमूल्य मानवी जीवनाचा पूर्ण लाभ घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बोधिचित्ताचं ध्येय साध्य करण्यासाठी या जीवनाचा वापर करणं. आत्तापर्यंत न झालेल्या व्यक्तिगत साक्षात्कारावर लक्ष केंद्रित करणारं मन व हृदय, हे बोधिचित्ताचं ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला बौद्ध स्वभावाचे घटक सहायक ठरतात, आणि त्यांच्या आधारे मानसिक सातत्यपूर्णता लाभते. सकारात्मक शक्ती व सखोल जागरूकता, आपले विविध गुण, आणि आपल्या मनांची नैसर्गिक शुद्धता, हे ते घटक आहेत. या बोधिचित्त ध्येयासोबत दोन उद्देश असतात: शक्य तितक्या लवकर साक्षात्कार साधणं आणि त्या आधारे सर्व जीवांचा लाभ करवून देणं.

बोधिचित्त साध्य करत असताना आपण उलट्या क्रमाने हे दोन उद्देशही साधत असतो. एक, केवळ मानवांचाच नव्हे, तर सर्व मर्यादित जीवांचा लाभ करून देण्याचा आपला पूर्ण उद्देश असतो. आपल्यामधलं प्रेम, करुणा व अपवादात्मक निश्चय यांच्यामुळे हे घडतं, त्याची चर्चा आपण सदर व्याख्यानामध्ये नंतर करणार आहोत. त्या सर्वांचा सर्वाधिक परिणामकारकतेने लाभ व्हावा यासाठी आपण साक्षात्कार साधण्याचा व बुद्ध होण्याचा उद्देश पूर्णतः राखून असतो. आपल्या सर्व मर्यादांपासून व कमतरतांपासून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला साक्षात्कार गरजेचा असतो. कारण, इतरांना मदत करण्याच्या आपल्या क्षमतेला या मर्यादा व कमरतरतांमुळे प्रतिबंध होत असतो, हे आपल्याला कळतं. उदाहरणार्थ, आपल्याला इतरांचा राग आला तर आपण त्याच वेळी त्यांची मदत करणं आपल्याला कसं काय शक्य होईल? शिवाय, आपलं पूर्ण सामर्थ्य उपयोगात येण्यासाठी साक्षात्कार होणं गरजेचं असतं. त्यामुळे, बोधिचित्ताचं ध्येय साध्य करताना बुद्धत्वाची स्थिती सर्वोच्च आहे म्हणून ती साध्य करायची आणि एखादा खोडसाळ कर भरावाच लागतो तशी इतरांना मदत करायची, अशी काही गरज नसते.

बोधिचित्ताचं ध्येय साध्य करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. एक, सात भागांच्या कार्यकारण शिकवणुकीद्वारे. दोन, स्वतःविषयी व इतरांविषयीच्या आपल्या प्रवृत्तीला समानतेने पाहून त्यांत देवाणघेवाण करणं. इथे आपण या दोन्हींतील पहिल्या पद्धतीची चर्चा करणार आहोत.

समतोल वृत्ती विकसित करणं

सात भागांच्या कार्यकारण शिकवणुकीमध्ये पहिल्या सहा पायऱ्या सातवीला, बोधिचित्त ध्येय प्रत्यक्ष साध्य होण्याला, कारणीभूत ठरतात. याची सुरुवात एका प्राथमिक पायरीपासून होते, त्याचा समावेश सात भागांमध्ये नाही. काही जीवांकडे आकर्षित होणं किंवा त्यांच्याबाबत जवळीक वाटणं, इतरांबद्दल तिरस्कार वाटणं आणि आणखी इतर काहींबाबत अलिप्तता वाटणं, यावर मात करण्यासाठी समतोल वृत्ती विकसित करणं, ही ती प्राथमिक पायरी आहे. प्रत्येकाबाबत समान खुलेपणा ठेवणं, हा या प्राथमिक पायरीचा उद्देश आहे.

प्रत्येक जण समान आहे ही समजूत प्रत्येकाबाबत समानपणे खुलं होण्यासाठी आवश्यक आहे. मानसिक सातत्याला किंवा मनाच्या प्रवाहाला आरंभ नाही व अंत नाही, हे लक्षात आल्यानंतर वरील समजूत निर्माण होते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या काळी आपला मित्र राहिलेला आहे, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या काळी आपला शत्रू राहिलेला आहे, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या काळी अनोळखी राहिलेला आहे, आणि हे स्थान सतत बदलत असतं. या अर्थी प्रत्येक जण सारखाच आहे.

मनाच्या आरंभहीनतेवर हा विचार आधारलेला आहे हे आपण समजून घ्यायला हवं. बुद्धविचारातील हे एक प्राथमिक गृहितक आहे. पुनर्जन्मामध्ये अनुभवांचं सातत्य गृहित धरलेलं असतं. मानसिक सातत्य म्हणजे अनुभवांचं सातत्य. ते सुटे असतात आणि त्यांना मानव, प्राणी, नर वा मादी अशी अंगभूत ओळख नसते. कोणत्याही विशिष्ट पुनर्जन्मामध्ये मानसिक सातत्यामधून आविष्कृत होणारं जीवनरूप व लिंगभाव पूर्वकर्मावर आणि त्याच्या परिणामांवर आधारलेलं असतं. 

मनाच्या आरंभहीनतेशी संबंधित हा मुद्दा मूलभूत आहे, आणि बोधिचित्त साध्य करण्यासाठी सक्षम होण्याकरिता ही समजूत आवश्यक असते. कारण, या समजुतीच्या आधारावर पूर्णतः प्रत्येकाबद्दल करुणामय प्रेम विकसित करणं शक्य होतं. उदाहरणार्थ, इतर जीवांकडे आपण केवळ एक डास म्हणून पाहत नाही. उलट, या जीवाकडे आपण अनंतकालीन दीर्घ व्यक्तिगत मानसिक सातत्य म्हणून पाहतो, ज्याला पूर्वकर्मामुळे या जीवनात डासाचं रूप मिळालेलं आहे; तो जीव अंगभूतरित्या डास नाही. यामुळे आपलं हृदय मानवाइतकंच डासाबाबतही खुलं राहतं. बोधिचित्ताद्वारे आपण अगदी प्रत्येकाला लाभ देऊ इच्छितो, या वस्तुस्थितीमधून बोधिचित्ताची ताकद उत्पन्न होते. हे अर्थातच सोपं नाही.

प्रत्येक जण आपली माता आहे हे समजून घेणं

सर्व जीव म्हणजे व्यक्तिगत आरंभहीन मानसिक सातत्य आहे, त्यांना या जीवनकाळातही त्यांचं रूप नाकारलं गेलेलं नाही, हे समतोल वृत्तीने आपल्याला पाहता आलं की सात भागांच्या कार्यकारण साधनेतील पहिली पायरी चढायला आपण तयार होतो. प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या काळात आपली माता राहिलेला आहे, हे समजून घेण्यासाठी याची गरज असते. या जीवनकाळामध्ये आपल्याला एक माता आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक जीवनकाळामध्ये आपण एखाद्या गर्भातून किंवा एखाद्या अंड्यातून जन्म घेतो, म्हणजे आपल्याला एक माता असते, हा यामागचा तर्क आहे. पुनर्जन्माच्या आरंभहीनतेच्या तर्कामुळे आणि मर्यादित पण अगणित जीव जगामध्ये आहेत ही वस्तुस्थिती असल्यामुळे, प्रत्येक जण आरंभहीन काळापासून आपली माता राहिलेले आहेत. ते आपले पिताही राहिलेले आहेत, आपले सर्वांत जवळचे मित्रही राहिलेले आहेत, इत्यादी.

प्रत्येक जण आपली माता आहे, असं पाहत असताना आपली माता म्हणजे कोणाची अंगभूत ओळख आहे असं पाहिलं जाणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी, कारण तेही अडचणीचं होऊ शकतं. शून्यतेकडे, अंगभूत निश्चित ओळखींच्या अभावाकडे, दुर्लक्ष होणार नाही, असा प्रयत्न आपण करायला हवा. 

प्रत्येक व्यक्ती आपली माता राहिली आहे, हे समजून घेतल्याने इतरांशी असलेल्या आपल्या संबंधांमध्ये प्रचंड बदल होतो. इथे आपण प्रत्येकाबद्दल समतोल वृत्ती राखण्यापलीकडे जात आहोत. प्रत्येकासोबत आपले अतिशय जवळचे, स्नेहपूर्ण, प्रेमळ संबंध होते आणि अजूनही असू शकतात, हे आपण इथे पाहतो आहोत.

मातृत्वप्रेमातील दयाभाव लक्षात ठेवणं

मातृत्वप्रेमातील दयाभाव लक्षात ठेवणं, ही सात पायऱ्यांमधील दुसरी पायरी आहे. अनेक पाश्चात्त्यांसाठी साधनेमधील ही पायरी अडचणीची ठरते, कारण भारतीयांनी व तिबेटी लोकांनी या जीवनकाळामध्ये आपल्या आईचा दाखला कायमच समोर ठेवलेला असतो. पाश्चात्त्य समाजांपेक्षा या समाजांमध्ये बहुतांश लोकांचे मातांसोबतचे संबंध कमी क्षीण झालेले व कमी समस्याग्रस्त असतात, असं दिसतं. हे खरं आहे किंवा नाही हे व्यक्तिगत दाखल्यानुसार बदलेल. पण तिबेट व भारतीय समाजांमध्ये २९ वर्षं राहिल्यानंतर माझ्या अनुभवावरून मी एवढं सांगू शकतो की, या ठिकाणी मोठी झालेली मुलं व त्यांच्या माता यांच्यातील संबंध पश्चिमेपेक्षा खूप कमी क्षीण झालेले असतात.

आपली माता किती दयाळू आहे- किंवा ती निवर्तली असेल, तर ती किती दयाळू होती, हे लक्षात ठेवण्यासाठी साधनेमध्ये ही पायरी आहे. आपल्याला तिने तिच्या गर्भामध्ये सांभाळलं, तिथपर्यंत तिची आठवण आपण ठेवायला हवी. त्यानंतर यापुढे जात, प्रत्येकाने गतजन्मांमध्ये आपल्याबाबतीत अशाच प्रकारचा दयाभाव दाखवला, याचा विचार आपण करावा.

अनेक जण हे पाश्चात्त्यांना शिकवतात तेव्हा म्हणतात की, ठीक आहे, तुम्हाला मातेबाबत अवघडल्यासारखं होत असेल, तर तुम्ही तुमच्या पित्याचा विचार करा, एखाद्या जवळच्या मित्रमैत्रिणीचा विचार करा किंवा तुम्हाला दयाभावाने वागवलेल्या कोणाचाही विचार करा. असं केल्याने तुम्ही ही साधना करण्याच्या प्रयत्नात अडकून पडणार नाही. हा दृष्टिकोन सहाय्यकारी आहे, असं मला वाटतं. पण, आपल्या मातेसोबतच्या संबंधांमध्ये काही समस्या असतील, तर त्या सोडून न देता त्यांना सामोरं जाणं खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. आपल्या मातेशी आपल्याला सुदृढ संबंध राखता येत नसतील, तर इतरांशी सुदृढ प्रेमाचे संबंध राखणं अतिशय अवघड होईल. समस्या असणारच आहेत. त्यामुळे आपल्या मातेसोबतच्या प्रत्यक्ष संबंधांकडे पाहणं आणि तिच्यासोबतचे संबंध कितीही समस्याग्रस्त राहिले असले किंवा आत्ताही तसेच असले तरी, तिचा दयाभाव समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हे अतिशय महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.

एक, आपण आदर्श मातृत्व प्रेमाकडे पाहायची गरज आहे. अभिजात संहितांमध्ये याची वर्णनं आहेत: उदाहरणार्थ, अनेक प्राण्यांमध्ये आपल्याला हे दिसतं. एखादी पक्षी माता, कितीही थंडी असली किंवा ती कितीही ओली झाली असली, तरी तिच्या अंड्यांवर बसतेच आणि अंडी उबवून झाली की ती कीडे पकडून चावते, पण गिळत नाही, आणि हे अन्न तिच्या पिल्लांना देते. हे अगदी असाधारण आहे.

माता आपल्या पिलांना खाऊन टाकतात अशी उदाहरणंही प्राण्यांच्या व कीटकांच्या जगात आहेत, पण तरीही पिलांना जन्म देण्यासाठी या मातांनीदेखील अडचणी सहन केलेल्या असतात. आणि आपली जैविक माता असू दे किंवा सरोगेट माता असू दे, कोणीतरी आपल्याला स्वतःच्या गर्भात वाढवलेलं असतं. आपला जन्म टेस्ट-ट्यूबमध्ये झाला असेल, तरीही कोणीतरी आपल्याला टेस्ट-ट्यूबमध्ये पाहिलेलं असतं आणि योग्य तापमानात ठेवलेलं असतं. आपल्या मातांना आपल्याला वाढवणं आवडलं की नाही, हे अप्रस्तुत आहे. आपल्याला स्वतःच्या गर्भात वाढवणं, आणि गर्भपात न करणं, हे अविश्वसनीय दयाभावाचंच उदाहरण आहे. तिच्यासाठी काही ही स्थिती सोपी नसते. आपल्या प्रत्यक्ष जन्मावेळी तिला प्रचंड वेदना सहन कराव्या लागलेल्या असतात. शिवाय, आपण बाळ असतो तेव्हा कोणाला तरी मध्यरात्री उठावं लागलेलं असतं, आपल्याला भरवावं लागलेलं असतं; तसं कोणी केलं नसतं तर आपण जगलोच नसतो. अशा प्रकारच्या गोष्टींवर अभिजात संहितांमध्ये भर दिलेला असतो.

आपल्या मातांसोबत आपल्याला अडचणी आल्या असतील, तर त्यातून सुगावा घेऊन आपण पाचव्या दलाई लामांच्या ‘लामरिम’ संहितेतील गुरूसाधनेपासून सुरुवात कशी करायची याचा अंदाज घेऊ शकतो. केवळ गुण असलेला आध्यात्मिक गरू शोधणं जवळपास अशक्य आहे, असं पूर्वीच्या अनेक संहितांमध्ये म्हटलेलं आहे. कोणताही आध्यात्मिक गुरू आदर्श असणार नाही; प्रत्येक जण सबळ व दुर्बळ घटकांचं मिश्रण असतो. आध्यात्मिक गुरूच्या साधनेमध्ये आपण गुणांवर आणि दयाभावावर लक्ष केंद्रित करावं, म्हणजे आपल्या मनात प्रचंड आदर, प्रेरणा व कृतज्ञता निर्माण होते. आपल्यामध्येही हे गुण व दयाभाव निर्माण करण्याची प्रेरणा यातून आपल्याला मिळेल.

हे करत असताना आपण गुरूमधील कमतरता व त्रुटी नाकारायची गरज नसते, असं स्पष्टीकरण पाचव्या दलाई लामांनी दिलेलं आहे. असं नकार देणं भाबडेपणाचं ठरेल. आपण कमतरता मान्य कराव्यात, पण क्षणभरासाठी त्या बाजूला ठेवणं गरजेचं असतं, कारण गुरूच्या त्रुटींबद्दल विचार करत राहिलं, तर आपण तक्रारी करत बसू आणि आपली वृत्ती नकारात्मक होईल. हे अजिबात प्रेरणादायी नसेल. गुण व दयाभाव यांवर लक्ष केंद्रित करूनच आपल्याला प्रेरणा मिळते.

त्यामुळे पहिल्यांदा आपण कमतरता कबूल कराव्यात. पण या खरोखरच्या कमतरता आहेत की केवळ आपण काहीतरी समज करून घेतलेला आहे, याची प्रामाणिक तपासणी करणं गरजेचं आहे. या कमतरता केवळ गैरसमजातून उद्भवलेल्या असतील, खऱ्या नसतील, तर त्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करणं चांगलं. त्यानंतर कल्पित नसलेल्या कमतरता अजूनही आपल्या गुरूमध्ये आहेत की हा जुना इतिहास आहे व आपल्यालाच तो सोडून द्यायचा नाहीये, याचीही तपासणी आपण करायला हवी. या त्रुटी वर्तमानामध्ये नसतील, तर आपण त्यांचा विचार थांबवावा: त्या आता प्रस्तुत नाहीत, हे समजून घ्यावं. वर्तमानातील त्रुटी काय आहेत, हे आपल्याला एकदा स्पष्ट झालं की, या त्याच्या किंवा तिच्या त्रुटी आहेत, हे आपण समजून घ्यावं. नंतर क्षणभरासाठी आपण ते बाजूला ठेवावं आणि केवळ गुणांवर लक्ष केंद्रित करावं.

मला वाटतं की, अशाचसारखी प्रक्रिया योग्य असते आणि आपल्या मातांच्या दयाभावाकडे पाहताना ही प्रक्रिया योग्य रितीने कार्य करू शकते. कोणाचीही माता आदर्श नसते. आपण पालक झालो, तर आदर्श पालक होणं आत्यंतिक अवघड असतं हे आपण जाणतो, त्यामुळे आपल्या पालकांनी आदर्श असायला हवं होतं अशी अपेक्षाही करू नये. आपल्या मातांमध्ये कोणत्या त्रुटी व कमतरता आहेत किंवा होत्या, हे पाहिल्यावर त्यामागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचाही प्रयत्न आपण करायला हवा. ती अंगभूतरित्या वाईट व्यक्ती नाही, जसं की कोणतंही मानसिक सातत्य अंगभूतरित्या एखादा डास नसतं (डासही अंगभूतरित्या त्रस्तकारक नसतो). आपण आपल्या मातांवर कमतरता लादत नाहीयोत ना किंवा प्राचीन इतिहासातच रमत नाहीयोत ना, याची खातरजमा करायला हवी, आणि मग सर्व कल्पित त्रुटी बाजूला सारायला हव्यात, क्षणभरासाठी सर्व गतकालीन व वर्तमानकालीन त्रुटी बाजूला ठेवायला हव्यात. आपण म्हणावं की, तिच्या काही त्रुटी आहेत किंवा होत्या, पण ती इतरांसारखीच एक व्यक्ती आहे: आपल्या सर्वांमध्येच काहीतरी त्रुटी आहेत. मग आपण तिच्या गुणांकडे आणि तिने आपल्याबाबत दाखवलेल्या आदरभावाकडे पाहतो.

एका पाश्चात्य धर्मगुरूंनी- नक्की कोण ते मला आत्ता आठवत नाहीये- सुचवलेली एक साधनापद्धती अतिशय उपयोगी आहे, असं मला वाटतं. आपल्या मातांचे अवगुण बाजूला ठेवल्यानंतर आपण आपल्या जगण्याचा पाच किंवा दहा वर्षांच्या संचांमध्ये विचार करावा. आपल्या मातांनी आपल्यासाठी कोणत्या गोष्टी दयाभावाने केल्या, ते पाच किंवा दहा वर्षांच्या संचांमध्ये आठवून त्यावर विचार करावा. पाच मिनिटं, अर्धा तास, एक तास, किंवा आपल्याला वाटेल तितका वेळ हे करत राहावं. एक, आपण गर्भात होतो तेव्हापासून पाच वर्षं वयाचे होईपर्यंतचा काळ विचारात घेतला असता आपल्या लक्षात येतं की, आधी आई आपले घाण झालेले डायपर बदलत होती, आपल्याला भरवत होती, आंघोळ घालत होती आणि तशा सर्व गोष्टी करत होती. त्यानंतर पाच ते दहा वर्षांचा काळ आठवून पाहावा. ती आपल्याला शाळेत सोडत असे- तिने आपल्याला गृहपाठामध्ये मदत केली नसेल किंवा असेल, पण तिने आपल्यासाठी स्वयंपाक केला आणि आपले कपडेही धुतले. आपण किशोरवयीन असताना तिने आपल्याला खर्चासाठी पैसे दिले असतील. आपल्या माता कितीही भयंकर राहिल्या असतील, तरी आपल्या जीवनाच्या प्रत्येक कालखंडात त्यांनी अनेक प्रकारचा दयाभाव निःसंशयपणे दाखवलेला असतो.

मग आपण आपल्या वडिलांबाबत आणि इतर नातेवाईकांबाबत, मित्रमंडळींबाबतही असाच विचार करून पाहावा. साधनेसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. ‘मी कोणलाच आवडत नाही’ असा विचार आपल्या मनात येतो, तेव्हा निराशेच्या काळात हा अगदी जोरदार उतारा ठरतो. अशा रितीने या जीवनामध्ये आपल्याला आईचा दयाभाव लक्षात आला, तर प्रत्येक जण आपल्याशी समान प्रकारे दयाभाव राखून असल्याचं आपल्या लक्षात येईल. कोणीही आदर्श माता नसतं, हे खरं; इतर कोणत्या तरी जीवनकाळामध्ये कधीतरी तिने आपल्याला खाल्लंही असेल, पण तिने आपल्याबाबतीत दयाही दाखवलेली आहे.

मातृत्वप्रेमातील दयाभावाची परतफेड

सात भागांच्या या सारभूत शिकवणुकीतील तिसरी पायरी म्हणजे आपल्याला मिळालेल्या मातृत्वप्रेमातील दयाभावाची परतफेड करण्याची इच्छा विकसित करणं. त्यासाठी आपण अशी कल्पना करावी की, आपली आई अंध आणि पूर्णतः गोंधळलेली व नाराज आहे, एका कड्याच्या टोकावर उभी असून दुःखाच्या दरीत कोसळण्याच्या बेतात आहे. शिवाय, आपण, म्हणजे तिचा मुलगा अथवा मुलगी, तिच्या शेजारी उभे आहोत आणि तिला पडण्यापासून कसं वाचवायचं हे आपल्याला माहीत आहे, अशीही कल्पना त्यात असावी. आपण, तिच्या मुलांनी तिला वाचवलं नाही, तर कोण वाचवेल? त्या मदतीसाठी कोणाकडे बघतील? सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी तिला मदत करून तिच्या दयाभावाची परतफेड करण्याची कळकळीची इच्छा पूर्ण करण्यासाठी असे विचार सहायक ठरतात.

आपली इच्छा दृढ करण्यासाठी आपण साधनेमध्ये आणखी एक बदल करू शकतो. पुन्हा एकदा आपल्या जीवनातील पाच किंवा दहा वर्षांच्या कालखंडाचा विचार करावा आणि आपण आपल्या आईला कशा प्रकारे दयाभाव दाखवला ते तपासावं. आपले वडील, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, इत्यादींबाबतही असा विचार करून पाहावा.

आपल्याला किती प्रेम व मदत मिळाली आणि आपण किती प्रेम व मदत दुसऱ्यांना दिली याची तुलना केली, तर आपल्यापैकी बहुतेकांना असं जाणवेल की, आपण दिलं त्यापेक्षा कितीतरी अधिक आपल्याला मिळालं आहे. याचा अर्थ आपण अपराधी वाटून घ्यावं असा नाही. तसं केलं तर ते साचेबद्ध क्षीण मनोवृत्तीच्या पाश्चात्त्य प्रतिक्रियेसारखं होईल. बोधिचित्त साधनेच्या पुढील पायरीवर जाण्यासाठी आपल्याला मदत व्हावी, एवढाच यातला मुद्दा आहे. त्यासाठी आपल्याला मिळालेल्या दयाभावाची जाणीव ठेवावी, सखोल कृतज्ञतेची भावना विकसित करावी आणि दयाभावाची परतफेड करण्याची इच्छा राखावी.

आपल्याला खरोखर काहीतरी जाणवावं यासाठी आपलं हृदय हेलावण्यासाठी मी आत्ता नमूद केलेला साधनेतील बदल अतिशय उपयुक्त ठरतो. हे खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. प्रेम व करुणेची ही सर्व साधना करणारे आणि इतरांना मदतही करणारे अनेक पाश्चात्त्य बौद्ध मला माहीत आहेत, पण त्यांचे त्यांच्या पालकांशी भयंकर संबंध असतात आणि त्यात ते अडकून पडतात. त्या संबंधांबाबत काम करणं खरोखरच मदतीच ठरेल, असं मला वाटतं. हे संबंध अडचणीचे आहेत म्हणून त्यांना टाळू नये.

उपयोजनासाठी सुचवलेली पद्धत

आपल्या उपयोजनाची व्याप्ती सर्व जीवांपर्यंत विस्तारणं, त्यासाठी खुलं होण्याचा प्रयत्न करणं, हा या प्रत्येक पायरीमधील महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक पायरीवर आपण अर्थातच हळू पावलं टाकू शकतो, पण नंतर आपण आपली व्याप्ती विस्तारणं गरजेचं आहे. प्रत्येकाला व्यक्तिगत मानसिक सातत्याच्या रूपामध्ये पाहून समतोल वृत्तीच्या आधारे आपण हे करतो. ‘ज्ञानेंद्रियं असलेल्या सर्व जीवां’चा अमूर्त विचार करत, डोळे बंद करून बसलेल्या अवस्थेत साधना करणं, हा यासाठीचा परिणामकारक मार्ग नव्हे. समतोल भावना साध्य करण्याचे मार्ग मी संवेदनशीलतेच्या प्रशिक्षणात सुचवतो, त्यांच्यासारखं उपयोजन इथेही अधिक परिणामकारक ठरेल, असं मला वाटतं.

निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपले मित्र, आपल्याला न आवडणारे लोक आणि अनोळखी लोक यांच्या छायाचित्रांवर लक्ष केंद्रित करून या सकारात्मक प्रृवत्ती विकसित करण्याचा प्रयत्न सुरुवातीला करावा. त्यानंतर साधना गटामध्ये वर्तुळाकार बसलेल्या प्रत्यक्ष लोकांकडे बघून या प्रवृत्ती स्वतःमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर सब-वेमध्ये किंवा बसमध्ये असलेल्या लोकांच्याबाबतीत हा प्रयत्न करावा. अशा प्रकारे आपण विकसित करू पाहत असलेल्या सकारात्मक प्रवृत्तींचं इतरांबाबत उपयोजन करता येतं. 

त्याचप्रमाणे आपण हे प्राण्यांना, कीटकांना व इतर जीवांनाही लागू करण्याचा प्रयत्न करावा. केवळ आपल्या मनांमध्ये सैद्धान्तिकदृष्ट्या नव्हे, तर प्रत्यक्ष ते दिसतील तेव्हा हे उपयोजन करावं. असं करत असताना टोकाची स्थिती टाळायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तिबेटी बौद्धांमध्ये आपल्याला अशी टोकाची वृत्ती दिसते- त्यात मानवापेक्षाही कीटकाबद्दल दयाभाव राखण्याचा सोपा मार्ग पत्करलेला असतो. मंदिराच्या मध्यभागी एखादी मुंगी असेल, तर तिला त्रास होऊ नये याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक जण अगदी टोकाला जाईल. पण अनेकदा मानवांबाबत ते इतकी आस्था व दयाभाव दाखवत नाही. उदाहरणार्थ, त्यांच्या मंदिरांना भेट देणारे भारतीय किंवा परदेशी लोक तिथे काय दिसतंय ते जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्याबाबतीत अशी वृत्ती राखली जातेच असं नाही. इथे आपण योग्य परिप्रेक्ष्य राखायला हवं.

मानवाला मदत करण्यापेक्षा मुंगीची मदत करणं सोपं असतं, असं काही जण म्हणतील. कारण, मुंगी तुम्हाला उलटं बोलून सतावत नाही, पण लोक बरेचदा असं करतात. एखाद्या मुंगीला तुम्ही सहज उचलून बाहेर घेऊन जाऊ शकता, पण लोक त्रास देत असतील तर त्यांच्याबाबतीत असं करता येत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, बरेच लोक, अर्थात ज्ञानेंद्रिय असलेले सर्व जीव ही साधना अतिशय अमूर्त पद्धतीने करतात आणि “वास्तव जगा”मधल्या वास्तवातील लोकांसमोर त्याचं उपयोजन कधीही केलं जात नाही. यामुळे पुढील प्रगती साधण्याबाबत मोठी समस्या निर्माण होते.

महान प्रेम

प्रत्येक जण आपली माता राहिलं आहे हे लक्षात आल्यानंतर, मातृत्वप्रेमातील दयाभाव लक्षात ठेवल्यानंतर, आणि कृतज्ञतेने या दयाभावाची परतफेड करण्याचा विचार केल्यानंतर नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये हृदय हेलावून टाकणाऱ्या प्रेमाची भावना निर्माण होते. आपल्याला भेटणाऱ्या कोणाहीबाबत जवळीक व स्नेह वाटणारी ही भावना आपोआपच येते. ही भावना विकसित होण्यासाठी स्वतंत्र साधनेची पायरी चढण्याची गरज नसते. याला ममत्व बाळगणं, आस्थेवाईक प्रेम ठेवणं, दुसऱ्याबद्दल मनात बाळगलेलं प्रेम, असंही म्हणतात. त्याच्या किंवा तिच्या कल्याणाविषयी आपल्याला आस्था असते, आणि त्याचं किंवा तिचं काही वाईट झालं तर आपल्याला अतिशय दुःखी वाटतं.

हृदय हेलावणाऱ्या प्रेमावर आधारित चौथी पायरी आपण चढतो, ती महान प्रेमाची असते. दुसऱ्या कोणीतरी, सर्वसाधारणतः आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीने आनंदी असावं, यासाठीची इच्छा म्हणजे प्रेम. परंतु, महान प्रेम म्हणजे प्रत्येकाने आनंदी असावं आणि प्रत्येकाकडे आनंदी असण्याची कारणं असावीत अशी इच्छा. आनंद आणि त्याची कारणं हे दोन्ही खरंच खूप महत्त्वाचं आहे. आनंदामागे काही कारणं आहेत, केवळ देवाची कृपा किंवा सुदैव नाही- आणि हे कारण मी  नाही, याची पूर्ण जाणीव यामध्ये असते.

आनंदाची कारणे कर्मविषयक शिकवणुकीमध्ये दिलेली असतात: लोकांनी न गुंतता, न संतापता, रचनात्मक कृती केली, तर त्यांना आनंद अनुभवता येईल. त्यामुळे इथे आपण विचार करायला हवा की, “तुम्हाला आनंद मिळावा आणि आनंदाची कारणंही मिळावीत. तुम्ही रचनात्मक व सुदृढ पद्धतीने कृती करावी, जेणेकरून तुम्हाला आनंद अनुभवता येईल.”

प्रत्येकाला मदत करण्यासाठी, परंतु त्यांना मदत करण्यासंदर्भातील आपल्या भूमिकेला अवाजवी महत्त्व न देता, बुद्ध होण्यासाठीचा प्रयत्न या बोधिचित्त साधनेमधून आपण करतो आहोत, हे या पायरीवरून स्पष्ट व्हावं. आपण इतरांना मार्ग दाखवू शकतो, पण त्यांना स्वतःच्या आनंदाची कारणं स्वतःच तयार करावी लागतात.

महान करुणा

यानंतर पाचवी पायरी येते. ही महान करुणेची पायरी असते. प्रत्येकाने दुःखापासून व दुःखाच्या कारणांपासून मुक्त होण्याची इच्छा ठेवावी. आपल्या दुःखामागे काही कारणं आहेत आणि दुःखाचं उच्चाटन करण्यासाठी या कारणांचं उच्चाटन करणं गरजेचं आहे, या पूर्ण समजुतीमधून हे घडतं. इथेही अतिशय वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागतो. महान प्रेम व महान करुणा या केवळ भावना नाहीत- “प्रत्येकाला दुःख भोगावं लागतं, याचं मला खूप वाईट वाटतं”, एवढ्यापुरतंच हे नाही. उलट, वर्तनाशी संबंधित कार्यकारणभावाच्या समजुतीची जोड या महान प्रेमाला व महान करुणेला असते.

महान करुणा अनेक मार्गांनी सर्वसामान्य करुणेच्या पुढे जाते.

  • केवळ काही जीवांबद्दल नव्हे, तर सर्व मर्यादित जीवांबद्दल समानतेने वाटणारी ही करुणा असते.
  • महान प्रेमाप्रमाणे इथेही प्रत्येक जीवाबद्दल ममत्व व आस्था वाटते, आपल्या एकमेव मुलाबद्दल प्रेमळ मातेला वाटते तशी ही भावना असते, आणि इतर जीवांच्या संरक्षणाची व सुरक्षिततेची भावनाही त्यात असते.
  • त्यांच्यातील प्रत्येकाने वारंवार व अनियंत्रित पद्धतीने पुनर्जन्म होण्याच्या सर्वव्यापी दुःखापासून मुक्त व्हावे, अशी ही इच्छा आहे. एकंदरित जमा गोंधळातून येते, गोंधळातच ती मिसळते, त्यातून आणखी गोंधळ निर्माण होतो, आणि दुःखही सुरू राहतं. तर, इतरांनी वेदनेच्या दुःखापासून किंवा बदलाच्या दुःखापासून मुक्त व्हावं, एवढीच ही इच्छा नाही. बदलाचं दुःख हे सर्वसामान्य ऐहिक आनंदाचं असतं, ते कधीही टिकत नाही आणि कधीही त्याचं समाधान होत नाही. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी जीवांनी नंदनवनात जावं, ही इच्छा म्हणजे महान करुणा नव्हे.
  • सर्व मर्यादित जीवांना सर्वव्यापी दुःखापासून मुक्ती मिळवणं शक्य आहे, या ठोस निश्चयावर ही करुणा आधारलेली असते. ही केवळ सदिच्छा नसते.

करुणा ही सर्वसंगपरित्यागाशी साधर्म्य सांगणारी प्रवृत्ती आहे, असं वर्णन अनेकदा केलं जातं, मुक्त होण्याचा निर्धार त्यात असतो. सर्वसंगपरित्याग ही प्रवृत्ती आपल्या दुःखाला, त्याच्या कारणांना आणि त्यापासून मुक्त होण्याच्या इच्छेला लक्ष्य करणारी असते. आपली स्वतःची दुःख व त्यांची कारणं यांच्यापासून मुक्त होण्याच्या आपल्या निश्चयाच्या आधारे आपण इतरांविषयी सहानुभूती साध्य करू शकतो. ती प्रवृत्ती बदलून इतरांच्या दिशेने वळवणं, त्यांच्या दुःखाकडे आणि त्यांच्या दुःखाच्या कारणांकडे वळवणं, हे करायला हवं. आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळावी हे आपल्याला जितक्या उत्कटतेने वाटतं, तितक्याच उत्कटतेने इतरांच्या दुःखमुक्तीविषयीची इच्छा आपल्याला वाटायला हवी. 

आपण स्वतःच्या दुःखाविषयी विचार करत नाही आणि त्यापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवत नाही, तोपर्यंत इतरांविषयी खऱ्या अर्थाने सहानुभूती व करुणा वाटणं अवघड आहे, असं नेहमी म्हटलं जातं. इतरांना त्यांच्या दुःखाची वेदना खरोखरच अनुभवावी लागते आणि आपल्या दुःखाने आपण व्यथित होतो, तसंच तेही दुःखाने व्यथित होतात, हे आपण समजून घ्यायला हवं. आपलं स्वतःचं दुःख व्यथित करणारं आहे, हे मान्य करण्यावर ही समजूत आधारलेली आहे. अन्यथा, इतरांचं दुःख आपल्याला गांभीर्याने जाणवत नाही. आपल्याशी दयाभावाने वागलेल्या मातांनी आनंदी राहावं आणि दुःखापासून त्यांना मुक्ती मिळावी, अशी इच्छा आपण ठेवतो आहोत, हे लक्षात घ्या.

स्वाभिमान वाढवण्यासाठी मदत करणारी पद्धती पुढे देणं

आपण दुःखापासून व त्याच्या कारणांपासून मुक्त व्हावं, अशी इच्छा आपल्याला वाटली, तरच प्रामाणिक करुणा विकसित होते, असं संहितांमध्ये म्हटलं आहे, त्याचप्रमाणे प्रेमाबाबतही असंच तत्त्व तयार करता येईल, असं मला वाटतं. आपल्यापैकी जे लोक स्वाभिमानाच्या अभावाला सामोरं जातात, त्यांच्याबाबतीत हे विशेषकरून प्रस्तुत ठरतं. स्वाभिमान कमी असणं, हे खास पाश्चात्त्य घटित आहे, ते तिबेटी लोकांमध्ये किंवा अगदी भारतीयांमध्येही फारसं आढळत नाही. इतरांनी आनंदी असावं आणि त्यांच्याकडे आनंदाची कारणं असावीत, अशी आपली प्रामाणिक इच्छा निर्माण होईपर्यंत, आपण स्वतः आनंदी असण्याची व आनंदाची कारणं आपल्याकडे असण्याची गरज आहे. आनंदी राहण्यास आपण पात्र नाही, असं आपल्याला वाटत असेल, तर इतर कोणी आनंदी होण्यास पात्र कसं ठरेल?

तर, आपण आनंदी व्हावं ही इच्छासुद्धा साधनेतील एक पायरी आहे आणि आपल्यात स्वाभिमानाचा अभाव असेल, तर ही पायरी आपण चढायला हवी, असं मला वाटतं. हे खरंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण आनंदी राहण्यास पात्र आहे, असा विचार करण्यासाठी आपल्याला बुद्ध-स्वभावाची मदत होते. आपण पूर्णपणे वाईट नाही; कोणीच पूर्णपणे वाईट नसतं. आपल्या सर्वांमध्ये बुद्ध होण्याचं सामर्थ्य आहे, इतरांना लाभदायक होण्याचं, आनंदी होण्याचं सामर्थ्य आहे.

दुसरा मुद्दा: थेरवाद व इतर हिनयान पंथांमध्येही प्रेम व करुणा साध्य करता येतात. परंतु, साधनापद्धतींमध्ये श्रेणीबद्ध पायऱ्या नाहीत. मातृत्वप्रेम लक्षात घेणं, इत्यादींसारख्या विवेकावर आधारित पायऱ्यांद्वारे प्रेम व करुणेची भावना निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्या सात भागांची पद्धती इथे सांगितली आहे, तसं त्या पंथांमध्ये नाही. पण थेरवाद परंपरेमध्ये प्रेम व करुणा यांच्याशी संबंधित साधना नसते, असं आपण मानू नये. फक्त बोधिचित्त साधनेतील पुढील पायऱ्या त्या परंपरेत नाहीत.

अपवादात्मक निश्चय

निरनिराळे भाषांतरकार पुढच्या सहाव्या पायरीचं वर्णन वेगवेगळ्या मार्गांनी करतात. काही जण त्याला “विशुद्ध स्वहीन इच्छा” म्हणतात. परम पूज्य दलाई लामा “वैश्विक जबाबदारी” अशी संज्ञा वापरतात. मी स्वतःसुद्धा निरनिराळ्या मार्गांनी याचं भाषांतर केलं आहे, पण या क्षणी मी “अपवादात्मक निश्चय” ही संज्ञा स्वीकारतो आहे. महान करुणेद्वारे इतर जीवांना मदत करण्याची आपली पूर्ण इच्छा असते व आपला तो हेतू असतो. आपण ते करूच, असा ठाम निर्णय इथे आपण करतो. इतरांच्या दुःखाबाबत काहीतरी प्रत्यक्षात करायची जबाबदारी इथे आपण स्वीकारतो. कोणीतरी तलावात बुडत असेल, तर आपण फक्त किनाऱ्यावर उभे राहून “अरेरे, अरेरे, हे व्हायला नको होतं” असं म्हणत बसत नाही. आपल्याला प्रत्यक्षात तलावामध्ये उडी मारून त्या व्यक्तीची मदत करावी लागते. त्याचप्रमाणे बोधिचित्त साधनेमध्ये, अशा सर्व जीवांची शक्य तेवढी मदत करायची वैश्विक जबाबदारी घ्यायचा पूर्ण निर्णय आपण घेतो.

बोधिचित्ताचं ध्येय

या सहा पायऱ्यांच्या विकासक्रमाचा आधार कारण म्हणून घेतल्यावर त्याचा परिणाम म्हणून सातवी पायरी बोधिचित्त साध्य करण्याची असेल. आपल्या विद्यमान मर्यादा आणि अस्वस्थकारक भावना व प्रवृत्ती यांच्यासह इतरांचा आपण अधिकाधिक लाभ कसा करून देऊ शकतो, याची तपासणी केली असता आपल्या लक्षात येतं की, आपण फारशी मदत करण्यासाठी खरोखरचे सक्षम होणार नाही. मी स्वार्थी असेन, उतावीळ असेन, काही लोकांकडे आकर्षित होत असेन आणि काही लोकांवर संतापत असेल, मी आळशी असेन आणि कायम थकून जात असेन, मला खऱ्या अर्थाने इतरांना समजून घेता येत नसेल, आणि मला योग्य रितीने संवाद साधता येत नसेल, मला इतरांची भीती वाटत असेल, मी लोकांना आडणार नाही किंवा नाकारला जाईन अशी भीती मला वाटत असेल- तर या सगळ्या गोष्टींमुळे मला इतरांना मदत करण्यापासून प्रतिबंध घातला जाईल. मला स्वतःवर खरोखरच काम करावं लागेल आणि या गोष्टींपासून फारकत घ्यावी लागेल, तरच मी माझी गुणवत्ता, क्षमता व बुद्ध-स्वभावातील गुण इतरांच्या शक्य तितक्या लाभासाठी प्रत्यक्षात वापरू शकेन. “शक्य तितकं”, हे आपण कायम मनात ठेवायला हवं. आपण काही अमर्याद शक्ती असलेले देव होणार नाहीयोत. या विचारधारेवर आपण स्वतःची मनं व हृदयं बुद्ध होण्यासाठी तयार करतो आणि त्यातून इतरांना शक्य तितकी मदत करतो. बोधिचित्ताचं ध्येय साध्य करणं म्हणजे हेच. याद्वारे आपण अजून घडत नसलेल्या व्यक्तिगत साक्षात्कारावर लक्ष केंद्रित करतो, हे ध्येय शक्य तितक्या लवकर साध्य व्हावं अशी पूर्ण इच्छा राखतो आणि ते साध्य झाल्यावर इतरांची मदत करण्याची इच्छा ठेवतो.

बोधिसत्वाचं आचरण

बोधिचित्त साध्य झाल्यानंतर आता आपण, आपल्या मर्यादांसह, इतरांना मदत करायचा प्रयत्न करावा. बोधिचित्त साधनेच्या आधीच्या सात भागांच्या कार्यकारण पायऱ्यांच्या आधारावर आपण मदत करण्याची जबाबदारी घेतलेली आहे, त्यासाठीचा अपवादात्मक निश्चय केलेला आहे. 

त्यामुळे आपण इतरांना सामोरं जाऊ तेव्हा ते काही अडचणीत असल्याचं दिसलं- उदाहरणार्थ, ते बेघर असतील, तर त्या केवळ बेघर व्यक्ती आहेत, असं आपण पाहणार नाही. आपण त्यांना पाहू तेव्हा ते अंगभूतरित्या गरीब व आळशी आहेत असं आपण मानणार नाही किंवा कोणत्याही कथित मूल्यनिवाड्याच्या वाटेला जाणार नाही. उलट, फक्त या जीवनकाळामध्ये, या जीवनकाळातील या विशिष्ट टप्प्यावर ते असे आहेत, हे आपल्या लक्षात येईल. त्या लोकांचं मानसिक सातत्य आरंभहीन आहे आणि कोणत्या तरी काळी ते आपली माता राहिलेले आहेत आणि त्यांनी दयाळूपणे आपली काळजी घेतलेली आहे. त्यांनी आपल्याला त्यांच्या गर्भात सांभाळलेलं आहे, आपले घाण डायपर बदललेले आहेत, इत्यादी आपण लक्षात घेऊ. त्यांच्याबद्दल आपण खरोखरचे कृतज्ञ राहू आणि त्यांच्या दयाभावाची परतफेड करू. ते आनंदी राहावेत, त्यांना आनंदाची कारणं लाभावीत आणि ते त्यांच्या अडचणींपासून व अडचणींच्या कारणांपासून मुक्त व्हावेत, अशी आपली इच्छा राहील. त्यासाठी काहीतरी करायची जबाबदारी आपण स्वीकारू.

आपण काय करायला हवं? आपल्या कमतरतांवर मात करण्यासाठी आपण घरी जाऊन साधनेला बसावं आणि अशा लोकांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात काहीच न करणं, हा यावरचा मार्ग नव्हे. आपण अर्थातच साधना जास्त करायला हवी, पण त्या क्षणी आपल्याला स्वतःच्या भिडस्तपणावर, अवघडलेपणावर, कंजुषपणावर मात करायची प्रेरणा व्हायला हवी, किमान त्या लोकांकडे बघून स्मित करता यायला हवं- किमान काहीतरी करता यायला हवं.

निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपण आपला अपवादात्मक निश्चय वापरून, त्या क्षणी स्वतःच्या मर्यादांवर मात करून कार्यप्रवृत्त होतो, आपल्याला शक्य तितकी कृती करतो आणि आपल्याला शक्य असेल तितकी मदत करण्यासाठी आपलं सामर्थ्य वापरतो. घरी गेल्यानंतर आपल्याला स्वतःवर जास्त काम करायला लागेलच, पण त्या बेघर लोकांचा आपल्याला विसर पडू नये आणि निव्वळ घरी जाऊन साधना करणं पुरेसं वाटू नये. आपला निश्चय प्रामाणिक असेल, तर त्याने आपण जागरूक राहतो.

इतर गरजू जीव दिसल्यावर आपल्याला प्रत्येक क्षणी स्वतःवर अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. एखाद्या रेल्वेस्थानकावर हिवाळ्यात थंड जमिनीवर बसून भीक मागणारी म्हातारी स्त्री आपल्याला दिसते आणि ती आपली आई असती तर काय, असा विचार आपण करतो? ती या जीवनकाळातील आपली प्रत्यक्ष आई असती आणि तिथे थंड जमिनीवर बसून भीक मागत असती, तर आपण तसेच पुढे चालत गेलो असतो का? किंवा, त्याच स्थानकावर बेघरांच्या कामचलाऊ वर्तमानपत्रांची विक्री करणाऱ्या तरुणाचं काय- तो आपलाच मुलगा असता तर आपल्याला कसं वाटलं असतं? या मुलाचे आईवडील आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. भारतामध्ये आपल्याला कुष्ठरोगी व इतर अपंग लोक दिसतात आणि या कुष्ठरोग्यांना कुटुंबं आहेत असा विचार आपण सर्वसाधारणतः करतो. त्यांना कुटुंबं असतातच. त्यांना मानव माना.

या बेघर लोकांच्या रूढ परिस्थितीमधील भेद समजून घेण्यासाठीची जागरूकता आपल्यामध्ये अर्थातच असायला हवी. काही लोक अंमली पदार्थ किंवा दारू विकत घेण्यासाठी पैसे लाटण्याकरिता रस्त्यांवर घुटमळत असतात. अशा वेळी आपण “कुशल साधनं” ही बौद्धविचारातील संकल्पना वापरायला हवी. मदत करण्याची आपली इच्छा आहे, त्यांच्या दुःखाचं कारण काय आहे याची काहीएक कल्पना आपल्याला आहे आणि त्यांच्या आनंदाचं कारणही आपल्याला माहीत आहे. मग आपण त्यांना मदतीचं ठरेल ते करायचा प्रयत्न करतो. त्यांना पैसे देणं कदाचित अजिबातच मदतीचं ठरणार नाही. ते त्या पैशातून आणखी अंमली पदार्थ किंवा दारू विकत घेतील, त्यामुळे आपण त्यांना पैसे देऊ नयेत. आपल्याकडे काही अन्न असेल, तर ते त्यांना द्यावं. काहीही झालं तरी आपण त्यांना आपल्या सेवाभावी प्रवृत्तीने वागणूक देऊ शकतोच आणि ते केवळ भयंकर, किळसवाणे दारुडे आहेत असा विचार न करता त्यांना आदर देऊ शकतो. ते मानव आहेत, दुःखाला सामोरं जाणारे मानव आहेत, हे समजून घेऊ शकतो.

कोणाला मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग कुठला, हे ठरवणं सोपं नाही. आपली मर्यादा असल्याचं आपल्या आता लक्षात येतं. सर्वोत्तम काय आहे, हे आपल्याला खऱ्या अर्थाने कळत नाही. खऱ्या अर्थाने कळून घेण्यासाठी आपल्याला बुद्ध व्हावं लागेल, पण आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो, काही वेळा आपल्या चुका होतील हे लक्षात घेऊन आपण प्रयत्न करतो. आपण किमान प्रयत्न तरी करतो.

सारांश

सात भागांच्या कार्यकारणभावात्मक साधनेच्या प्रशिक्षणाद्वारे आपण बोधिचित्ताचं ध्येय साध्य केलं की, आपल्याला सक्षम भावनिक स्थिती लाभते, त्यात अनेक व्यक्तिगत भावनांचा मिलाफ होतो आणि इतरांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी बुद्धत्व प्राप्त व्हायचं आपलं ध्येय समोर असतं. प्रत्येकासोबत समान जवळीक व समान जोडलेपण वाटणं, इतरांच्या दयाभावाची दखल घेणं, सखोल कृतज्ञता बाळगणं, आस्था, प्रेम व करुणा बाळगणं, शिवाय इतरांना शक्य तितकी मदत करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा ठाम निश्चय करणं- यांचा यात समावेश होतो. अशा प्रकारची भावना अंतःप्रवाहाच्या रूपात असेल, तर आपलं बोधिचित्ताचं ध्येय सक्षम होतं, मनःपूर्वक ठरतं आणि स्थिर होतं.

Top