विचारांना शांत करणे

08:26
संकल्पनात्मक विचार ही अपरिहार्य अशी बाब आहे. जर तसे झाले नाही तर दुकानात गेल्यानंतर सफरचंद कोणते आणि नासपती कोणते असा वस्तूंमधला भेद आपण करूच शकणार नाही. किंवा ‘मला या कार्यक्रमाची दोन तिकिटे द्या’ अशा वाक्यांचासुद्धा विचार करू शकणार नाही. त्यामुळे संकल्पनात्मक विचार हे आपल्याला दैनंदिन आयुष्यात गरजेचे आहेतच. परंतु काही वेळेस तेच अडथळाही बनू शकतात. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, ध्यान करताना मन एकाग्र करीत असताना आपल्याला मनात सारखे उठणारे विचार आणि आपल्याला ज्यांचा अनुभव येत असतो अशा सर्व पूर्वकल्पना शांत करणे गरजेचे असते.

मन शांत करणे

आपल्याला एकाग्रता प्राप्त करायची असेल तर अगोदर मन शांत करावे लागते. त्यामुळे काही ध्यान प्रक्रियांमध्ये सांगतात त्यानुसार, आपण मनाच्या अधिक नैसर्गिक अवस्थेमध्ये येतो. परंतु अधिक स्पष्ट करून सांगायचे तर, आपल्याला विचारहिन, झोंबीसारखे मन अशी अवस्था किंवा एखाद्या बंद केलेल्या रेडिओसारखी अवस्था प्राप्त होणे इथे अपेक्षित नाही. जर अशी अवस्था असेल तर त्यापेक्षा शांतपणे केवळ झोप घेणे केव्हाही श्रेयस्कर. आपल्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या  सर्व गोष्टींपासून मुक्त होणे हे आपले ध्येय आहे. काही भावना या अतिशय अस्वस्थ करणाऱ्या असतात. निराश होणे, चिंताक्रांत होणे, घाबरून जाणे अशा काही. आपले लक्ष्य या सगळ्यांमधून बाहेर पडून शांत होणे हे आहे. 

आपण जेव्हा आपले मन शांत करतो, आपल्या मनाची अवस्था ही सुस्पष्ट आणि जागृत असते. त्यामध्ये आपण काही प्रमाणात प्रेम आणि समजूतदारपणाही आणू शकतो. किंवा नैसर्गिकरित्या आपल्या सर्वांमध्ये असणारी मानवी उबही आणू शकतो. त्यासाठी अतिशय सखोल अशी शिथिलतेची अनुभूती देणारी विश्रांती गरजेची आहे. केवळ शरीरातील स्नायूच नव्हे तर आपल्या मानसिक आणि भावनिक बद्धतेलाही रोखून आपण नैसर्गिक उब अनुभवतो आणि मनाच्या पातळीवरची स्पष्टताही अनुभवास येते किंवा इतर काहीही स्पष्टपणे जाणवते. 

काही जण ध्यानाचा चुकीचा अर्थ घेतात. त्यांना वाटते की ध्यान म्हणजे विचारांना थांबवणे. किंबहुना, विचारांना थांबवणे यापेक्षा ध्यानामुळे अतिरेकी, अनावश्यक असणारे विचार थांबायला हवेत. जसे की, भविष्याविषयी अस्वस्थ करणारे विचार (मला रात्री जेवायला काय मिळणार आहे?) आणि नकारात्मक विचार (तू माझ्याशी काल खूप वाईट वागलास. तू एक अतिशय भयानक व्यक्ती आहेस.) अशा प्रकारचे सगळे विचार हे मनाला वाहवत नेणारे आणि अस्वस्थ करणारे विचार आहेत. 

मन शांत असणे हे एक साधन आहे. ते अर्थातच अंतिम लक्ष्य नाही. जेव्हा आपले मन अधिक शांत, सुस्पष्ट आणि अधिक खुले असते तेव्हा आपण त्याचा अधिक चांगल्या रीतीने वापर करू शकतो. आपण त्याचा दैनंदिन जीवनात प्रभावीपणाने वापर करू शकतो. त्यामुळे आपण जेव्हा ध्यान करू तेव्हा आयुष्यातील परिस्थितीविषयी अधिक समजूतदार आकलन आपल्याला होऊ शकते. जेव्हा अस्वस्थ करणाऱ्या भावनांपासून आणि बाह्य विचारांपासून मन मुक्त असते तेव्हा आपण महत्त्वाच्या विषयांचा अधिक सुस्पष्टतेने विचार करू शकतो. जसे की, ‘मी माझ्या आयुष्यात नक्की काय करतो आहे? महत्त्वाच्या नातेसंबंधांच्या बाबतीत नक्की काय घडते आहे? हे चांगले आहे की वाईट?’ आपण त्याचे योग्य पद्धतीने विश्लेषण करू शकतो. त्यालाच आत्मपरीक्षण असे म्हणतात. त्यामुळे असे सर्व विषय साकल्याने समजून घेण्यासाठी आणि भविष्यात उपयुक्त ठरेल असे आत्मपरीक्षण करू शकण्यासाठी आपल्याला सुस्पष्टता आवश्यक असते. आपले मन अतिशय स्थिर, शांत असावे लागते आणि ती स्थिती प्राप्त होण्यासाठी ध्यान हेच महत्त्वपूर्ण साधन आहे.

संकल्पनात्मक आणि संकल्पनाविरहित अशी मनाची अवस्था 

संकल्पनात्मक विचारांच्या बंधनातून स्वत:ला मुक्त करून आणि संकल्पनाविरहित अवस्थेमध्ये स्थिर व्हावे असे आपल्याला अनेक ध्यानाच्या पद्धतींमध्ये सुचवलेले असते. सर्वप्रथम, ही सूचना सर्व ध्यानप्रकारांना लागू होत नाही. वास्तवावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आधुनिक ध्यानपद्धतीमध्येच या सूचनेचा प्राधान्याने विचार होतो. संकल्पनात्मक पातळीवर हे निश्चित आहे की सर्व प्रकारच्या ध्यानाद्वारे आपल्याला विचारांच्या बंधनातून मुक्त व्हायचे असते. परंतु संकल्पनांचे विविध प्रकार समजून घेण्यासाठी ध्यानाच्या प्रक्रियेत ते सविस्तर दिलेले आहेत. बौद्ध धर्मामध्ये ‘संकल्पनात्मक’ याचा अर्थ नेमका काय आहे हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. केवळ आपल्या डोक्यामध्ये घुमणारे आवाज म्हणजे संकल्पनात्मक विचार नव्हे. काही लोक असा विचार करतात की, दररोजच्या जगण्यामध्ये आपल्या मनामध्ये जे सामान्यतः विचार येतात त्यांना संकल्पनात्मक विचार म्हणता येऊ शकेल. थोडक्यात ज्याला आपल्या डोक्यात येणारे आवाज म्हटले जाते ते. त्यामुळे संकल्पनाविरहित म्हणजे अर्थातच ते आवाज शांत करणे असा अर्थ घेतला जातो. आपल्या डोक्यात जे आवाज सुरू असतात ते शांत करणे ही खरे तर फक्त सुरुवात आहे. तितकीच महत्त्वाची अशी सुरुवात. परंतु ती केवळ पहिली पायरी आहे. बाहेरच्या अस्वस्थ करणाऱ्या विचारांपासून आपले मन शांत करून अतिशय स्थिर आणि शांत मनाची अवस्था प्राप्त करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. इतर काही लोकांच्या मते, जर खरोखर तुम्हाला काही समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला ते संकल्पनाविरहित पद्धतीनेच समजून घेणे गरजेचे असते. संकल्पनात्मक विचार आणि योग्यरीतीने समजून घेणे हे परस्परांना सामावून घेणारे असते. हीसुद्धा ती परिस्थिती नाही. 

संकल्पनेसंदर्भातील गुंतागुंत कमी करण्यासाठी, एखादी गोष्ट समजून घेतल्यानंतर आपण जेव्हा विचारांतून त्याला शब्दरूप देतो त्यामध्ये विभागणी करणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट समजून घेऊन अगर समजून न घेता आपण आपल्या विचारांमध्ये त्याला शब्दरूप देऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादी परदेशी भाषेतील प्रार्थना आपण तिचा अर्थ काय आहे हे समजून न घेता ती पाठ करून म्हणू शकतो. त्याचप्रमाणे, मनामध्ये एखाद्या संकल्पनेची उकल शब्दांनी न करता देखील आपण मनाच्या पातळीवर काही गोष्टी समजून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, प्रेमात असल्यानंतर आपल्या मनाला जाणवणारी भावना. 

ध्यानामध्ये संकल्पनात्मक आणि संकल्पनाविरहित विचारांचा मुद्दा विचारात घेताना हे लक्षात घ्यायला हवे, की यामध्ये काही समजून घेण्याचा किंवा न समजून घेण्याचा मुद्दाच नाही. संकल्पनात्मक असो किंवा संकल्पनाविरहित अथवा एखाद्या गोष्टीला आपण शब्दरूप देऊ शकलो नाही तरीही ध्यानामध्ये त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नेहमीच समजूतदारपणा ठेवावा लागतो. काही वेळेस हे शब्दरूप देणे उपयुक्त ठरते. तर काही वेळेस त्याचा काहीही उपयोग नसतो किंवा कधीही त्याची गरजसुद्धा नसते. उदाहरणार्थ, तुमच्या बुटाची लेस बांधत असताना बुटाची लेस कशी बांधायची असते हे तुम्हाला माहित असते. त्यामुळे ती लेस आणि ती कशी बांधायची याला शब्दरूप देण्याची गरज असते का? नाही. किंबहुना, मला तर असं वाटतं, की आपल्यातील बहुतांश लोकांना बुटाची लेस कशी बांधायची हे शब्दांतून सांगायची वेळ आली तर ते अधिक अवघड जाईल. त्यामुळे आपल्याला त्याची समज असणे पुरेसे असते. ती समज असल्याखेरीज आपण आयुष्यात काहीही करू शकत नाही. करू शकतो का? आपण साधा दरवाजासुद्धा उघडू शकणार नाही. 

अनेक बाबींचा विचार केला तर मात्र शब्दरूप देणे हे उपयुक्तही ठरू शकते. इतरांशी संवाद साधताना आपल्याला शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. परंतु आपण विचार करीत असताना तिथे शब्द आवश्यक असतातच असे नाही, परंतु शब्दरूप देण्याची प्रक्रिया तटस्थ असते. याचा अर्थ ती उपयुक्तही ठरू शकते आणि विध्वंसकसुद्धा.

उदाहरणार्थ, आपण जेव्हा काही मंत्र वारंवार उच्चारतो तोसुद्धा शब्दांचाच प्रकार असून त्यामध्ये आपण विशिष्ट पद्धतीने शब्दांचा उच्चार करून ती लय आपल्या मनामध्ये ठसवत असतो. मंत्रोच्चारांची ती वैशिष्ट्यपूर्ण लय अतिशय उपयुक्त ठरते. आपल्या मनाची एक विशिष्ट स्थिती टिकून राहण्यासाठी अशा मंत्रोच्चारांची मदत होते.  उदाहरणार्थ, करुण आणि प्रेम मनामध्ये निर्माण करीत असताना तुम्ही जर ओम मनी पद्मो हम हा मंत्र सातत्याने गुणगुणत असाल तर प्रेमाच्या अवस्थेवर केंद्रित राहणे अधिक सोपे होऊन जाते. मानसिक स्तरावर काहीही न बोलतासुद्धा आपण नक्कीच लक्ष केंद्रित करू शकतो. त्यामुळे शब्दरूप देणे ही काही समस्या नाही. दुसऱ्या बाजूला, जेव्हा लोक अगदी अनावश्यक बडबड करीत असतात तेव्हा आपल्याला आपले मनही शांत ठेवायचे असते. 

संकल्पनात्मक विचार म्हणजे मेंदूमध्ये गोष्टींची विभागणी करणे 

जर संकल्पनात्मक विचार ही गोष्ट शब्दांशी किंवा समजुतीशी संबंधित नसेल तर मग मुद्दा काय आहे? संकल्पनात्मक मन म्हणजे काय आणि आपण बंधनातून मुक्त व्हायचे आहे असे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या ध्यानातील सूचनेचा नेमका अर्थ काय होतो? ध्यानाच्या सर्व टप्प्यांवर आणि पायऱ्यांवर ही सूचना आवश्यक असते का? त्याचप्रमाणे दैनंदिन आयुष्यातही आवश्यक असते का? या मुद्द्यांबाबत सुस्पष्टता येणे आवश्यक आहे. 

संकल्पनात्मक मन म्हणजे आपल्या विचारांची विविध प्रकारांमध्ये विभागणी करणे, थोडक्यात प्रत्येक गोष्टीसाठी एक स्वतंत्र खोका तयार करणे. जसे की, चांगले किंवा वाईट, काळे किंवा पांढरे, कुत्रा किंवा मांजर.

आता जेव्हा आपण बाजारात खरेदीसाठी जातो तेव्हा आपल्याला अर्थातच सफरचंद आणि संत्रे यांच्यामध्ये भेद करता यायला हवा. किंवा कच्चे फळ आणि पिकलेले फळ हे सुद्धा कळायला हवे. अशा दैनंदिन गरजांमध्ये अशा पद्धतीने विभागणी करून विचार करण्यात काहीच गैर नाही. परंतु त्यामध्ये इतर काही प्रकार आहेत तिथे मात्र ही समस्या ठरते. त्यातीलच एका प्रकाराला आपण पूर्वकल्पना असे म्हणतो. 

पूर्वकल्पनेचे उदाहरण द्यायचे झाले तर, आपण नेहमी माझ्याशी वाईट, दुष्ट हेतू ठेवूनच वागत आला आहात. तुम्ही एक भयानक व्यक्ती आहात कारण भूतकाळात तुम्ही अमुक केले आहे आणि ते केले आहे. आणि आताही मी सांगू शकतो की काहीही झाले तरीही भविष्यातही तुम्ही एक भयानक व्यक्तीच राहाल. यामध्ये आपण अगोदरच ठरवून टाकलेले आहे की ही व्यक्ती भयानक आहे. आणि अर्थातच आपण जर या पद्धतीने विचार केला आणि आपण मनात एखाद्या व्यक्तीची अशी प्रतिमा तयार करून ठेवली की हा व्यक्ती दुष्ट हेतू ठेवून वागणारा आहे आणि तो कायमच माझ्याबाबतीत भयानक वागत राहणार आहे. तर अशा परिस्थितीत ती व्यक्ती आणि आपल्यामध्ये एक मोठेच अंतर पडते. आपल्या पूर्वकल्पनेचा आपण त्या व्यक्तीशी कसे जोडले जातो यावर खूप परिणाम होत असतो. त्यामुळे पूर्वकल्पना ही मनाची अवस्था महत्त्वाची असते त्यामध्ये आपण विभागणी करतो आणि त्यानुसार विविध गोष्टी विभागणी करून मेंदूमध्ये साठवतो. 

संकल्पनाविरहित होण्यासाठी...

संकल्पनाविरहित अवस्थेच्या अनेक पातळ्या अस्तित्वात आहेत. त्यातील एक पहिली सोपी पातळी म्हणजे जशी परिस्थिती समोर येते ती खुल्या मनाने स्वीकारा. आता असे करीत असताना आपल्या सर्व सकंल्पनात्मक समजुती सोडून द्याव्या असे अजिबात नाही. उदाहरणार्थ, जर एखादा कुत्रा आजूबाजूच्या अनेक लोकांना चावलेला असेल तर कुत्रा चावतो ही संकल्पना मनात रुजलेली असल्याने आपण त्या कुत्र्यापासून अधिक सावधानता बाळगतो आणि स्वत:ला त्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो. आपण त्या प्राण्याच्या संदर्भात आवश्यक ती सावधगिरी जरुर बाळगतो, परंतु अशा वेळी आपण पूर्वकल्पना करीत नाही. जसे की, कुत्रा मला निश्चितपणे चावू शकेल त्यामुळे मी त्याच्या जवळसुद्धा जाण्याचा प्रयत्त्न करणार नाही. समोर जशी परिस्थिती असेल तिचा आहे तसा स्वीकार करणे आणि त्याचवेळी कोणत्याही पूर्वकल्पना उराशी न बाळगल्याने आपण त्या परिस्थितीचा अगोदरच अनुभव घेत नाही, यामध्ये एक संतुलन राखणे महत्त्वाचे ठरते. 

संकल्पनाविरहित अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या ध्यानप्रक्रियांमध्ये पूर्वकल्पनेपासून आपण मुक्त असले पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन करण्यात आलेले आहे. 

एक महत्त्वाची सूचना ध्यान करताना दिली जाते ती म्हणजे कोणत्याही अपेक्षेविना आणि कोणत्याही चिंतेविना ध्यान करणे महत्त्वाचे असते. ध्यानाच्या वेळी कदाचित पूर्वकल्पना केली जाऊ शकते. माझे ध्यानाचे सत्र अतिशय उत्तम रीतीने पूर्ण होणार आहे अशी अपेक्षाही केली जाऊ शकते किंवा मग माझे पाय दुखावले जातील अशी चिंताही असू शकते किंवा मला नीट यशस्वीरीतीने ध्यान जमणार नाही असा विचारही मनात येऊ शकतो. अशा प्रकारच्या अपेक्षा किंवा चिंता म्हणजेच पूर्वकल्पना असतात. त्यांना आपण शब्दरूप देऊ किंवा देणारही नाही. अशा प्रकारचे विचार तुमच्या पुढच्या ध्यानाच्या सत्रामध्ये मात्र तुमच्या मेंदूमध्ये जाऊन फिट्ट बसतात. एक विलक्षण  सुंदर अनुभव किंवा एक वेदनादायी अनुभव या प्रकारे आपण त्याची विभागणी मनात करून ठेवलेली असते.

संकल्पना किंवा विचाररहीत दृष्टिकोन म्हणजे जे काही घडते आहे त्याचा जसे आहे तशापद्धतीने साधेपणाने स्वीकार करणे आणि ध्यानाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार त्या परिस्थितीला हाताळणे. त्यावेळी त्या परिस्थितीविषयी कोणत्याही प्रकारच्या निष्कर्षावर न येणे महत्त्वाचे आहे. 

सारांश 

विविध प्रकारचे संकल्पनात्मक विचार समजून घेतल्याखेरीज ध्यानामध्ये किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये इतर सारे संकल्पनात्मक विचार हानिकारकच आहेत, असा चुकीचा ग्रह करून घेऊ शकतो. बहुतांश ध्यान प्रकारांमध्ये आपल्याला डोक्यातील सारे आवाज बंद करायचे असतात आणि सर्व पूर्वकल्पना सोडून द्यायच्या असतात. परंतु दीर्घकाळ ध्यानाचा सराव करणाऱ्या व्यक्तींचा अपवाद वगळता ती गोष्ट शब्दांत मांडली अथवा मांडली नाही तरीही आपल्यामधील आणि ध्यानाच्या बाहेरील काहीही समजून घेण्यासाठी एक विशिष्ट मनोवस्था प्राप्त करावी लागते.

Top