विध्वंसक वर्तनाची व्याख्या
नितीमूल्यांनुसार कृती करण्याच्या प्रत्येक पद्धतीमध्ये विध्वंसक वर्तनाचे काही प्रकार असतात. काय स्वीकारार्ह आहे आणि काय नाही यावर हे वर्तनाचे प्रकार आधारलेले असतात. धार्मिक किंवा नागरी व्यवस्था या प्रामुख्याने दैवी नियम, कुणीतरी प्रमुख शासनकर्ता किंवा काही प्रकारची विधीमंडळ स्वरूपाची रचना यांच्या माध्यमातून तयार झालेल्या असतात. जेव्हा आपण आज्ञेचे उल्लंघन करतो तेव्हा आपण दोषी ठरतो आणि आपल्याला शिक्षा देणे आवश्यक ठरते. जेव्हा आपण आज्ञाधारक असतो तेव्हा आपल्याला एकतर स्वर्गामध्ये त्याचे बक्षीस मिळते किंवा एक सुरक्षित आणि सौहार्दपूर्ण असा समाज आपल्याला लाभत असतो. मानवतावादी प्रणाली ही कोणत्याही प्रकाराने दुसऱ्याचे नुकसान होणार नाही यावर भर देते परंतु ते सुद्धा काहीवेळेस समस्या निर्माण करणारे ठरते. कारण आपण प्रत्येकवेळी एखादी बाब खरोखर दुसऱ्यांसाठी नुकसानकारक किंवा हितकारक आहे का हे ठरवू शकतो का? उदाहरणादाखल सांगायचे झाले तर एखाद्यावर दुसरा कुणी ओरडला तर कदाचित त्याने त्याच्या भावना दुखावू शकतात परंतु कदाचित ते ओरडणे एखाद्या पुढच्या धोक्यापासून वाचवणारेही ठरू शकते.
बौद्ध नीतीविचार हा आत्मविध्वंसक वर्तनापासून दूर राहण्यावर भर देतो. दीर्घकाळाचा विचार करता ज्या कृती आपल्यासाठी अहितकारक असतील आणि आपले नुकसान करतील त्यापासून दूर राहण्यावर भर देतो. वेडेपणाने आपल्या पुढे जाऊ पाहणाऱ्या गाडीच्या चालकावर आपण ओरडलो तर त्या क्षणापुरते आपल्याला बरे वाटेल परंतु त्यातून आपले मन अस्थिर होईल आणि आपल्या शरीरातील ऊर्जा विनाकारण जागृत होतील व त्यातून अंतिमत: आपले मन:स्वास्थ आपण हरवून बसू. जेव्हा आपण या ना त्या कारणाने ओरडण्याची सवय लावून घेऊ तेव्हा त्यानंतर कोणतीही असुविधाजनक परिस्थिती निर्माण झाली तर ती सहन करण्याची क्षमता आपण गमावून बसतो. त्यामुळे आपले इतरांशी असणारे संबंध तर बिघडतातच परंतु आपल्या आरोग्यावरही त्याचा विपरित असा परिणाम होतो.
दुसऱ्या बाजूला जेव्हा आपल्याला इतरांची खरोखर मनापासून काळजी असते, प्रेम, करुणा आणि समजुतदारपणा हे आपले स्वभावगुण बनतात तेव्हा आपल्याला एखाद्यावर ओरडावेसे वाटत असले तरीही आपण त्याच्यावर ओरडणे टाळतो. आपण त्या गाडीच्या चालकाला पुढे जाण्याची मुभा देतो तेव्हा परिणामस्वरूप त्या चालकाला मनापासून आनंद होतो आणि आपल्यालाही त्याचा लाभ होतो. आपण शांत आणि स्थिर राहतो. आपले मन:स्वास्थ चांगले राहून आपण शांत चित्त राहतो. आपण आपली ओरडण्याची आणि स्वत:ला अस्वस्थ करण्याची भावना अडवून धरत नाही. उलट, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्याची इच्छा असते हे आपण लक्षात घेऊ लागतो. त्याचबरोबर, प्रवासात आपण विनाकारण स्पर्धेत अडकण्यापासून दूर होतो आणि त्यातील खरी निरर्थकता आपल्या लक्षात येते.

बौद्ध धर्मात विध्वंसक वर्तनाची व्याख्या केलेली आहे. त्यानुसार, विचलित करणाऱ्या भावना आणि नकारात्मक सवयी यांच्या प्रभावाखाली येऊन जबरदस्तीने होणारी ती कृती असते. नक्की काय नुकसानकारक आहे आणि काय उपयुक्त ठरणारे आहे याची विभागणी आपण नेमकेपणाने करू शकत नाही कारण कदाचित आपल्याला सर्वोत्तम काय आहे हेच ठाऊक नसते किंवा कदाचित ते माहित असले तरीही आपल्यामध्ये स्व-नियंत्रणाचा पूर्णत: अभाव असतो. लोभ आणि क्रोध या सर्वाधिक विचलित करणाऱ्या भावना आहेत. जेव्हा या त्रासदायक भावनांचा प्रभाव असतो तेव्हा आपल्या कृती, बोलणे आणि विचार यांच्यावरही त्यांचा परिणाम होत असतो. या शिवाय, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आत्मसन्मानाचा अभाव असल्याची जाणीव होत राहते आणि त्यामुळे आपण कसे वागतो याची पर्वाही केली जात नाही. तरीही आपल्यामध्ये एक ताठा कायम राहतो. त्यामध्ये आपण इतर कोणत्याही महत्त्वाच्या बाबींना महत्त्व न देता वरवरच्या उथळ गोष्टींना महत्त्व देत राहतो. आपण कोणते आणि कसे कपडे घातलेले आहेत, आपले केस कसे दिसत आहेत आणि आपले मित्र कोण आहेत यांना अधिक महत्त्व दिले जाते. आपल्या संपूर्ण पिढीवर, आपल्या लैंगिकतेवर, राष्ट्रीयत्वावर, धर्मावर किंवा ज्यामुळे आपली ओळख असते त्या समूहावर आपल्या वागण्याचा काय परिणाम होणार आहे याची आपल्याला जराही पर्वा राहत नाही. आपण आत्माभिमान आणि आत्मसन्मान पूर्णपणे हरवून बसतो.