स्वत्वाचं इतरांसोबत समकरण आणि विनिमय

त्सेनझाब सरकॉंग रिंपोछे यांनी निधनाच्या दोन महिने आधी पुढील शिकवण डॉ. बर्झिन यांना सांगितली आणि काटेकोरपणे लिहवून घेतली. ही आपली सर्वांत महत्त्वाची शिकवण म्हणून जतन करावी, असंही त्यांनी सांगितलं. आपली स्वप्रेमाची प्रवृत्ती हा आपल्या दुःखांचा व समस्यांचा सर्वांत मोठा स्रोत असतो, त्यावर मात करण्यासाठीच्या साधनेचं तपशीलवार स्पष्टीकरण या शिकवणीत दिलं आहे. शिवाय, स्वप्रेमाची प्रवृत्ती सोडून त्याऐवजी इतरांवर प्रामाणिकपणे प्रेम करण्याची- सर्व आनंदाचा स्रोत असलेली- प्रवृत्ती विकसित कशी करावी, हेही इथे सांगितलं आहे.

बोधिचित्त- पूर्णतः इतरांना समर्पित मन- कसं साधायचं आणि इतरांना शक्य तितकं लाभदायक ठरण्यासाठी साक्षात्कार कसा साधावा, हे सांगणाऱ्या दोन परंपरा आहेत. सात भागांमधील कार्यकारणभावात्मक परंपरा आणि स्वतःबद्दलच्या व इतरांबद्दलच्या आपल्या प्रवृत्तीचं समकरण करणारी व विनिमय करणारी परंपरा, अशा या दोन परंपरा आहेत. पूर्वप्राथमिक भाग म्हणून आधीच समतोलवृत्ती साध्य करण्याचे वेगवेगळे किंवा भिन्न मार्ग या दोन्ही परंपरांमध्ये आहेत. दोन्हींमध्ये समतोलवृत्तीच साध्य होत असली, तरी ज्या प्रकारची समतोलवृत्ती साध्य होते ती वेगवेगळी असते.

  1. सात भागांच्या कार्यकारणभावात्मक साधनेमध्ये प्रत्येक जण आपली माता राहिल्याचं ओळखण्यापूर्वी समतोलवृत्ती साधायची असेल, तर एखादा मित्र, एखादा शत्रू व एखादी अपरिचित व्यक्ती डोळ्यांसमोर आणावी लागते. जवळीक व तिरस्कार या भावना थांबवणारी ही समतोलवृत्ती असते. किंबहुना, ‘मित्र, शत्रू व अपरिचित व्यक्ती यांच्याबद्दल जवळीक किंवा तिरस्कार वाटणं थांबवणारी निव्वळ समतोलवृत्ती’ असंच याचं एक संबोधन आहे. इथल्या निव्वळ या शब्दामधून असं सूचित केलं आहे की, हाच परिणाम साधणारी दुसरीही एक पद्धत अस्तित्वात आहे.

    ‘श्रावक व प्रत्येकबुद्ध यांच्यात सामायिक समतोलवृत्ती साध्य करण्याचा मार्ग म्हणजे निव्वळ समतोलवृत्ती’ असं पहिल्या प्रकारच्या समतोलवृत्तीचं आणखी एक संबोधन आहे. श्रावक (श्रोते) व प्रत्येकबुद्ध (स्व-उत्क्रांतिकर्ते) हे बुद्धाच्या शिकवणुकीतील हिनयानाचे (निम्न वाहन) दोन प्रकारचे उपयोजनकर्ते आहेत. इथे निव्वळचा गर्भितार्थ असा आहे की, अशा प्रकारच्या समतोलवृत्तीमध्ये आपल्याला समर्पित बोधिचित्त प्राप्त होत नाही आणि आपण त्यात सहभागी होत नाही.
  1. स्वत्व आणि इतरांबाबतच्या आपल्या प्रृवत्तींचं समकरण व विनिमय यांची पूर्वप्राथमिक स्थिती म्हणून आपण जी समतोलवृत्ती साधतो ती निव्वळ वरील प्रकारची समतोलवृत्ती नसते. सर्व मर्यादित जीवांचा लाभ करून देताना, त्यांना मदत करताना आणि त्यांच्या समस्यांचं उच्चाटन करताना आपण जे काही विचार अथवा कृती करतो त्यात जवळकीची अथवा दूरस्थपणाची भावना नसणं म्हणजे ही समतोलवृत्ती होय. समतोलवृत्ती साध्य करण्याचा हा विशेष प्रतिष्ठित, असाधारण असा महायान (मोठं वाहन) मार्ग आहे.

निव्वळ समतोलवृत्ती

सात भागांच्या कार्यकारणभावात्मक पद्धतीमध्ये प्रत्येक जण आपली माता राहिला आहे, हे ओळखण्यापूर्वीची समतोलवृत्ती साध्य करण्याचा मार्ग कोणता, असा प्रश्न विचारला असता त्यामध्ये पुढील पायऱ्या असल्याचं नमूद करता येईल.

तीन व्यक्ती डोळ्यांसमोर आणणं

एक, आपण तीन व्यक्ती डोळ्यांसमोर आणतो: आपल्याला न आवडणाऱ्या किंवा आपण ज्यांना शत्रू मानतो अशा ओंगळ व अप्रिय व्यक्ती, अगदी प्रिय असलेल्या किंवा मित्र असलेल्या व्यक्ती, आणि एखादी अपरिचित व्यक्ती किंवा जिच्याविषयी आपल्याला यातल्या दोनपैकी कोणत्याच भावना वाटत नाहीत अशी व्यक्ती. या तीनही व्यक्तींना आपण एकत्रितरित्या डोळ्यांसमोर आणतो. 

यातील प्रत्येक व्यक्तीवर एका मागून एक लक्ष केंद्रित केल्यावर सर्वसाधारणतः कोणत्या प्रकारची प्रवृत्ती निर्माण होते? आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीबाबत अप्रियता, अस्वस्थता, व तिटकाऱ्याची भावना निर्माण होते. आपल्याला प्रिय असलेल्या मित्र व्यक्तीबाबत आकर्षणाची व जवळिकीची भावना निर्माण होते. अपरिचित व्यक्ती आपल्याला आकर्षकही वाटत नाही किंवा तिरस्करणीयही वाटत नाही, त्यामुळे तिच्याबद्दल एक प्रकारची अलिप्ततेची भावना राहते, ना मदत करावीशी वाटते, ना काही बाधा पोचवायची इच्छा होते.

आपल्याला नावडत्या व्यक्तीबद्दलचा तिरस्कार थांबवणं

चर्चेच्या सोयीसाठी असं समजू की, आपण डोळ्यांसमोर आणलेल्या सर्व व्यक्ती स्त्रिया आहेत. एक, आपल्या नावडत्या व्यक्तीसोबत, अगदी आपल्याला शत्रू वाटत असेल अशा व्यक्तीसोबत आपण काम करावं.

  1. ती व्यक्ती अप्रिय व तिरस्करणीय वाटते, ही भावना आपण निर्माण होऊ द्यावी. एकदा का ही भावना स्पष्टपणे निर्माण झाली की,
  2. त्यापुढची भावनाही निर्माण होत असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्या व्यक्तीचं काही वाईट झालं तर बरं, किंवा त्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध काही अनुभवायला लागलं तर बरं, असं आपल्याला वाटू लागतं.
  3. नंतर या वाईट भावनांमागील व इच्छांमागील कारणं आपण तपासावीत. त्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं असेल, किंवा काही बाधा पोचवली असेल, किंवा आपल्याबद्दल किंवा आपल्या मित्रांबद्दल काहीतरी ओंगळवाणे उद्गार काढले असतील किंवा तसं बोलली असेल, असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाईट घडावं किंवा तिला हवंय ते मिळू नये, अशी आपली इच्छा असते. 
  4. आपल्याला इतक्या नावडत्या या स्त्रीचं काहीतरी वाईट व्हावं, अशी इच्छा आपल्या मनात का निर्माण झाली, याचं कारण मग आपण शोधावं. त्यामागे खरोखरच काही चांगलं कारण आहे का, हे तपासावं. यामध्ये आपण पुढील गोष्टींचा विचार करावा:
  • ही तथाकथित शत्रू असलेली व्यक्ती गतजीवनांमध्ये अनेक वेळा माझी माता व पिता होती, त्याचप्रमाणे माझी नातलग व मित्र होती. तिने मला अगणित वेळा खूप मदत केली आहे.
  • या जीवनामध्ये काय होईल याची खात्री नाही. कदाचित आयुष्यात नंतर कधीतरी ती खूप मदत करेल आणि चांगली मैत्रीण होईल. अशा गोष्टी शक्य असतातच.
  • काहीही झालं तरी आमची असंख्य भावी जीवनं आहेतच आणि कोणत्या तरी काळात ती माझी माता वा पिता असेल हेही अगदी निश्चित आहे. त्यामुळे ती मला खूप मदत करण्याची शक्यता आहे आणि तिच्यावर मी पूर्णतः आशा ठेवायला हवी. तर, गतकाळात, वर्तमानात व भविष्यात तिने अगणित मार्गांनी मला मदत केलेली आहे, ती मदत करते आहे आणि ती मला मदत करेल, आणि अखेरीस ती माझी चांगली मैत्री असेल. हे अगदी निश्चित झालेलं आहे. त्यामुळे या जीवनात तिने मला थोडंसं दुखावलं, यांसारख्या कोणत्यातरी क्षुल्लक कारणाने मी तिला शत्रू मानणं व तिचं वाईट चिंतणं, हे अजिबातच चालणार नाही.
  1. इथे काही उदाहरणं विचारात घेता येतील. उदाहरणार्थ, समजा, कोणी बँक अधिकारी किंवा मला बराच पैसा देण्याइतकी ताकद असलेला कोणी श्रीमंत माणूस आहे आणि मला पैसे देण्याची त्याची इच्छा व उद्देश आहे, आणि तसं काही त्याने गतकाळात थोडंसं केलंही आहे, तर या माणसाने एखाद्या दिवशी राग अनावर होऊन माझ्या कानशिलात लगावली. अशा वेळी मी चिडलो आणि स्वतःचा राग टिकवून ठेवला, तर तो मला आणखी पैसे देण्याचा उद्देश सोडून देईल अशी शक्यता आहे. किंवा त्याचा विचार बदलेल आणि तो दुसऱ्या कोणाला तरी पैसे द्यायचा निर्णय घेईल, असा आणखीही धोका त्यात आहे. दुसऱ्या बाजूला, मी कानशिलात लगावलेलं सहन केलं, माझी नजर खालीच ठेवली आणि माझं तोंड बंदच ठेवलं, तर मी नाराज न झाल्याबद्दल तो माझ्यावर आणखी खूश होईल. कदाचित तो मूळ उद्देशाहून अधिक पैसे मला देईल. पण मी चिडलो आणि मोठा गदारोळ केला, तर ते पुढील तिबेटी म्हणीसारखं होईल: ‘तोंडात अन्न आहे, पण आपली जीभच ते बाहेर ढकलतेय.’
  2. त्यामुळे मला अप्रिय असलेल्या या व्यक्तीबद्दल मी दीर्घकालीन विचार करायला हवा आणि हे सर्वच मर्यादित जीवांबद्दल खरं आहे. दीर्घकाळात ते मला मदतीचे ठरतील हे १०० टक्के निश्चित आहे. त्यामुळे, कोणी मला थोडीशी, क्षुल्लक बाधा पोचवली तर त्याचा राग मी धरून ठेवणं अगदीच अयोग्य होईल. 
  3. एखादा विंचू, वन्य प्राणी किंवा भूत थोड्याशा धक्क्याने किंवा चिथावणीने लगेच उलटा फटकारा हाणतो, हे लक्षात घ्यावं. आपण अशा प्राण्यांसारखं वागणं किती अयोग्य आहे, हेही मग लक्षात येतं. या व्यक्तीने मला कितीही बाधा पोचवली, तरी माझ्यावरचा ताबा सोडणार नाही आणि चिडणार नाही. अन्यथा, मी वन्यप्राण्यासारखा किंवा विंचूसारखाच ठरेन.
  4. शेवटी हे सगळं आपण तर्कशुद्ध निष्कर्षाच्या रूपात नोंदवू. कोणीतरी मला काही बाधा पोचवली आहे, या कारणाने इतरांवर संतापणं मी थांबवेन, कारण:
  • गतजीवनांमध्ये या व्यक्ती माझ्या पालक राहिल्या आहेत.
  • सद्य जीवनातही कालांतराने या व्यक्ती माझ्या सर्वांत जवळच्या मित्रमैत्रिणी होण्याची शक्यता आहेच.
  • भविष्यात कोणत्या ना कोणत्या काळी या व्यक्ती माझे पालक म्हणून पुनर्जन्म घेतील आणि मला खूप मदत करतील. अशा रितीने तीन वेळा त्या मला मदतीच्या ठरल्या आहेत.
  • त्यांच्या वागण्याच्या प्रत्युत्तरादाखल मीही चिडलो, तर मीसुद्धा वन्य प्राणीच ठरेन. त्यामुळे या जीवनामध्ये त्यांनी मला काही थोडीशी बाधा पोचवली, तरी त्याबद्दल चिडणं मी थांबवायला हवं.

आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीबाबत जवळिकीची भावना थांबवणं

  1. आपण सुरुवातीला डोळ्यांसमोर आणलेल्या शत्रू, मित्र व अपरिचित व्यक्तीच्या गटामधील आपल्या मित्रावर किंवा प्रिय व्यक्तीवर आता आपण लक्ष केंद्रित करावं.
  2. त्या व्यक्तीबद्दलच्या आपल्या आकर्षणाच्या व जवळिकीच्या भावना जाणवून घ्याव्यात.
  3. या व्यक्तीसोबत आपल्याला किती तीव्र भावना वाटते, हे यातून जाणवायला लागतं, आणि मग 
  4. अशा पद्धतीने मोह पडणं व जवळीक वाटणं, यांमागील कारणं काय असतील याचा तपास करावा. त्या व्यक्तीने आपल्याला या जीवनामध्ये काही छोटी मदत केली, आपल्याशी ती काही चांगली वागली, आपल्याला तिच्यामुळे चांगलं वाटलं, किंवा असं काहीतरी झालं असेल, त्यामुळे आपल्याला तिच्याकडे आकर्षित झाल्यासारखं व जवळीक असल्यासारखं वाटतं.
  5. आता ही भावना राखण्यासाठी अशी कारणं योग्य आहेत का, याचा आपण तपास करावा. हे कारण चांगलं नाही, याची कारणं पुढीलप्रमाणे:
  • गतजीवनांमध्ये ती कधीतरी माझी शत्रू राहिली आहे, तिने मला दुखावलं आहे आणि अगदी माझं मांस खाल्लं आहे आणि माझं रक्त ती प्यायली आहे, यात काही संशय नाही.
  • या जीवनांमध्ये नंतर कधीतरी ही व्यक्ती पुन्हा माझी सर्वांत वाईट शत्रू होण्याची शक्यता आहेच.
  • भावी जीवनांमध्ये ही व्यक्ती मला दुखावेल किंवा कधी ना कधी माझ्याबाबतीत कोणतीतरी ओंगळ कृती करेल, हेही अगदी निश्चित झालेलं आहे.
  1. या जीवनात तिने माझ्यासाठी काहीतरी चांगलं, पण क्षुल्लक केलं, या छोट्या कारणासाठी मी तिच्या मोहात पडू शकतो व तिच्याबद्दल मला जवळीक वाटू शकते, मग मीही भुरळ पाडणाऱ्या नरभक्षक स्त्रियांना भुलणाऱ्या पुरुषांसारखाच ठरेन. या भुरळ पाडणाऱ्या स्त्रिया सुंदर पेहराव करतात, आपल्या हालचालींनी पुरुषांना भुरळ घालतात आणि नंतर त्यांना मटकावून टाकतात.
  2. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने या जीवनात आपल्याबद्दल काही लहानशी चांगली गोष्ट केली, तरी त्याबद्दल त्या व्यक्तीशी जवळीक वाटून घ्यायची नाही, असं आपण ठरवतो.

तटस्थ व्यक्तीबाबत दुरावा राखणं थांबवणं

अपरिचित असलेल्या व्यक्तीबाबत, मित्र वा शत्रू नसलेल्या व्यक्तीबाबत, आपण अशीच प्रक्रिया पाळावी.

  1. आपण डोळ्यांसमोर आणलेल्या लोकांमधील अशा अपरिचित व्यक्तीवर लक्ष केंद्रित करावं,
  2. या व्यक्तीचा बाधा पोचवण्याची किंवा मदत पोचवण्याची इच्छाही आपल्याला वाटू नये, या व्यक्तीपासून दूर जावं किंवा तिच्या सोबत राहावं, अशीही भावना आपल्यामध्ये निर्माण होऊ नये.
  3. त्या व्यक्तीकडे आणखी दुर्लक्ष करण्याची भावनाही आपण जाणवून घ्यावी.
  4. अशा प्रकारे भावना का निर्माण होतेय, याच्या कारणाचा आपण तपास करावा. त्या व्यक्तीने आपल्या मदतीसाठी किंवा आपल्याला दुखावण्यासाठी काहीही केलेलं नाही, त्यामुळे आपला तिच्याशी काहीही संबंध नाही.
  5. अशा प्रकारच्या भावना मनात येण्यासाठी हे वैध कारण आहे का, याचा तपास आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की, शेवटी ती व्यक्ती अपरिचित नसतेच, कारण आपल्या अगणित गतजीवनांमध्ये, या जीवनामध्ये नंतरच्या काळात, आणि अनेक नंतरच्या जीवनांमध्ये ती आपल्यासोबत असेल, ती आपली मैत्रीण असेल, इत्यादी.

अशा प्रकारे आपण शत्रू, मित्रं व अपरिचित व्यक्ती अशा सर्वांविषयीच्या राग, जवळीक किंवा दुराव्याच्या भावना थांबवू शकतो. श्रावक व प्रत्येकबुद्ध यांच्यात समान असलेली ही निव्वळ समतोलवृत्ती साध्य करण्याचा हा मार्ग आहे. बोधिचित्त साध्य करण्यासाठीच्या सात भागांच्या कार्यकारणभावात्मक पद्धतीमध्ये प्रत्येक जण आपली माता राहिली असल्याचं ओळखावं लागतं आणि त्यासाठीचा पूर्वप्राथमिक टप्पा या मार्गावरून साधता येतो.

आपल्या प्रवृत्तींचं समकरण व विनिमय यांसाठीची पूर्वप्राथमिक पायरी म्हणून असाधारण महायान समतोलवृत्ती 

स्वत्व आणि इतरांच्या संदर्भात आपल्या प्रवृत्तींचं समकरण करणं व विनिमय करणं, यांसाठीची पूर्वप्राथमिक पायरी म्हणून असाधारण महायन समतोलवृत्ती साध्य करावी लागते, त्याचा मार्ग पुढीलप्रमाणे विभागलेला आहे:

  • सापेक्ष दृष्टिकोनावर आधारित समतोलवृत्ती प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग
  • सखोल दृष्टिकोनावर आधारित समतोलवृत्ती प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग

सापेक्ष दृष्टिकोनावर आधारित मार्ग पुढीलप्रमाणे विभागला जातो:

  • आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनांवर आधारित समतोलवृत्ती प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग
  • इतरांच्या दृष्टिकोनांवर आधारित समतोलवृत्ती प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग

आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनांवर आधारलेल्या समतोलवृत्तीला प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग

यामध्ये तीन मुद्दे आहेत:

  1. सर्व मर्यादित जीव अगणित जीवनांमध्ये आपले पालक, नातलग व मित्र राहिलेले असल्यामुळे, त्यातील काही जवळचे आहेत व काही दूरचे आहेत, कोणी मित्र आहे तर कोणी शत्रू आहे, कोणी स्वागतार्ह आहे तर कोणी नाकारण्याजोगं आहे, असं मानणं गैर आहे. मी माझ्या आईला दहा मिनिटं, दहा वर्षं किंवा जहा जन्मं पाहिलं नसेल, तरीही ती माझी आईच राहते, असा विचार आपण करणं गरजेचं आहे. 
  2. परंतु, या जीवांनी मला मदत केली, त्याचप्रमाणे काही वेळा त्यांनी मला बाधाही पोचवली असेल, अशी शक्यता असतेच. पण त्यांनी मला जितक्या वेळा मदत केली आणि जितक्या प्रमाणात मदत केली, त्या तुलनेत त्यांनी पोचवलेली बाधा क्षुल्लक ठरते. त्यामुळे एकाला जवळचं मानणं आणि दुसऱ्याला दूरचा म्हणून नाकारणं अयोग्य आहे.
  3. आपण मरणार हे निश्चित असतं, पण आपल्या मरण्याची वेळ पूर्णतः अनिश्चित असते. उदाहरणार्थ, समजा आपल्याला उद्या देहदंडाची शिक्षा मिळणार आहे. अशा वेळी आपला शेवटचा दिवस रागावण्यात आणि दुसऱ्याला दुखावण्यात घालवणं असंगत ठरतं. एखादी क्षुल्लक निवड करून आपण आपल्या अखेरच्या दिवशी काहीतरी सकारात्मक व अर्थपूर्ण करण्याची संधी नाकारतो. उदाहरणार्थ, एकदा एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला कोणाचा तरी प्रचंड राग आला आणि त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी कठोर शिक्षा करायची असं त्याने ठरवलं. त्याने सगळा दिवस शिक्षेच्या नियोजनामध्ये घालवला आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला काही करता येण्यापूर्वी तो स्वतःच अचानक मरण पावला. त्याचा राग पूर्णतः असंगत होता. त्यातल्या दुसऱ्या व्यक्तीला पुढच्या दिवशी मरण आलं असतं, तरी त्याबाबतीतही असंच म्हणता येतं. त्याला आज दुखावणं निरर्थक ठरतं.

इतरांच्या दृष्टिकोनांवर आधारलेली समतोलवृत्ती प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग

हा मार्गही तीन मुद्द्यांमध्ये विभागलेला आहे.

  1. आपण असा विचार करायला हवा: मला दुःख नको आहे, अगदी माझ्या स्वप्नातही दुःख नको, आणि मला कितीही आनंद मिळाला तरी मला तो कधीच पुरेसा वाटत नाही, असा माझ्यापुरता विचार आहे. हे सर्वांच्याबाबतीत खरं असतं. लहानशा किड्यापासून ते मोठ्या प्राण्यापर्यंत सर्व मर्यादित जीवांना आनंदी राहण्याची आणि कधीही दुःखात न जाण्याची किंवा कधीच कोणत्या समस्या येऊ नयेत अशी इच्छा असते. त्यामुळे, काहींना नाकारून इतर काहींचं स्वागत करणं अयोग्य आहे.
  2. समजा, दहा भिकारी माझ्या दारावर आले. तर, त्यातल्या काहींनाच अन्न देणं आणि उर्वरितांना अन्न नाकारणं पूर्णतः अयोग्य व अन्याय्य ठरेल. भूक आणि अन्नाची गरज याबाबतीत ते सर्व समान आहेत. त्याचप्रमाणे, गोंधळाने न डागाळलेला आनंद असेल- बरं, असा काही आनंद कोणाला मिळतो का? पण अगदी गोंधळाने डागाळलेला आनंद गृहीत धरला- तरी, सर्व मर्यादित जीवांना अशा आनंदाचा पुरेसा पुरवठा होतच नाही. प्रत्येकाला असा आनंद शोधण्यात तीव्र रस असतो. त्यामुळे काहींना दूरचे म्हणून नाकारणं आणि इतर काहीचं जवळचे म्हणून स्वागत करणं, हे अयोग्य आहे.
  3. आणखी एक उदाहरण म्हणून दहा आजारी लोक आहेत असं समजू. त्या सर्वांचीच समान दुर्दशा व दयनीय अवस्था झालेली असते. त्यामुळे, यातल्या काहींनाच प्राधान्य देऊन त्यांच्यावर उपचार करणं आणि इतरांना विसरून जाणं अन्याय्य ठरतं. त्याचप्रमाणे सर्व मर्यादित जीव समान दयनीयतेमध्ये असतात, त्यांच्या व्यक्तिगत अडचणी असतात आणि अस्तित्व किंवा संसाराचा भाग म्हणून अथकपणे येणाऱ्या इतर समस्याही असतातच. त्यामुळे काहींना दूरचे म्हणून नाकारणं आणि काहींचं जवळचे म्हणून स्वागत करणं, हे अन्याय्य व अयोग्य आहे.

सखोल दृष्टिकोनावर आधारित समतोलवृत्ती प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग

यातही विचारांच्या तीन फेऱ्या आहेत.

  1. आपल्या गोंधळामुळे आपण आपल्याला मदत करणाऱ्यांना किंवा आपल्याशी चांगलं वागलेल्यांना खरे मित्र मानतो आणि आपल्याला दुखावणाऱ्यांना खऱे शत्रू मानतो. परंतु, आपण वापरतो त्या शिक्क्यांनुसारच ते प्रत्यक्षात अस्तित्वात असते, तर तथागत बुद्धालाही ते दिसायला हवे होते. पण त्याला कधीच असं दिसलं नाही. दिग्नागाच्या ‘वैधरित्या सुजाण मनांच्या सारग्रंथा’वर (संस्कृत: प्रमाणवत्तिक) भाष्य करताना धर्मकीर्तीने म्हटलं आहे की, “आपल्या शरीराच्या एका बाजूला अत्तर लावणारा आणि दुसऱ्या बाजूला तलवारीने कापणारा, या दोहोंबाबतही बुद्ध सारखाच वागतो.”

    बुद्धाचा चुलतभाऊ देवदत्त ईर्ष्येपोटी त्याला बाधा पोचवण्याचा प्रयत्न कायम करत असे, त्याच्याशी बुद्ध कसा वागला, या दाखल्यामधूनही बुद्धाचा निःपक्षपातीपणा दिसतो. त्यामुळे, आपणही पक्षपाती होणं आणि गोंधळाने विचार करून लोकांच्या बाजू घेणं टाळायला हवं. आपण लोकांवर जे शिक्के मारतो त्याच कोटींनुसार ते खरोखरचे अस्तित्वात असतात, असा गोंधळलेला विचार करू नये. कोणीही तशा तऱ्हेने अस्तित्वात नसतं. खरोखरच्या प्रस्थापित अस्तित्वाचा अदमास घेणं थांबवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या गोंधळलेल्या मनांमधून हा अदमास घेण्याचा प्रयत्न उत्पन्न होतो आणि सत्य नसलेल्या मार्गांनी गोष्टी दिसू लागतात.
  1. शिवाय, मर्यादित जीव मित्र व शत्रू अशा कोटींमध्ये, आपण त्यांचा अदमास बांधतो तसेच, खरोखरच अस्तित्वात असल्याचं प्रस्थापित झालं असतं, तर ते कायम तसेच राहिले असते. उदाहरणार्थ, समजा, एखाद्या घड्याळात कायम अचूक वेळ दिसते असं आपल्याला वाटतं. पण काही वेळा परिस्थिती बदलू शकते आणि ते घड्याळ मागे पडू शकतं, त्याचप्रमाणे इतर लोकांचं स्थान सारखं नसतं, तेही बदलतं.

    संसाराच्या अनियंत्रित पुनरावृत्त होणाऱ्या परिस्थितींमध्ये कोणतीही निश्चिती नसते या वस्तुस्थिती संदर्भातील शिकवणुकींचा आपण विचार करतो, तेव्हा स्वतःचे वडील खाणाऱ्या, स्वतःच्या आईला मारणाऱ्या आणि शत्रूला झुलवणाऱ्या मुलाचं उदाहरण समोर येतं. साक्षात्काराकडे जाण्याच्या श्रेणीबद्ध मार्गातील (लाम-रिम) प्रेरणेची मध्यम पातळी साध्य करण्यासाठीच्या सूचनांमध्ये हे उदाहरण येतं. एकदा प्रबुद्ध आर्य कत्यायन एका घरात आले, तिथे पित्याचा पुनर्जन्म तलावातील मासा म्हणून झाला होता आणि त्या माणसाचा मुलगा पित्याला खात होता. मग त्या मुलाने स्वतःच्या पित्याच्या, माशाच्या हाडांनी एका कुत्र्याला मारलं, हा कुत्रा त्याची माता राहिलेला होता. आणि त्यानंतर त्या मुलाने त्याचा शत्रू राहिलेल्या बालकाला हातामध्ये घेऊन झुलवलं. संसारात फिरणाऱ्या जीवांच्या स्थानात होणाऱ्या या बदलांमधील असंगती पाहून कात्यायन हसले. तर, लोकांना मित्र वा शत्रू अशा निश्चित व कायमस्वरूपी कोटींमध्ये बंदिस्त करून त्यांचा अदमास बांधणं, आणि त्यानुसार एकाचं स्वागत करणं व दुसऱ्याला नाकारणं, हे आपण थांबवायला हवं.
  1. ‘प्रशिक्षणांचा सारग्रंथ’ (संस्कृत: शिक्षासमुच्चय) या ग्रंथामध्ये शांतिदेव यांनी स्वत्व आणि इतर एकमेकांवर कसे अवलंबून असतात हे स्पष्ट केलं आहे. दूरच्या व जवळच्या पर्वतांप्रमाणे स्वत्व आणि इतर एकमेकांवर अवलंबून असतात किंवा त्यांना एकमेकांच्या संदर्भातच सापेक्ष पदनाम मिळालेलं असतं. आपण एखाद्या पर्वताच्या जवळ असतो, तेव्हा दुसरा पर्वत आपल्याला दूरचा दिसतो आणि हा जवळचा वाटतो. मग आपण दुसऱ्या बाजूला गेलो, की हा पर्वत लांबचा वाटतो आणि तो दुसरा पर्वत जवळचा वाटतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या बाजूने ‘स्वत्व’ म्हणून अस्तित्वात असल्याचं प्रस्थापित झालेलं नसतं, कारण आपण इतर कोणाच्यातरी दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहतो, तेव्हा आपण ‘इतर’ झालेले असतो. त्याचप्रमाणे मित्र व शत्रू हे एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचे किंवा तिच्याकडे लक्ष देण्याचे केवळ भिन्न मार्ग आहेत. एकच व्यक्ती कोणाचीतरी मित्र आणि कोणाचीतरी शत्रू असू शकते. जवळच्या व दूरच्या पर्वतांप्रमाणे, हे आपल्या दृष्टिकोनावर आधारित, सापेक्ष असतं.

पाच निर्णय

वरील मुद्द्यांबद्दल अशा रितीने विचार केल्यानंतर आपल्याला पाच निर्णय घेणं गरजेचं असतं.

मी पक्षपाती होणं टाळेन

आपण सापेक्ष किंवा सखोल दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा काही लोकांना किंवा जीवांना जवळचे मानून इतरांना दूरचे मानण्याचं कोणतंही कारण उरत नाही. त्यामुळे, आपण एक ठाम निर्णय घेणं गरजेचं असतं: मी पक्षपाती होणं टाळेन. मी काहींना नाकारतो व काहींचं स्वागत करतो, यामधील पक्षपातीपणाची भावना मी स्वतःमधून काढून टाकेन. कारण, वैरभाव आणि जवळीक या दोन्हींनी या व भावी जीवनांना बाधा पोचते, ही बाधा तात्कालिकही असते आणि टिकून राहणारीही असते, अल्पकालीनही असते आणि दीर्घकालीनही असते, त्याचे काहीही लाभ होत नाहीत. शेकडो प्रकारच्या दुःखाचं मूळ हे असतं. संसारातील अनियंत्रित पुनरावृत्त होणाऱ्या समस्यांच्या तुरुंगाचा वेढा माझ्याभोवती कायम राहील, अशी तजवीज या भावना करतात.

१९५९च्या उठावानंतर तिबेटमध्येच राहिलेल्यांचं उदाहरण विचारात घ्या. आपले मठ, मालमत्ता, संपत्ती, घरं, नातलग, मित्र, इत्यादींबाबत जवळीक वाटत असल्यामुळे त्यांना सोडून जाणं या लोकांना सहन होत नव्हतं. परिणामी त्यांना २० किंवा अधिक वर्षांसाठी तुरुंगात डांबलं गेलं किंवा छळछावणीत पाठवण्यात आलं. त्यांच्या जवळिकीच्या भावनेमुळे हे घडलं. पक्षपातीपणाच्या या भावना कत्तलखोर असतात, त्यातून आपण आनंदहीन नरकसमान प्रांतातील ज्वाळांमध्ये जाऊन पडतो. आपली रात्रीची झोप हिरावून घेणारे हे दानव असतात. त्यांना आपण सर्वतोपरी उचकटून टाकायला हवं.

दुसऱ्या बाजूला, प्रत्येकाबद्दल समान प्रवृत्ती राखणं, सर्व मर्यादित जीव आनंदी व्हावेत आणि त्यांच्या समस्या व दुःख दूर व्हावीत अशी इच्छा राखणं, कोणत्याही दृष्टिकोनातून तात्पुरतं व कायमस्वरूपी महत्त्वाचं असतं. प्रत्येक बुद्धाने व बोधिसत्वांनी साक्षात्कारप्राप्तीसाठी या मुख्य मार्गाचा अवलंब केला आहे. तिन्ही काळातील सर्व बुद्धांचा हेतू व अंतःस्थ इच्छा हीच होती. त्यामुळे कोणत्याही मर्यादित जीवांनी त्यांच्या बाजूने मला कोणतीही बाधा पोचवली किंवा मदत केली, तरी माझ्या बाजूने मला दुसरा काही पर्याय नाही, असा विचार आपण करण्याची गरज आहे. मी रागावणार नाही किंवा जवळीकही वाटून घेणार नाही. मी काहींना दूरचे व काहींना जवळचे मानणार नाही. या व्यतिरिक्त सदर परिस्थिती हाताळण्याचा दुसरा कोणताही मार्ग किंवा पद्धत असू शकत नाही. हा माझा ठाम निर्णय झालेला आहे. प्रत्येकालाच आनंदी व्हायचं आहे आणि कधीही दुःख सहन करावं लागू नये असं प्रत्येकालाच वाटतं, त्यामुळे मी इतरांबाबत कसा विचार करतो व कशी कृती करतो, यानुसार मला समान प्रवृत्ती लाभेल. मी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवा. आध्यात्मिक गुरूंनो, हे मला शक्य तितक्या उत्तम रितीने करता यावं अशी प्रेरणा कृपया मला द्या. या आचरणाशी निगडित गुरू पूजा- लामा चोपा या प्रार्थनेची पहिली पाच कडवी आपण म्हणतो तेव्हा आपण असे विचार करणं गरजेचं आहे:

इतरांचं समाधान व आनंद वाढवण्यासाठी आम्हाला प्रेरणा दे. इतर आणि आम्ही वेगळे नाही असा विचार आम्हाला करता येवो. कोणालाही थोडंसंही दुःख नको असतं, त्याचप्रमाणे कोणालाही स्वतःकडच्या आनंदाबद्दल समाधान नसतं. 

प्रत्येकाला आनंद देण्यासाठी व दुःख नष्ट करण्यासाठी आपल्या विचारांमध्ये अथवा कृतींमध्ये कोणालाही जवळचं किंवा दूरचं मानलं जाऊ नये, अशी समान प्रवृत्ती साधता यावी, अशी प्रार्थना या पहिल्या कडव्याद्वारे आपण करतो. आपण इथे ज्याबद्दल चर्चा करत आहोत ती समतोलवृत्ती किंवा समकरण प्रवृत्ती अशा समान प्रवृत्तीशी सुसंगतच आहे. दुकानात एखादी विलक्षण वस्तू दिसल्यावर ती विकत घेण्याचं आपण ठरवतो, तशाच रितीने ही प्रवृत्ती साध्य करण्याचा ठाम निर्णय आपण करावा.

मी स्वतःला स्वप्रेमापासून मुक्त ठेवेन

त्यानंतर आपण स्वप्रेम प्रवृत्तीमधील दोषांचा विचार करावा. स्वप्रेम प्रवृत्तीच्या स्वार्थी आस्थांमुळे आपण विध्वंसक कृती करतो, दहा विध्वंसक कृती करतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला नरकसदृश पुनर्जन्म मिळतात. तिथून, एखाद्या अर्हताला (मुक्त जीवाला) साक्षात्कार न होण्यामागे अशा प्रकारच्या स्वार्थी आस्था कारणीभूत होतात, त्यातून आनंद व शांतता गमावली जाते. बोधिसत्व साक्षात्काराच्या जवळ असतात, काही जण इतरांपेक्षा जास्त जवळ असतात. त्यांच्यातील भेद त्यांच्यामधल्या स्वप्रेमाच्या प्रमाणावरून आलेला असतो. देशादेशांमधील वादांपासून ते आध्यात्मिक गुरू व अनुयायी यांच्यातील वितुष्ट, कुटुंब किंवा मित्रमंडळींमधील वाद- हे सर्व स्वप्रेमातून आलेलं असतं. त्यामुळे आपण स्वतःमधील स्वार्थ व स्वप्रेमाचा गोंधळ काढून टाकला नाही, तर मला कधीही आनंद उपभोगता येणार नाही, याचा विचार आपण करायला हवा. त्यामुळे मी कधीही स्वतःला स्वप्रेमाच्या मोहात गुरफटता कामा नये. आध्यात्मिक गुरूंनो, कृपया मला सर्व स्वार्थी आस्थांपासून सुटका करून घेण्याची प्रेरणा द्या. दुसऱ्या कडव्यातील विचार असे आहेत:

स्वप्रेमाचा हा गंभीर आजार अनिष्ट दुःखांना वाढवण्यास कारणीभूत ठरतो, त्यामुळे त्याला दोष देऊन स्वप्रेमाचा हा दानव नष्ट करावा.

स्वतःमधील स्वार्थी आस्थेतून आलेल्या स्वप्रेमाच्या प्रवृत्तींपासून मुक्तता करण्याचा ठाम निर्णय या दुसऱ्या कडव्याद्वारे आपण करतो.

इतरांवर प्रेम करणं हे माझं मुख्य आचरण असेल

इतरांवर प्रेम केल्याचे लाभ व गुण कोणते, याचा विचार आपण करावा. इतरांवर प्रेम केल्यामुळे या जीवनामध्ये सर्व आनंद मिळतात व सर्व काही चांगलं सुरू राहतं; भावी जीवनांमध्ये मानव किंवा देव म्हणून जन्म होतो; आणि एकंदरित साक्षात्कारप्राप्तीपर्यंतचा सर्व आनंद मिळतो. विविध उदाहरणांच्या संदर्भात आपण याचा विचार करायला हवा. उदाहरणार्थ, एखाद्या लोकप्रिय अधिकाऱ्याची लोकप्रियता तो इतरांवर प्रेम करतो व इतरांविषयी आस्था राखतो त्यातूनच आलेली असते. इतर कोणाचा जीव घेण्यापासून किंवा त्यांचं काही चोरण्यापासून आपण स्वतःला थोपवतो, ही नैतिक स्वयंशिस्त इतरांवरच्या आपल्या प्रेमातून आलेली असते, आणि यामुळे आपल्याला मानव म्हणून पुनर्जन्म मिळण्याची शक्यता राहते.

उदाहरणार्थ, परमपूज्य दलाई लामा कायम सर्वत्र सर्वांच्या कल्याणाचा विचार करतात, आणि इतरांवर ते प्रेम करतात, त्यातूनच त्यांचे गुण आले आहेत. बोधिसत्व तोग्मेय-झांग्पो यांना बाधा पोचवणं कामदेवाला शक्य झालं नाही. कामदेवाने त्यांच्या कार्यात हस्तक्षेप आणण्याचा प्रयत्न चालवला होता. पण तिबेटी बुद्धविचाराचे हे महान उपयोजनकर्ते एखाद्या ज्योतीवर कोणा किड्याने झेप घेतली तरी रडू लागत असत. इतर सर्वांबद्दल त्यांना प्रामाणिक आस्था वाटत होती आणि अगदी भुतं व इतर कोणी हस्तक्षेप करणारे असतील त्यांच्याबद्दलही त्यांना इतकी आस्था होती की यांपैकी कोणीच त्यांना बाधा पोचवू शकत नव्हतं. कारण, त्यांनी आमचा लाभ करून देण्याचा व आमच्यावरील प्रेमाचाच विचार केला, असं खुद्द पिशाच्च सांगतात.

एका गतजीवनामध्ये बुद्धाचा जन्म देवांचा राजा इंद्र म्हणून झाला होता,, तेव्हा देव व यक्ष यांच्यात युद्ध झालं. यक्ष जिंकत होते, तेव्हा इंद्र त्याच्या रथातून पळून गेला. अनेक कबुतरं जमली होती अशा रस्त्यावरच्या ठिकाणी तो आला आणि त्यातील काही रथाखाली चिरडतील या भीतीने त्याने रथ थांबवला. त्याने मागे वळून आपल्यावर हल्ला करण्यासाठीच रथ थांबवला आहे, असं यक्षांना वाटलं, त्यामुळे ते पळून गेले. या उदाहरणाचं विश्लेषण केलं असता आपल्या लक्षात येतं की, इतरांवर विविध दृष्टिकोनांमधून प्रेम करण्यातील लाभांचा विचार करायला हवा.

एखादा दंडाधिकारी किंवा कोणताही अधिकारी आपल्या कार्यालयात अतिशय दिमाखात बसतो, तेव्हा त्याचं पद व त्याभोवतीची प्रत्येक गोष्ट इतरांमुळे अस्तित्वात असते. उदाहरणार्थ, इतर लोक अस्तित्वात आहेत या वस्तुस्थितीमधूनच इतरांबद्दल दया वाटू लागते. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणीही लोक अस्तित्वात नसते, तर तो दंडाधिकारी झालाच नसता. त्याला करायला काही राहिलंच नसतं. शिवाय, लोक अस्तित्वात असले, तरी कोणी त्याच्याकडे कधीच आलं नसतं, मग या दंडाधिकाऱ्याला केवळ बसून राहण्याशिवाय दुसरं काही करण्यासारखं राहिलं नसतं. दुसऱ्या बाजूला, अनेक लोक त्याच्याकडे आले, आपल्या समस्या सोडवण्याची अपेक्षा त्याच्याकडून करायला लागले, तर तो त्यांच्यावर अवलंबून राहील आणि व्यवस्थित बसून त्यांची सेवा करेल. कोणत्याही लामाविषयी असंच होत असतं. इतरांवरच्या अलंबनामुळे ती व्यक्ती शांतपणे बसून शिकवण देऊ शकते. इतरांची मदत करता येण्यासाठी ती व्यक्ती अस्त्तिवात असते. त्यांच्या लाभासाठी तो धर्माची शिकवण देतो, त्यामुळे तो करत असलेली मदत इतरांवर अवलंबून राहण्यातून आलेली असते, त्यांच्या दयाभावाची आठवण तो ठेवतो त्यातून हे घडलेलं असतं.

त्याचप्रमाणे प्रेम व करुणा यांद्वारे, इतरांवर प्रेम करण्याद्वारे आपण लगेच साक्षात्कार प्राप्त करू शकतो. उदाहरणार्थ, कोणा शत्रूने आपल्याला दुखावलं आणि आपल्यामध्ये संयम निर्माण झाला, तर आपण साक्षात्काराच्या नजीक जातो, हे इतरांवर प्रेम करण्यातून घडतं. मर्यादित जीव हेच सर्व आनंद व कल्याणाचा पाया व मुळं असल्यामुळे त्यांनी काहीही केलं किंवा त्यांनी आपल्याला कितीही बाधा पोचवली, तरी आपण इतरांवर कायम प्रेमच करत राहायचा निर्णय घ्यावा. इतर जीव माझ्या आध्यात्मिक गुरूसारखे, बुद्धासारखे किंवा अमूल्य मोत्यांसारखे आहेत, मी त्यांच्यावर प्रेम करायला हवं. त्यांच्याबाबत काही विपरित घडलं तर मला त्या हानीचं दुःख व्हायला हवं आणि मी त्यांना कधीही काहीही झालं तरी नाकारायला नको. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम दयाभाव व स्नेह राहावा. माझ्या आध्यात्मिक गुरूंनो, अशा प्रकारच्या मनापासून व इतरांबद्दलच्या या भावनेपासून माझी कधीही फारकत होऊ नये यासाठी कृपया मला प्रेरणा द्या. तिसऱ्या कडव्याचा अर्थ असा आहे:

आपल्या मातांवर प्रेम करणारं आणि वादळात त्यांचं संरक्षण करणारं मन अमर्याद गुणांकडे जाण्याचं प्रवेशद्वार आहे, हे कळण्याची प्रेरणा आम्हाला द्यावी, आणि आमच्या जीवांपेक्षा या भटकणाऱ्या जीवांवर, ते आमचे शत्रू असल्यासारखं वाटत असलं तरी त्यांच्यावर, प्रेम करण्याची प्रेरा आम्हाला द्यावी.

अशा प्रकारे इतरांवर प्रेम करणं हा आपल्या आचरणाचा मध्यवर्ती घटक बनवण्याचा निर्णय आपण घेतो.

स्वत्व आणि इतर यांच्यासंबंधीच्या माझ्या प्रवृत्तींचा विनिमय करण्याची क्षमता माझ्यात निश्चितपणे आहे

स्वप्रेमातील अनेक दोषांचा विचार करणं आणि इतरांवर प्रेम करण्यातील अनेक गुणांचा विचार करणं, या प्रवेशद्वारावर विसंबल्यामुळे आपल्याला जाणवतं की, कोणावर प्रेम करावं यासंबंधीची आपली मूल्यं बदलण्याची गरज आहे. ही मूल्यं बदलणं आपल्याला खरोखरच शक्य आहे का, अशीही शंका आपल्याला पडते. तर, आपण निश्चितपणे ही मूल्यं बदलू शकतो. साक्षात्कारापूर्वी बुद्धही आपल्यासारखाच होता, त्यामुळे आपणही आपली प्रवृत्ती बदलू शकतो. बुद्धही अनियंत्रित पुनरावृत्तीच्या परिस्थितींमध्ये व संसाराच्या समस्यांमध्ये एका जन्मातून दुसऱ्या जन्मात भटकत होता. तरीही सक्षम बुद्धाने कोणावर प्रेम करावं यासंबंधीच्या स्वतःच्या प्रवृत्तींचा विनिमय केला. उपास करण्यापासून ते इतरांवर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास करून बुद्धाने स्वतःचं व इतरांची ध्येय साध्य करण्यापर्यंतचं शिखर गाठलं. 

या उलट आपण फक्त स्वतःवर प्रेम केलं आणि इतरांकडे दुर्लक्ष केलं. इतरांच्या लाभाची कृती करणं तर दूरच आपण स्वतःचंही फारसं भलं करू शकलेलो नाही. स्वतःवर प्रेम करणं व इतरांकडे दुर्लक्ष करणं यांमुळे आपण पूर्णतः असहाय झालो आहोत, खरं अर्थपूर्ण असं काही साध्य करणं आपल्याला शक्य उरलेलं नाही. खरा सर्वसंगपरित्याग किंवा आपल्या समस्यांपासून मुक्त होण्याचा निग्रह साध्य करणं आपल्याला शक्य नाही. सर्वांत वाईट पुनर्जन्माच्या स्थितीत जाऊन पडण्यापासून स्वतःला रोखणंही आपल्याला शक्य नाही. अशा प्रकारे आपण स्वतःवर प्रेम करण्यातील दोषांचा आणि इतरांवर प्रेम करण्यातील लाभांचा विचार करावा. आपल्यासारखीच सुरुवात करून बुद्धाला त्याची प्रवृत्ती बदलणं शक्य झालं असेल, तर आपल्यालाही आपली प्रवृत्ती बदलणं शक्य होईल.

एवढंच नव्हे, तर पुरेशा परिचयानंतर आपल्याला इतरांवर प्रेम करणंही शक्य होईल. आपण स्वतःची काळजी घेतो तसं त्यांच्याशी वागणंही शक्य आहे. शेवटी इतरांच्या, आपल्या पालकांच्या शरीरांमधील वीर्य व बीजांडं यांच्याच आधारे आपली शरीरं निर्माण झाली आणि आता आपण आपल्या शरीरांवर प्रेम करतो. मुळात ही शरीरं आपली नव्हती. त्यामुळे आपली प्रवृत्ती बदलणं अशक्य नाही, असा विचार आपण करणं गरजेचं आहे. स्वत्वाविषयी व इतरांवियी वाटणाऱ्या माझ्या प्रवृत्तींचा विनिमय मी करत नाही तोवर ही प्रवृत्ती बदलणार नाही हेही आपण लक्षात घ्यायला हवं. हे मी करणं मला शक्य आहे, हे करणं मला अशक्य नाही. त्यामुळे माझ्या आध्यात्मिक गुरूंनो, मला हे करण्याची प्रेरणा द्या. चौथ्या परिच्छेदामध्ये पुढील मत मांडलेलं आहे:

थोडक्यात, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी गुलामी करणारे पोरकट जीव आणि केवळ इतरांसाठी काम करणाऱ्या साधूमहाराजांचे गुण यांच्यातील भेद कळण्याइतकी मनं विकसित करण्यासाठी आम्हाला प्रेरणा द्यावी, जेणेकरून इतरांविषयीच्या व स्वतःविषयीच्या आमच्या प्रवृत्तींचं समकरण व विनिमय शक्य व्हावा.

स्वत्व व इतर यांच्यावर प्रेम करण्याशी संबंधित आपल्या प्रवृत्तींचा विनिमय आपण निश्चितपणे करू शकतो, असा निर्णय आपण इथे करत.

स्वत्व व इतर यांच्याशी संबंधित माझ्या प्रवृत्तींचा विनिमय मी निश्चितपणे करेन

इथे पुन्हा आपण स्वप्रेमातील दोषांचा आणि इतरांवर प्रेम केल्यावर होणाऱ्या लाभांचा विचार करावा, पण या वेळी आपण दोन्हींच्या मिश्रणाद्वारे, एका पाठोपाठ एक असा हा विचार करावा. निराळ्या शब्दांत नोंदवायचं तर, आपण दहा विध्वंसक व दहा रचनात्मक कृती करतो, प्रत्येक यादीतून आलटून-पालटून एका अशा प्रकारे या कृती पार पाडल्या जातात आणि स्वप्रेम व इतरांवरील प्रेम या संदर्भात याचा काय परिणाम होतो हे पाहतो. उदाहरणार्थ, मी स्वतःवर प्रेम करत असेन, तर मी इतरांचा जीव घेतानाही अडखळणार नाही. परिणामी, माझा पुनर्जन्म आनंदहीन नरकसदृश प्रांतामध्ये होईल आणि कालांतराने माझा जन्म मानव म्हणून झाला तरी माझं जीवन आजारामुळे कमी झालेलं असेल. दुसऱ्या बाजूला, मी इतरांवर प्रेम केलं, तर मी इतरांचा जीव घेणं थांबवेन. परिणामी, माझा पुनर्जन्म चांगल्या स्थितीत होईल, मला दीर्घायुष्य लाभेल, इत्यादी. चोरी करणं आणि चोरी करण्यापासून दूर राहणं, अयोग्य लैंगिक वर्तन करणं आणि अशा वर्तनापासून दूर राहणं, यांच्याबाबतीतही आपण अशीच प्रक्रिया पार पाडावी. थोडक्यात, पाचव्या कडव्यात असं म्हटलेलं आहे की:

स्वतःवर प्रेम करणं हा सर्व यातनांकडे जाणारा मार्ग आहे, तर आपल्या मातांवर प्रेम करणं हा सर्व चांगल्या गोष्टींचा पाया आहे, त्यामुळे इतरांशी स्वतःचा विनिमय करणाऱ्या योगसाधनेला स्वतःच्या आचरणाचा गाभा करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. 

तर, स्वत्व आणि इतर यांच्यातील माझ्या प्रवृत्तींचा विनिमय मी निश्चितपणे करेन, हा पाचवा निर्णय होय. याचा अर्थ असा नव्हे की, आता मी तू असेन आणि तू मी असशील. आपण कोणावर प्रेम करतो या संदर्भातील दृष्टिकोनांचा विनिमय करणं, असा याचा अर्थ आहे. आपल्यावर प्रेम करून इतरांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी आपण आता स्वार्थी आस्थांकडे दुर्लक्ष करावं आणि इतर सर्वांवर प्रेम करावं. हे आपल्याला करता आलं नाही, तर आपल्याला काहीही साध्य करता येणार नाही. पण आपल्याला या प्रवृत्तींचा विनिमय करता आला, तर त्या आधारावर आपण आपला आनंद इतरांना देणारी व इतरांचं दुःख स्वतःकडे घेणारी कल्पना करत जाऊ शकतो. यातून आपल्याला प्रामाणिक स्नेहपूर्ण प्रेम व करुणामय सहानुभूती साधता येतील. प्रत्येकाच्या समस्या व दुःख दूर करण्याचा आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा अपवादात्मक निश्चयही याद्वारे आपल्याला साध्य करता येतो. शिवाय, आपल्याला बोधिचित्तही साध्य होतं, त्याद्वारे आपण शक्य तितक्या प्रमाणात ही कृती करण्याकरिता साक्षात्कार होईल म्हणून प्रयत्नशील राहतो.

सारांश

शांतिदेव यांचं एन्गेजिंग इन बोधिसत्व बिहेव्हिअर (संस्कृत: बोधिचर्यावतार), कदम्प गुरूंची शिकवण, आणि अर्थातच चौथे पन्चेन लामा यांचं द गुरू पूजा- लामा चोपा – हे उपरोक्त शिकवणुकीचे स्रोत आहेत. परमपवित्र दलाई लामा यांचे दिवंगत कनिष्ठ शिक्षक क्याब्जे त्रिजांग दोर्जेचांग यांच्या संकलित वाङ्मयामध्ये (द कलेक्टेड वर्क्स ऑफ क्याब्जे त्रिजांग दोर्जेचांग) हे क्रमांकित विभागांमध्ये नमूद केलेलं आहे. परंतु, रूपरेषेमध्ये व त्यातील क्रमांकांमध्ये खूप जास्त रस घेणं, म्हणजे असं होईल की, आपल्या समोर एका ताटलीत सात मोमो ठेवलेले आहेत, पण ते खाण्याऐवजी आपण कोणालातरी त्यांच्या संख्येची खातरजमा करायला सांगतो, त्यांच्या आकाराचा स्रोत कोणता ते तपासतो, इत्यादी. त्यापेक्षा निवांत बसून समोरचा पदार्थ खावा!

Top