शाक्यमुनी बुद्धांचे जीवन

आपण ज्या परंपरा मानतो, त्यानुसार बुद्धांकडे एक असा सामान्य माणूस म्हणून पाहिले जाऊ शकते, ज्याने आपल्या असाधारण प्रयत्नांनी मुक्ती प्राप्त केली किंवा असा ज्ञानप्राप्त सिद्धी असलेला जीव, ज्याने २५०० वर्षांपूर्वी ज्ञानोद्याचा मार्ग दाखविण्यासाठी कार्य केले. इथे आपण बुद्धांच्या जीवनपटावर नजर टाकणार आहोत आणि त्यातून आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कशी प्रेरणा घेणे शक्य आहे, हे पाहणार आहोत.

ऐतिहासिक तिथीनुसार शाक्यमुनी बुद्ध, जे गौतम बुद्ध म्हणूनही ओळखले जातात, त्यांचा जीवनकाळ ख्रिस्तपूर्व ५६६ ते ४८५ वर्षांच्या दरम्यानचा मध्य-उत्तर भारतातील आहे. विविध बौद्ध सुत्रांत त्यांच्या जीवनविषयक विभिन्न संदर्भ मिळतात, जे कालांतराने अधिक विस्तारित होत गेले आहेत. पण बौद्ध साहित्य बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर तीन शतकांनंतर लिहिले गेल्याने या संदर्भांमध्ये दिले गेलेल्या माहितीची सत्यता निश्चित स्वरूपात स्पष्ट करणे कठीण आहे. पण काही वृतांत लिखित स्वरूपात कालांतराने प्रकाशात आले असले तरी त्यांच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह उभे करता येणार नाही, काही घटना लिखित स्वरूपात आल्यानंतरही काही अन्य गोष्टी मौखिक रूपातही सांगण्याची परंपरा कायम राहिलेली असू शकते.   

सामान्यतः महात्मा बुद्धांसहित अन्य महान बौद्ध गुरूंच्या पारंपारिक जीवनचरित्रांचे संकलन उपदेशाच्या कारणास्तव करण्यात आले होते, ते ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जतन करण्यात आले नव्हते. विशेषतः ही जीवनचरित्रे अशा स्वरूपात लिहिली जात होती, की जेणेकरून मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीच्या आध्यात्मिक मार्गावर बौद्ध अनुयायांना उपदेश आणि प्रेरणा मिळेल. त्यामुळे बुद्धांच्या कथेवरून प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला ती कथा त्या संदर्भातून समजून घ्यायला हवी आणि त्यातून मिळणाऱ्या शिकवणींचे विश्लेषण करायला हवे.  

बुद्धांच्या जीवनविषयक स्रोत

बुद्धांच्या जीवनविषयक प्राथमिक स्रोत आहे – थेरवादाच्या धार्मिक ग्रंथांमधील माज्झिम निकायमधील अनेक पाली सूक्त तथा हीनयान संप्रदायातील अनेक विनय ग्रंथ, ज्यात संघ विषयक अनुशासनाचे वर्णन आहे. तरी या प्रत्येक ग्रंथांमध्ये बुद्धांच्या जीवनगाथेचे अंशतः वर्णनच मिळते. 

बुद्धजीवनाचा सर्वप्रथम अधिकृत वृतांत ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील हीनयानातील महासंघिका परंपरेतील महावस्तु काव्यरचनेत मिळतो. हा ग्रंथ त्रिपिटकांमध्ये संग्रहित नाही. यात हा वृत्तांत थोडा विस्तृत आहे, उदाहरणार्थ, यात बुद्धांचा जन्म राजघराण्यात झाल्याचे तपशील आहेत. याच प्रकारचा आणखी एक काव्यग्रंथ ललितविस्तर सूत्र, हीनयानातील सर्वास्तिवाद परंपरेत समोर आला. त्यानंतरच्या महायान आवृत्त्यांमध्ये याचा अधिक विस्तार करण्यात आला. उदाहरणार्थ, त्यात स्पष्ट करण्यात आले की शाक्यमुनींना शेकडो वर्षांपूर्वीच बुद्धत्व प्राप्त झाले होते आणि सिद्धार्थाच्या रूपात प्रकट होण्याचा त्यांचा उद्देश केवळ इतरांना निर्वाणाच्या मार्गाची शिकवण देण्याचा होता. 

शेवटी यातील काही जीवनचरित्रांचा त्रिपिटकांसारख्या संकलनात समावेश झाला. यातील अश्वघोषाचे बुद्धचरित सर्वात लोकप्रिय आहे, जे पहिल्या शतकात लिहिले गेले. इतर वृतांत चक्रसंवर साहित्यासारख्या तंत्र ग्रंथांमधून कालांतराने समोर आले. त्यात आपल्याला हे तपशील मिळतात की शाक्यमुनींच्या रूपात प्रकट होऊन प्रज्ञापारमिता सूत्र विषयक शिकवण देतेवेळी बुद्ध अगदी त्याच वेळी वज्रधारा रूपातही प्रकट झाले आणि त्यांनी तंत्रविषयक शिकवण दिली.  

या सर्व तपशिलांमधून आपण प्रेरणा आणि शिकवण घेऊ शकतो. पण आपण मूलतः त्या वृतांतावर भर द्यायला हवा, जे ऐतिहासिक बुद्धांचे चित्रण करतात. 

जन्म, प्रारंभिक जीवन आणि संन्यास 

प्रारंभिक तपशिलांनुसार शाक्यमुनींचा जन्म सध्याच्या भारत-नेपाल सीमेवरील शाक्य राज्याची राजधानी कपिलवस्तु येथे, एका गर्भश्रीमंत क्षत्रिय कुटुंबात झाला. पण त्यांचा राजघराण्यात जन्म झाल्याचा उल्लेख आढळत नाही. त्यानंतरच्या वर्णनांमध्ये त्यांचा राजघराण्यातील जन्म आणि सिद्धार्थ नावासंबंधी संदर्भ येतात. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोदन होते. पण त्यांच्या आईचे नाव मायादेवी असल्याचे वर्णनही त्यानंतरच्या आवृत्त्यांमध्ये येते. शिवाय त्यात त्यांच्या स्वप्नात चमत्कारिक गर्भधारणा झाल्याचा, ज्यात सहा हस्तिदंत असलेल्या हत्तीचा त्यांच्या शरीरातील प्रवेश आणि असित मुनींच्या भविष्यवाणीचा उल्लेख आहे, ज्यात हा बालक चक्रवर्ती राजा होईल किंवा महान मुनि होईल, असा संदर्भ आहे. त्यानंतरच्या साहित्यात कपिलवस्तुपासून काही अंतरावर असणाऱ्या लुम्बिनीच्या उपवनात मातेच्या शरीरातून त्यांचा निष्पाप जन्म आणि जन्मापश्चात सात पावलं चालून ‘मी आलो आहे’ अशी बुद्धांनी केलेली घोषणा आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या आईचे अंतर्धान पावणे, अशी वर्णनं आहेत. 

युवावस्थेत बुद्धांचे जीवन सुखसोयींनी परिपूर्ण होते. त्यांनी यशोधरा नावाच्या महिलेशी लग्न केले आणि त्यांना राहूल नावाचा मुलगाही झाला. पण वयाच्या २९व्या वर्षी त्यांनी आपले कौटुंबिक जीवन, राज्याचे उत्तराधिकार यांचा परित्याग केला आणि श्रमण जीवन अंगीकारले. 

बुद्धांचे वैराग्य तत्कालीन समाज आणि काळाच्या संदर्भातून पाहणे फार महत्त्वाचे आहे. भ्रमणशील आध्यात्मिक साधकाचे जीवन अंगीकारताना त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलाला प्रतिकूल परिस्थितीत आणि दारिद्र्यात सोडलेले नव्हते. त्यांच्या श्रीमंत कुटुंबाकडून अर्थातच त्यांची काळजी घेतली जाणार होती. शिवाय एक क्षत्रिय असल्याने, त्याचा अर्थ असाच होता की कधी ना कधी त्यांना युद्धासाठी घर सोडावेच लागले असते. आणि एका क्षत्रिय परिवाराने पुरूषाचे कर्तव्य म्हणून ही गोष्ट स्वीकारली असती. 

बाह्य शत्रुंशी लढाई लढता येऊ शकते, पण खरे युद्ध आपल्या आतील शत्रुंविरोधात असते आणि बुद्ध हेच युद्ध लढण्यासाठी गेले. या उद्देशासाठी बुद्धांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करण्याचा अर्थ हाच आहे की आध्यात्मिक साधकाचे हेच कर्तव्य आहे की त्याने आध्यात्मिक शोधासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत करावे. जर सध्याच्या आधुनिक युगात आपल्याला संन्यासी होण्यासाठी घर सोडावे लागले, तर आपल्याला ही खात्री करून घ्यावी लागेल की आपल्यामागे आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. याचा संबंध फक्त आपला सहचर आणि मुलांशी नाही, तर आपल्या वयोवृद्ध मातापित्याशीही आहे. आपण आपल्या घरदाराचा त्याग करू अथवा ना करू, पण प्रत्येक बौद्ध आध्यात्मिक साधकाचे हे कर्तव्य आहे की त्याने दुःख कमी करण्यासाठी सुखसुविधांच्या व्यसनावर निर्बंध आणावेत, जसे बुद्धांनी केले होते. 

दुःखावर विजय मिळवण्यासाठी बुद्ध जन्माचे स्वरूप, जरा, व्याधी, मरण, पुनर्जन्म, खिन्नता आणि भ्रमितावस्था यांचे आकलन करू पाहत होते. याचा विस्तृत वृतांत एका घटनेच्या रूपातून समोर आला, जेव्हा त्यांचा सारथी छन्ना त्यांना शहराची सफर घडविण्यासाठी रथातून घेऊन गेला. बुद्धांनी रस्त्यात आजारी, वृद्ध, मृत आणि संन्यासी लोकांना पाहिले आणि छन्नाकडून त्या प्रत्येकाबाबतचे स्पष्टीकरणही ऐकले. अशा रीतीने बुद्धांना प्रत्येकाला अनुभवाला येणाऱ्या दुःखांची जाणीव झाली आणि त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठीच्या उपायांवर त्यांनी विचार केला. 

आध्यात्मिक मार्गावर एका सारथीद्वारे साहाय्यता मिळवण्याची घटना भगवत गीतेतील अर्जुनाच्या घटनेच्या समान आहे, ज्यात त्याचा सारथी कृष्णाने त्याच्या क्षत्रिय धर्माचे पालन करून युद्धभूमीवर आपल्या आप्तांविरूद्ध युद्ध करण्याचा उपदेश दिला आहे. बौद्ध आणि हिंदू दोन्ही प्रकरणात आपण आपल्या सुखासीन चौकटीतून बाहेर पडून सत्याचा शोध घेण्याच्या आपल्या कर्तव्यापासून पळ न काढण्याचा सखोल संबंध आहे. दोन्ही घटनांमध्ये स्वाभाविकपणे रथ हे मनाच्या वाहनाचे एक प्रतीक आहे, जो त्याला मुक्तीपर्यंत पोहचवतो आणि सारथीचे शब्द हे एका वचनाचे, अर्थात प्रेरणा शक्तीच्या वाहनाचे प्रतीक आहे, जे यथार्थाच्या ज्ञान प्राप्तीच्या प्रक्रियेला चालना देते. 

बुद्धांची साधना आणि ज्ञानप्राप्ती 

ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या एका भ्रमणशील आध्यात्मिक साधकाच्या रूपात बुद्धांनी दोन गुरूंच्या मार्गदर्शऩाखाली ध्यानधारणेतील विविध स्तरांची प्राप्ती आणि निराकार अवस्था आत्मसात करण्याच्या उपायांचे अध्ययन केले. ते एकाग्रतेच्या परिशुद्ध रूपांच्या गहन स्तरावर पोहचण्यात सक्षम झाले, ज्यात ते स्थूल दुःख किंवा सांसारिक सुखांनी प्रभावित होत नसत, पण तरी ते समाधानी नव्हते. त्यांच्या ध्यानात आले की या उच्चतम अवस्था फक्त अस्थायी, क्षणिक समाधान देतात, दुषित भावनांपासून कायमस्वरूपी मुक्ती देत नाहीत, त्यांना ज्या सखोल सार्वभौम दुःखांपासून मुक्ती हवी होती, ती देत नाहीत. त्यानंतर त्यांनी पाच तपस्वींसोबत कठोर तपस्या केली, पण त्यानेही अनियंत्रित पुनर्जन्मांसारख्या सांसारिक समस्यांपासून मुक्ती लाभली नाही. केवळ तद्नंतरच्या वर्णनांमध्ये बुद्धांनी निरंजना नदीतिरी त्यांचा सहा वर्षांचा उपवास सोडल्याचे आणि सुजाताने त्यांना खीर भेट केल्याच्या घटनेचे वर्णन मिळते. 

आपल्यासाठी बुद्धांचे उदाहरण हे स्पष्ट करते की आपण केवळ पूर्णतः शांत होऊन किंवा साधनेच्या नशेतही संतुष्ट होऊ नये, मग अमली पदार्थ तर दूरची गोष्ट आहे. एका सखोल ध्यान स्थितीत स्वतःला हरवून जाणे किंवा आत्मपीडा देणाऱ्या कठोर तपस्यांमध्ये स्वतःला झोकून देणे हा ही काही उपाय नाही. आपल्याला मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीचा संपूर्ण प्रवास करायचा आहे आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी पुरेशा नसलेल्या आध्यात्मिक पद्धतींमध्ये आपण समाधान मानता कामा नये. 

तपश्चर्या सोडल्यानंतर भयावर नियंत्रण मिळवण्यासाठी बुद्धांनी जंगलात एकट्याने ध्यानधारणा केली. भयाच्या भावनेमागे विलासीवृत्ती आणि मनोरंजनाच्या प्रबळ इच्छेपेक्षाही अधिक बाधक इच्छा असते ती म्हणजे, स्वतःला गोंजारत राहण्याची आणि एक अशक्य ‘मी’पणाचे अस्तित्व प्राप्त करण्याची. धारदार शस्त्राचे चाक (द व्हील ऑफ शार्प वेपन्स) या ग्रंथात इसवीसन दहाव्या शतकातील भारतीय गुरू धर्मरक्षितांनी मोरांच्या प्रतिमेचा वापर केला आहे, जे विषारी वनौषधींच्या वनात नाचतबागडत असतात. हे मोर बोधिसत्वाचे प्रतीक आहेत, जे इच्छा, क्रोध आणि मूर्खपणाच्या विषारी भावनांना रूपांतरित करून त्यांच्या साहाय्याने स्वतःला गोंजारत राहण्याच्या वृत्तीवर आणि मीपणाच्या लालसेवर नियंत्रण मिळवतात. 

प्रचंड ध्यानधारणेनंतर पस्तिसाव्या वर्षी बुद्धांना परिपूर्ण ज्ञानप्राप्ती झाली. नंतरच्या वर्णनांमध्ये तपशील मिळतात की सध्याच्या बोधगया येथील बोधिवृक्षाखाली असूयाग्रस्त देव मार याच्याशी यशस्वी लढत देऊन त्यांनी ज्ञानप्राप्ती साध्य केली. ईर्ष्याग्रस्त मार बुद्धांचे ध्यान भंग करण्यासाठी बोधिवृक्षाखाली भयंकर आणि संमोहक रूप धारण करून आला होता. 

प्रारंभिक वर्णनांमध्ये तपशील येतो की, तीन प्रकारचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले, ज्यात त्यांच्या स्वतःच्या गतजन्मांचे पूर्ण ज्ञान, इतरांची कर्मे आणि पुनर्जन्मांचे ज्ञान आणि चार आर्य सत्यांचे ज्ञान समाविष्ट होते. नंतरच्या वर्णनात त्यांना ज्ञानप्राप्तीसोबतच सर्वज्ञता प्राप्त झाल्याचे संदर्भ येतात.

शिकवण आणि बौद्ध संघाची स्थापना 

स्वतः ज्ञानप्राप्ती साध्य केल्यानंतर इतरांना ती शिकवण देताना बुद्धांना संकोच वाटू लागला, त्यांना वाटले की हे कोणीही समजू शकणार नाही. पण विश्वनिर्माता भारतीय देव ब्रह्मा आणि देवांचा देव इंद्राने त्यांना ती शिकवण देण्याचा आग्रह धरला. ब्रह्मदेवाने केलेल्या प्रार्थनेत त्याने सांगितले की, बुद्धांनी ती शिकवण दिली नाही तर जग अंतहीन दुःखाने ग्रासले जाईल आणि इथे किमान काही लोक तरी असतील, जे त्याची शिकवण समजू शकतील. 

या तपशिलात उपहासात्मक घटक असू शकतात, ज्यात तत्कालीन भारतीय आध्यात्मिक परंपरांमध्ये सांगितलेल्या साधना पद्धतींपेक्षा बौद्ध शिकवणींचे श्रेष्ठत्व सुचित केलेले असेल.  सर्वोच्च देवतांनीच जगाला बौद्ध शिकवणींची गरज असल्याचे मान्य केले कारण त्यांच्याजवळ लोकांची दुःखे कायमस्वरूपी दूर करण्याच्या पद्धतींचा अभाव होता, ज्यातून हे सांगण्याचा प्रयत्न होता की सर्वसामान्य लोकांना या शिकवणींची किती नितांत गरज होती. पुढे जाऊन बौद्ध प्रतीकांमध्ये ब्रह्मा अहंकाराचे प्रतीक आहे; ब्रह्माची आपण सर्व शक्तिमान विश्वनिर्माता असल्याची धारणा भ्रमितावस्थेची पराकाष्ठा आहे, ज्यात एक अशक्य ‘मी’पण आहे, ज्याचे जीवनातील सर्व गोष्टींवर नियंत्रण आहे. अशा स्वरूपाचा भ्रामक विश्वास अंततः नैराश्य आणि दुःखाला जन्म देतो. आपल्या अस्तित्वाच्या संदर्भात केवळ बुद्धांची शिकवण वास्तविक दुःख आणि त्या दुःखाची कारणे संपवण्याचा मार्ग दाखवते.  

ब्रह्मा आणि इंद्राची विनंती स्वीकारून बुद्ध सारनाथला गेले आणि तिथे हरणांच्या उपवनात त्यांनी आपल्या पूर्व पाच सहकाऱ्यांना चार आर्य सत्यांची शिकवण दिली. बौद्ध प्रतीकांमध्ये हरिण मृदुतेचे प्रतीक आहे आणि अशा प्रकारे बुद्ध अशा मृदू मार्गाने शिकवण देतात, जी भोग आणि संन्यासातील अतिरेकापासून दूर आहे.

लवकरच निकटवर्ती वाराणसीतील अनेक नवयुवक बुद्धांसह कठोर ब्रह्मचर्याचे पालन करत भ्रमणशील आध्यात्मिक साधक बनले. त्यांचे पालक त्यांचे साधारण शिष्य झाले आणि भिक्षा देऊन त्या समुदायांना आधार देत राहिले. जसजसे एखादा सदस्य चांगला प्रशिक्षित होत गेला, त्याला इतर लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी पाठवण्यात आले. अशा रीतीने बुद्धांच्या अनुयायांचा समूह वाढत गेला आणि लवकरच ते एका स्थानावर स्थिर झाले आणि त्यांनी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी ‘संघ’ निर्माण केले. 

बुद्धांनी या मठीय समूहांना व्यावहारिक निर्देशांनुसार संघटित केले. या प्रारंभिक टप्प्यावर आपण भिक्षु शब्दप्रयोग करू, तर ते लोकांना संघात सामील करून घेऊ शकत होते, पण त्यांच्यावर काही निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक  होते, जसे निधर्मी किंवा मठाबाहेरील अधिकाऱ्यांसोबत त्यांनी तंटे करू नयेत. अशा रीतीने बुद्धांनी गुन्हेगार, राज्य सेवेतील कर्मचारी जसे लष्करातील लोक, दासत्वातून मुक्त न झालेले दास आणि कुष्ठरोगासारखे संसर्गजन्य रोग असलेले रुग्ण यांना संघात सामील करून घेतले नाही. वीस वर्षांहून कमी वय असणाऱ्यांनाही प्रवेशाची अनुमती नव्हती. बुद्धांना समस्या नको होत्या आणि धार्मिक शिकवण व संघाबाबत लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करायची होती. यातून स्पष्ट होते की बुद्धांचे अनुयायी म्हणून आपण स्थानिक रीतिरिवाजांचा आदर राखायला हवा आणि आपले वर्तन सन्माननीय असायला हवे, जेणेकरून लोकांच्या मनात बौद्ध धर्माची चांगली प्रतिमा निर्माण होईल आणि आदराची भावना वाढेल. 

लवकरच बुद्ध बोध गया असलेल्या मगध राज्यात परतले. बिम्बिसार राजाने त्यांना राजगृह शहरात आमंत्रित केले, ज्याला आज राजगीर म्हणून ओळखले जाते आणि त्यानंतर बिम्बिसार बुद्धांचे आश्रयदाता आणि शिष्य बनले. तिथेच शारिपुत्र आण मौद्गल्यायन यांनी सुद्धा बुद्धांच्या विस्तार पावणाऱ्या संघात प्रवेश केला आणि ते बुद्धांचे निकटतम शिष्य म्हणून ओळखले जाऊ लागले.

ज्ञानप्राप्तीनंतर एक वर्षाच्या आतच बुद्ध आपल्या घरी कपिलवस्तुला परत आले, जिथे त्यांचा मुलगा राहूलने संघात प्रवेश केला. बुद्धांचे सावत्र भाऊ नंद हे ही आधीच घरदार सोडून बुद्धांसोबत गेले होते. बुद्धांचे वडील राजा शुद्धोदन वंश परंपराच तुटल्याने फार दुःखी होते आणि त्यांनी बुद्धांना प्रार्थना केली की मुलाने संघात प्रवेश करण्यापूर्वी पालकांची संमती घ्यायला हवी. बुद्धांनी या गोष्टीला पूर्ण संमती दिली. या वर्णनांचा उद्देश बुद्ध आपल्या पित्याप्रति किती क्रूर होते, हे दाखवण्याचा नाही, तर असा संदेश देण्याचा उद्देश आहे की ज्यामुळे बौद्ध धर्माप्रति लोकांमध्ये आणि विशेषतः कुटुंबांमध्ये वाईट भावना निर्माण होऊ नये.

नंतरच्या वर्णनांमध्ये तपशील येतात की बुद्धांनी आपल्या परा-भौतिक शक्तीने तेहतीस देवांच्या स्वर्गात किंवा अन्य स्रोतांनुसार तुषिता स्वर्गात जाऊन जिथे त्यांच्या आईचा पुनर्जन्म झाला होता, तिला शिकवण दिली. यातून आईच्या प्रेमाचा आदर राखत तिच्याप्रति कृतज्ञ असण्याचे महत्त्व सिद्ध होते. 

बौद्ध संघांचा विस्तार 

सुरुवातीचे संघ आकाराने छोटे असत आणि एका संघात वीसहून अधिक भिक्षु नसत. प्रत्येक संघ स्वायत्त होता आणि संघात राहणारे भिक्षु निर्धारित क्षेत्रातील सीमांमध्येच भिक्षाटन करत असत. कोणत्याही प्रकारचे मतभेद होऊ नयेत, यासाठी प्रत्येक संघाबाबतचे निर्णय सर्व संघवासी सदस्यांच्या सर्वानुमते घेतले जात आणि कुणाही एका व्यक्तीकडे संपूर्ण अधिकार दिले जात नसत. बुद्धांनी त्यांना निर्देश दिले होते की धार्मिक शिकवणींनाच अधिकाऱ्याच्या रूपात मानले जावे. गरज पडल्यास संघाच्या शिस्तीचे नियमही बदलले जात असत, पण कोणताही बदल तेव्हाच लागू केला जात असे, जेव्हा तो सर्व संघवासींच्या मतानुसार घेतला गेला असेल. 

राजा बिम्बिसारांनी सल्ला दिला की, बुद्धांनी जैनांसारख्या आध्यात्मिक भिक्षु समूहांप्रमाणे साप्ताहिक सभांच्या आयोजनाच्या प्रथेची अनुमती द्यावी. या प्रथेनुसार प्रत्येक सप्ताहाच्या पहिल्या दिवशी उपदेशांवर चर्चा करण्यासाठी सर्व जण एकत्र येत असत. बुद्धांनी हा प्रस्ताव स्वीकारण्यास अनुमती दिली. ज्यातून हे स्पष्ट होते की तत्कालीन प्रचलित प्रथा स्वीकारण्याबाबत त्यांचा दृष्टिकोन उदार होता. आणि बुद्धांनी आपल्या आध्यात्मिक संघांना आणि आपल्या उपदेशांना जैन रीतींनुसार आकार दिला. जैन धर्माचे प्रवर्तक महावीरांनी बुद्धांआधी जवळपास अर्ध्या शतकांपूर्वी आपली शिकवण दिली होती. 

काही दिवसांनी शारिपुत्रांनीही संघाच्या शासनाबाबत नियम स्थापित करण्याचा आग्रह धरला. पण तेव्हा बुद्धांनी तोवर प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला, जोवर एखादी विशिष्ट समस्या उद्भवणार नाही आणि तशी समस्या उद्भवल्यास, ती पुन्हा उद्भवणार नाही, यासाठीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. हे धोरण दोन प्रकारच्या कृत्यांशी संबंधित होते, पहिली स्वाभाविक हानिकारक कृत्ये, जी ज्या व्यक्तीने ती केली आहेत त्याला हानिकारक असतील आणि दुसरी कृत्ये विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट परिस्थितीत नैतिकदृष्ट्या अयोग्य असतील. अशा प्रकारे त्यांचे अनुशासनासंबंधी नियम(विनय) व्यावहारिक होते आणि प्रयोजनानुसार तयार करण्यात आले होते. या मागे बुद्धांचा उद्देश कोणत्याही समस्येपासून आणि कुणालाही दुखावण्यापासून दूर राहण्याचा होता. 

अनुशासनाच्या याच नियमांच्या आधारावर बुद्धांनी संघांच्या साप्ताहिक बैठकांमध्ये प्रतिज्ञा घेण्याची परंपरा सुरू केली, ज्यात भिक्षुंना आपल्यामार्फत घडलेल्या नियमांच्या उल्लंघनाला जाहीरपणे मान्य करावे लागत असे. गंभीर उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये संघातून हकालपट्टी किंवा तपास होईपर्यंत तसेच थांबण्याची नामुष्की ओढवली जात असे. नंतर ही बैठक केवळ द्विमासिक करण्यात आली. 

त्यानंतर बुद्धांनी वर्षा ऋतुत तीन महिन्यांच्या एकांतवासाची परंपरा सुरू केली, या काळात भिक्षु एकाच जागेवर थांबत असत आणि प्रवास टाळत असत. यामागचा उद्देश भिक्षुंनी शेतातील पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून चालताना रोपे पायाखाली चिरडू नयेत असा होता. त्यातून स्थायी संघांची परंपरा उदयाला आली, जी व्यावहारिकही होती. आणि ही परंपरा सामान्य लोकांना नुकसान पोहचू नये आणि त्यांचा आदर मिळवता यावा, यासाठी अधिक विकसित झाली. 

दुसऱ्या वर्षा ऋतुतील एकांतवासापासून पुढील २५ वर्षांपर्यंतचा काळ बुद्धांनी कौशल राज्याची राजधानी श्रावस्तीच्या बाहेर जेतवन कुंजवनात व्यतीत केला. अनाथपिंडद नावाच्या व्यापाऱ्याने या जागी बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांसाठी मठ स्थापन केला आणि पुढे राजा प्रसेनजित यांनी मठाचा आर्थिक भार उचलला. जेतवनातील या मठात बुद्धांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. ज्यातील सर्वात प्रसिद्ध घटना ती होती, ज्यात बुद्धांनी तत्कालीन सहा गैर-बौद्धमतांच्या अनुयायांना चमत्कारी शक्तींच्या स्पर्धेत पराजित केले.

सध्याच्या काळात आपल्यापैकी कोणीच चमत्कार करू शकत नाही. पण आपल्या विरोधकांना पराजित करण्यासाठी बुद्धांद्वारे तर्काच्या जागी चमत्कारी शक्तींचा प्रयोग होणे, हे दर्शविते की जेव्हा समोरचे लोक तर्क स्वीकारण्यास तयार नसतील, तर आपल्या कौशल्य आणि व्यावहारिकतेच्या साहाय्याने आपले कसब दाखवून त्यांना तर्काचे महत्त्व स्वीकारायला लावणे, हाच योग्य मार्ग आहे. जसे इंग्रजीत म्हण आहे की, ‘शब्दांपेक्षा कृती अधिक बोलते.’      

बौद्ध भिक्षुणींच्या संघाची स्थापना 

नंतरच्या काळात बुद्धांनी आपली मावशी महाप्रजापतिच्या विनंतीवरून वैशाली येथे भिक्षुणींसाठी संघाची स्थापना केली. सुरुवातीला ते अशा संघाच्या स्थापनेसाठी उत्सुक नव्हते, पण नंतर त्यांनी निर्णय घेतला की भिक्षुंच्या तुलनेत भिक्षुणींसाठी अधिक नियम बनवल्यास भिक्षुणींसाठी संघ स्थापन करणे शक्य आहे. पण असे करून बुद्धांना असा संकेत द्यायचा नव्हता की महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक शिस्तहीन आहेत आणि त्यांच्यासाठी अधिक कठोर नियम बनवून त्यांच्यावर निर्बंध आणण्याची गरज आहे. तर बुद्धांना अशी शंका होती की भिक्षुणींच्या संघामुळे बौद्धमताची प्रतिष्ठा कमी होईल आणि बौद्ध शिकवणींचा अकाली अंत होईल. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे बुद्ध सामान्य जनसमुदायाचा अनादर वा रोष ओढवून घेऊ इच्छित नव्हते आणि त्यामुळे भिक्षुणींच्या संघांनी कोणत्याही अनैतिक आचरणापासून दूर असणे आवश्यक होते. 

सामान्यतः बुद्ध निर्बंधांच्या विरोधात होते आणि एखादा कमी महत्त्वाचा नियम अनावश्यक वाटत असेल, तर तो बंद करण्याची त्यांची इच्छा असे. त्यांचे धोरण गहनतम सत्य आणि पारंपरिक सत्य दोन्हींना महत्त्व देणारे होते. अर्थात गहनतम सत्याच्या दृष्टीने भिक्षुणींच्या संघाच्या स्थापनेत काहीच गैर नव्हते, पण तत्कालीन सर्वसामान्य लोकांचा बौद्ध शिकवणींबाबत अनादर ओढवू नये, यासाठी भिक्षुणींसाठी अधिक नियम ठरवण्याची गरज मानली गेली. गहिऱ्या सत्यात समाज काय म्हणतो हे गैरलागू असले तरी पारंपरिक सत्याच्या दृष्टीने बौद्ध समुदायासाठी सामान्य जनतेचा आदर आणि विश्वास संपादन करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आधुनिक युग आणि समाजात भिक्षुणी, सामान्य महिला किंवा कोणत्याही अल्पसंख्याक समूहाप्रतिच्या पूर्वग्रहामुळे बौद्ध धर्माबद्दल अनादर निर्माण होत असेल, तर बुद्धांच्या शिकवणींचा कल हा ते नियम समकालीन मापदंडांप्रमाणे बदलण्यासाठी अनुकूल आहे.  

शेवटी सहनशीलता आणि करुणा हेच बुद्धांच्या शिकवणीचे प्रमुख बिंदू आहेत. उदाहरणार्थ, बुद्ध इतर संप्रदायातून येणाऱ्या आपल्या अनुयायांना त्यांच्या जुन्या संप्रदायाचे समर्थन कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहित करतात. बौद्ध संघांमध्येसुद्धा संघवासियांना एकमेकांची काळजी घेण्याची शिकवण दिली जाते. उदाहरणार्थ, एखादा भिक्षु आजारी पडला तर दुसऱ्या भिक्षुंनी त्याची काळजी घेण्याच्या सूचना बुद्धांनी केल्या आहेत कारण सर्व बौद्ध एकाच कुटुंबाचा भाग आहेत. सर्व सामान्य बौद्ध अनुयायांसाठीही हा महत्त्वपूर्ण उपदेश आहे. 

बुद्धांची शिकवण देण्याची पद्धत 

बुद्धांनी आपल्या स्वतःच्या जिवंत उदाहरणातून आणि मौखिक सूचनांच्या माध्यमातून इतरांना शिकवण दिली. मौखिक सूचनांसाठी त्यांनी समूहासाठीची शिकवण आणि व्यक्तिगत शिकवणीच्या स्वरूपानुसार दोन पद्धती अवलंबल्या. समूहासमोर बुद्ध आपली शिकवण प्रवचनाच्या रूपात देत असत, ज्यात ते एखादा मुद्दा वेगवेगळ्या शब्दांमध्ये पुन्हा पुन्हा सांगत, जेणेकरून श्रोत्यांना त्याचे नेमके आकलन होईल आणि तो स्मरणात राहील. पण त्यांना जेव्हा व्यक्तिगत शिकवण द्यावी लागे, विशेषतः त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना जेवणासाठी आमंत्रित केलेल्या घरी बुद्ध निराळी शैली वापरत. ते श्रोत्यांच्या दृष्टिकोनाला कधीही विरोध करत नसत, उलट त्या व्यक्तीच्या जागेवर स्वतःला ठेवून शंका विचारत, ज्यामुळे त्या श्रोत्याला त्याचे विचार अधिक स्पष्ट होत. अशा प्रकारे बुद्ध त्या व्यक्तीला त्याचे विचार आणि दृष्टिकोन सुधारण्यासाठी आणि सत्याच्या सखोल आकलनासाठी साहाय्य करत. एक उदाहरण सांगायचे झाले तर, एका घमेंडी ब्राह्मणाला बुद्धांनी हे समजून घेण्यास मदत केली की कुणीही एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला आल्याने महान ठरत नाही, तर सद्गुण विकसित केल्याने मोठा होतो. 

एक दुसरे उदाहरण एक शोकाकुल आईचे आहे, जी तिच्या मृत बाळाला बुद्धांकडे घेऊन येऊन त्याला जिवंत करण्याची त्यांना विनंती करू लागली. बुद्धांनी तिला एखाद्या अशा घरातून मोहरीचे दाणे घेऊन येण्यास सांगितले की ज्या घरात कधीच मृत्यू झालेला नाही. त्यानंतर ते काय करणे शक्य आहे, ते पाहतील. ती महिला घरघर फिरली, पण मृत्युचा अनुभव नसलेले एकही घर तिला सापडले नाही. तिला हळूहळू जाणीव झाली की, प्रत्येकालाच कधी ना कधी मृत्यू येतो. आणि अशा रीतीने ती शांत चित्ताने स्वतःच्या मुलावर अंत्यसंस्कार करू शकली.  

बुद्धांच्या शिकवणींची पद्धत स्पष्ट करते की व्यक्तिगत शिकवणींमध्ये प्रत्यक्ष शिकवण देण्यापेक्षा त्यांना स्वतःला विचार करायला प्रवृत्त करण्याची पद्धत अधिक परिणामकारक आहे. पण सामुहिक शिकवणींमध्ये स्पष्ट आणि सरळ ढंगात गोष्टींचे आकलन करून देणे अधिक चांगले आहे.


बुद्धांविरोधातील षड्यंत्रे 

बुद्धनिर्वाणाच्या सात वर्ष आधी त्यांचे चुलत भाऊ देवदत्तने संघाचे प्रमुखपद मिळवण्यासाठी षड्यंत्र रचले. तसेच राजकुमार अजातशत्रुने आपला पिता बिम्बिसारला मगध देशाच्या राजपदावरून हटवण्यासाठी षड्यंत्र रचले. त्यामुळे देवदत्त आणि अजातशत्रुने एकत्रित षड्यंत्र रचले. अजातशत्रुने बिम्बिसाराची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि याचा परिणाम असा झाला की राजाने मुलासाठी आपल्या सिंहासनाचा त्याग केला. अजातशत्रुचे यश पाहून देवदत्ताने त्याला बुद्धांची हत्या करण्यास सांगितले, पण बुद्धांच्या हत्येचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. 

त्यानंतर देवदत्ताने आपण बुद्धांपेक्षा महान असल्याचा दावा करत बुद्धांच्या अनुयायांना त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि असे करत असताना त्याने आणखी कठोर नियम बनवले. इसवीसन चौथ्या शतकातील थेरवादी गुरू बुद्धघोषांच्या विशुद्धिमग्ग ग्रंथानुसार देवदत्ताच्या नियमात खालील गोष्टींचा समावेश होताः

  • केवळ जुन्या कापडापासून बनविलेली वस्त्रे परिधान करावी
  • फक्त तीनच वस्त्रे असावी
  • भिक्षुंनी फक्त भिक्षेसाठी जावे आणि जेवणाचे आमंत्रण स्वीकारू नये
  • भिक्षाटनावेळी कोणतेही घर सोडू नये
  • भिक्षेत मिळालेले अन्न एकाच बैठकीत संपवावे
  • केवळ स्वतःच्याच भिक्षापात्रातून खावे
  • इतर कोणत्याही अन्नाचा स्वीकार करू नये
  • फक्त जंगलात निवास करावा
  • वृक्षाखाली आश्रय घ्यावा
  • खुल्या हवेत राहावे, घरात राहू नये
  • अधिकाधिक काळ स्मशानात राहावे
  • सतत एका जागेहून दुसऱ्या जागी भटकत असताना निवासासाठी जे स्थान मिळेल त्याबाबत समाधानी असावे
  • केवळ बैठ्या अवस्थेत झोपावे, पडून झोपू नये 

बुद्धांनी सांगितले की जर एखाद्या भिक्षुला या अतिरिक्त नियमांचे पालन करायचे असेल, तर हरकत नाही, पण कोणासाठीही ते बंधनकारक नसेल. त्यांच्या शिष्यांपैकी अनेकांनी देवदत्तचे अनुसरण करण्याचे ठरविले आणि स्वतःचा संघ स्थापन करण्यासाठी बुद्धांना सोडून निघून गेले. 

थेरवाद संप्रदायात देवदत्तमार्फत ठरविले गेलेले हे नियम धुतांग म्हणून ओळखले जातात. जंगलात राहणाऱ्या भिक्षुंची परंपरा आजही थायलंडमध्ये पाहायला मिळते, ती याच परंपरेतून आली असण्याची शक्यता आहे. बुद्धांचे शिष्य महाकश्यप ही कठोर पद्धत अवलंबणारे पहिले प्रसिद्ध शिष्य होते. आजच्या काळात अशा साधना हिंदू साधुंमध्ये पाहायला मिळतात. असे वाटते की त्यांचा धर्माभ्यास बुद्ध काळातील आध्यात्मिक शोधासाठी झटणाऱ्या साधुंच्याच परंपरेचे रूप आहे.    

महायान परंपरेतही अशा प्रकारच्या साधनेच्या बारा वैशिष्टयांचा (धातुगुण) समावेश आहे. या यादीत ‘भिक्षाटनावेळी कोणतेही घर सोडू नये’ हा नियम गाळण्यात आला आहे आणि त्यात ‘कचऱ्याच्या टोपलीत फेकलेली वस्त्रे परिधान करावी’ या नियमाची भर घालण्यात आली आहे, तर ‘भिक्षाटनाला जाणे’ आणि ‘केवळ स्वतःच्या भिक्षापात्रातूनच खावे’ या दोन नियमांना एकत्रित करण्यात आले आहे. यातील अधिकांश नियमांचे पालन महान भारतीय तांत्रिक साधकांनी (महासिद्धांनी) केले जे महायान बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म अशा दोन्ही धर्मात आढळतात. 

एका प्रस्थापित बौद्ध परंपरेतून वेगळे होऊन दुसरा संप्रदाय स्थापन करणे किंवा आधुनिक संदर्भातून पाहिल्यास वेगळा धर्म स्थापन करणे ही काही समस्या नाही. असे करणे संघात फूट पाडण्यासारखे म्हणून पाहिले जात नाही, जे पाच भयंकर अपराधांमध्ये गणले जाते. पण देवदत्ताने अशा फुटीला जन्म दिला आणि असा अपराध केला की जो गट वेगळा झाला होता, त्याच्या मनात बुद्धांच्या संघाबाबत द्वेषभावना निर्माण झाली आणि ते बुद्धांवर टीका करत राहिले. आणखी काही वर्णनांनुसार, ही वाईट फूट पुढे अनेक शतके कायम राहिली. 

फुटीचा हा वृतांत स्पष्ट करतो की बुद्ध अत्यंत सहनशील होते आणि ते मूलतत्त्ववादी नव्हते. जर त्यांचे अनुयायी बुद्धांमार्फत निर्देशित अनुशासनाहून अधिक कठोर नियमांचे पालन करू इच्छित होते, तर बुद्धांना त्याबाबत तक्रार नव्हती. आणि शिष्यांना तशी इच्छा नसली, तरी ते त्यांना मान्य होते. कोणालाही बुद्धांच्या शिकवणीचे पालन बंधनकारक नव्हते. एखादा भिक्षु किंवा भिक्षुणी संघ सोडू इच्छित असले तरी त्यांची हरकत नव्हती. पण बौद्ध संघाला दोन गटात विभागणे, जिथे दोन्ही पक्ष एकमेकांबद्दल द्वेषभाव ठेवतील, एकमेकावर दोषारोप करतील, एकमेकाला हानी पोहचवतील, अशी विभागणी विनाशकारी असते. अगदी या दोन गटांपैकी एकात सामील होऊन दुसऱ्या विरोधात घृणा पसरवणे अत्यंत नुकसानदायक असते. जर एखादा गट अशा विनाशकारी आणि हानिकारक गोष्टीत गुंतलेला असेल किंवा अनुशासन भंग करत असेल तर अशा गटातील लोकांना सुचित करण्यासाठी करुणाभाव अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांना समजावता यायला हवे की अशा गटात सामील होणे किती धोकादायक आहे. पण असे करतेवेळी मनात क्रोध, घृणा किंवा बदला घेण्याची भावना असता कामा नये. 

बुद्धांचे महानिर्वाण 

वस्तुतः मुक्ती प्राप्त झाल्यानंतर बुद्ध मृत्युच्या सर्वसाधारण अनुभवांपलीकडे पोहचले होते, पण तरीही वयाच्या ८१व्या वर्षी बुद्धांनी निर्णय घेतला की त्यांच्या अनुयायांना नश्वरतेची शिकवण देण्यासाठी त्यांनी देहत्याग करणे योग्य होईल. पण असे करण्यापूर्वी त्यांनी आपला शिष्य आनंद याला , त्यांनी अधिक काळ जगून आपली शिकवण सुरू ठेवण्याविषयी विचारण्यासंदर्भात संकेत दिला होता, पण आनंद तो संकेत समजू शकला नाही. यातून स्पष्ट होते की बुद्ध तेव्हाच शिकवण देतात, जेव्हा त्यांना त्यासंदर्भात विनंती केली जाते आणि जर कुणी तशी विनंती केली नाही किंवा रस दाखवला नाही, तर ते कुठेतरी दुसरीकडे निघून जातात, जिथे लोकांना त्यांच्यापासून अधिक लाभ होईल. गुरूची उपस्थिती आणि त्यांची शिकवण विद्यार्थ्याच्या इच्छेवर अवलंबून असते. 

त्यानंतर कुशीनगर येथे चुन्द या आश्रयदात्याच्या घरी बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांना दिलेल्या भोजनानंतर ते अस्वस्थ होऊन मरणासन्न झाले. आपल्या मृत्युशय्येवर बुद्धांनी भिक्षुंना सांगितले की त्यांच्या मनात काही शंका असतील किंवा काही अनुत्तरित प्रश्न असतील, तर त्यांना धार्मिक शिकवण आणि नैतिक स्वयंशिस्तवर अवलंबून राहावे लागेल, कारण बुद्धांनंतर त्या शिकवणीच त्यांच्या गुरू होतील. बुद्धांना असा संकेत द्यायचा होता की प्रत्येकाने शिकवणींच्या माध्यमातून स्वतःच स्वतःचा मार्ग शोधावा. अशी कोणतीही परम शक्ती नाही, जी सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल. त्यानंतर बुद्धांनी देहत्याग केला. 

चुन्द या विचाराने अस्वस्थ झाला की त्याने बुद्धांना विष दिले. पण आनंदने त्याला हे सांगत शांत केले की, त्याने बुद्धांच्या महानिर्वाणापूर्वीचे अंतिम भोजन देऊन सकारात्मक ऊर्जा किंवा विशेष पुण्य कमावले आहे.

बुद्धांवर अंत्यसंस्कार झाले आणि त्यांच्या चितेची राख स्तूपांमध्ये त्या स्थानांवर ठेवली गेली, जी नंतर बौद्ध तीर्थ क्षेत्र बनलीः

  • लुम्बिनी, जिथे बुद्धांचा जन्म झाला होता
  • बोधगया, जिथे त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले
  • सारनाथ, जिथे बुद्धांनी पहिला उपदेश दिला
  • कुशीनगर, जिथे त्यांनी देहत्याग केला.

सारांश

वेगवेगळ्या बौद्ध परंपरा बुद्धांच्या जीवनाबाबत वेगवेगळे संदर्भ देतात. त्यांच्यातील तफावत हे स्पष्ट करते की प्रत्येक परंपरेत बुद्धाला कशा पद्धतीने समजून घेतले आहे आणि आपण त्यातून काय बोध घ्यायला हवा. 

  • हीनयान परंपरा- ही परंपरा केवळ ऐतिहासिक बुद्धांबाबत चर्चा करते. बुद्धांनी स्वतः कठोर परिश्रम घेऊन जशी ज्ञानप्राप्ती साध्य केली, तशीच सामान्य माणूसही करू शकतो आणि त्यासाठी आपण परिश्रम घेणे शिकायला हवे.
  • सर्वसामान्य महायान परंपरा- या परंपरेनुसार बुद्धांना कित्येक युगांआधीच ज्ञानप्राप्ती झाली होती. स्वतःच्या जीवनात बारा चमत्कारी कार्ये प्रकट करत ते शिकवण देतात की ज्ञानप्राप्तीचा अर्थ सर्व जिवमात्रांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणे, हाच आहे.  
  • अनुत्तर योगतंत्र- बुद्ध प्रज्ञा पारमिताची शिकवण देतेवेळी शाक्यमुनीच्या रूपात आणि तंत्रविषयक शिकवण देतेवेळी वज्रधराच्या रूपात एकाच वेळी प्रकट झाले. ही गोष्ट हे सुचित करते की, तंत्राभ्यास पूर्णतः शून्यतेसंबंधीच्या माध्यमिकांच्या शिकवणींवर आधारलेला आहे. 

अशा रीतीने आपण बुद्धांच्या जीवनातील प्रत्येक तपशिलातून खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो आणि विविध स्तरांवर प्रेरणा घेऊ शकतो.

Top