थेरवाद, महायान व तंत्र या तिन्हींतील बुद्ध सारखाच आहे का?

बुद्धाच्या जीवनाविषयीच्या विविध आवृत्त्या किंवा मांडण्या केवळ काटेकोर ऐतिहासिक संदर्भातील निव्वळ तथ्यांच्या संदर्भात पाहता येत नाहीत, किंवा त्या परस्परविरोधीही मानता येत नाहीत. उलट, आपण समजून घ्यायला हवं की, प्रत्येक मांडणी एका विशिष्ट संदर्भामध्ये लिहिली गेली आहे व तशीच ती वाचली जाणार आहे. हे विभिन्न संदर्भ आपल्याला विशिष्ट शिकवणुकी कशा रितीने पुरवतात, हे पाहिलं तर आपल्याला एकंदरित बुद्धाच्या शिकवणुकींचा सखोल आस्वाद घेता येईल, शिवाय या शिकवणुकींचं आपल्या जीवनामध्ये कसं उपयोजन करायचं हेही या विविध मांडण्यांद्वारे शिकता येतं. अशा रितीने शिकवणुकींचं उपयोजन करत आपण बुद्धाच्या जीवनातील टप्पे अनुसरले, तर बुद्धाला सत्याचा साक्षात्कार झाला त्याप्रमाणे आपल्यालाही होऊ शकतो आणि इतरांना करुणेने मदत करायचा उद्देशही साध्य होऊ शकतो.

प्रास्ताविक

बौद्ध धर्माचे संस्थापक शाक्यमुनी कोण होते, हे शोधायची आपली इच्छा असते, तेव्हा बुद्धाच्या जीवनकहाणीच्या अनेक भिन्न आवृत्त्या आपल्याला सापडतात. असं असल्यावर आपण विचारू शकतो की: हे सर्व एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं नाही.

बुद्धाच्या जीवनाची एक आवृत्ती पाली वाङ्मयातून आलेली आहे, थेरवाद परंपरेतील धर्मग्रंथांमध्ये ती आढळते. त्यात एकाच ठिकाणी त्याच्या जीवनाचा संपूर्ण वृत्तान्त नाही, पण विविध संहितांमधून छोटे-छोटे भाग निवडून आपण एकत्र गुंफू शकतो. त्यानंतर बौद्ध वाङ्मयाने या मोकळ्या सांगाड्यात अनेक तपशिलांची भर घातली.

बुद्धाच्या ओळखीचा बराच विस्तार करून महायान परंपरेमध्ये बुद्धाच्या जीवनाची आणखी एक आवृत्ती मांडलेली आहे. ही आवृत्ती थेरवादापासून भिन्न आहे. थेरवादातील आवृत्तीमध्ये बुद्ध हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे, तो इसवीसनपूर्व ५६६ ते ४८५ या कालावधीमध्ये राहून गेल्याचं सर्वमान्य झालं आहे. त्याला त्याच्या जीवनकाळामध्ये साक्षात्कार झाला आणि त्याच्या मृत्यूचं सातत्य समाप्त झालं. पाली वाङ्मयामध्ये मांडण्यात आलेल्या कहाणीचा आणखी उलगडा महायान परंपरेतील आवृत्तीमध्ये केलेला आहे, आणि अगणित जीवनकाळांपूर्वी बुद्ध साक्षात्कारी कसा झाला होता आणि शाक्यमुनीच्या रूपात पृथ्वीवर कसा अवतरला होता याचं वर्णन त्यात आहे. पृथ्वीवर त्याने साक्षात्कारी असल्याचं इतरांना दाखवण्यासाठी बारा कृती केल्या आणि मृत्यूनंतर त्याचं सातत्य कायम राहिलं, जेणेकरून इतर अनेक प्रांतांमध्ये, शिकवणुकींमध्ये त्याचा आविष्कार होऊन सर्व जीवांना लाभ व्हावा.

बुद्धाच्या जीवनकहाणीची आणखी एक आवृत्ती आपल्याला तंत्र परंपरेमध्ये सापडते. या आवृत्तीमध्ये बुद्ध विभिन्न रूपांमध्ये एकाच वेळी अवतरतो. या रूपांना “साधना देवता” असं संबोधलं आहे, त्यांचे विविध रंग आहे, अगणित हात, चेहरे व पाय आहेत, आणि त्यातून बुद्धाच्या साक्षात्कारांच्या विविध पैलूंचं प्रतिनिधित्व होतं. बुद्ध या विभिन्न रूपांमध्ये अवतरतो, पण त्याच वेळी मानवी रूपामध्ये शिकवतो, उदाहरणार्थ भारतातील व्हल्चर्स पार्क इथे त्याने सूत्रंही शिकवली.

विशिष्ट संदर्भांमध्ये बुद्धाचं जीवन

या विविध आवृत्त्या, यात विरोधी आवृत्त्याही आहेत, गोंधळवणाऱ्या वाटतात, त्यामुळे बुद्ध प्रत्यक्षात कोण होता? या विविध आवृत्त्यांचा अर्थबोध होण्यासाठी आपण एक प्राथमिक बौद्ध तत्त्व समजून घ्यायला हवं की, बुद्धाच्या जीवनकहाणीच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये बौद्ध धर्माच्या त्या विशिष्ट पैलूनुसार, म्हणजे विशिष्ट संदर्भानुसार धर्मग्रंथ शिकवले जातात. पाली वाङ्मयात वर्णन केलेल्या बुद्धाचा प्रकार थेरवादी शिकवणुकींच्या संदर्भात शिकवला जातो. त्यामुळे तोच बुद्ध सर्वसाधारण महायान व तांत्रिक शिकवणुकींमधून शिकवला जाण्याला काही अर्थ नाही.

महायान संहितांमध्ये वर्णन केला जाणारा बुद्ध हा “ऐतिहासिक बुद्ध” नाही (म्हणजे एका जीवनकाळामध्ये साक्षात्कारी झालेला आणि मृत्यूवेळी सातत्य समाप्त झालेला बुद्ध नाही). तांत्रिक शिकवणुकींमध्ये वर्णन केलेल्या बुद्धाच्या प्रकाराच्या संदर्भातही हे खरं आहे.

थोडक्यात, बुद्धाच्या जीवनाची, किंवा खरंतर इतर विषयांचीही, चर्चा करताना एक प्राथमिक बौद्ध तत्त्व लक्षात घ्यायला हवं की, विविध शिकवणुकींमध्ये ज्याचं वर्णन केलं असेल किंवा ज्याची मांडणी असेल, ते त्या विशिष्ट संदर्भात समजून घ्यायला हवं. तीच सामग्री भिन्न संदर्भांमध्ये विचारात घेण्यासाठी विशिष्ट प्रश्न विचारायला हवेत, जसे की: ही सामग्री शिकल्याचा माझ्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भात उपयोग काय? या सामग्रीचा बौद्ध आध्यात्मिक मार्गावर कोणता लाभ होईल? 

बुद्ध शाक्यमुनीच्या जीवनाकडे विभिन्न संदर्भांमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला पुढील अडचणीचे प्रश्न टाळता येतील अशी आशा वाटते: बुद्धाने खरोखरच महायान सूत्रं शिकवली का? त्याने खरोखरच तंत्र शिकवलं का? बुद्धाच्या काळी शिकवणुकी केवळ तोंडीच सांगितल्या जातात आणि काहीच लिहिलं जात नव्हतं, त्यामुळे महायान व तांत्रिक शिकवणुकी बुद्धानेच शिकवलेल्या आहेत का, याबद्ध बौद्धांमध्ये बरेच वाद झाले आहेत. महान भारतीय गुरू शांतिदेव यांच्या “एन्गेजिंग इन बोधिसत्व बिहेविअर” या संहितेमध्ये यातील एका वादाची मांडणी आहे. त्यात ते म्हणतात, “आमच्या महायान सूत्रांना अपात्र ठरवण्यासाठी तुम्ही हिनायनी (थेरवादी, इत्यादी) लोक जी कारणं देता, तीच कारणं वापरून मी तुम्हाला अपात्र ठरवू शकतो.” निराळ्या शब्दांचा सांगायचं तर, हिनयान व महायान या दोन्ही पंथांमध्ये असं म्हटलेलं आहे की, त्यांच्या शिकवणुकी मौखिक परंपरेद्वारे प्रसारित झाल्या.

त्यामुळे महायानांच्या “शिकवणुकी नंतर निपजलेल्या आहेत, त्यामुळे त्या बुद्धाने शिकवलेल्या नाहीत,” असं थेरवादी म्हणत असतील, तर त्यावर महायानी असं प्रत्युत्तर देतील की, “तुमच्याबाबतीतही हेच खरं आहे. तुमच्या शिकवणुकीसुद्धा मौखिक परंपरेद्वारे प्रसारित झालेल्या आहेत आणि त्यांचं लेखन खूप नंतर झालं. त्यामुळे आमच्या शिकवणुकी अस्सल नसतील, तर तुमच्याही अस्सल नाहीत.”

या लेखामध्ये आधी नमूद केलेल्या दुसरा एक युक्तिवाद असा आहे की, थेरवाद व महायान या संदर्भांमध्ये बुद्धाची भिन्न संकल्पना आहे. थेरवाद प्रकारातील बुद्ध थेरवादी धर्मग्रंथ शिकवतो आणि महायान प्रकारचा बुद्ध महायान धर्मग्रंथ शिकवतो. हे संदर्भ तीन परंपरांमधील आहेत: हिनयान परंपरेचा प्रतिनिधी म्हणून थेरवाद, महायान सूत्र परंपरा, आणि महायान तांत्रिक परंपरा. यातून आपण बुद्धाच्या सर्वसाधारण जीवनाबद्दल जाणून घेऊ शकतो.

बुद्धाचा काळ

पहिल्यांदा आपण हे विचारायला हवं: बुद्ध कधी जगत होता? विशिष्ट समाजामध्ये, म्हणजे एका निश्चित संदर्भामध्ये विशिष्ट वेळी तो जगला. त्या समाजाच्या काही विशिष्ट प्राथमिक धारणा आधीपासूनच होत्या, त्याला बुद्धाने प्रतिसाद दिला. त्या धारणाव्यवस्थेमध्ये, तत्कालीन भारतीय विचारमार्गांमध्ये सापडणारी आणि इतिहासामध्ये विकसित होत आलेली प्राथमिक विषयसूत्रं सापडतात. बुद्धाने या विषयसूत्रांचं स्पष्टीकरण दिलं. उदाहरणार्थ, पुनर्जन्म- हा कर्मानुसार (वैयक्तिक कृतीनुसार) आणि आपण या पुनर्जन्माच्या चक्रापासून मुक्ती कशी मिळवतो यानुसार निर्धारित होतो. सर्व भारतीय व्यवस्था सर्वसाधारणतः असं म्हणतात की, ज्ञान किंवा वास्तवाचं आकलन ही पद्धत व्यक्तीला पुनर्जन्मापासून मुक्त व्हायला सक्षम करते. तत्कालीन विविध तत्त्वज्ञानं व धर्म यांच्या उत्तरांनी असमाधानी झालेल्या बुद्धाने चिंतन केलं, साधना केली आणि सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी विविध उपासना केल्या.

भारतामध्ये बुद्धाच्या काळात एकाधिकारशाहीच्या दिशेने जोरदार चळवळ होत होती. विविध प्रकारची राज्यं होती, त्यात व्यापारी श्रीमंत होत चालले होते, संपत्तीच्या बाबतीत ते राजांशी स्पर्धा करू लागले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून राजे अधिक एकाधिकारशाहीने वागू लागले. भारतातील मोजक्या प्रदेशांमधील लहान प्रजासत्ताकांमध्ये सर्वसाधारण लोकांच्या विचाराचा आधार घेऊन श्रेणिबद्धता आणखी कमी केलेली व्यवस्था प्रस्थापित होऊ जाऊ लागली. अशा एका प्रजासत्ताकामध्ये (किंवा त्याजवळ) जन्माना आलेल्या बुद्धावर या व्यवस्थेचा प्रभाव पडला आणि त्याने स्थापन केलेल्या मठामध्ये सर्व सदस्य संयुक्तरित्या निर्णय घेत असत.

त्याचप्रमाणे आपल्या रुढी व पुजारी इत्यादींद्वारे जुन्या वैदिक धर्माविरोधात प्रत्युत्तर देणाऱ्या लोकांचीही ळवळ त्या काळी होती. प्रजासत्ताकं व एकाधिकारशाह्या वगळता इतर ठिकाणी हा वैदिक धर्म अनुसरला जात होता. त्यांना प्रत्युत्तर देणारे “श्रमण”- म्हणजे फिरते संन्यासी किंवा समाजातून “बाहेर पडलेले” होते, ते वनांमध्ये फिरत, साधना करत आणि स्वतःच्या आध्यात्मिक विकासावर काम करत. या प्रकारच्या चळवळींच्या प्रतिनिधींमध्ये केवळ बुद्धाचा समावेश नव्हता, तर इतर पंथ व अनुयायांचाही समावेश होता. एक आध्यात्मिक मार्ग चोखाळायचा असेल, सत्यशोधनासाठी स्वतंत्र व्हायचं असेल, तर समाजामधून बाहेर पडणं, किमान काही काळासाठी तसं करणं, महत्त्वाचं आहे. आपल्याला सत्य सापडलंय असं वाटल्यावर आपण श्रेणिबद्ध व एकाधिकारशाहीच्या पद्धतीने ते इतरांवर लादू नये, तर अधिक “लोकशाही” रितीने ते उघड करावं.

चरित्रांचा उद्देश व वैधता

भारतीय अथवा तिबेटी बौद्ध संदर्भामध्ये एखाद्या महान व्यक्तिमत्वाच्या जीवनकहाणीतील विशिष्ट मुद्दे शिकवण्यासाठी व उलगडून दाखवण्यासाठी चरित्रं वापरली जातात, निव्वळ तथ्यं म्हणून ती मांडली जात नाहीत. एखाद्या महान धार्मिक व्यक्तिमत्वाचं जीवन त्या संदर्भामध्ये इतरांना प्रेरित करणारं असतं, त्यामुळे पाश्चात्त्या दृष्टिकोनानुसार, या कहाणीतील काही भाग कल्पनारम्य वाटण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, बुद्धाच्या जीवनकहाणीमध्ये मातेला स्वप्नात सहा सुळे असलेला पांढरा हत्ती दिसतो, किंवा बुद्ध मातेच्या पोटी जन्म घेतो आणि सहा पावलं चालतो नि म्हणतो, “मी आलोय!” इत्या. भारतीय/तिबेटी दृष्टिकोनानुसार, ही कहाणी ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आहे की नाही हे महत्त्वाचं नाही. ही कहाणी लोकांना प्रत्यक्षात काय शिकवते व त्यांच्या समोर काय मांडते ते महत्त्वाचं आहे. बुद्धाने प्रत्यक्षात काय केलं किंवा त्याच्या अनुयायांमध्ये काय घडलं, हे शोधण्यासाठी आपण बुद्धाचं जीवन ऐतिहासिकदृष्ट्या एकत्र गुंफू पाहत असलो, तर हे प्रस्तुत ठरणारं हे. किंवा, कोणताही भारतीय वा तिबेटी माणूस वाचेल त्या दृष्टिकोनातूनही आपण या कहाणीकडे पाहू शकतो. प्रत्येक संदर्भामध्ये ही जीवनकहाणी आपल्याला काहीतरी शिकवते, त्यात इतरांपेक्षा अमुकएक जास्त वैध ठरते, असं काही नाही. विविध दृष्टिकोनांनुसार गोष्टी अनेक भिन्न पातळ्यांवर, आणि यातील अनेक गोष्टी पूर्णतः वैध असू शकतात; अमुकएक खरोखर कसं होतं याबद्दल एकाहून अधिक सत्यं असू शकतात- हे तत्त्व बौद्ध विचारप्रक्रिया समजून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे.

एका द्रवाचं उदाहरण बौद्ध वाङ्मयामध्ये प्रसिद्ध आहे. मानवांना हे द्रव पाण्यासारखं वाटतं; भुकेल्या भुतांना त्यात पू दिसतो; नरकातील जीवांना त्यात आम्ल दिसतं; देवांना त्यात अमृत दिसतं. यातील कोणतं अचूक आहे? बुद्ध विचाररितीनुसार, ते सगळंच अचूक आहे, कारण कोणत्याही गोष्टीची वैधता त्या विशिष्ट संदर्भानुसार सापेक्ष असते.

आणखी एक उदाहरण कौटुंबिक उपचारपद्धतीच्या शाखेचं आहे- त्याला संदर्भविशिष्ट उपचारपद्धती असं म्हणतात. यानुसार एखाद्या कौटुंबिक परिस्थितीत प्रत्येक कुटुंबसदस्याला त्या परिस्थितीची आपापली मांडणी करायला सांगितलं जातं. वडील एक मांडणी करतात, आई दुसरी मांडणी करते आणि प्रत्येक मूल आपापली मांडणी करतं. यातील प्रत्येक मांडणी अथवा आवृत्ती अचूक असते आणि प्रत्येकाला समान आदर दिला जातो, कारण प्रत्येक कुटुंबसदस्याने आपल्या रितीने ती परिस्थिती अनुभवलेली असते. हा विचार करण्याचा खास बौद्ध मार्ग आहे आणि बुद्धाच्या जीवनकहाणीच्याबाबतीतही त्याचं उपयोजन करता येतं. ही कहाणी आपण अनेक भिन्न मार्गांनी ऐकली, तर प्रत्येक आवृत्ती अचूक ठरते आणि ती आपल्याला काहीतरी शिकवते.

बुद्धाच्या जीवनातील प्रमुख तथ्यं आणि आपल्या उपासनेमधील त्यांची प्रस्तुतता

बुद्धाचा जन्म एका विशेषाधिकारी व संपन्न कुटुंबात झाला (तो राजकुमार होता अथवा नाही हा वादाचा विषय आहे), त्यामुळे त्याला मोठमोठी सुखं व लाभ उपभोगता येत होते, त्यातच चांगल्या शिक्षणाचाही समावेश होता. तो विवाहित होता आणि त्याला एक मुलगा होता. कारकीर्दीच्या संदर्भात त्याच्या समोर आपल्या वडिलांचं प्रजासत्ताकप्रमुखाचं पद स्वीकारायचा पर्याय होता, पण बुद्ध श्रामणा चळवळीचा अनुयायी असल्यामुळे त्याने हा प्रस्ताव नाकारला. आपली पत्नी व मुलं यांना सोडून देईल, असा बुद्ध बेजबाबदार नव्हता, हे इथे अधोरेखित करणं गरजेचं आहे. भारतीय समाजामध्ये पत्नी व मुलं यांची काळजी आजीआजोबा व इतर सदस्यांच्या विस्तारित कुटुंबांच्या कक्षेत घेतली जाते. शिवाय, बुद्धाचा जन्म लढवय्या जातीत झाला होता, या जातीमधील पुरुष लढाईवर जाताना घराचा निरोप घेत असत. बुद्ध स्वतःची लढाई लढत होता, अजाणता व अस्वस्थकारक भावना यांच्या विरोधातली ही आंतरिक लढाई होती.

कौटुंबिक जीवन सोडून देण्याचा बुद्धाचा निर्णय आपल्याला हे शिकवतो की, चांगलं पद, सत्ता व पैसा या गोष्टी असण्यापेक्षा सत्याचा शोध घेणं- म्हणजे पुनर्जन्म किंवा मानसिक व भावनिक दुःख संपवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. संताप, हाव, स्वार्थ, इत्यादींसारख्या वैश्विक वैयक्तिक समस्यांवर किंवा सामाजिक समस्यांवर तोडगा शोधणं हे स्वतःसाठी सत्ता व पैसा जमवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. बुद्धाच्या जीवनातून हा धडा आपल्याला शिकायला मिळतो.

शंभर टक्के आध्यात्मिक जीवन अनुसरणं प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण तुमच्या जीवनाची व तुमच्या आजूबाजूच्यांच्या जीवनाची गुणवत्ता महत्त्वाची आहे, असं परम पूजनीय दलाई लामा म्हणतात. बुद्धाने एका रथात बसून महाल सोडला (गीतेमधील दाखला) आणि आध्यात्मिक मार्ग पूर्णतः स्वीकारला, त्याने महालात न दिसणारे विविध प्रकारचे आजार, वृद्धावस्था व मृत्यू आणि फिरस्ते यांमधील दुःख पाहिलं.

बुद्धाच्या जीवनाविषयीच्या विविध कहाण्यांमधील प्रतिकात्मकता युंगच्या सिद्धान्तानुसार पाहता येते. संपत्ती व वैषयिक सुखाने बुद्ध इतका आंधळा झाला होता की त्याला जगाचं दुःख दिसत नव्हतं. तो स्वतःच्या रथामधून महालाबाहेर जातो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होते, तिथे त्याला प्रत्येकाला सहन करावं लागणारं दुःख आणि सर्व समस्या दिसतात.

उपासनेचं वेडसर टोक गाठू नये, हा बुद्धाच्या कहाणीतील व बुद्धाच्या शिकवणुकींमधील एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. महाल सोडल्यानंतर बुद्धाने तीव्र साधना केली आणि अतिशय टोकाची संन्यस्त उपासना केली, यात अक्षरशः त्याने उपासमार करून स्वतःचा मृत्यू ओढवण्याइतकी पातळी गाठली. एका वृक्षाखाली बसलेलं असताना त्याला लक्षात आलं की या उपासना लाभदायक नाही, त्यामुळे त्याने एका मेंढपाळ मुलीकडून दही स्वीकारून उपवास सोडला. भारतीय विचारामध्ये गाय (दही, दूध) हे मातृत्वप्रेमाचं व करुणेचं प्रतीक असतं, त्यामुळे गायीतून उत्पन्न झालेला पदार्थ बुद्धाला देण्यात आला हे प्रतिकात्मक ठरतं. स्वतःचा मृत्यू ओढवण्यापासून आपल्याला जागं करण्याचं काम करुणा करते, आणि योग्य मार्ग शोधण्यासाठी, वैश्विक दुःखाविषयी आस्था राखणारा मार्ग शोधण्यासाठी, आपल्याला सक्षम करते, असा याचा अर्थ होतो.

साक्षात्कार होण्यापूर्वी बुद्ध बोधिवृक्षाखाली (भारतीय विचारपरंपरेमध्ये पवित्र वृक्ष हे एक सार्वत्रिक विषयसूत्र आहे) बसला होता आणि मार अवतरला. मार हा मृत्यूसाठीचा संस्कृत शब्द आहे- अडथळे, अडचणी, मोह इत्यादी अर्थ त्यात अभिप्रेत आहेत. बुद्धालाही, साक्षात्कारी होण्याच्या अगदी थोडं आधीही, काहीतरी सकारात्मक साध्य करण्याच्या प्रयत्नात असताना अडथळ्यांना व अडचणींना सामोरं जावं लागलं, हे यातून आपल्या लक्षात येतं.

साक्षात्कारी होण्याच्या आधीच बुद्धाची आत्यंतिक आध्यात्मिक प्रगती साधलेली होती. अगदी नवख्यापासून तो थेट साक्षात्कारी जीव झाला नाही. त्याच्या उपासनेच्या अंतिम टप्प्यांमध्येही अडथळे व अडचणी आल्या, किंबहुना अधिक कठोर अडचणी आल्या, त्याला त्याचा उद्देश साध्य करण्यामध्ये या अडचणींमुळे अडथळे सहन करावे लागले, तसंच आपल्या बाबतीतही होतं. किंबहुना आपण जितकी अधिक सकारात्मक कृती करू पाहतो, तितके अडथळे मोठे असतात. त्यामुळे आपण नाउमेद होऊ नये, तर योद्ध्याप्रमाणे सर्व शक्तिनिशी अडथळ्यांशी लढा द्यावा, ही शिकवणूक इथे आपल्याला मिळते. बुद्ध लढवय्यांच्या जातीतून आला ही संकल्पना इथे जुळते, कारण ही खरोखरच स्वतःचे भ्रम, भीती, इत्यादींशी आंतरिक लढाई असते.

बुद्ध साक्षात्कारी झाल्यानंतर तो शिकवणूक देण्याबाबत उत्सुक नव्हता आणि आपल्या शिकवणुकी कोणाला कळणं शक्य हे का याबद्दल त्याला खात्री नव्हती. परंतु, त्याला शिकवण्याची विनंती करण्यात आल्यानंतर त्याने प्रयत्न करायचं ठरवलं. शिकवणुकी इतरांना शिकवणं किंवा स्पष्ट करून सांगणं अतिशय अवघड असलं, तरी करुणेद्वारे आपण ते करायला हवं, ते कितीही अवघड असलं तरी करायला हवं, हा धडा यातून आपल्याला मिळतो.

इतरांना शिकवून झाल्यानंतर अनेक लोकांना बुद्धाचं अनुयायी व्हायचं होतं आणि त्यातून संन्यस्तवादाचा उदय झाला. सुरुवातीला यात संन्यस्तांची नियमनं नव्हती. परंतु हे संन्यासी अथवा भिक्खू समाजामध्ये राहत होते, त्यामुळे “विनय” म्हणून ओळखले जाणारे शिस्तीचे विविध नियम लागू करण्यात आले. समुदायामध्ये व समाजामध्ये जगत असताना समस्या टाळण्याकरिता हे नियम मदतीला येणार होते. हे नियम कोणा एकाने आदेश दिल्याप्रमाणे तयार झाले नाहीत, तर समस्या उद्भवल्यावर त्यावर तोडगा म्हणून नियम तयार होत गेले. उदाहरणार्थ, अन्न मागणारे (तत्कालीन श्रमणांमधील प्रथा) हे भिक्खू हावरट आहेत असं लोकांना वाटू नये यासाठी भिक्खूंनी अन्न मागायचं नाही असा नियम करण्यात आला; त्यांनी केवळ देण्यात आलेलं स्वीकारावं; त्यांना अन्न साठवतायेणार नाही; त्यांना अधिकचं अन्न मागता येणार नाही, इत्यादी नियम झाले. समाजाला भिक्खूजीवनाबद्दल नाराजी वाटू नये यासाठी हे नियम करण्यात आले आणि ते आजही आपल्याला लागू होतात.

सुरुवातीला स्त्रियांना मठजीवनामध्ये भिक्खुणी म्हणून सामील करून घ्यायला बुद्ध का-कू करत होते, कारण पुरुष व स्त्रिया वनामध्ये अनुचितरित्या राहत आहेत असं समाजाला वाटेल अशी त्यांची चिंता होती. पण शेवटी त्यांनी स्त्रियांना मठव्यवस्थेमध्ये स्वीकारलं, तेव्हा त्यांनी या संदर्भात अतिशय स्पष्ट नियम केले, जेणेकरून समाजामध्या काही चुकीची कल्पना पसरू नये. एखाद्या भिक्खू व भिक्खुणीने एकट्यात असण्याला मुभा नव्हती, दुसऱ्या भिक्खुणीने सतत तिथे उपस्थित असायला हवं, आणि दोघांनी एकाच रजईवर बसू नये, असाही नियम होता. एका बाजूला, सत्य शोधण्यासाठी बुद्धाने समाजातील सर्व आकर्षणांवर पाणी सोडलं, आणि दुसऱ्या बाजूला समाजाची चुकीची कल्पना होऊ नये यासाठीही तो प्रयत्न करत होता, हे या नियमांमधून आपल्याला शिकायला मिळतं. समाजातील मूल्यांच्या संदर्भात सर्व तत्त्वांशी कोणी सहमत नसेल, तरीही समाजापासून आपण तोडून घेता कामा नये. अलीकडच्या राजकारण्यांनी मुत्सद्दी होताना हे शिकण्याची गरज आहे, समाजाच्या मूल्यांशी सहमती नसेल तरी मन दुखवायचं नाही आणि निराधार साशंकतेलाही जागा द्यायची नाही हे त्यांनी समजून घ्यायला हवं.

देवदत्त नावाचा बुद्धाचा एक चुलत भाऊ होता. त्याला बुद्ध अजिबात आवडत नसे आणि तो कायम बुद्धाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असे. किंबहुना पाली वाङ्मयात आणखी शोध घेतला तर अनेक लोक बुद्धाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते आणि अनेकांना तो आवडत नसे, हे दिसून येतं. बुद्धही काहींसाठी नावडता होता आणि आपण प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाही, हा एक मूल्यवान धडा यातून आपल्याला शिकायला मिळतो. त्यामुळे आपण वास्तववादी असावं, इतरांना आपण आवडत नसलो किंवा सर्वांना संतुष्ट करणं आपल्याला शक्य झालं नाही तरी निराश होऊ नये. 

बुद्ध मरण पावला त्याचा उल्लेख करणाऱ्याही जीवनकहाण्या आहेत. त्यानुसार, बुद्धाने जीव सोडू नये अशी विनंती करण्याची संधी आनंदाला (बुद्धाच्या प्रमुख शिष्यांपैकी एक) मिळाली होती, पण त्याने तसं विचारलं नाही आणि बुद्धाचं जीवन समाप्त झालं. बुद्ध विचारणा केल्यावरच शिकवतो आणि विनंती केल्यावर बुद्ध थांबतो, ही शिकवण यातून आपल्याला मिळते. कोणालाही त्याने थांबू नये असं वाटत असेल, तर तो सोडून जातो. हे आपण स्वतःच्या बाबतीतही लागू करू शकतो. लोकांना आपली मदत नको असेल किंवा आपली गरज नसेल, तर आपण स्वतःला त्यांच्यावर लादू नये. अधिक स्वीकार करणारे आणि कदाचित आपली मदत करू इच्छिणारे इतर अनेक जण असतात.

निष्कर्ष

बुद्धाच्या जीवनाकडे आपण अनेक कोनांमधून पाहू शकतो. आपण सर्व ऐतिहासिक तथ्यं शोधायचा प्रयत्न करू शकतो, या तथ्यांना इतिहासाविषयीच्या पाश्चात्त्य दृष्टिकोनानुसार विशिष्ट संदर्भामध्ये वैधता असली, तरी विशिष्ट तारखा वा वर्षं निश्चित करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होणार नाही. किंवा, कोणत्याही कहाणीत उपस्थित असलेल्या विविध प्रतिकांच्या संदर्भात शिकता येतील अशा धड्यांचा विचार आपण करावा. युंगच्या विश्लेषणानुसार प्रश्न विचारू शकतो: या प्रतिकातून काय सूचित होतं? हे कशाचं प्रतिनिधित्व करतं आहे?

व्यापक महायान संदर्भामध्ये आपण बुद्धाच्या जीवनाकडे पाहू शकतो. अनेक युगांपूर्वी बुद्ध साक्षात्कारी झाला आणि वैश्विकतेचं महायान विषयसूत्र तो आपल्याला शिकवतो आहे आणि इतर अनेक जीवनकाळांमध्ये तो इतरांना लाभदायक ठरणार आहे, अशी मांडणी त्यातून करता येते. आपण आत्ता जे काही करतो आहोत ते आपल्याआधी होऊन गेलेल्या अनेक पिढ्यांमधून निपजलेलं आहे, आणि आपण काही सकारात्मक करण्याचा प्रयत्न करत असू तर आपण भविष्यातील सर्व पिढ्यांच्या संदर्भात विचार करायला हवा, हे यातून आपल्याला शिकायला मिळतं.

तांत्रिक मांडणीनुसार, बुद्ध एका ठिकाणी मूलगामी तत्त्वान शिकवतो आणि दुसऱ्या ठिकाणी चार मुखांनी अवतरतो- यातील प्रत्येक मुखातून तो एकाच वेळी काहीतरी वेगवेगळं शिकवत असतो. इतिहासामध्ये आपल्याला सापडणारे बुद्धाच्या शिकवणुकीचे अनेकविध पैलू एकाच स्त्रोतातून वा प्राथमिक कल्पनेतून एकमेकांशी सुसंगत ठरतात आणि त्यांची मांडणी वेगळ्या रितीने करता येते.

बुद्धाच्या शिकवणुकींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उपस्थित असलेली प्राथमिक तत्त्वं आपल्याला शोधता येतात. यासाठी थेरवादी मांडणी, महायान सूत्रं मांडणी किंवा महायान तांत्रिक मांडणी या कशाचाही विचार आपल्याला करता येईल. या प्रत्येक मांडण्यांमध्ये प्राथमिक तत्त्वं आहेत आणि बुद्धप्रतिमांचे विविध हात, पाय व अनेक चेहरे यांतून त्यांचंच प्रतिनिधित्व होतं. बुद्धाची सर्वांत प्राथमिक शिकवणूक चार आर्य सत्यांची आहे आणि तिचं प्रतिनिधित्व चार चेहऱ्यांच्या रूपात होतं असं आपल्याला म्हणता येईल. बुद्धाच्या जीवनाविषयीची ही मांडणी प्रत्यक्षातील अर्थपूर्ण तथ्यांच्या संदर्भात केलेली नाही, तर प्रत्येक मांडणीचं उपयोजन कसं करावं आणि त्यामागचा उद्देश काय हे तपासण्यासाठी आपल्याला मदत व्हावी अशा रितीने ही मांडणी केलेली आहे. या तपासाद्वारे आपल्याला सदर सामग्रीचा सखोल आस्वाद घेणं शक्य होतं.

सारांश

बुद्धाच्या जीवनाच्या तीन आवृत्त्या आहेत: थेरवादी मांडणी, महायान सूत्र व तांत्रिक मांडण्या. या मांडण्या परस्परविरोधी आहेत का याबद्दल वाद आहेत, पण तर्काद्वारे आपण असं दाखवू शकतो की, यातील प्रत्येक मांडणी एखाद्या भिन्न संदर्भात शिकवली जाते. या भिन्न मांडण्या आपल्याला प्रेरित करण्यासाठी व शिकवण्यासाठी आहेत. आपण बुद्धाच्या जीवनकहाणीकडे पाहिलं, तर दुःखापासून मुक्ती कशी मिळवावी या संदर्भातील विशिष्ट विषयसूत्रांचं स्पष्टीकरण करणारी एक धारणाव्यवस्था त्या समाजामध्ये असल्याचं दिसतं. या व्यवस्थेबद्दल असमाधानी वाटलेल्या बुद्धाने श्रेणिबद्ध नसेलल्या व्यवस्थेअंतर्गत सत्य शिकवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या घरातील व कुटुंबातील सुखसोयी सोडून त्याने दुःखाचा आंतरिक लढा दिला. हे संन्यस्त उपासनेद्वारे साधलेलं नव्हतं, तर वैश्विक दुःखासंदर्भातील करुणेमुळे साधलेलं होतं. बुद्धासमोर मोठमोठे अडथळे आले, पण याने तो डगमगला नाही आणि एकदा साक्षात्कारी झाल्यानंतर त्याने करुणेने शिकवण्याची विनंती मान्य केली. बुद्धाच्या अनुयायांसाठी भिक्खू व भिक्खुणी या दोहोंसाठीचं मठजीवन विशिष्ट नियमांनी घडलेलं होतं आणि समाजाशी सौहार्द राखत हे नियम प्रस्थापित झालेले होते.

Top