ईर्ष्या : अस्वस्थकारक भावना हाताळताना

13:24
ईर्ष्येचे अनेक प्रकार आहेत. इतरांची उपलब्धी सहन न होणं असा हा सरळ प्रकार असू शकतो, किंवा आपल्यालाच ही उपलब्धी मिळायला हवी होती ही इच्छाही त्यात समाविष्ट असू शकते. दुसऱ्याकडे काय आहे याचा लोभ आपल्याला वाटू शकतो आणि ती गोष्ट आपल्याकडे हवी अशी इच्छाही होऊ शकते, आणि त्या व्यक्तीकडे ती गोष्ट नसावी अशीही इच्छा निर्माण होण्याची शक्यता असते. यात स्पर्धात्मकतेचाही समावेश असू शकतो, त्याचप्रमाणे आपण पूर्णतः “पराभूत” आणि इतर पूर्णपणे “विजयी” झालेले, अशा द्वैती विचाराचाही यात समावेश असणं शक्य असतं. या सगळ्यात आपला आत्मकेंद्रीपणा असतो. अशा सर्व घटकांचं विश्लेषण करून बौद्ध धर्माने आपल्या अस्वस्थकारक भावनांची विरचना करण्याच्या व त्यांपासून आपल्याला मुक्त करण्याच्या प्रगत पद्धती सांगितल्या आहेत.

अस्वस्थकारक भावना

आपण सर्वच अस्वस्थकारक भावना (न्योंग-मोंग, संस्कृत- क्लेश, क्लेशकारक भावना) अनुभवतो. आपली मनःशांती संपुष्टात येईल आणि आपला आत्मसंयम ढासळेल इतकं आपल्याला अशक्त करून टाकणारी ही मनस्थिती असते. हाव, आसक्ती, वैरभाव, संताप, ईर्ष्या व मत्सर ही याची काही सर्वसामान्य उदाहरणं आहेत. यातून विविध मानसिक इच्छा (कर्म) उद्भवतात, सर्वसाधारणतः विध्वंसक वर्तनाकडे नेणाऱ्या या इच्छा असतात. इतरांबाबत विध्वंसकपणे कृती करण्याची किंवा आत्मघातकी कृती करण्याची ही इच्छा असू शकते. परिणामी, आपण इतरांसाठी आणि अपरिहार्यपणे स्वतःसाठीसुद्धा समस्या व दुःख निर्माण करतो.

अनेक प्रकारच्या अस्वस्थकारक भावना असतात. प्रत्येक संस्कृती मानसिकदृष्ट्या विशिष्ट सामायिक भावनिक अनुभवांच्या संचाभोवती एखादी यादृच्छिक रेषा आखते, समाजातील बहुतांश लोकांना हे अनुभव आलेले असतात, आणि त्यानुसार तिला एक कोटी (कॅटेगरी) मानलं जातं, आणि या कोटीला एखादं नाव दिलं जातं. प्रत्येक संस्कृती अर्थातच सामायिक भावनिक अनुभवांचा वेगवेगळा संच निवडते, त्यांच्या वर्णनासाठी वेगवेगळी वैशिष्ट्यं वापरते, आणि अशा प्रकारे अस्वस्थकारक भावनांच्या वेगवेगळ्या कोटी तयार होतात.

वेगवेगळ्या संस्कृतींनी निश्चित केलेल्या अस्वस्थकारक भावनांच्या कोटी सर्वसाधारणतः अचूकपणे परस्परांसारख्या नसतात, कारण भावनांच्या व्याख्या किंचित भिन्न असतात. उदाहरणार्थ, “जेलसी” असं इंग्रजी भाषांतर करता येईल असे संस्कृत व तिबेटी वेगवेगळे शब्द आहेत (संस्कृत- ईर्ष्या, तिबेटी- फ्राग-दोग), तर पाश्चात्त्य भाषांमध्ये असे दोन शब्द आढळतात. इंग्रजीत “जेलसी” व “एन्व्ही” असे शब्द आहेत, तर जर्मनमध्ये “Eifersucht” व “Neid” असे शब्द आहेत. या दोन इंग्रजी शब्दांमधला भेद हा संबंधित दोन जर्मन शब्दांमधील भेदांसारखा नाही, आणि संस्कृत व तिबेटीमधील संज्ञाही इंग्रजी व जर्मन शब्दांशी अचूकरित्या जुळणाऱ्या नाहीत. पाश्चात्त्य लोक म्हणून आपण या सर्वसाधारण कोटीमधील भावनिक समस्या अनुभवतो तेव्हा या कोटी आपल्या संस्कृतीने व भाषांनी तयार केलेल्या असतात, आणि त्यावर मात करण्याच्या बौद्ध पद्धती शिकण्याची आपल्याला इच्छा असेल, तर आपण स्वतःच्या भावनांचं विश्लेषण व विरेचना करणं गरजेचं आहे. बौद्ध धर्मात केलेल्या व्याख्यांनुसार विविध अस्वस्थकारक भावनांचा संयोग कसा होतो, याची कल्पना आपण करायला हवी.

इथे आपण “ईर्ष्या” (एन्व्ही) या अर्थाच्या बौद्ध संज्ञेवर लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण ही संज्ञा तिच्या पारंपरिक व्याख्येच्या जवळची आहे. आपण, उदाहरणार्थ- नातेसंबंधांमधील- मत्सराची (जेलसी) चर्चा “आवश्यक तत्त्वं” या विभागात स्वतंत्रपणे केली आहे (पाहा: नात्यांमधील मत्सर कसा हाताळावा).

ईर्ष्या म्हणजे काय?

बौद्ध संहितांमध्ये “ईर्ष्या” हा वैरभावाचा भाग मानलेला आहे. “इतर लोकांच्या उपलब्धींवर- म्हणजे त्यांचे गुण, मालमत्ता, किंवा यश- लक्ष केंद्रित करणारी ही अस्वस्थकारक भावना असते. त्यात इतरांच्या उपलब्धी सहन होत नाहीत, कारण स्वतःच्या लाभाविषयी किंवा स्वतःला मिळणाऱ्या आदराविषयी आपल्याला अवाजवी आसक्ती वाटत असते,” अशी “ईर्ष्ये”ची व्याख्या केली जाते.

एखाद्या क्षेत्रात इतरांची उपलब्धी आपल्यापेक्षा जास्त असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करणं किंवा त्याच्या सकारात्मक पैलूंची अतिशयोक्ती करणं, असा आसक्तीचा इथला अर्थ आहे. आपल्या मनांमध्ये आपण अशा क्षेत्राला जीवनाचा सर्वांत महत्त्वाचा पैलू मानू लागतो आणि आपली स्वयंमूल्याची भावना त्यावर आधारून ठेवतो. यामध्ये “मी”बद्दल आत्ममग्न व आसक्त होणं गर्भित असतं. आपल्याला या विशिष्ट क्षेत्रासंदर्भात “स्वतःच्या लाभाविषयी किंवा आपल्याला मिळणाऱ्या आदराविषयी आसक्ती वाटत असते”, त्यामुळे आपल्याला ईर्ष्या वाटते. उदाहरणार्थ, आपल्याकडे असलेल्या पैशाविषयी किंवा आपण किती देखणे आहोत याविषयी आपल्याला आसक्ती वाटत असू शकते. वैरभावाचा पैलू म्हणून ईर्ष्या या आसक्तीला आणखी प्रोत्साहन देते आणि इतरांनी या क्षेत्रात काय कमावलंय याबद्दलचा तीव्र रोष आपल्या मनात निर्माण होतो. त्यांच्या उपलब्धींबद्दल आनंदी वाटण्याच्या उलटी अशी ही भावना असते.

ईर्ष्येमध्ये अनेकदा इतर व्यक्तींबद्दलच्या वैरभावाचाही घटक असतो, या व्यक्ती आपल्याहून अधिक लाभ कमावत असल्याची आपली धारणा झालेली असते. हा लाभ खरा असेल किंवा नसेल, पण काहीही झालं तरी आपण आत्ममग्न झालेले असतो आणि स्वतःकडे काय नाही याचाच विचार करत राहतो.

शिवाय, बौद्ध धर्मात केलेल्या व्याख्येनुसार ईर्ष्येमध्ये “एन्व्ही” या शब्दाचे सर्व नाहीत तरी काही अर्थांश येतात. इंग्रजी संज्ञा काही अर्थाची भर घालणारी आहे. बौद्ध धर्मात त्याला “हवंहवंसं वाटणं” (कोव्हेटसनेस) म्हटलं आहे, त्याचीही भर “एन्व्ही”मध्ये पडते. “दुसऱ्याकडे असलेल्या कशाची तरी अवाजवी अभिलाषा” म्हणजे हाव. तर, इंग्रजीतल्या “एन्व्ही” शब्दाची व्याख्या अशी करता येते” “इतर कोणाला तरी मिळणाऱ्या लाभाबद्दलची वेदनादायी किंवा रोषयुक्त जागरूकता आणि त्याचसोबत तोच लाभ आपल्याला मिळावा अशी इच्छा.” निराळ्या शब्दांत सांगायचं तर, जीवनाच्या विशिष्ट क्षेत्रातील इतरांच्या उपलब्धी सहन करण्याची क्षमता नसण्यासोबतच आपण त्या उपलब्धी स्वतःकडे असाव्यात अशी इच्छा राखून त्या वस्तूंच्या महत्त्वाची अतिशयोक्ती करतो, याकडे बौद्ध धर्म लक्ष वेधतो. आपण गरीब असू किंवा त्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे अभाव असेल, किंवा आपल्याकडे पुरेसं असेल किंवा सरासरीहून अधिक असेल. आपल्याला ईर्ष्या वाटली आणि अधिक काही हवंसं वाटलं तर आपलं हे हवंहवंसं वाटणं हावेमध्ये रूपांतरित झालेलं असतं. इतरांनी जे काही कमावलंय ते त्यांच्याकडून हिरावून घेतलं जावं, जेणेकरून ते आपल्याकडे येईल, अशीही इच्छा ईर्ष्येतून अनेकदा निर्माण होते. यात द्वेषभावनेच्या घटकाचीही भर पडू शकते.

हवंहवंसं वाटण्याशी सांगड बसल्यावर ईर्षा स्पर्धेकडे जाते. त्यामुळे ईर्ष्येने आपण अतिशय स्पर्धात्मक होतो आणि इतरांवर किंवा स्वतःवर मात करण्यासाठी पछाडल्यासारखं काम करतो, अशी ही अस्वस्थकारक भावना असल्याची चर्चा त्रुंगपा रिंपोछे यांनी केली आहे. याचा संबंध शक्तिशाली कृतीशी- तथाकथित “कर्म कुटुंबाशी”- येतो. इतरांची उपलब्धी काय आहे याबद्दल ईर्ष्या वाटल्यामुळे आपण स्वतःला पुढे रेटतो किंवा अधिकाधिक काम करण्यासाठी इतरांना आपल्या खाली रेटतो- व्यवसाय किंवा खेळांमधील टोकाच्या स्पर्धेसारखा हा प्रकार असतो. त्यामुळे ईर्ष्येचं प्रतीक म्हणून बौद्ध धर्मात घोड्याचा वापर केला जातो. ईर्ष्येमुळे घोडा इतर घोड्यांच्या पुढे पळतो. दुसरा घोडा आपल्याहून वेगाने धावत असल्याचं त्याला सहन होत नाही.

ईर्ष्या व स्पर्धात्मकता

ईर्ष्येचा निकटचा संबंध स्पर्धात्मकतेशी येतो, पण ईर्ष्येतून स्पर्धात्मकता येईलच असं काही निश्चित नसतं, असं बौद्ध धर्म मानतो. कोणी इतरांविषयी ईर्ष्या बाळगत असू शकतं आणि स्पर्धेचा प्रयत्नही न करता केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळेही हे घडू शकतं. त्याचप्रमाणे स्पर्धात्मक असण्यातून ईर्ष्या निर्माण होतेच असं नाही. काही लोकांना गंमत म्हणून खेळांमध्ये स्पर्धा आवडते, त्याचा ते आनंद घेतात, इतरांसोबत खेळल्याचा आनंद घेतात, पण त्यात गुणांची खेचाखेच करण्याची त्यांची इच्छा नसते.

बौद्ध धर्मामध्ये ईर्ष्या व स्पर्धात्मकता यांचा संबंध वेगळ्या रितीने लावण्यात आला आहे. उदाहरणार्थ, महान भारतीय गुरू शांतिदेव यांनी बोधिचर्यावतार या ग्रंथामध्ये ईर्ष्येविषयी चर्चा केली आहे. समान ताकदीच्या लोकांसोबत स्पर्धा करणं आणि खालच्या स्थानावर असलेल्यांबाबत अहंकार बाळगणं, अशाही रूपातील ईर्ष्या असते. सर्व जीवांना समान पातळीवर कसं मानावं, हे शिकण्यासंदर्भात त्यांनी ही चर्चा केली आहे.

“मी” विशेष आहे या भावनेला बौद्ध धर्माने इथे समस्या मानलं आहे आणि यात तीनही अस्वस्थकारक भावना अधोरेखित होतात. विशिष्ट गोष्ट करण्यासाठी, जीवनात पुढे जाण्यासाठी केवळ “मी”च पात्र आहे, असं आपल्याला वाटू लागलं, तर यशस्वी होणाऱ्या इतर कोणाबद्दल तरी आपल्याला ईर्ष्या वाटत असते, आपण स्पर्धात्मक होतो. आपल्याला त्या व्यक्तीवर मात करावीशी वाटते, मग आपण काही प्रमाणात यशस्वी असलो, तरीही हे घडत जातं. इथे ईर्ष्या म्हणजे “मी”विषयीची तीव्र भावना असते आणि आत्मकेंद्रीपणा असतो. आपण इतरांना स्वतःसारखं मानत नाही. आपण स्वतःला विशेष मानतो.

ईर्ष्या, स्पर्धात्मकता व अहंकार अशा प्रकारांनी निर्माण होणाऱ्या समस्या व दुःखावर उपाय म्हणून “मी” व “तू” या संदर्भातील गैरसमजूत दूर करावी, असं बौद्ध धर्मात सुचवलेलं आहे. आपण प्रत्येकाला समान मानायला हवं. प्रत्येकाकडे सारख्याच प्राथमिक क्षमता असतात, प्रत्येकाकडे बुद्ध-स्वभाव असतो- साक्षात्कार प्राप्त होण्यासाठीचं सामर्थ्य असतं. शिवाय, सुखी होण्याची व यशस्वी होण्याची आणि आपण दुःखी होऊ नये किंवा अपयशी होऊ नये अशी इच्छा प्रत्येकालाच असते. आणि प्रत्येकाला सुखी व यशस्वी होण्याचा आणि दुःखी न होण्याचा वा अपयशी न होण्याचा समान अधिकार असतो. या संदर्भात “मी”मध्ये विशेष काही नसतं. प्रत्येकाने सुखी व्हावं, अशा समान इच्छेची- प्रेमाची शिकवण बौद्ध धर्म देतो.

बौद्ध-स्वभाव व प्रेम यांनुसार आपण प्रत्येकाला समान मानायला शिकलो की, आपण आपल्याहून अधिक यशस्वी झालेल्यांशी किंवा आपण अपयशी झालेले असतानाही यशस्वी झालेले असतील त्यांच्याशी कसं नातं जोडायचं याबद्दल खुले राहू शकतो. त्या व्यक्तीच्या यशाचा आपल्याला आनंद वाटतो, कारण प्रत्येकाने सुखी व्हावं अशी आपली इच्छा असते. आपले समकक्ष असलेल्यांशी स्पर्धा करून त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांनाही यशस्वी होण्यासाठी मदत करावी. आपल्याहून कमी यशस्वी असलेल्यांची कामगिरी चांगली व्हावी यासाठी त्यांची मदत करावी, त्यांना कमी लेखू नये आणि आपण त्यांच्याहून चांगले आहोत असा अहंकारही बाळगू नये.

ईर्ष्या व स्पर्धात्मकता यांचं सांस्कृतिक मजबुतीकरण

इथे सुचवलेल्या बौद्ध पद्धती अतिशय प्रगत आहेत आणि विशिष्ट पाश्चात्त्य सांस्कृतिक मूल्यांद्वारे आपल्यामध्ये आपोआप उद्भवणारी ईर्ष्या व स्पर्धात्मकता यांचं मजुबतीकरण व बळकटीकरण होत असताना या पद्धतींचं उपयोजन करणं विशेषकरून अवघड जातं. शेवटी, जवळपास सर्व मुलांना आपोआपच जिंकणं आवडतं आणि हरल्यावर ती रडतात. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, लोकशाही समाजाचं स्वाभाविक सर्वोत्तम रूप म्हणजे भांडवलशाही, अशी शिकवण अनेक पाश्चात्त्य संस्कृतींमध्ये दिली जाते. जुळवून घेणारा टिकतो, या सिद्धान्तामुळे जीवनाचा प्राथमिक प्रेरक घटक स्पर्धा हाच होऊन जातो आणि प्रेम व ममत्व यांसारखी मूल्यं बाजूला पडतात. शिवाय, स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांद्वारे यश व जिंकणं यांचं महत्त्व पाश्चात्त्य संस्कृतींमध्ये ठसवलं जातं, आणि जगातील सर्वात्तम क्रीडापटू व सर्वांत श्रीमंत व्यक्ती यांचं गौरवीकरण केलं जातं.

त्याचप्रमाणे, लोकशाही व मतदानाची संपूर्ण राजकीय व्यवस्था स्पर्धेवर चालते- त्यात स्वतःला उमेदवार म्हणून सादर करून विकावं लागतं आणि विशिष्ट पदासाठी आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगले आहोत, हे जाहीर करत राहावं लागतं. प्रचारमोहिमांमुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराचे दुबळे दुवे शोधण्याचे प्रयत्न सर्वतोपरी केले जातात, अगदी एकमेकांच्या खाजगी जीवनातील तपशील वापरले जातात आणि त्याची किंवा तिची नाचक्की व्हावी यासाठी असे तपशील प्रमाणाबाहेर ताणून त्यांना मोठी प्रसिद्धी दिली जाते. अशा प्रकारे मत्सर व स्पर्धा यांवर आधारित वर्तन कौतुकास्पद व न्याय्य असल्याचं अनेक लोकांना वाटतं. इथे भावनिक गतिशीलता सारखीच असली तरी, “द्वेषा”पेक्षा “मत्सर” हा शब्द वापरणं जास्त सयुक्तिक राहील, 

दुसऱ्या बाजूला, इतरांना तुच्छ लेखणाऱ्या कोणावरही तिबेटी समाज संतापतो आणि आपल्यापेक्षा इतर व्यक्तीच चांगल्या असल्याचा दावा करतात. ही नकारात्मक स्वभाववैशिष्ट्ये मानली जातात. किंबहुना, स्वतःची कधीही स्तुती करू नये आणि आपल्यापेक्षा खालच्या स्थानावर असलेल्या लोकांना कधी कमी लेखू नये- ही बोधिसत्वाची पहिली प्रतिज्ञा आहे. स्वाभाविकपणे मतदान करणाऱ्या जनतेसमोरही असे शब्द न वापरण्याचा समावेश यात होतो. संबोधित केल्या जाणाऱ्या लोकांकडून लाभ, कौतुक, प्रेम, आदर इत्यादींची इच्छा ठेवून त्या हेतूने शब्द वापरले जातात, संबंधित लोकांचा मत्सर कमी लेखला जातो. अशा वेळी आपण बोलतो ते खरं आहे की खोटं याने काही फरक पडत नाही. उलट, स्वतःविषयी आत्यंतिक नम्रतेने बोलताना, “माझ्यात काहीच गुण नाही; मला काहीच माहीत नाही” असं म्हणतो, तेव्हा ते कौतुकास्पद मानलं जातं. तर, लोकशाही व मतांसाठी प्रचार करणं पूर्णतः परकं ठरतं आणि तिबेटी समाजामध्ये हे नेहमीच्या पाश्चात्त्य रूपात अंमलात आणलं तर परिणामकारक ठरत नाही.

आपल्याला पदासाठी निवडणूक लढवायची आहे, असं नुसतं म्हटलं तरी ती अहंकाराची व स्वार्थी हेतूची साशंक खूण मानली जाते. यात एकमेव तडजोड शक्य असते, ती म्हणजे केवळ उमेदवाराच्या प्रतिनिधींनी आपल्या उमेदवाराच्या गुणांबद्दल व उपलब्धींबद्दल बोलायची मुभा मिळू शकते आणि असं करताना प्रतिस्पर्धी उमेदवाराशी तुलना करता कामा नये किंवा त्यांच्याबद्दल काही वाईट बोललेलंही चालणार नाही. पण असं क्वचितच कधी केलं जातं. सर्वसाधारणतः विख्यात उमेदवार, म्हणजे चांगल्या घराण्यांमधील किंवा पुनर्जन्मित लामा, यांचं नामांकन दिलं जातं, त्यांना यात उतरायची इच्छा आहे का हे विचारलंही जात नाही. या पदासाठी स्पर्धेत उतरायची इच्छा नाही, असं ते म्हणाले, तर ती त्यांची नम्रता मानली जाते, कारण तत्काळ “हो” म्हटलं तर त्यातून अहंकार व सत्तालालसा दिसून येते. नामांकन झालेल्या व्यक्तीला नकार देणं जवळपास अशक्यच असतं. त्यानंतर प्रचारमोहिमेविनाच मतदान केलं जातं. सर्वाधिक विख्यात असलेल्या उमेदवाराला लोक सर्वसाधारणतः मतदान करतात.

तर इतरांच्या विजयाचा आनंद साजरा करण्याची- आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे इतरांना विजयी होऊ देऊन, स्वतः पराभव स्वीकारण्याची- बौद्ध पद्धती पाश्चात्त्यांना सर्वाधिक सुसंगत ठरेलच असं नाही, कारण पाश्चात्त्य लोक भांडवलशाही मूल्यांचे व पाश्चात्त्य निवडणुकीय प्रचारपद्धतीचे कट्टर पाठीराखे आहेत. पाश्चात्त्य देशांमधील आपण आधी स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांच्या वैधतेचं पुनर्मूल्यांकन करायला हवं आणि ही मूल्यं स्वीकारल्यामुळे उद्भवणाऱ्या मत्सर, ईर्ष्या व स्पर्धा या रूपांवर उपाय करायला हवा.

पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारित मत्सर, ईर्ष्या व स्पर्धात्मकतेच्या सापेक्षतेचं एक उदाहरण आपल्याला मदतीला येऊ शकतं, ते उदाहरण म्हणजे भारतीय बाजारपेठ. भारतामध्ये कपड्यांच्या बाजारपेठा आहे, दागिन्यांच्या बाजारपेठा आहे, भाज्यांच्या बाजारपेठा आहेत, इत्यादी. प्रत्येक बाजारपेठेमध्ये स्टॉल व दुकानांच्या एका मागून एक रांगा असतात, प्रत्येक रांगेत जवळपास सारख्याच वस्तू विकल्या जातात. बहुतांश दुकानदार एकमेकांचे मित्र असतात आणि अनेकदा आपापल्या दुकानाबाहेर उभे राहून ते चहा पितात. आपलं दुकान चांगलं चालेल की नाही, हा कर्माचा भाग आहे, अशी त्यांची मनोवृत्ती असते.

ईर्ष्येमध्ये लपलेला फसवा पवित्रा

एखाद्या क्षेत्रातील- उदाहरणार्थ, आर्थिक यश- कोणी व्यक्तीच्या उपलब्धी आपल्याला सहन होत नसतील तर त्याला ईर्ष्या म्हणतात, हे आपण पाहिलं आहे. आपल्याला ईर्ष्या वाटल्यामुळे आपणच तेवढं यश कमवायला हवं, अशी आपली इच्छा असते. कोणालातरी कोणाकडून तरी काही- म्हणजे प्रेम किंवा ममत्व- मिळतं तेव्हाही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते. हे आपल्यालाच मिळायला हवं होतं, असं आपल्याला वाटतं.

ईर्ष्येची ही अस्वस्थकारक भावना दोन फसव्या पवित्र्यांमधून येते. गोंधळल्यामुळे आणि गोष्टी कशा अस्तित्वात आहेत हे न समजल्यामुळे आपल्या मनानेच हे पवित्रे निर्माण केलेले असतात. पहिला द्वैती पवित्रा असा (१) “मी” असा कोणीतरी ठोस आहे आणि माझी पात्रता असूनही मला विशिष्ट उपलब्धी प्राप्त झाली नाही, आणि (२) “तू” असा कोणीतरी ठोस आहे आणि ही उपलब्धी मिळण्याची त्याची पात्रता नव्हती. जग आपलं काहीतरी देणं लागतं असं आपल्याला नेणिवेमध्ये वाटत असतं आणि इतरांना ते मिळालं की हा अन्याय आहे असंही आपल्याला वाटतं. “पराभूत” आणि “विजेते” अशा दोन काटेकोर कोटींमध्ये आपण जगाचं विभाजन करतो, आणि अशा काटेकोर कोटींच्या खोक्यांमध्येच लोक अस्तित्वात असतात व तिथेच ते सापडतात, अशी कल्पना करतो. मग आपण स्वतःला “पराभूत” या कायमस्वरूपी कोटीमध्ये समाविष्ट करतो आणि दुसऱ्या व्यक्तीला “विजेता” या कायमस्वरूपी कोटीमध्ये समाविष्ट करतो. आपण स्वतः सोडून इतर सर्वांनाच विजेता या खोक्यामध्ये समाविष्ट करण्याचीही शक्यता असते. आपल्यामध्ये केवळ रोषच निर्माण होतो असं नव्हे, तर आपण संपून गेल्याची भावनाही निर्माण होते. यातून “बिचारा मी” अशा वेदनादायी विचाराचाच मोह पडतो.

वर्तनातील कार्यकारणसंबंधांबाबत अजाण असल्यानेही अनेकदा ईर्ष्या निर्माण होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला बढती मिळाली किंवा प्रेम मिळालं, तर त्यासाठी त्याने काही मेहनत केली असेल किंवा तो त्यासाठी पात्र आहे, हे आपण समजून घेत नाही, किंबहुना ते नाकारतोच. हे प्राप्त करण्यासाठी आपण काहीच केलं नाही, तरी आपल्याला ते मिळायला हवं, अशी आपली भावना असते. आपण खूप काही केलं आहे, पण आपल्याला त्याचा मोबदला मिळालेला नाही, असंही आपल्याला वाटत असतं. त्यामुळे आपलं मन दुसरा फसवा पवित्रा तयार करून पुढे करतं. कोणत्याही कारणाविना गोष्टी घडत आहेत किंवा केवळ एकाच कारणासाठी गोष्टी घडत आहेत अशी समजूत आपल्या संभ्रमित मनामध्ये निर्माण होते- अशा वेळी केवळ स्वतःच्याच कृतींनाच महत्त्व दिलं जातं.

फसव्या पवित्र्यांची विरचना

आपण या दोन प्रकारच्या फसव्या पवित्र्यांची विरचना करणं गरजेचं आहे. सजीवांच्या जगामध्ये स्पर्धा हे प्रेरक अंगभूत तत्त्व आहे, असं आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं असेलही: जिंकण्याची इच्छा, जुळवून घेणारा टिकतो हे तत्त्व आपल्याला शिकवलं जात असेलही. पण हे गृहितक खरंच असेल असं नाही. तरीही, आपण ते स्वीकारलं असेल, तर जग स्वतःच्या स्वरूपामुळेच अंगभूतरित्या विभागलेलं आहे अशी आपली धारणा असते, या विभाजनामध्ये विजेते व पराभूत यांचं संपूर्ण द्वैत मानलं जातं. परिणामी, जगामध्ये विजेते व पराभूत अशा निश्चित सांकल्पनिक कोटी आहेत, असा आपला समज होतो, आणि अर्थातच आपण स्वतःकडेही त्याच सांकल्पनिक चौकटीतून पाहतो.

विजेते, पराभूत व स्पर्धा या संकल्पना उत्क्रांतीच्या वर्णनासाठी उपयुक्त असतीलही, पण त्या केवळ यादृच्छिक मानसिक रचित आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. “विजेता” व “पराभूत” हे केवळ मानसिक शिक्के आहेत. विशिष्ट घटनांच्या वर्णनासाठी वापरल्या जाणाऱ्या या सोयीस्कर मानसिक कोटी आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम येणं, कामाच्या ठिकाणी दुसऱ्या कुणाच्याऐवजी आपल्याला बढती मिळणं, किंवा एखादा ग्राहक किंवा विद्यार्थी दुसऱ्या कुणाकडे तरी जाणं, अशा प्रकारच्या घटनांमध्ये या कोटी वापरल्या जातात. अशाच प्रकारे आपण “चांगुलपणा”ची व्याख्या करून त्यानुसार “चांगल्या व्यक्ती” आणि “चांगल्या नसलेल्या व्यक्ती” अशाही कोटी करून लोकांचं विभाजन करू शकतो.

अशा प्रकारचे कोटींचे सर्व द्वैती संच मानसिक रचित असतात, हे समजल्यावर आपल्या लक्षात येतं की, “मी” किंवा “तू” यांना ठोस कोटीमध्ये बंदिस्त करणारा काहीच अंगभूत घटक नसतो. आपण अंगभूतरित्या पराभूत नसतो, आणि खरा “मी” पराभूत आहे, “मी” बिचारा आहे, हे सत्य आपल्याला विचारान्ती सापडलेलं आहे, असंही काही नसतं. उलट, आपला एखादा ग्राहक दुसऱ्या कोणाकडे गेला, तरी त्या व्यतिरिक्त आपल्याकडे इतर अनेक गुण असतात, त्यामुळे एकाच पराभूत परिस्थितीतला “मी” हाच खरा आहे असं मानू नये.

शिवाय, आपल्या मर्यादित मनांमुळे व आत्ममग्नतेमुळे आपण “बिचारा मी” आणि “मूर्ख तू” असा विचार करतो आणि त्यातून यश व अपयश, लाभ व तोटा, हे कोणत्याही कारणांविना होत असल्यासारखा विचार करत राहतो. आपल्याबाबत जे काही घडलं ते अन्याय्य होतं, असा विचार यामुळेच केला जातो. परंतु, विश्वामध्ये जे काही घडतं त्यामागे कार्यकारणसंबंधांचं प्रचंड मोठं जाळं असतं. त्यामुळे आपल्याबाबतीत व इतरांबाबतीत जे काही घडतं त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, त्यातील प्रत्येक घटकाचा विचार करणं आपल्या कल्पनाशक्तीपलीकडचं असतं.

आपण या दोन फसव्या पवित्र्यांची (विजेते व पराभूत, आणि कोणत्याही कारणाविना गोष्टी घडतात) विरचना करू पाहतो आणि त्यांना अधोरेखित करणं थांबवतो, तेव्हा आपली अन्यायाची भावना निवळते. आपल्या ईर्ष्येखाली केवळ उपलब्धीबद्दलची व काय घडलंय त्याबद्दलची जागरूकता असते. आपला ग्राहक दुसऱ्या कोणाकडे तरी गेला आणि आता तो ग्राहक त्या व्यक्तीकडे आहे. यामुळे आपण काहीतरी साध्य करण्याच्या उद्दिष्टाबद्दल जागरूक होतो. हे उद्दिष्ट साध्य करताना आपण कोणाबद्दल मत्सर बाळगला नाही, तर कदाचित आपण त्या व्यक्तीने यश कसं मिळवलं हे शिकू शकतो. त्यातून आपण स्वतः ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्षम होतो. या जागरूकतेवर द्वैती पवित्र्यांनी व ठोस ओळखींनी मात केली की आपल्याला ईर्ष्या व मत्सर वाटतो.

सारांश

तर, ईर्ष्येची अस्वस्थकारक भावना हाताळण्याच्या अनेक पद्धती बौद्ध धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. या भावनेची व्याख्या आपण बौद्ध अर्थाने केली किंवा पाश्चात्त्य अर्थाने केली, तरी या पद्धती लागू होतात. एखाद्या अस्वस्थकारक भावनेने आपण त्रस्त झालेले असू, तेव्हा त्यातील निर्धारक वैशिष्ट्यं व आपली सांस्कृतिक पार्श्वभूमी अचूकरित्या ओळखणं हे आव्हान असतं. साधनेच्या उपासनेद्वारे आपण स्वतःला विविध पद्धतींचं प्रशिक्षण देतो, तेव्हा आपल्या अनुभवात येणाऱ्या कोणत्याही भावनिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरेल, हे निवडणं आपल्याला शक्य होतं.

Top