सर्वसाधारणतः आपण दुःखाची, असमाधानकारक सुखाची किंवा शून्यत्वाची भावना अनुभवतो, तेव्हा आपण त्यातून काहीतरी असाधारण व ठोस निर्माण करतो आणि ते चिरकाल टिकेल अशी कल्पना करतो. पण अर्थातच आपण अनुभवतो त्या भावनांमधील काहीच विशेष नसतं- या सर्व भावना अचल व अशाश्वत असतात. या भावना जितका काळ टिकून असतात तितका काळ त्या बदलत राहतात आणि अखेरीस त्या नैसर्गिकरित्या संपुष्टात येतात. या वस्तुस्थितीची आपल्याला जाणीव नसते, आपण त्या उलट विचार करत असतो, त्यामुळे ‘या सुखापासून माझी कधीही फारकत होऊ नये असं मला वाटतं; हे किती भारी आहे’ किंवा ‘हे दुःख माझ्यापासून दूर जायला हवं; हे किती भयंकर आहे, मला हे सहन होत नाही’ किंवा ‘कधीच कशाचा ऱ्हास न होण्याची ही भावना मला हवी आहे; किती सुटल्यासारखं वाटतं’, असं आपल्या डोक्यात उच्चारवात ओरडलं जात असतं, त्याने आपण फसतो. ‘मी, मला, माझं’ याबद्दलची ही ओढ ‘मी’ला एक ठोस अस्तित्व देते, त्यातून अस्वस्थकारक भावना व अनिवार्य वर्तन सुरू होतं आणि आपलं खरं दुःख टिकून राहतं.
आपण ‘मी’ म्हणून- शरीर व मन यांच्याहून स्वतंत्र, स्वयंपूर्णरित्या आणि तुमच्या मनातील आवाजाच्या- एखाद्या ठोस रूपात अस्तित्वात आहे, असं आपल्याला का वाटतं, असा प्रश्न स्वतःला विचारा. ‘तसं जाणवतं, म्हणून मला तसं वाटतं’ असं तुम्ही यावर म्हणणार असाल, तर परत स्वतःला विचारा, ‘मला तसं वाटतं’ हे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसं कारण आहे का? आपण एखाद्या कल्पनेवर, विशेषतः स्वतःविषयीच्या कल्पनेवर विश्वास ठेवतो आणि ‘मला तसं वाटतं’ एवढाच त्याचा आधार असतो, तेव्हा आपल्याला त्याबद्दल असुरक्षित का वाटत राहतं? कारण, आपल्या गैरसमजुतीला पाठबळ पुरवणारं काहीच नसतं; त्याला तथ्य किंवा विवेक यांचं पाठबळ नसतं.
सुख, दुःख किंवा आपण पाहताना, ऐकताना, वास घेताना, चव घेताना, शारीरिकदृष्ट्या काही जाणवून घेताना किंवा विचार करताना जो काही अनुभव घेतो त्यात काहीच विशेष नसतं, ही वस्तुस्थिती आहे. यातील काहीच नंतर हाती उरत नाही. यातील कोणताही अनुभव पकडून ठेवायचा प्रयत्न करणं म्हणजे ढग पकडायचा प्रयत्न करण्यासारखं असतं- ते पूर्णतः निष्फळ ठरतं. ‘मी’मध्ये आणि मला या क्षणी जे वाटतं त्यात काहीही विशेष नसतं. कायम स्वतःच्या मनासारखं हवं असं वाटणाऱ्या आणि मनातल्या मनात त्याबद्दल बोलणाऱ्या स्वयंपूर्ण ठोस अस्तित्वाच्या रूपात आपण जगत नसतो. आपण अस्तित्वात असतो, पण आपल्याला वाटतं तशा गैरसमजुतीमधील अशक्य मार्गांनी अस्तित्वात नसतो. निव्वळ तसं जाणवतं आणि ‘मला तसं वाटतं’ म्हणून तसं असतंच असं नाही.
स्वतःविषयीच्या या गैरसमजुतीपासून व संदिग्ध धारणेपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी आपल्याला एका विरोधकाची गरज असते, जो या गैरसमजुती पूर्णतः पुसून टाकतो. आपलं मन शांत केल्याने आणि आपल्या मनातील असे विचार काढून टाकल्याने तात्पुरती संदिग्धता दबली जाईल, पण ती पुन्हा उद्भवण्यापासून मात्र रोखता येत नाही. आपल्या खऱ्या समस्यांच्या या खऱ्या कारणाला खरोखर थांबवायचं असेल, तर आपल्या अजाणतेपणाच्या पूर्णतः विरोधी असलेली मनस्थिती अंगीकारणे हा खरा मार्ग आहे. अजाणपणाविरोधात जागरूकता असते. तर, आपण कशाविषयी जागरूक राहायला हवं? आपण स्वयंपूर्ण रूपात अस्तित्वात असतो, ही गैरसमजूत दूर करण्याचं काम, अशी काही गोष्ट नसल्याच्या असांकल्पनिक बोधाद्वारे होतं. यामध्ये शून्यत्वाचा असांकल्पनिक बोध महत्त्वाचा असतो, केवळ आपल्याला अगदी अचूक वाटणाऱ्या शून्यत्वाच्या एखाद्या कल्पनेवर सांकल्पनिक लक्ष केंद्रित करून चालत नाही. आपली चुकीची धारणा सत्य नव्हती, ती वास्तवाशी सुसंगत नाही, अशी विवेक आणि असांकल्पनिक अनुभव यांच्यावर आधारलेली जागरूकता असेल तरच ‘मला तसं वाटतं’ एवढ्याच आधारावरची चुकीची समजूत संपुष्टात येते. कारण, अजाणतेपणाची प्रवृत्ती व सवयी खोलवर रुजलेल्या असतात, त्यामुळे गैरसमजुतीच विरून जाण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यात पार पडते.