लाम-रिम आचरणासाठी ध्यानधारणेविषयी सल्ला

बुद्धाच्या शिकवणुकी आचरणात आणायच्या असतील, तर ध्यानधारणा हा अर्थातच महत्त्वाचा विषय ठरतो. परंतु, ध्यानधारणेमध्ये खास बौद्ध असं काही नाही. ध्यानधारणा सर्व भारतीय परंपरांमध्ये आणि भारताबाहेरच्या बौद्धेतर व्यवस्थांमध्येही सापडते.

संस्कृतमध्ये ध्यानधारणेसाठी (‘मेडिटेशन’) “भावना” असाही शब्द आहे. “भावना” शब्द “भू” या धातूपासून तयार होतो, त्याचा अर्थ आहे “टू बीकम” किंवा “कशाचं तरी दुसरं काही होणं.” काहीएक रचनात्मक मनोवस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवणारी प्रक्रिया म्हणजे भावना. अलंकारिकरित्या बोलायचं तर आपण ती अवस्था ‘होतो’. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ध्यानधारणेद्वारे आपण स्वतःच्या मनाला विशिष्ट उपकार अवस्थेमध्ये आणतो.

भावना हा शब्द भू या संस्कृत धातूपासून आलेला असल्यामुळे, भावनेचा गर्भितार्थ रूपांतरण असा आहे. उदाहरणार्थ, आपण प्रेमाविषयी ध्यानधारणा करत असू, तर आपण प्रत्यक्षात स्वतःला आपल्या हृदयात प्रेमासह असणाऱ्या कोणामध्ये तरी स्वतःला रूपांतरित करतो. ही संज्ञा संस्कृतमधून तिबेटीमध्ये भाषांतरित झाली तेव्हा त्यासाठी वापरला गेलेला तिबेटी शब्द “सवय लावून घेणं” असं सुचवणारा होता. “गोम” हा तो तिबेटी शब्द. स्वतःला काही सकारात्मक सवय लावून घेणं- नकारात्मक किंवा तटस्थ सवय नव्हे- असा गोम या शब्दाचा अर्थ होतो, त्यातून सकारात्मक, रचनात्मक सवय लावून घेतली जाते.

त्यामुळे तिबेटी शब्द संबंधित संस्कृत शब्दाच्या अर्थाशी किंवा गर्भितार्थाशी बऱ्यापैकी साधर्म्य सांगणारा आहे. स्वतःला आपल्या ध्येयासारखं होण्यासाठी रूपांतरित करणं, हा दोन्ही संज्ञांचा गर्भितार्थ आहे- उदाहरणार्थ, आपल्याला हृदयातून प्रेम वाटतं त्या व्यक्तीमध्ये रूपांतरित होणं. आपण प्रेमाला उपकारक सवय म्हणून अंगीकारणं गरजेचं आहे. ही उपकारक सवय लावून घेण्यासाठी आपण ध्यानधारणेची पद्धत वापरतो.

शिकवणुकींकडे लक्ष देणं

बुद्धाच्या काळापूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रमुख भारतीय तात्त्विक संहिता म्हणजे उपनिषदं. या संहितांमध्ये आधीपासूनच ध्यानधारणेचे संदर्भ होते. उपनिषदांमध्ये ध्यानधारणेची चर्चा तीन टप्प्यांच्या प्रक्रियेसंदर्भात केली आहे: ऐकून घेणं, विचार करणं आणि ध्यानधारणा करणं. बुद्धाने ही तीन टप्प्यांमधील प्रक्रिया नव्याने शोधून काढली नाही; ती त्याच्या काळामध्ये प्रचलित होती. त्यामुळे आपल्याला एखादी सकारात्मक सवय लावून घ्यायची असेल, तर आपण आधी त्याबद्दल ऐकून घ्यायला हवं; मग त्यावर विचार करून ती समजून घ्यायला हवी; आणि अखेरीस ती स्वतः अंगीकारायला हवी.

आपल्याला बौद्ध धर्माविषयी काहीही माहीत नसेल, तर आपण आधी त्याबद्दल प्राथमिक माहिती मिळवायला हवी आणि ही माहिती अचूक असल्याची खात्रीही करून घेणं गरजेचं आहे. केवळ अचूक प्राथमिक माहितीद्वारेच आपल्याला अस्सल धर्मविषयक शिकवणुकींमध्ये रस घेण्यासाठीचा विश्वसनीय पाया घालता येतो. परंतु, बुद्धाच्या काळात तात्त्विक शिकवणुकी कधीही लिहून काढल्या गेल्या नाहीत. त्यांना लिखित संहितेमध्ये संकलित करायचं काम काही शतकांनी सुरू झालं. त्यामुळे तीन टप्प्यांची प्रक्रिया ‘ऐकण्या’ची आवश्यकता अधोरेखित करून सुरू होते- निराळ्या शब्दांत सांगायचं तर, उच्चारून सांगितल्या गेलेल्या शिकवणुकीबद्दल ऐकून घ्यावं.

आज पुस्तकं किंवा इंटरनेटवर वाचन करणं याचाही समावेश या पहिल्या टप्प्यामध्ये करता येईल. तुम्हाला प्राप्त करायचं असलेलं आचरण किंवा मनोवस्थांच्या विशिष्ट प्रकारांबद्दल तुम्ही वाचन करू शकता. परंतु, हा विवाद्य मुद्दा आहे, कारण आपण शिक्षकाकडून थेट शिकवण ऐकतो, तेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या शिक्षकाने विशिष्ट वातावरण निर्माण केलेलं असतं. आपण प्रत्यक्ष शिकवण ऐकतो, तेव्हा आपल्याला मिळणारी प्रेरणा एखादं पुस्तक वाचताना मिळेलच असं नाही. अर्थात पुस्तकही कोणीतरी लिहिलेलंच असतं, तरीही हा मुद्दा लागू होतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्येही हे दिसून येतं. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या लाइव्ह कॉन्सर्टला गेलात, तर तिथला अनुभव अतिशय ताकदीचा आणि प्रेरणादायी असतो, तसं घरात सीडी ऐकताना होत नाही. तो वेगळा अनुभव ठरतो.

आपण शिकवणुकी ऐकतो तेव्हा “मातीच्या कलशासारख्या तीन उणिवा” दूर करायच्या, ही एक अतिशय मदतीला येणारी सूचना असते.

  • एक, आपण उलट्या कलशासारखं असणं टाळणं गरजेचं आहे, कारण त्यात काहीच जात नाही. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपली मनं बंद असतील, तर आपण जे काही ऐकतोय त्यातून काहीच शिकणं आपल्याला शक्य होणार नाही.
  • शिवाय, तळाशी भोक असलेल्या कलशासारखं राहण्याची चूक टाळणं गरजेचं असतं. त्यात ओतलेलं काहीही त्या भोकातून सरळ बाहेर जातं. “एका कानातून आत, दुसऱ्या कानातून बाहेर,” या म्हणीसारखं होतं. हे आपण टाळणं गरजेचं आहे.
  • अखेरीस, खराब कलशासारखं होणंही टाळण्याची गरज आहे. खराब कलशामध्ये स्वच्छ पाणी ओतल्यावर पाणीही खराब होऊन जातं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपले अनेक पूर्वग्रह असतील, तर ते पूर्वग्रह नवीन सामग्रीविषयीच्या आपल्या समजुतीलाही डागाळतात. संबंधित व्यक्ती काय म्हणतेय हे निव्वळ ऐकून घेण्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या विचारांचा प्रभाव नवीन सामग्रीमध्ये सारखा मिसळत राहतो. 

या चुका टाळण्यासाठी आपण काही शिकवणुकी ऐकल्यानंतर त्या लिहून ठेवणं किंवा कोणत्यातरी मार्गाने त्या रेकॉर्ड करणं अतिशय मदतीचं ठरतं, जेणेकरून उल्लेख झालेले मुद्दे आपल्याला अचूकरित्या लक्षात राहतात. आपली स्मरणशक्ती परिपूर्ण नसेल, आणि आपल्यातल्या बहुतेकांची स्मरणशक्ती परिपूर्ण नसते, तर हे अतिशय मदतीचं ठरतं. आपण ऐकलेलं लिहून काढायला जितका वेळ घालवू, तितके आपले पूर्वग्रह आपल्या स्मृतींना डागाळतात. आणि आपण ऐकलेलं लिहून काढल्यावर किंवा रेकॉर्ड केल्यावर, ते आपण वारंवार ऐकणं गरजेचं आहे. आपल्या फडताळातल्या टिपणवहीमध्ये किंवा कम्प्युटरवरच्या किंवा आयपॉडवरच्या एखाद्या फायलीमध्ये शिकवणुकी असून काही पुरेसं नाही!

धर्मपालनाची सुरुवात करण्यासंदर्भात शाक्य गुरू सोनम त्सेमो म्हणाले आहेत की:

  • आपल्यासमोर समस्या आहेत आणि आपल्याला दुःख होतंय, हे पहिल्यांदा मान्य करणं गरजेचं आहे.
  • या दुःखद परिस्थितीतून बाहेर पडण्याची इच्छा ठेवणं गरजेचं आहे.
  • अखेरीस, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून धर्मामध्ये रस घेणं गरजेचं आहे.

आपण नवागत असतो तेव्हा आपण निश्चितपणे मनं खुली ठेवणं गरजेचं असतं आणि शिकलेलं सगळं टिकवून ठेवायचा प्रयत्न करावा; पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपण रस घेऊन आणि ऐकलेल्याचं मूल्यमापन करण्याच्या हेतूने धर्माच्या शिकवणुकी ऐकणं गरजेचं असतं. आपण ऐकतोय ती शिकवणूक आपण आचरणात आणली तर समस्यांवर मात करण्यासाठी तिची मदत होणार आहे का, हे ठरवण्यासाठी आपण मूल्यमापन करायला हवं. शाळेतली एखादी परीक्षा पास होण्यासाठी किंवा इतरांना आपल्या सखोल ज्ञानाने प्रभावित करण्यासाठी आपण बौद्ध शिकवणुकी शिकत नसतो. व्यक्तीशः प्रस्तुत ठरणारं व आपल्या जीवनात मदतीला येईल असं काहीतरी शिकण्यासाठी आपण या शिकवणुकी ऐकत असतो.

या शिकवणुकी ऐकत असताना आपण स्वतः व परिस्थिती ओळख कशी पटवून घ्यावी याचे वेगवेगळे मार्ग आहेत. “तीन ओळखी” म्हणून ज्ञात असलेल्या पद्धतीमध्ये आपण स्वतःला आजारी माणूस मानतो, शिक्षकाला डॉक्टर मानतो आणि शिकवणूक म्हणजे आपल्याला विविध आजारांवर किंवा समस्यांवर मात करण्यासाठी मदतीला येणारं औषध मानतो- अस्वस्थकारक भावना हा आपला आजार असतो.

आपल्या आचरणामध्ये आपण अधिक प्रगत झालो की, शिक्षकासंबंधी आपण कोणती मनोवृत्ती राखावी याबद्दलच्या इतर अनेक सूचना असतात- शिक्षकाला बुद्ध मानणं, इत्यादी. पण या सूचना नवागतांसाठी नाहीत.

आपण जे काही ऐकलं त्यावर विचार करणं

आपण जे काही ऐकलं त्याबद्दल विचार करणं, हा दुसरा टप्पा. शिकवण समजून घेण्यासाठी आपण त्याबद्दल विचार करतो. शिकवणुकीचा अर्थ काय हे अचूकरित्या समजल्यावर आपण या विचारप्रक्रियेच्या शेवटच्या बिंदूपाशी पोचतो. शिकवणुकीचं अचूक आचरण करण्यासाठी ती अचूकरित्या समजून घेणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे ती शिकवण वैध असल्याबद्दल आपली खात्री पटायला हवी आणि विशिष्ट समस्यावर मात करण्यासाठी ती आपल्याला मदतीची होईल याबद्दलही खात्री वाटायला हवी. शिकवणुकीमध्ये ज्या कशाची चर्चा झाली आहे ते प्रत्यक्षात साध्य करणं शक्य आहे, याबद्दलही आपल्याला खात्री वाटणं गरजेचं आहे. हे अशक्य आहे- उदाहरणार्थ, आपण आपल्या संतापावर कधीच मात करू शकणार नाही, असं आपल्याला वाटत असेल, तर संतापावर मात करण्याच्या उद्देशाने आचरण करण्यात काय अर्थ आहे? इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अमुकएक आचरण उपयुक्त ठरेल, अशी खात्री आपल्याला वाटणं गरजेचं आहे.

आपण एखाद्या शिकवणुकीबद्दल विचार करतो तेव्हा आपण अनेक दृष्टिकोनातून त्याबद्दल विचार करतो. उदाहरणार्थ, प्रत्येकाबद्दल समानरित्या प्रेम वाटावं यासाठी ध्यानधारणा करण्याबद्दल आपण बोलतो, त्या वेळी अशा प्रकारचं प्रेम विकसित करण्यासाठी कोणती विविध पावलं उचलणं गरजेचं आहे याची कल्पना आपल्याला असायला हवी. उदाहरणार्थ, प्रत्येकाविषयी वाटणारं समान प्रेम कशावर अवलंबून असतं? प्रत्येकाला समानरित्या पाहण्यावर, प्रत्येक जण आपल्याशी दयाभावाने वागलेला आहे, इत्यादीवर हे अवलंबून असतं. त्यामुळे आपल्या मनांमध्ये वैश्विक प्रेम विकसित व्हावं यासाठी आपण ते प्रेम कशावर अवलंबून आहे हे समजून घेणं गरजेचं असतं, आणि असं प्रेम आपल्यामध्ये वाढावं यासाठी आपण कोणत्या मर्मदृष्टी व मनोवस्था प्राप्त करणं गरजेचं आहे, हेदेखील समजून घेणं आवश्यक असतं.

शिवाय, प्रेमाविरोधातील कोणत्या घटकांवर हे प्रेम उपाय करणार आहे, हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. विशेषतः विरोधी घटक संताप व द्वेष हे असल्याबद्दल आपली खात्री असायला हवी; आणि प्रेम खरोखरच या घटकांवर मात करेल आणि आपल्याला त्यांच्यापासून मुक्त करेल, याबद्दलही आपल्याला खात्री वाटणं गरजेचं आहे. प्रेम आपल्याला यांपासून कसं मुक्त करेल, हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे.

शिवाय, प्रेम विकसित करण्यामागचा उद्देश काय, आणि प्रेम विकसित केल्यानंतर आपण काय करणार आहोत, हेही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रेम विकसित करण्याचे लाभ जाणून घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बोधिचित्ताचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासंदर्भात सूचना करणाऱ्या अनेक संहिता आपण पाहतो. सर्व मर्यादित जीवांना उपकारक ठरण्यासाठी आपलं स्वतःच्या, व्यक्तिगत भविष्यातील साक्षात्कारांची प्राप्ती करणं, असं ते उद्दिष्ट असतं. तर, या संहिता सर्वसाधारणतः बोधिचित्ताचं उद्दिष्ट प्राप्त करण्यामधील लाभांच्या स्पष्टीकरणाने सुरू होतात. जीवनात असं काही उद्दिष्ट असणं, आपल्याला आवडेल, याबद्दल आपली खात्री असायला हवी.

अखेरील, या शिकवणुकींमागील तर्काबद्दल आपल्याला खात्री वाटायला हवी. या शिकवणुकी तार्किक व वाजवी असायला हव्यात, आणि शिकवणुकींचे टप्पे व प्रत्यक्षातील तपशील या संदर्भात त्यांचा अर्थ लागायला हवा.

तर, आपण विचार करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. आपण पहिल्यांदा काय प्राप्त करणं गरजेचं आहे, यातून आपल्याला विशिष्ट समस्याग्रस्त मनोवस्थेपासून मुक्तता कशी मिळेल, आणि आपण कोणत्या विरोधी घटकांवर लक्ष ठेवायला हवंय, हे समजून न घेता थेट ध्यानधारणेची उडी मारणं शहाणपणाचं ठरणार नाही. यासाठीचा समतुल्य दाखला असा: “ऐकून घेणं म्हणजे तोंडात अन्नाचा घास घेण्यासारखं असतं; आणि विचार करणं म्हणजे तो घास चावण्यासारखं असतं.” आपण न चावता गिळायचा प्रयत्न केला, तर आपल्याला घास लागतो. त्याचप्रमाणे आपण शिकवणुकीबद्दल विचार न करता ध्यानधारणेचा प्रयत्न केला, तर आपल्याला अडचणी येतात.

विचारप्रक्रिया आपण नक्की कशी पूर्ण करायची? विचाराचा हा टप्पा एक तर मी नोंदवलेल्या विविध मुद्द्यांवर मुक्त शैलीच्या विचारप्रक्रियेचा असू शकतो, किंवा ते करून झाल्यावर अधिक औपचारिक विचारप्रक्रिया असू शकते.

औपचारिक विचारप्रक्रिया

औपचारिक विचारप्रक्रिया म्हणजे विवेकाच्या रितीने पुढे जाणे. आपल्याला विशिष्ट मनोवस्था प्राप्त करायची असते, तेव्हा आपल्याला त्यासाठी तयारी करावी लागते. काही टप्प्यांमधून पुढे जाऊन आपल्याला ती मनोवस्था प्राप्त करता येते, आणि बहुतेकदा या टप्प्यांवर तर्कविवेक अनुसरावा लागतो. उदाहरणार्थ, अनित्यतेचं आकलन विकसित करणारा तर्कविवेक समाविष्ट असलेली शिकवणूक असू शकते (कार्यकारणसंबंधांचा परिणाम होणाऱ्या गोष्टी क्षणोक्षणी बदलतात आणि संपुष्टात येतात); किंवा भावशून्यतेच्या आकलनाकडे नेणारी तर्कविवेकाची प्रक्रिया शिकवणुकीमध्ये समाविष्ट असू शकते (अशक्य रितीने कोणालाच अस्तित्वात असता येत नाही). तर्कविवेकाच्या रितीने विचार करून व काम करून आपल्याला खात्री पटते की केवळ अनित्यता व भावशून्यताच वैध आहे, त्याचप्रमाणे तर्कविवेकाद्वारे हेही सिद्ध होते की अनित्यता व भावशून्यता सत्य आहेत. तर्कविवेकाच्या मार्गाने केल्यास आपण अनित्यता व भावशून्यता यांबद्दल अचूक व निर्णायक आकलन प्राप्त करू शकतो, याबद्दलही आपली खात्री पटते. एक लक्षात ठेवा: खात्री वाटणं हा विचारप्रक्रियेचा भाग आहे.

याला पर्याय म्हणजे तर्कविवेकाऐवजी विशिष्ट टप्प्यांद्वारे आपण काहीएक मनोवस्था प्राप्त करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला बोधिचित्ताचं उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल, तर आपल्याला मानसिक स्थैर्य विकसित करावं लागतं आणि मग प्रत्येक जण गतजीवनकाळामध्ये आपली आई होतं असं पाहावं लागतं, त्या मातृत्वातील दयाभावाची आठवण ठेवावी लागते, त्याबद्दल कृतज्ञता विकसित करावी लागते, इत्यादी. या टप्प्यांनी पुढे गेलं की आपल्याला बोधिचित्ताचं उद्दिष्ट प्राप्त करता येईल, याबद्दल आपली खात्री पटलेली असते, म्हणून आपण ही पावलं उचलतो. हेदेखील विचारप्रक्रियेचा भाग असतं.

आपल्याला नक्की कोणती मनोवस्था विकसित करायची आहे, हेही या विचारप्रक्रियेदरम्यान समजून घ्यायला हवं. काही ध्यानधारणा आपल्याला विशिष्ट वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी असतात- उदाहरणार्थ, बुद्धाचं कल्पनाचित्र. कल्पनेतील बुद्धासंबंधी ध्यानधारणा करण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवं की, ही लक्ष केंद्रित करण्याच्या प्रकारातील ध्यानधारणा आहे आणि तिचं उदिद्ष्ट विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित करणं हे आहे- इथे एक लहान, त्रिमितीय, प्रकाशमान बुद्ध आपण आपल्या डोळ्यांसमोर असल्याची कल्पना आपण करतो.

दुसऱ्या बाजूला, विशिष्ट मनोवस्था, उदाहरणार्थ- प्रेम, विकसित करण्यासाठी निरनिराळ्या ध्यानधारणेच्या पद्धती असतात. इथे प्रेम या वस्तूवर आपण लक्ष केंद्रित करत नसतो, तर ती केवळ एक मनोवस्था असते, आपल्याला ती मनोवृत्ती विकसित करायची असते. तर, आपण कोणत्या प्रकारच्या ध्यानधारणेनुसार काम करतो आहोत, हे जाणून घेणं आवश्यक आहे: आपण  एका विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो आहोत की आपण विशिष्ट मनोवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत? आपण काय साधण्याचा प्रयत्न करतो आहोत?

या दोन्ही बाबतीत आपण दोन गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे, असं त्सोनगखापा अतिशय जोर देऊन सांगतात:

  • एक, आपल्या मनामध्ये कोणती वस्तू अवतरायला हवी, याबद्दल आपल्याला स्पष्टता असायला हवी. आपण कल्पनेतील बुद्धाबाबतच्या ध्यानधारणेबद्दल बोलतो आहोत की प्रेमाबाबतच्या ध्यानधारणेबाबत? आपल्या ध्यानधारणेमध्ये समोर येणारी वस्तू कोणती आहे?
  • दोन, आपलं मन त्या वस्तूचा ताबा कसं घेतं, त्याचा बोध कसा करवून घेतं, हेही जाणून घेणं गरजेचं आहे.

या दोन मुद्द्यांबाबत आपल्याला पूर्ण स्पष्टता नसेल, तर आपल्याला इच्छा असलेली मनोवस्था कशी प्राप्त करता येईल?

उदाहरणार्थ, करुणा: करुणेचं उद्दिष्ट काय? समोर अवतरणारी वस्तू कोणती? करुणेबाबत ध्यानधारणा करत असताना आपल्या मनात अवतरणारी वस्तू ज्ञानग्रहणक्षण जीवांची, दुःख असलेल्या विविध मर्यादित जीवांची, असते. आपलं मन त्यांवर लक्ष केंद्रित करतं आणि त्यांच्यातील विशिष्ट पैलू वेगळा करतं, हा पैलू म्हणजे दुःख व त्या दुःखाची कारणं. मन या वस्तूंवर ताबा कसं मिळवतं? या जीवांना त्यांच्या दुःखापासून व दुःखाच्या कारणांपासून मुक्ती मिळावी या तीव्र इच्छेने आणि आपल्याबाबतीतही असं घडवण्याच्या उद्देशाने आपलं मन या वस्तूंवर ताबा मिळवतं. अशा प्रकारे, आपण ऐकलेल्या किंवा वाचलेल्या सूचनांवर विचार करून आपल्याला कोणती मनोवस्था प्राप्त करायची आहे हे स्पष्टपणे नमूद करता येतं व समजून घेता येतं.

आपण बोधिचित्तावर ध्यानधारणा करायची योजना आखत असलो, तर अशा ध्यानधारणेमध्ये आपलं मन काय करतं याबद्दल आपण विचार करायला हवा आणि आपल्याला त्याबाबत स्पष्टता असणं गरजेचं आहे. बहुतांश लोक बोधिचित्त व करुणा यांच्यात गल्लत करतात; बोधिचित्त व करुणा हे सारखे नव्हेत. बोधिचित्त ही मनोवस्था आहे आणि करुणा हा तिचा पाया आहे; पण बोधिचित्त इतरांची सर्व दुःखं व दुःखाची कारणं दूर व्हावी, या इच्छेपलीकडे जातं. सर्व मर्यादित जीवांना साक्षात्कार व्हावा अशी इच्छा आणि त्यासाठीची जबाबदारी, यापलीकडे बोधिचित्त जातं. पण या सदिच्छा व सकारात्मक भावना यांवर बोधिचित्त अवलंबून असतं व त्यातून ते उगवून येतं. आपल्याकडे आधी प्रेम व करुणा यांचा पाया असायला हवा.

आपण चटईवर बसून बोधिचित्ताबाबत ध्यानधारणा करत असतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात कशावर लक्ष केंद्रित करत असतो? आपण स्वतःच्या व्यक्तिगत साक्षात्कारावर लक्ष केंद्रित करत असतो, हा साक्षात्कार तोवर घडलेला नसतो, पण बुद्ध-स्वरूपाच्या घटकांच्या व आपण करत असलेल्या कष्टाच्या आधारे तो घडू शकतो. बुद्ध-स्वरूपाचे घटक म्हणजे आपल्याला बुद्ध होण्यासाठी सक्षम करणारे सर्व प्राथमिक गुण व वैशिष्ट्यं होत- यात आपल्या मनाच्या निखळ स्वरूपाचा समावेश होतो. आपण बुद्ध शाक्यमुनींच्या साक्षात्कारवर लक्ष केंद्रित करत नाही आहोत. आपण एकंदरच अमूर्त साक्षात्कारावर लक्ष केंद्रित करत नाही आहोत, तर आपण स्वतःच्या व्यक्तिगत साक्षात्कारवर लक्ष केंद्रित करत आहोत, आपल्या अजून घडत नसलेल्या साक्षात्कारवर लक्ष केंद्रित करत असतो. 

आपल्या अजून घडत नसलेल्या साक्षात्कारावर आपण लक्ष केंद्रित कसं करतो? हे तितकंसं सोपं नाही. पहिल्याला आपल्याला याचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो, अजून होत नसलेलं हे घटित किंवा गोष्ट कोणत्या प्रकारचं आहे हे समजून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ, अजून न घडलेले कोंब बियाण्यामध्ये आधीपासूनच अस्तित्वात असतात का? की, अजून न घडलेले कोंब बियाण्याच्या पातळीवर अजिबातच अस्तित्वात नसतात? याचा विचार आपण करायला हवा.

आपण आपल्या अजून न घडलेल्या सक्षात्कावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा कशावर लक्ष केंद्रित करतोय याबद्दल स्पष्टता असणं भावशून्यतेविषयीच्या आकलनासाठी गरजेचं असतं. आपला अजून न घडलेला साक्षात्कार म्हणजे अंतिम रेषेच्या दिशेने धावण्याच्या स्पर्धेसारखं कुठेतरी बसून राहणं नसतं. किंवा आपल्या मनामध्ये किंवा बुद्ध-स्वरूपामध्ये कुठेतरी बसून राहून साक्षात्कार उमलून येईल अशी वाट पाहणं नसतं. अशा प्रकारे शोधून सापडणारी ही वस्तू नव्हे. दुसऱ्या बाजूला, आपण अजिबात अस्तित्वातच नसलेल्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नसतो; आपण नसतेपणावर (नथिंग) लक्ष केंद्रित करत नसतो. उलट, आपल्या अजून न घडलेल्या साक्षात्काराची जबाबदारी बुद्ध-स्वरूपाच्या घटकांच्या आधारे आपल्या मानसिक सातत्यावर वैधरित्या देता येते, हे समजून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट उचित रितीने वैधरित्या जबाबदारी म्हणून अमुकएका ठिकाणी ठेवणं, याचा अर्थ काय हेही समजून घेणं गरजेचं आहे.

या न घडलेल्या साक्षात्कारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण स्वतःच्या मनामध्ये अवतरणाऱ्या साक्षात्काराच्या मानसिक प्रतिमेवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आपण “साक्षात्कार” या शब्दाच्या ध्वनीची कल्पना करू शकतो किंवा आपण बुद्धाची कल्पना करू शकतो. तंत्रामध्ये आपण स्वतःला बुद्धप्रतिमेमध्ये कल्पू शकतो. यातील दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला स्वतःच्या मनांमध्ये येणारा मानसिक ध्वनी किंवा मानसिक चित्र अजून न घडलेल्या साक्षात्काराची प्रतिमा मानावं लागतं.

समोर अवतरणाऱ्या मानसिक वस्तूवर आपल्या मनाने लक्ष केंद्रित कसं करायचं? आपल्या मनामध्ये अवतरणाऱ्या मानसिक वस्तूमध्ये आपल्या अजून न घडलेल्या साक्षात्काराची प्रतिमा उमटल्याचं मानून आपण दोन उद्देशांनी त्यावर लक्ष केंद्रित करतो. पहिला उद्देश: “मी साक्षात्कार साध्य करणारच.” साक्षात्कार साधण्याचा उद्देश इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो आणि या गोष्टींविषयी आपण विचार केलेला असायला हवा व त्या समजून घेतलेल्या असाव्यात. साक्षात्कार साधण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, हे आपण वास्तविकरित्या जाणून घ्यायला हवं. “अरे, मी हे साध्य करेनच,” अशी वरवरची मनोवृत्ती असून चालणार नाही. आपण साक्षात्कार कसा साधणार आणि आपल्याला तो साधता येईल याबद्दल खात्री कशी वाटेल, हे जाणून घेणं गरजेचं आहे. साक्षात्काराची स्थिती साध्य करण्यासाठी आपल्याकडे वैध उद्देश असणं गरजेचं आहे. अन्यथा, साक्षात्कार साध्य करणं हे केवळ एक सुंदर स्वप्न होऊन जातं. शिवाय, साक्षात्कार म्हणजे काय हेही आपण अचूकरित्या समजून घ्यायला हवं, हे समजून घेणं अर्थातच खूप सोपं नाही. या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यावर आपल्याला ही सर्व समजूत प्राप्त होते, हा दुसरा टप्पा म्हणजे विचारप्रक्रिया.

या मानसिक प्रतिमेवर लक्ष केंद्रित करताना आपला दुसरा उद्देश असा असतो की, या साक्षात्काराद्वारे आपण इतरांना शक्य तितके उपकारक ठरणार आहोत. शेवटी, साक्षात्कार म्हणजे काही सर्वव्यापी ईश्वर होणं नसतं. आणि प्रत्येकाला उपकारक ठरायचं असेल, तरी त्यासाठी प्रेम व करुणा या बोधिचित्ताला पाया पुरवणाऱ्या पायऱ्या घालून झालेल्या हव्यात. इतरांनी सर्व दुःखापासून मुक्त व्हावं आणि त्यांच्याव आनंदाची खैरात व्हावी, अशी आपली इच्छा असते म्हणून इतरांनाही साक्षात्कारापर्यंत नेण्याची जबाबदारी आपण स्वतः घेतो.

विचारप्रक्रियेचा टप्पा बराच दीर्घ चालणारा असतो, त्यात बरंच कामही करावं लागतं. पण आपण कोणती मनोवस्था साधायचा प्रयत्न करतो आहोत आणि आपण ती मनोवस्था कशी विकसित करणार, हे या टप्प्याच्या अखेरीस आपल्याला अचूकरित्या व पूर्ण ठोसपणे लक्षात येतं. आपण अशी मनोवस्था विकसित करण्यासाठी सक्षम आहोत आणि ती विकसित करणं अतिशय उपकारक ठरेल, याबद्दल आपली पूर्णतः व वैधरित्या खात्री पटलेली असते.

ही विचारप्रक्रिया ध्यानधारणेसारखी वाटली, तरी पारंपरिक व्याख्येनुसार ही ध्यानधारणा नसते. अतिशय अचूकरित्या संज्ञा न वापरणारे पाश्चात्त्य लोक या विचारप्रक्रियेला “ध्यानधारणा” असं म्हणू शकतात, पण ते योग्य नाही. विचारप्रक्रिया व ध्यानधारणा यांच्यातील भेदांविषयी आपल्याला स्पष्टता असायला हवी.

विचारप्रक्रिया ही अतिशय मूल्यवान कृती असते, आणि शिकवणुकींबद्दल आपण कधीही विचार करू शकतो. किंबहुना, आपण दैनंदिन जीवनात इतर कामांमध्ये गुंतलेलं असतानाही असा विचार करणं अतिशय मदतीचं ठरू शकतं. उदाहरणार्थ, आपण वाहतूककोंडीत अडकलेले असतो, तेव्हा आपण विचार करू शकतो की, विशिष्ट मनोवस्था- उदाहरणार्थ, प्रेम- अशा परिस्थितीत कशी उपयोगात आणायची? ती इथे कशी प्रस्तुत ठरेल? तिचे लाभ कोणते असतील? इत्यादी. दिवसभरात आपण या मुद्द्यांचा विचार करू शकतो.

ध्यानधारणा

आता आपण या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आलो: हा टप्पा खुद्द ध्यानधारणेचा आहे. आपण अन्न चावल्यानंतर पचवतो तशीच ध्यानधारणा असते. एखाद्या मनोवस्थेबद्दल विचार करून झाल्यावर ती समजून घेतल्यावर आणि आपण ती प्राप्त करू शकतो याबद्दल खात्री पटल्यावर त्या विशिष्ट सकारात्मक मनोवस्थेची सवय लावून घेणं, ती मनोवस्था होणं, हा ध्यानधारणेचा उद्देश असतो. 

ध्यानधारणा ही मूलतः दुहेरी प्रक्रिया असते. यातील पहिल्या भागाला मी “सूक्ष्मदर्शी ध्यानधारणा” असं म्हणतो. सर्वसाधारणतः तिचं भाषांतर “विश्लेषणात्मक ध्यानधारणा” असं केलं जातं, पण तिला “विश्लेषणात्मक” असं म्हटल्याने ती विचारप्रक्रियेतला टप्पा वाटू शकते. त्यामुळे “सूक्ष्मदर्शी” हे त्या संज्ञेचं अधिक अचूक भाषांतर होईल, असं मला वाटतं. या संदर्भात, “सूक्ष्मदर्शी होणं” म्हणजे कशाची तरी अतिशय काळजीपूर्वक छाननी करणं, ती गोष्ट विशिष्ट रितीने समजून घेणं. ध्यानधारणेचा दुसरा भाग म्हणजे एकटक ध्यानधारणा, यात आपण त्या मनोवस्थेकडे प्रत्यक्षात एकटक पाहतो आणि त्यावर लक्ष केंद्रित करतो. या दुसऱ्या टप्प्याला आपण “स्थिरीकरण ध्यानधारणा” असं म्हणू शकतो.

यातील पहिला, सूक्ष्मदर्शी ध्यानधारणेचा, टप्पा कसा पूर्ण करायचा? विचारप्रक्रियेदरम्यान आपण तर्कविवेकाच प्रवास पूर्ण केलेला असतो किंवा विशिष्ट मनोवस्था विकसित करायची पावलं उचलेली असतात. आपल्याला कोणती मनोवस्था प्राप्त करायची आहे आणि ती आपण कशी प्राप्त करू शकतो, याबद्दलचं आकलन होण्याच्या उद्देशाने आपण हे केलेलं असतं. पण आता आपण प्रत्यक्षात ती मनोवस्था प्राप्त करण्यासाठी आणि नव्याने ती आपल्यामध्ये रुचवण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करत असतो. उदाहरणार्थ, सर्वांबद्दल करुणा वाटावी, यासाठी आपण तर्कविवेकाची वाट चोखाळतो: “प्रत्येक जण माझी आई राहिलेला आहे, प्रत्येक जण माझ्याशी दयाभावाने वागलेला आहे...” इत्यादी. अशाने आपण इच्छित मनोवस्थेपर्यंत जातो आणि प्रत्यक्षात ती आपल्याला जाणवते.

ही टप्प्या-टप्प्यांची प्रक्रिया पार पाडून आपण इच्छित मनोवस्थेपर्यंत पोचलो, तिची सवय लावून घेतली की, त्या पद्धतीने आपण आपल्याला ज्या वस्तूवर लक्ष केंद्रित करायचं आहे त्याबद्दल सक्रिय सूक्ष्मदर्शी आकलन करून घेतो. उदाहरणार्थ, आपण करुणेबाबत ध्यानधारणा करत असलो, तर आपण सर्व मर्यादित जीवांवर लक्ष केंद्रित करतो, आणि विशेषतः त्यांच्यातील आपल्याला आकळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण तपशिलावर- त्यांच्या समस्यांवर आणि दुःखावर लक्ष केंद्रित करतो. ते दुःखी आहेत असं आपल्याला कळतं आणि ते दुःखापासून मुक्त व्हावेत अशी आपली इच्छा आहे आणि त्यांना मुक्त होण्यासाठी मदत करावी असा आपला हेतू आहे. आपण प्रत्यक्षात आपल्या मनात ज्ञानग्रहणक्षम जीवांना पाहतो आहोत, अशा रितीने आपण आपल्या मनात त्यांच्याकडे बघतो आहोत; किंवा वास्तव जीवनामध्ये आपण प्रत्यक्ष लोकांना पाहतो, तसंही होऊ शकतं. करुणा इतरांवर व त्यांच्या दुःखावर केंद्रित असते, आणि त्यांनी दुःखापासून मुक्त व्हावं अशी इच्छा त्यात असते.

आपण काही काळ, सक्रिय प्रक्रिया म्हणून अशा सूक्ष्मदर्शी अवस्थेत राहतो. त्यानंतर आपण सूक्ष्मदर्शीपणे जाणून घेतलेल्या गोष्टी रिचवण्यासाठी स्थिरीकरणाची ध्यानधारणा असते, त्यात या विषयावर किंवा मनोवस्थेवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं जातं. आपण सूक्ष्मदर्शी ध्यानधारणेच्या टप्प्यात असतो, तेव्हाही आपल्याला अर्थातच लक्ष केंद्रित करावं लागतं; पण स्थिरीकरणाच्या टप्प्यात आपण या भावना आपल्या हृदयापर्यंत खोलवर रिचवल्या जातील असं पाहतो: आपल्याला तीव्रपणे करुणा जाणवते.

आपण हे दोन टप्पे आळीपाळीने आचरणात आणतो- सूक्ष्मदर्शी आकलन आणि स्थिरीकरण, असं पुढे मागे करतो, आणि अखेरीस आपल्याला त्याचा संयोग साधणं शक्य होतं. सूक्ष्मदर्शी आकलन व स्थिरीकरण या ध्यानधारणेच्या टप्प्यांचा संयोग साधणं अतिशय गुंतागुंतीचं असतं. तुम्हाला याबद्दल काही तपशील जाणून घ्यायचा असेल, तर माझ्या संकेतस्थळावर त्याबद्दल अधिक वाचता येईल.

शिवाय, आपण अधिक प्रगत होतो, तेव्हा आपल्याला “कष्टपूर्वक ध्यानधारणा” करायची गरज उरत नाही. कष्टप्रद ध्यानधारणेमध्ये सूक्ष्मदर्शी ध्यानधारणेची प्रक्रिया काही टप्प्यांमधून जाऊन एखादी मनोवस्था विकसित करते. प्रगत पातळीवर आपल्याला कष्टदायक न वाटणारी सूक्ष्मदर्शी ध्यानधारणा शक्य असते. टप्प्याटप्प्यांचा किंवा तर्कविवेकाचा मार्ग न चोखाळता क्षणार्धात आपल्याला इच्छित मनोवस्था प्राप्त करणं शक्य होतं. सूक्ष्मदर्शी ध्यानधारणा कष्टपूर्वक करावी लागत होती तेव्हा आपण लक्ष दिलेल्या वस्तूचं सूक्ष्मदर्शी आकलन करण्यासाठी जी मनोवस्था वापरत होतो, तिचाच वापर अजूनही करतो. 

ध्यानधारणेचे प्रकार

आपण अनेकदा दोन प्रकारच्या ध्यानधारणेबाबत ऐकतो. त्यासाठी वापरले जाणारे संस्कृत शब्द आहेत- “शमथ” आणि “विपश्यना”, किंवा तिबेटीमध्ये “शिनय” आणि “ल्हागतोंग”. या दोन संज्ञा मुळात ध्यानधारणेच्या प्रक्रियेद्वारे आपण ज्या दोन मनोवस्था साध्य करू पाहतो त्यांचा संदर्भ देणाऱ्या आहेत. शमथ ही शांत आणि स्थिर झालेली मनोवस्था असते. या मनोवस्थेमध्ये आपण सर्व पातळ्यांवरील मानसिक उदासीनतेचं व मनाच्या चंचलतेचं किंवा मानसिक अस्थिरतेचं (दुसऱ्या आकर्षक वस्तूकडे जाणारं मन) निवारण केलेलं असतं, अशा अर्थी ही अवस्था शांत असते. त्याचप्रमाणे यात एका वस्तूवर लक्ष स्थिर केलेलं असतं, त्यामुळे शमथ ध्यानधारणा स्थिर असते. इथे स्थिरीकरणाच्या ध्यानधारणेवर भर दिलेला आहे.

श्वासोच्छवास, बुद्धाचं कल्पनाचित्र, इत्यादींसारख्या अनेक विविध गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपण शांत व स्थिर मनोवस्था प्राप्त करू शकतो. शक्यतांची यादी मोठी आहे.

शमथ ध्यानधारणेबाबतही आपण सूचना ऐकणं गरजेचं आहे, आणि मग ध्यानधारणेच्या टप्प्यांवर विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, आपण बुद्धाची कल्पना करत असू, तर आपल्याला कल्पनाचित्र कसं उभं करायचं यासंबंधीच्या सूचना ऐकाव्या लागतील. मग पहिल्यांदा काय करायचं, दुसऱ्यांदा काय करायचं, इत्यादीचा विचार आपण करू.

“विपश्यना” म्हणजे अत्यंत आकलनक्षम मनोवस्था. गोष्टींचं अतिशय अपवादात्मक रितीने आकलन करून घेऊ शकणारी ही मनोवस्था असते. त्यामुळे विपश्यना ध्यानधारणा सूक्ष्मदर्शी ध्यानधारणेवर भर देते. आफण विपश्यनेची स्थिती साधण्याबद्दल बोलतो, तेव्हा ती अपवादात्मक आकलनक्षम मनोवस्था म्हणून साध्य करता येते, त्यात अनित्यता व भावशून्यता यांचं सूक्ष्मदर्शी आकलन होतं, पण या दोन्हीतील केवळ एकच आकलन त्यात होतं असं नाही. तंत्राचा सर्वोच्च वर्ग असलेलं अनुत्तरयोग तंत्र ही विपश्यना साध्य करण्याची एक पद्धती आहे, त्यात नाकाच्या टोकावरचा एक सूक्ष्म ठिपका किंवा थेंब कल्पनेत आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्या ठिपक्याची कल्पना तशीच ठेवत, त्याच रांगेत आणखी दोन ठिपके कल्पिले जातात, त्यानंतर चार, आठ, सोळा, बत्तीस, अशी ही संख्या वाढवली जाते. हे सर्व ठिपके अचूकरित्या यायला हवेत आणि मग टप्प्या-टप्प्याने हे कल्पनाचित्र विरळ करत न्यायचं. अशा प्रकारचं कल्पनाचित्र रंगवून आपण अतिशय तीव्र, अपवादात्मक आकलनक्षम मनोवस्था प्राप्त करतो. अतिशय उच्च पातळीवरील अशी मनोवस्था तुम्हाला खरोखरच प्राप्त करायची असेल, तर इतरही काही पद्धतींनी कल्पनाचित्र उभं करता येतं. या पद्धतींमध्ये प्रत्येक थेंबामध्ये तुम्ही आचरत असलेल्या देवताव्यवस्थेच्या संपूर्ण मंडलाची कल्पना केली जाते, त्यात सर्व देवता व त्यांचे सर्व तपशील कल्पिले जातात. हे तुम्हाला साधता आलं, तर तुमची निश्चितपणे अपवादात्मक आकलनक्षम मनोवस्था आलेली असते!

शमथ आणि विपश्यना हे ध्यानधारणेचे दोन प्रकार सर्व बौद्ध परंपरांमध्ये अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे अनेक भारतीय बौद्धेतर व्यवस्थांमध्येही अस्तित्वात आहेत. थेरवाद बौद्ध परंपरेमध्ये यांना ‘समथ’ व ‘विपस्सना’ या पाली संज्ञांनी ओळखलं जातं. झेन पंथामध्येदेखील या दोन पद्धती आहेत. उदाहरणार्थ, झेनचे कोरियन रूप असलेल्या सोन बौद्धविचारामध्ये ‘कोआन’ अशी एक पद्धत आहे: “हे काय आहे?” आपण “हे काय आहे”वर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्याचं उत्तर असेलच असं नाही. उदाहरणार्थ: “हे टेबल आहे आणि हा पेला आहे,” असं उत्तर असेलच असं नाही. उलट, मन “मूलगामी साशंकते”च्या स्थिती राहील अशी पातळी आपण गाठतो. असं मन वास्तवाला सतत “हे काय आहे” असा प्रश्न विचारत राहतं. त्यानंतर आपली मनोवस्था अपवादात्मक आकलनक्षम होते.

बहुतांश तिबेटी गुरूंनी झेन परंपरेचा अभ्यास केलेला नाही, त्यांचा या परंपरेशी परिचय नाही, हे दाखवणारी एक गंमतीशीर गोष्ट आहे. एक झेन गुरू आणि कालू रिंपोछे यांची एकदा भेट झाली. झेन गुरूंनी एक संत्रं हातात घेतलं आणि कालू रिंपोछेंना त्यांनी विचारलं, “हे काय आहे?” कालू रिंपोछे यांनी प्रश्नार्थक मुद्रेने दुभाषाकडे पाहिलं आणि विचारलं, “काय झालं, त्यांच्या देशात संत्रं नाहीयेत का?”

तर, शमथ आणि विपश्यना या पद्धती अशा आहेत. शमथ म्हणजे केवळ विभिन्न प्रकारचं लक्ष वापरून नऊ टप्प्यांमध्ये प्राप्त केलेली परिपूर्ण एकाग्रता नव्हे. परिपूर्ण एकाग्रतेसोबतच शमथमध्ये “उल्हसित मनोवस्था”ही असते. त्यासाठी खरं तर “सुदृढपणाची जाणीव” असा तांत्रिक शब्दप्रयोग केला जातो. परिपूर्ण एकाग्रतेसह सुदृढपणाची जाणीवही असते, ती उल्हसित शारीरिक व मानसिक अवस्था असते. “सदृढपणाची जाणीव” परिपूर्ण प्रशिक्षित क्रीडापटूच्या स्थितीसारखी असते.

माझे गुरू, त्सेनझाब सरकाँग रिंपोछे यांनी असं स्पष्ट करून सांगितलं होतं की, शमथ मनोवस्था असणं म्हणजे स्वतःकडे जंबो जेट विमान असण्यासारखं आहे: ते जमिनीवर ठेवलंत तर तिथे राहील, आणि तुम्ही ते हवेत उडवलंत तर ते तसं पुढे जाईल. कशावरही तुम्ही कितीही काळ लक्ष एकाग्र करू शकता, अशी जाणीव असते. शरीर थकून जात नाही; मन थकून जात नाही; आपल्याला पूर्णतः सुदृढ वाटतं; आणि हे उल्हसित करणारं असतं. शमथ अतिशय उल्हालक, उन्नतदायी, आनंदी मनोवस्था असते. पण चित्रपटात दाखवतात तसं रस्त्यावरून अत्यानंदाने गाणी म्हणत किंवा नाचत धावणं यात नसतं- शमथ अवस्था म्हणजे ते नव्हे. शमथ अवस्थेमध्ये अत्यंत सुप्रशिक्षित क्रीडापटूसारखं मन पूर्णतः सज्ज असतं.

विपश्यनेची मानसिक स्थिती शमथ स्थितीमध्ये भर घालते, हे इथे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. शमथ व विपश्यना यांची परिपूर्ण एकाग्रता व सुदृढपणाची स्थिती यांच्यात सुदृढपणाची दुसरी जाणीवही भर घालते. काहीही समजून घेण्यासाठी व सूक्ष्मदर्शी आकलनासाठी मन सुदृढ आहे, अशी ही जाणीव असते.

सर्वसाधारणतः “दृष्टिक्षेप ध्यानधारणा” असं संबोधलं जाणारा ध्यानधारणेचा आणखी एक प्रकार असतो. आपण विशिष्ट प्रकारच्या ध्यानधारणा पद्धतीवर काम करत असतो, तेव्हा अधूनमधून आपण संपूर्ण बौद्ध मार्गाची पडताळणी करणं गरजेचं असतं. आपला विशिष्ट ध्यानधारणेचा विषय संपूर्ण चित्रात नक्की कुठे बसतो याची स्वतःला आठवण करून देणं, हा यामागचा उद्देश आहे. आपण एकाच विषयावर अतिरिक्त भर देऊन इतर विषय टाळू नये किंवा दुर्लक्षू नये, यासाठी हे गरजेचं असतं. त्यामुळे दृष्टिक्षेप ध्यानधारणा म्हणजे संपूर्ण मार्गाची पडताळणी करणं; हा पडताळणीचा एक प्रकार आहे.

अनेक वर्षांपूर्वी मी डॉ. तेनझीन चोएद्रक यांच्यासोबत मॉस्कोला आलो होतो. डॉ. चोएद्रक हे परम पूजनीय दलाई लामा यांचे वैयक्तिक डॉक्टर होते. चर्नोबिल किरणोत्सार्गाचा आघात झालेल्यांना तिबेटी औषधांद्वारे मदत करू पाहणाऱ्या प्रकल्पावर आम्ही काम करत होतो. आम्ही खूप चांगल्या हॉटेलांमध्ये राहिलो आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आमच्या सोबत येत होते. अनेकदा आम्हाला रशियातील विख्यात सात टप्प्यांमधील भोजनासाठी नेण्यात आलं. तिबेट सोडून भारतात येण्यापूर्वी डॉ. तेनझीन चोएद्रक यांनी वीस वर्षं चिनी छळछावणीमध्ये काढली होती. त्यामुळे सात टप्प्यांमधल्ये भोजनात पहिल्याच टप्प्यात ते शक्य तितकं खाऊन टाकत. आम्ही कितीही सावध केलं, तरी ते ऐकत नसत. येत्या आठवड्याभरासाठी आपल्याला आत्ताच जेवण मिळत असल्यासारखं ते खात असत. यातच त्यांचं पोट इतकं भरायचं की नंतरच्या सहा टप्प्यांमध्ये ते काहीच खायचे नाहीत. दृष्टिक्षेप ध्यानधारणा करून आपण अशी अवस्था येणं टाळतो. आफल्याला सातही टप्प्यांमधील खाद्यपदार्थांची पडताळणी करून ते लक्षात ठेवायचं असतं, जेणेकरून आपल्याकडून “जास्त खाल्लं जाऊ नये” आणि एकाच विषयावर खूप जास्त ध्यानधारणा केली जाऊ नये. अन्यथा पहिल्याच टप्प्यात ताव मारून उर्वरित जेवण गमवावं लागेल.

तर, विशिष्ट मनोवस्था प्राप्त करण्यासाठी कोणत्या प्रकारची ध्यानधारणा करावी याचं वर्णन मी करत होतो, पण बौद्ध धर्मामध्ये केवळ त्याच प्रकारची ध्यानधारणा नाही. काही ध्यानधारणेच्या पद्धतींमध्ये, उदाहरणार्थ, मनाच्या स्वरूपाबाबतच्या काही काग्यू ध्यानधारणांमध्ये किंवा काही विशिष्ट झेन पद्धतींमध्ये निराळा दृष्टिकोन असतो. एखादी मनोवस्था प्राप्त करण्याऐवजी आपण त्या मनोवस्थेपर्यंत शांत होत जातो. स्वतःच्या मनातील प्रेम किंवा स्पष्टता यांसारखे विशिष्ट अंगभूत गुण शोधण्यासाठी व त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी हे केलं जातं. पण अशा प्रकारची ध्यानधारणा करत असतानाही आपण संबंधित सूचना आधी ऐकून घ्याव्या लागतात आणि मग त्यांच्यावर विचार करून आपल्याला त्यांचं आकलन होतं. आपण कोणत्या मनोवस्थेपर्यंत शांत होत जातोय, त्याचा आधार काय, आपण त्यातून काय साधणार आहोत, आपण पहिल्यांदा व दुसऱ्यांदा काय करायला हवंय, हेही जाणून घेणं गरजेचं आहे. “शांत होणं” या प्रकारच्या ध्यानधारणेची रचना “प्राप्त करणं” प्रकारच्या ध्यानधारणेसारखीच असते.

ध्यानधारणेसाठी सर्वाधिक अनुकूल वातावरण

एखादं ध्यानधारणा सत्र कसं घ्यावं, ध्यानधारणेची जागा कशी लावावी, फरशी कशी झाडावी, खोली कशी स्वच्छ करावी, आणि साष्टांग नमस्कार कसा करावा, प्रसाद कसा द्यावा, इत्यादींबद्दल विस्तृत सूचना केलेल्या आहेत- ध्यानधारणेसाठी अनुकूल पर्यावरण राखण्यासाठी या सर्व सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत. ध्यानधारणेसाठी अनुकूल परिस्थिती व उचित पर्यावरण- विशेषतः योग्य बैठक व शांत, स्वच्छ पर्यावरण- राखणं महत्त्वाचं असलं, तरी आपल्या भोवती मोठा देखावा उभा करणं गरजेचं नाही. सर्व खास सोनेरी वस्तू, आणि उदबत्त्या आणि पार्श्वभूमीराल ‘न्यू एज’चं संगीत, अशासारख्या गोष्टी करण्यावर खूप पैसा खर्च करण्याची गरज नाही. मिलरेपा यांच्याकडे अर्थातच हे सगळं नव्हतं आणि तरीही ध्यानधारणेच्या आचरणात ते चांगल्यापैकी यशस्वी झाले होते. आपण आपली ध्यानधारणेची जागा शक्य तितकी चांगली राखायचा प्रयत्न करावा, पण अवाजवी काही करू नये आणि केवळ दाखवण्यासाठी गोष्टी वाढवू नयेत.

शिवाय, आपल्याला कुठेही ध्यानधारणा करता यायला हवी. आपण ट्रेनने लांबच्या प्रवासाला निघालो असलो, तर “मला ट्रेनमध्ये ध्यानधारणा करता येत नाही, कारण माझी पाण्याची पात्रं नसतात, तिथे उदबत्ती पेटवता येत नाही, साष्टांग नमस्कार घालता येत नाही.” असं म्हणू नये. खरंतर ध्यानधारणेत थोडं पारंगत झाल्यावर आपण कुठेही ध्यानधारणा करू शकतो- ट्रेनमध्ये, कुठेही, रांगेत उभं असतानाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्येही औपचारिक ध्यानधारणा सत्रांच्या दरम्यान आपण इतरांना प्रेमाने व करुणेने वागवण्याची बाब लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकतो- ही ध्यानधारणा नाही का?

शिकवणुकी आत्मसात करणं- त्यांना आपला भाग बनवणं, जेणेकरून दैनंदिन जीवनात आपल्याला त्यांचं उपयोजन करता येईल, हा ध्यानधारणेमागचा मुख्य उद्देश आहे, हे लक्षात ठेवावं. पण ध्यानधारणा आपल्या दैनंदिन जीवनाहून पूर्णतः विभक्त होते, तेव्हा तो निव्वळ छंद उरतो. विशेषतः आपल्या ध्यानधारणेमध्ये अनोख्या तांत्रिक कल्पनाचित्रांचा समावेश असेल, तर ते सहज डिझ्नेलँडच्या सहलीसारखं होईल, कोणत्यातरी कल्पनारम्य प्रदेशात जाऊन यायचं, आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काहीच संबंध ठेवायचा नाही. या मार्गाने आपण पुढे गेलो, तर आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊ आणि ध्यानधारणेचा आपल्या दैनंदिन जीवनावर अत्यल्प परिणाम होईल. जीवनात शिकवणुकींचं उपयोजन करणं, हा ध्यानधारणेमागचा मुख्य उद्देश आहे, हे लक्षात ठेवावं.

आपण कुठेही असलो, तरी ध्यानधारणा करताना आपण पहिल्यांदा प्रेरणा निश्चित करायला हवी, आणि एकाग्रतेने ध्यानधारणा करण्याचा हेतू राखायला हवा. आपलं मन भरकटलं तर आपण ते परत जागेवर आणावं. आपल्याला झोप येत असेल, तर आपण स्वतःला जागं करावं. अखेरीस, आपल्याकडे समर्पित सकारात्मक शक्ती असते. ध्यानधारणेतून आपण प्राप्त केलेली सकारात्मक शक्ती आपण समर्पित केली नाही, तर ध्यानधारणेच्या प्रयत्नांतून केवळ आपल्या सांसारिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडते. आपण सर्वांच्या लाभासाठी साक्षात्कारामध्ये सकारात्मक उर्जा समर्पित करावी.

व्यक्तिगत आणि सामूहिक ध्यानधारणा

काही लोक व्यक्तिगतरित्या ध्यानधारणा करतात. किंबहुना, तिबेटी लोक बहुतांशाने व्यक्तिगत ध्यानधारणा करतात; ते सामूहिक ध्यानधारणा करत नाहीत, परंतु मठांमध्ये भिक्खू व भिक्खुणी प्रार्थना म्हणतात आणि पारंपरिक संहितांचं सामूहिक पठणही केलं जातं. पाश्चात्त्य देशांमध्ये मात्र आपण सामूहिक ध्यानधारणेची प्रथा पाडली आहे. बहुतांश लोकांना शिस्त लागण्यासाठी सामूहिक ध्यानधारणेचा लाभ होतो. आपण एकटेच असलो, तर आपल्याला बसून ध्यानधारणा करण्याची शिस्त लागत नाही. आपण ध्यानधारणा जितका वेळ करायचं ठरवलेलं असतं, त्या आधीच उठतो; त्याऐवजी आपल्या आजूबाजूला इतर लोक असतील, तर आपण अधिक शिस्तीने ध्यानधारणा करतो. आपण कमी चुळबुळ करतो, कारण इतरांसमोर असं करायची आपल्याला लाज वाटते.

काही लोकांना सामूहिक ध्यानधारणा खूपच भयंकर वाटते, कारण इतर लोकांमुळे त्यांचं लक्ष विचलित होतं. विशेषतः कोणी खोकत असेल किंवा चुळबुळत असेल, तेव्हा आपल्या ध्यानधारणेत त्याने अडथळा होतो असं त्यांना वाटतं, त्यामुळे ते खाजगीत एकट्याने ध्यानधारणा करणं पसंत करतात. विशेषतः समूह एकाच सुरात काही पठण करत असेल आणि काही लोक नेहमीपेक्षा खूप संथपणे पठण करत असतील, तर आपल्याला प्रचंड कंटाळा व संताप येतो. किंवा कधी असंही होतं की, काही लोक खूप वेगाने पठण करतात, त्याचाही आपल्याला संताप येऊ शकतो.

व्यक्तिगत किंवा सामूहिक ध्यानधारणेपैकी कोणती पद्धत आपल्यासाठी कोयोग्य आहे हे आपण ठरवण्याची गरज आहे. परंतु, लहान गटामध्ये, म्हणजे एक किंवा दोन इतर लोक असलेल्या वातावरणात ध्यानधारणेत सहभागी होताना एक रोचक वैशिष्ट्य माझ्या ध्यानात आलं आहे. इतरांशी विशेष घनिष्ठ संबंध असलेल्या वातावरणात ध्यानधारणा अतिशय यशस्वी होऊ शकते, त्यातून आपल्याला त्यांच्याशी सुसंवादी असल्यासारखं वाटतं. आपली ऊर्जा एकमेकांना बळकट करत नेते. त्यांच्यासोबत ध्यानधारणा करण्यातून आपल्याला खूप जास्त ऊर्जा व खूप जास्त स्पष्टता मिळते. पण छोट्या गटात ध्यानधारणा करणाऱ्या लोकांच्या व्यक्तिगत ऊर्जा एकमेकांशी संघर्षरत होतात, तेव्हा याच्या उलटा परिणाम होतो: आपण त्रस्त होतो आणि आपलं मन उदास होतं. त्यामुळे इतरांसोबत ध्यानधारणा करायची असेल तर, आपण कोणासोबत ध्यानधारणा करतो आहोत, याचं भान बाळगणं गरजेचं आहे.

चिकाटीचं महत्त्व

शेवटचा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे: वर-खाली होत राहणं हे संसाराचं स्वरूप आहे, त्यामुळे आपली ध्यानधारणाही वर-खाली होत राहते. ती कधीच एकरेषीय प्रक्रिया असू शकत नाही, प्रत्येक दिवशी अधिकाधिक चांगलं असं ते होत नाही. काही वेळा आपली ध्यानधारणा चांगली होती, इतर काही दिवशी ध्यानधारणा चांगली होत नाही. काही वेळा आपल्याला ध्यानधारणा करावंसं वाटतं, इतर काही दिवशी ध्यानधारणा करावी असं आपल्याला अजिबातच वाटत नाही. हे अतिशय स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे- संसाराचं स्वरूप असंच आहे. आपल्याला काय वाटतं हा इथला मुद्दा नाही, तर आपण चिकाटीने पुढे जात राहणं महत्त्वाचं आहे. “मला ध्यानधारणा करावीशी वाटत नाही” असा विचार तुमच्या मनात आला, तर मग पुढे काय? तरीही, ध्यानधारणा करायचीच. सातत्य टिकवायचं; रोज ध्यानधारणा करायची, अगदी दोन-तीन मिनिटांसाठी का होईना पण करायची. या मार्गावर आपल्याला स्थैर्य यावं यासाठी सातत्य अतिशय महत्त्वाचं असतं.

शिवाय, ध्यानधारणेचं सत्र खूप लांबलचक करू नये, विशेषतः सुरुवातीला तरी असं करूच नये. तीन ते पाच मिनिटं पुरेशी आहेत. अन्यथा, “कधी एकदा संपतेय” अशी ध्यानधारणेबद्दल भावना होऊ शकते. मग पुन्हा ते परत करावंसं वाटणार नाही. ध्यानधारणा ठरलेल्या वेळी संपवूनही पुढे सुरू राहावी असं वाटत असेल, तर आपण आनंदाने परत तिच्या वाटेला जातो. आपण कोणासोबत तरी असतो आणि थोडा अधिक वेळ त्या व्यक्तीसोबत घालवावासा वाटत असताना आपल्याला निरोप घ्यावा लागतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला लवकर परत भेटण्याची शक्यता असते- तसंच ध्यानधारणेबाबत होतं. पण दुसरी व्यक्ती खूप वेळ थांबली आणि आपण तिच्या असण्याने कंटाळून गेलो, ती आता निघून जावी असं आपल्याला वाटायला लागलं, तर ती व्यक्ती पुन्हा भेटणं आपल्यासाठी सुखकारक नसेल.

अखेरीस, ध्यानधारणेसाठीचा वेळ हळूहळू वाढवत नेणं आवश्यक असतं. लवचिक राहावं- लवचिक राहणं खूप महत्त्वाचं ठरतं. मी म्हणालो तसं: एक दिवसही ध्यानधारणा करायचं चुकवू नका. दररोज ध्यानधारणा केली, तर तुम्हाला स्थैर्य, विश्वसनीयता व आत्मविश्वास प्राप्त होईल. पण लवचिक राहावं: काही वेळा तुम्हाला वाटतंय तशी पूर्ण ध्यानधारणा करावी, आणि कधी वेळ नसेल, तर थोडक्यात ध्यानधारणा करावी. पण रोज किमान काहीतरी करावंच. दुराग्रही होऊ नका; खूप ताण घेऊ नका. झेन कोआनमधलं माझं एक आवडतं वचन असं आहे: “मृत्यू कोणत्याही वेळी येऊ शकतो. निवांत राहा!”

Top