आठ ऐहिक चिंता आणि सांकल्पनिक रूपरेषा

आठ ऐहिक चिंता

आपल्या जीवनामध्ये आपल्या मनांमधील अनुभव व भावना यांच्याव्यतिरिक्तही आशय असतो. इथेही तसंच होतं; आपण त्याला अवाजवी महत्त्व देणं टाळायचा प्रयत्न करायला हवा. बौद्ध शिकवणुकींमध्ये जीवनातील आठ अनित्य गोष्टींची यादी अधोरेखित केली आहे- यांना “आठ ऐहिक चिंता” किंवा “आठ ऐहिक धर्म” असं म्हणतात. या गोष्टीही सतत बदलणाऱ्या इतर गोष्टींप्रमाणेच चढ-उताराचं तत्त्व अनुसरतात.

लाभ व तोटे

काही वेळा आपला लाभ होतो, काही वेळा तोटा होतो. आर्थिकदृष्ट्या काही वेळा आपण पैसे कमावतो आणि काही वेळा पैसे गमावतो. काही वेळा आपण विकत घेतलेली वस्तू चांगली असते (हा लाभ होतो), पण काही वेळा ती वस्तू लगेच मोडून जाते (हा तोटा असतो). यातही विशेष असं काही नसतं. हे पत्ते खेळल्यासारखं किंवा मुलांचे खेळ खेळल्यासारखं असतं; काही वेळा आपण जिंकतो आणि काही वेळा आपण हरतो. मग काय? विशेष काही नाही.

हरल्यावर रडणाऱ्या आणि “मला जिंकायचंय!” असं ओरडणाऱ्या लहान मुलाप्रमाणे आपण व्हायचं नसतं, याची आठवण आपण स्वतःला करून देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपणच का जिंकायला हवं? प्रत्येक जण माझ्यासारखं होईल, अशी आशा ठेवल्यासारखा हा प्रकार असतो. बौद्ध धर्मात एक उपयुक्त म्हण आहे, ती अशी- “प्रत्येका बुद्ध आवडत नसे, मग आपण स्वतःबद्दल कोणती अपेक्षा ठेवावी- प्रत्येकाला आपण आवडणार आहोत का?” अर्थातच नाही. प्रत्येक जण आपल्या फेसबुक-पानावर ‘लाइक’चं बटण दाबणार नाही. काही लोकांना आपण आवडणारच नाही. यावर काय करायचं? हे अगदी स्वाभाविक आहे.

हे सगळं लाभ व तोटा यांच्याशी संबंधित असतं. आपण कोणाशी तरी नातं जोडतो, आणि ते अखेरीस संपुष्टात येतं. या संदर्भात आपण आपल्या खिडकीत येणाऱ्या मुक्त पक्ष्याची प्रतिमा पूर्वी वापरली आहे. तिथे तो पक्षी थोड्या वेळासाठी येतो, पण तो मुक्त असल्यामुळे तो उडूनही जातो. कोणत्याही नात्याबाबतसुद्धा असंच असतं. “मला कधीच सोडून जाऊ नकोस, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही”, असं तुम्ही म्हणालात आणि तुम्ही संपूर्ण आयुष्यभर सोबत राहिलात, तरी तुमच्यापैकी एक जण निःसंशयपणे दुसऱ्याच्या आधी मरणार आहे. एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री होते, एखाद्या व्यक्तीशी असलेली मैत्री तुटते, यात विशेष असं काहीच नाही. जीवन असंच आहे. ती व्यक्ती आपली मित्र वा मैत्रीण असताना आपल्याला आनंदी वाटणं शक्य नसतं आणि तिची मैत्री गमावल्यावर आपल्याला दुःख वाटणं शक्य नसतं, असा याचा अर्थ नव्हे. काहीच न वाटणं ही “काहीही होऊ दे” अशी मनोवृत्ती झाली, पण तिचा आणि “विशेष काही नाही” या मनोवृत्तीचा अजिबात संबंध नाही. आपण टोकांना जाऊ नये आणि संबंधित गोष्टींना अवाजवी महत्त्व देऊ नये, एवढाच याचा अर्थ आहे.

स्वतःकडे पाहणं आणि लाभ व तोटे यांना आपण कसा प्रतिसाद देतो हे पाहणं रोचक ठरतं. मी उदाहरण म्हणून कायम स्वतःकडे पाहो, कारण माझ्या संकेतस्थळाने कायम माझं मन व्यापून टाकलेलं असतं; जवळपास दिवसभर माझ्या विचारांवर आणि कामावर त्याचा पगडा असतो. आमच्याकडे सांख्यिकी आकडेवारीचा प्रोग्राम आहे आणि किती लोक संकेतस्थळ वाचतात हे मला रोज कळत असतं. एखाद्या दिवशी वाचकांची संख्या वाढली, तर खरोखरच चांगलं वाटतं, पण एखाद्या विशिष्ट संख्येपर्यंत किंवा मला वाटतंय तितके वाचक नसतील, तर ते तितकंसं चांगलं नाही. तर, अशा प्रकारे लाभ आणि तोटा हे घडत असतं. 

एका अर्थी मला आनंदाची अतिशय कमी पातळी जाणवते. ही काही नाट्यमय गोष्ट नाही. काही आठवड्यांपूर्वी एका दिवशी आमच्या संकेतस्थळाला भेट दिलेल्यांची संख्या ६,०००पर्यंत गेली होती. “अरे वा, ६,००० हे खूपच आहे!” असंच ते होतं. पण त्यातून मिळालेला आनंद अतिशय क्षुल्लक होता. त्यात काही मोठी गोष्ट नव्हती, कारण त्यातून वास्तविक काहीच घडलेलं नव्हतं. “बरं, हे चांगलं आहे. मग काय? आता नवीन काय?” अशी ती भावना होती. मग एका दिवशी वाचकसंख्या ४,५००पर्यंत खाली आली आणि मला खरोखरच निराश वाटलं. “अरे, आज फारसे लोक तिकडे फिरकले नाहीत.” पण स्वतःला त्यातच मग्न ठेवणं हे अधिक ठळक असल्याचं दिसतं, आणि मी ते कबूल करतो. कायम संकेतस्थळाशी निगडित सांख्यिकी तपशील बघावा, असं वाटत राहतं. इतर गोष्टींबाबत विचार करण्यात मग्न होण्यापेक्षा अशी आत्ममग्नतेची वृत्ती अधिक बळकट असते, असं बौद्ध धर्म सांगतो, कारण “मी”विषयी विचार करणं अंतःप्रेरणेने होतं. आपण किती विलक्षण आहोत किंवा महान आहोत किंवा कोणाचंच आपल्यावर प्रेम नाही, असा विचार आविष्कृतही व्हावा लागत नाही, पण तो कायम अंतःस्थ विचार म्हणून टिकून असतो.

तुम्ही सर्व तुमची उदाहरणं घेऊ शकता. कदाचित फेसबुक किंवा टेक्स्ट मेसेज या संदर्भात याचा विचार करता येईल का? मला आज किती मेसेज आले? माझ्या पोस्टना आज कोणी ‘लाइक’ केलं? काही नवीन आलंय का हे पाहण्यासाठी आपण स्वतःचं फेसबुक खातं किती वेळा तपासतो किंवा किती वेळा फोन खिशातून बाहेर काढतो? पूर्वी इंटरनेट वगैरे नव्हतं, पण लोक पोस्टमनच्या बाबतीत असंच वागायचे. “आज माझ्यासाठी काही पत्र आलंय का?” मग काही पत्रं आली नसतील तर, “अरेरे, कोणालाच मी आवडत नाही.” किंवा फक्त जाहिराती असतील आणि आपल्याला ते नको असेल, असंही होतं. “विशेष काही नाही” असं समजून घेणारी मनोवृत्ती असेल, तर चढ-उतारांना टोकांपर्यंत नेणं टाळण्यासाठी ती मदतीची ठरते, कारण या मनोवृत्तीद्वारे आपल्याला विविध घडामोडींविषयी अधिक मानसिक समतोल व मनःशांती साधता येते. नवीन काय आलंय, हे तपासण्याची सततची गरज कशी हाताळायची हे जास्त अवघड आहे.

आपली मनोवृत्ती बदलणं ही संथ व दीर्घ प्रक्रिया असते. गोष्टी सहज बदलत नाही, तर हळूहळू बदलतात. आपण स्वतःकडे अधिक वास्तववादी पद्धतीने बघायला सुरुवात केली की त्याची रोचकता लक्षात येते. “मला सतत कम्प्युटर आणि सेल-फोनकडे बघायची सवय लागलेय. मी त्यांचा गुलाम झालोय. किती लोक मला प्रतिसाद देतायंत हे सतत तपासायची सवय मला लागलेय. मी गुलाम का झालोय?”, असं आपण स्वतःला विचारतो. सब-वेमधील सर्व लोकांकडे पाहा आणि त्यांच्यातील किती लोकांच्या हातात सेल-फोन आहेत तेही पाहा. का? “माझ्या हातून काही सुटता कामा नये” या मानसिकतेमध्ये स्वतःला बहुमोल मानण्याची व असुरक्षिततेची भावना असते. का? इतकं महत्त्वाचं काय असतं? काही गोष्टी महत्त्वाच्या असतीलही, पण काहीच महत्त्वाचं नाही असं आपण म्हणत नाही आहोत, फक्त सतत संपर्कात राहण्याला, सतत ऑनलाइन राहण्याला आपण अवाजवी महत्त्व देतो, एवढंच म्हणणं आहे. आपल्या स्वतःच्या भावनिक समतोलाच्या संदर्भात याचं विश्लेषण करणं चांगलं असतं.

तर, काही वेळा आपण जिंकतो, काही वेळा आपण हरतो. हा एक संच झाला.

गोष्टी चांगल्या घडणं आणि गोष्टी वाईट घडणं

काही वेळा गोष्टी चांगल्या घडतात आणि काही वेळा गोष्टी वाईट घडतात, हा दुसरा संच. हेही आपण अनेक पातळ्यांवरून समजून घेऊ शकतो, पण इथे पुन्हा “विशेष काही नाही” हा प्रतिसाद असतो. एखादा दिवस खरोखरच चांगला जाईल, आणि दुसरा दिवस अनेक अडचणींनी भरलेला असेल, त्यात लोक आपल्याला त्रास देतील आणि सगळंच चुकीचं घडतंय असं वाटायला लागू शकतं. हे स्वाभाविक आहे. सकाळी आपली ऊर्जा जास्त असू शकते आणि दुपारनंतर ऊर्जा खालावू शकते. काही वेळा आपल्याला सुदृढ वाटतं, काही वेळा सर्दी होते. यात विशेष काही नाही.

प्रशंसा व टीका

प्रशंसा व टीका, या यापुढचा संच आहे. काही लोक आपली प्रशंसा करतात आणि इतर काही जण आपल्यावर टीका करतात. याला कसं सामोरं जायचं? प्रत्येक जण काही बुद्धाची प्रशंसा करायचं नाही; काही लोक, विशेषतः त्यांचा चुलतभाऊ त्यांच्यावर खूप टीका करत असे. मग प्रत्येक जण आपली प्रशंसा करेल, अशी अपेक्षा आपण का ठेवावी?

इथेही पुन्हा मी माझंच उदाहरण देतो. मला माझ्या संकेतस्थळाबद्दल अनेक ई-मेल येतात, आणि त्यातील बहुतांश लोक संकेतस्थळ त्यांना उपयुक्त ठरल्याचं सांगतात, पण क्वचित प्रसंगी टीकाही असते. प्रशंसा हाताळणं अर्थातच सोपं असतं; टीकेने आपलं मन खूप जास्त अस्वस्थ होऊ शकतं.

प्रशंसा झाल्यावर आपण टोकाला जाऊन विचार करायला नको- आपण महान आहोत असं मानायला नको. किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन, “मी काही याला पात्र नाही. त्यांना खरोखरचा मी माहीत असतो, तर त्यांना मी आवडलो नसतो” असाही विचार करू नये. पण प्रशंसा स्वीकारणं खूपच सोपं असतं. टीका स्वीकारणं मात्र इतकं अवघड का असतं? कारण आपण स्वतःला बहुमोल मानतो. मनोवृत्तीच्या प्रशिक्षणाद्वारे आपण स्वतःविषयी इतरांचा विचार करतो, आपल्या कोणत्या कृतीमुळे त्यांना आपल्यावर टीका करावीशी वाटली असेल याचा विचार करतो. आपल्याला मदतीसाठी काही करणं शक्य असेल, समजा नुसती दिलगिरी व्यक्त करणं शक्य असेल तर, “तुम्हाला यामुळे त्रास झाला असेल हे मी कबूल करतो. मी खरोखरच आपली माफी मागतो, माझा तो हेतू नव्हता”, असं म्हणता येईल. हळूहळू आपण स्वतःला बहुमोल मानण्यापासून इतरांना बहुमोल मानण्यापर्यंतचा बदल करू शकतो.

आपल्या इतरांसोबतच्या सर्वसाधारण, दैनंदिन संवादांमध्ये आपल्याला हे करता येणं शक्य आहे. काही वेळा ते आपल्यावर खूश होती आणि काही वेळा तसं होणार नाही. लोक आपल्यावर खूश असतील, तेव्हा ते सोपं असतं. शिवाय, आपल्या जीवनात काही लोक असे असतात ज्यांना हाताळणं खूपच अवघड असतं आणि ते कायम आपल्यावर टीका करतात किंवा कायम आपल्याबाबतीत नकारात्मक असतात. त्यांच्याबाबतीत आपली मनोवृत्ती कशी असते? आपण त्यांना केवळ अडचण करणारी, अप्रिय व्यक्ती मानतो का? की, ती अतिशय नाखूश व्यक्ती आहे, असं आपण मानतो? तुम्हा सर्वांच्या जीवनात असे लोक असतीलच याची मला खात्री आहे. ते तुम्हाला फोन करतात किंवा तुम्हाला भेटून सोबत जेवायची इच्छा व्यक्त करतात आणि या वेळी ते १०० टक्के स्वतःबद्दलच बोलती व तक्रारी करतील हे तुम्हाला माहीत असतं. “अरे.., आता परत हाच!” असा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. पण प्रत्येक वेळी आपण कामात व्यग्र आहोत असं आपल्याला सांगता येत नाही!

त्या लोकांसोबत असणं आणि त्यांच्या तक्रारी ऐकणं मला किती कटकटीचं वाटेल, याचा विचार करणं हा आपला प्रतिसाद असेल, तर आपला दृष्टिकोन आपल्याला बदलणं शक्य आहे: ही व्यक्ती सदासर्वकाळ तक्रारी करत असते, कारण ती प्रत्यक्षात अत्यंत दुःखई आहे, आणि एकाकीही आहे. तक्रारी करणाऱ्या लोकांसोबत सर्वसाधारणतः कोणालाच थांबायचं नसतं. त्यामुळे आपण त्यांच्या सोबत काही वेळ घालवणं गरजेचं आहे, त्यातून आपण अधिक सहानुभूती विकसित करू शकतो, आणि इथे आपण त्यांच्या बाजूने विचार करतो, “मी”च्या बाजूने नाही, त्यामुळे हा अनुभव तितका काही भयंकर नसतो.

चांगली बातमी व वाईट बातमी ऐकणं

चांगल्या व वाईट बातम्या ऐकणं, हा चौथा संच. हे आधीसारखंच असतं: प्रत्येक गोष्टीमध्ये चढ-उतार सुरूच  असतात. अर्थातच हे चार संच एकमेकांमध्ये मिसळतात आणि “विशेष काही नाही” हे तत्त्व या आठही संचांना लागू होतं. चांगल्या किंवा वाईट बातम्या ऐकण्यामध्ये विशेष असं काही नाही, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे घडतंच असतं. 

आता काही लोक अशा प्रकारच्या प्रशिक्षणावर आक्षेप घेतात. चढ-उतार नसतील तर आपण खऱ्या अर्थाने जिवंत नसतो, त्यामुळे अशा प्रकारे भावनिक हिंदोळे असणं आपल्याला आवडतं, अशी घोषणा या लोकांनी केलेली असते. पण ही मनोवृत्ती सहायक आहे का याची तपासणी करणं गरजेचं आहे.

पहिली गोष्ट, आपण भावनिक चढ-उतारांच्या हिंदोळ्यांमध्ये असलो किंवा नसलो, तरी आपण जिवंतच असतो. हा जरा मूर्खासारखा आक्षेप आहे. आपण भावनिक हिंदोळ्यांमध्ये असतो तेव्हा काय घडतं? आपण या भावनांनीच व्यापून जातो, त्यामुळे आपल्याला खरोखरचा तर्कसंगत विचार करता येत नाही. आपण शांत नसलो, तर आपलं जीवन तितकं नाट्यमय होत नाही, आणि आपल्याला अधिक चांगल्या रितीने परिस्थिती हाताळता येतात. आपण स्पष्टपणे विचार केला नाही आणि संतापलो, तर नंतर पश्चात्ताप वाटतील अशा गोष्टी आपल्याकडून बोलल्या जातात. आफल्या भावनांबाबत समवृत्ती ठेवली तर आपण अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. प्रत्येकाला आनंद हवा असतो, या संदर्भात अशा प्रकारचा शांत आनंद हा “ए हे हे, ओ हो हो” यांसारख्या नाट्यमय आनंदापेक्षा अधिक स्थिर असतो.

“विशेष काही नाही”ची सांकल्पनिक रूपरेषा

आपण चर्चा करत असलेल्या मनोवृत्तीचा पाया किंवा सांकल्पनिक रूपरेषा पाहू. इथे सांकल्पनिक विचार समजून घेणं महत्त्वाचं आहे. सांकल्पनिक विचार म्हणजे काय? गोष्टींकडे पाहताना किंवा गोष्टी अनुभवताना एखाद्या प्रवर्गाचा (कॅटेगरी) वापर करणं म्हणजे सांकल्पनिक विचार- इथे “काहीतरी विशेष” यासारखा प्रवर्ग विचारात घेता येऊ शकते. एखादा मानसिक कप्पा असतो आणि आपण काही अनुभव घेतो तेव्हा त्या “काहीतरी विशेष” या मानसिक कप्प्यामध्ये ठेवून देतो. 

हे आपण सदासर्वकाळ करत असतो, कारण अशाच रितीने आपल्याला गोष्टी समजून घेता येतात व त्यांवर प्रक्रिया करता येते. “स्त्री” असाही एक मानसिक खोका असतो. मला एखादी व्यक्ती दिसते आणि मी तिला “स्त्री” या मानसिक कप्प्यामध्ये ठेवून देतो. अशा प्रकारे आपण आपल्या अनुभवातील विविध गोष्टींना भिन्न मानसिक कप्प्यांमध्ये ठेवून देतो. उदाहरणार्थ, “पुरुष” वा “स्त्री” या कप्प्यांमध्ये घातलेलीच व्यक्ती “तरुण व्यक्ती” किंवा “वृद्ध व्यक्ती” किंवा “पिंगट केसांची” किंवा “काळ्या केसांची” अशाही कप्प्यांमध्ये जाऊ शकते. अनेकानेक कप्पे असतात.

प्रत्यक्षात गोष्टी कप्प्यांमध्ये अस्तित्वात नसतात. हे स्वाभाविक वाटत असलं, तरी ते समजून घेणं व पचवणं खरोखरच अवघड आहे. उदाहरणार्थ, आपण कोणालातरी “भयंकर व्यक्ती” या कप्प्यामध्ये ठेवू शकतो, पण प्रत्यक्षात कोणीही केवळ भयंकर व्यक्ती म्हणून अस्तित्वात नसतं, कारण ती व्यक्ती खरोखरच तशी अस्तित्वात असती, तर प्रत्येकाला ती तशीच वाटेल, आणि ती बाळ असल्यापासून तशीच राहिली असती.

या मानसिक कप्प्यांद्वारे आपल्याला गोष्टींचा अर्थ लावायला मदत होते, आणि इतरांविषयीची आपली मनोवृत्ती या मानसिक कप्प्यांच्या प्रकारानुसार निर्धारित होत असते. आपण कायम हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, हे मानसिक कप्पे म्हणजे केवळ मनाने रचलेली गोष्ट आहे आणि वास्तवाशी त्याचा संबंध नाही- वास्तवात काहीही कप्पे नसतात, हो ना?!

आपण हे कप्पे तयार कसे करतो?

आपण वस्तू ओळखून त्या प्रकारच्या मानसिक कप्प्याऐवजी या प्रकारच्या मानसिक कप्प्यामध्ये कशा ठेवतो, ते आता पाहू. त्या गोष्टीला इतर गोष्टींपासून खरोखर वेगळं ठरवणाऱ्या विशिष्ट वैशिष्ट्याच्या आधारे आपण हे करतो. याला “निर्णायक वैशिष्ट्य” या तांत्रिक संज्ञेद्वारे संबोधता येईल. आपण गोष्टींना “चौरस” या कप्प्यामध्ये ठेवतो तेव्हा त्याची वैशिष्ट्यं कोणती असतात, हे एक साधं उदाहरण पाहावं. अशा गोष्टीला चार समान बाजू असतील- त्यामुळे असं वैशिष्ट्य असलेल्या गोष्टींना आपण “चौरस” या मानसिक कप्प्यामध्ये टाकतो.

हा सोपा प्रवर्ग होता, पण “त्रासदायक व्यक्ती” या प्रवर्गाचं काय? “तू त्रासदायक व्यक्ती आहेस” या कप्प्यामध्ये एखाद्या व्यक्तीला ठेवताना तिची कोणती वैशिष्ट्यं आपण विचारात घेतलेली असतात? नक्की काय त्रासदायक आहे याचा विचार करणं रोचक ठरतं. आपल्या डोक्याभोवती घोंघावणारी माशी आणि ही व्यक्ती यांच्यात काय सारखेपणा आहे ज्यामुळे आपण या दोन्हींना “त्रासदायक” या कप्प्यामध्ये ठेवतो?

हे दोन्ही घटक जे काही करतात त्याने माझा भावनिक समतोल ढळतो व मनःशांती भंग पावते, असं मी म्हणू शकतो. तर, प्रत्यक्षात आपण “मी” संदर्भात मानसिक कप्प्यांची व्याख्या करत असतो, इतरांसंदर्भात नाही, कारण मला जे त्रासदायक वाटतं ते तुम्हाला कदाचित त्रासदायक वाटणार नाही. आणि माझी मनःशांती बिघडवणाऱ्या गोष्टी या मला पूर्णपणे आकर्षित करणाऱ्याही असू शकतात, मला त्यांचं वेडही असू शकतं. तर, आपण गोष्टींची व्याख्या कशी करतो आणि त्यांना कप्प्यांमध्ये कसं ठेवतो, हे केवळ आपल्याशीच निगडित असतं.

शिवाय, विविध भावना असतात. आता हे रोचक होऊ लागतं (कदाचित हे कायमच रोचक असेल). तर, आपल्याकडे “आनंदी” हा मानसिक कप्पा असतो. या “आनंदी” कप्प्यामध्ये आपण गोष्टी कशा ठेवतो? याचं उत्तर देणं अतिशय अवघड आहे. कोणीतरी आपल्याला विचारतं, “तू आनंदी आहेस का?” आणि काय उत्तर द्यायचं हे आपल्याला कळतही नाही. “मी आनंदी आहे का?” असं आपण स्वतःला विचारलं- तर त्याचा अर्थ खरोखरचा काय तेच मला कळत नाही? तर, आनंदी होण्याचं निर्णायक वैशिष्ट्य कोणतं? आपल्याला आनंदी होण्यासाठी इतकं काही हवं असतं, पण आनंदी असणं म्हणजे काय हे आपल्याला माहीत नसतं. हे विचित्र नाही का? आपल्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव घेताना तिच्यापासून फारकत होऊ नये असं वाटत असेल आणि ती कायम राहावी असं वाटत असेल, तर ती आपल्या आनंदाची व्याख्या असू शकते. बौद्ध वाङ्मयामध्ये आपल्याला ही व्याख्या सापडते, आणि त्याची आपल्याला थोडी मदतही होते.

फेसबुकबद्दल काय? “लाइक” केल्या जाणाऱ्या गोष्टींची व्याख्या कशी करायची? आपल्या चेहऱ्यावर स्मित आणणाऱ्या व आपल्याला चांगलं वाटेल अशा या गोष्टी असू शकतात. पण दिवसभर आपल्याला त्याकडेच पाहावं लागलं आणि दुसरं काहीच पाहायला मिळालं नाही, तर आपल्याला ती गोष्ट आवडत राहणार नाही, हो ना? हे विचित्र नाही का?

आपल्याकडे एखादा सांकल्पनिक विचार असेल, तेव्हा त्या प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करणारी मानसिक प्रतिमा कायम आपल्याकडे असते. त्यामुळे आपण जेव्हा “कुत्रा” असा विचार करतो तेव्हा आपल्याकडे एखाद्या कुत्र्याची मानसिक प्रतिमा असते, ती अर्थातच प्रत्येकाकडे वेगळी असेल. सेक्सी व्यक्ती किंवा त्रासदायक व्यक्ती, यांच्या संदर्भातील अशा प्रातिनिधिक मानसिक प्रतिमांनाही हे लागू होतं.

तर, मला आवडणाऱ्या गोष्टीचं प्रतिनिधित्व कशाने होतं? हा प्रश्न अधिक अवघड आहे. “मला हा ढंग आवडतो, मला अशा प्रकारचं अन्न आवडतं, मला अशा प्रकारचे चित्रपट आवडतात, ती मुलगी माझ्या टाइपची नाही, तो मुलगा माझ्या टाइपचा नाही” अशा गोष्टी आपण दैनंदिन स्तरावर बोलतो. मला आवडणाऱ्या गोष्टीचं प्रतिनिधित्व कशाने होतं? फेसबुकवरच्या एखाद्या प्रतिमेची तुलना आपण आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या अनुभवाशी करतो का? आणि मग त्यांना “लाइक” या प्रवर्गामध्ये ठेवतो का? हे सगळं आपल्या मनांच्या बाजूने येतं आहे हे लक्षात ठेवावं, या संबंधित वस्तूची बाजू नाही. त्या वस्तूमध्ये खरोखरच आवडण्याजोगं काही असेल, तर सर्वांनाच ते आवडेल. पण तसं होत नाही, त्यामुळे हे सगळं व्यक्तिनिष्ठ असतं.

“विशेष” म्हणजे काय याची व्याख्या

एखादी गोष्ट विशेष का ठरते, याचा विचार करणं हा पुढचा टप्पा आहे. त्या वस्तूच्या बाजूने विशेष असं काही असतं का किंवा “काहीतरी विशेष” असा केवळ एक मानसिक कप्पा आहे का, ज्याद्वारे आपण स्वतःची व्याख्या केलेली असते? एखादी गोष्ट विशेष का ठरते याचा आपण विचार करू लागतो तेव्हा “विशेष काही नाही” या वृत्तीचा सैद्धान्तिक आधार आपल्याला कळायला सुरुवात होते. खुद्द वस्तूच्या बाजूने विशेष असं अजिबात काहीच नसतं. “विशेष” ही कल्पना पूर्णतः आपल्या कल्पनांमधून, आपल्या “विशेष” या मानसिक कप्प्यामधून आलेली असते. त्या चाळणीद्वारे आपण गोष्टींचं आकलन करून घेतो: अमुकएक विशेष आहे आणि अमुक एक विशेष नाही, असं.

मग आपण स्वतःला विचारावं: विशेषत्वाची व्याख्या कशी करायची? एखादी गोष्टी अनन्य असेल तेव्हा विशेष असते, असं काही लोक म्हणतील: “हे खरोखरच विशेष चित्र आहे” किंवा “हे अगदी विशेष जेवण आहे”. पण प्रत्येकच गोष्टी अनन्य नसते का? कोणत्याही दोन गोष्टी अचूक एकमेकांसारख्या नसतात. कोबीच्या गड्ड्यांमधील प्रत्येक कोबीची गड्डी अनन्यसाधारण असते.

मग तुम्ही कदाचित असा विचार कराल की, “बरं, गोष्टी भिन्न असायलाच हव्यात. विशेष होण्यासाठी त्या भिन्न असायला हव्यात.” पण त्या खरोखरच एकमेकांपासून किती भिन्न असतात? सर्वसाधारण व विशेष यांच्यातील सीमारेषा आपण कशी व कुठे आखायची? यासंबंधीचा निर्णय कसा घ्यायचा?

नवीन असेल ते विशेष असतं, असं कदाचित तुम्ही म्हणाल. पण ते माझ्यासाठी नवीन आहे की या विश्वासाठी नवीन आहे? सर्वसाधारणतः आपण प्रत्येक गोष्टी “मी” संदर्भात निश्चित करतो आणि आपण घेतलेला प्रत्येक अनुभव नवीनच असतो, नाही का? मी काल अनुभवलं ते आणि आज अनुभवलं ते सारखं नाही. आज म्हणजे काल नव्हे. तर, एका अर्थी, प्रत्येक गोष्ट विशेष असते, म्हणजे काहीच विशेष नसतं, असा याचा अर्थ होतो. प्रत्येक गोष्ट अनन्य असते, प्रत्येक गोष्ट भिन्न असते आणि प्रत्येक गोष्ट व्यक्तीरूपात असते, त्यामुळे आपण कशालाच विशेष ठरवू शकत नाही. आपल्याला आवडतं म्हणून काहीतरी विशेष आहे, असं आपण म्हणत असू, तर आपली आवडही सदासर्वकाळ बदलत असते हे आपण सर्वच जाणतो. आपल्याला एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात मिळाली, तर ती आपल्याला आवडेनाशी होते, आणि ती आपल्याकडे दीर्घ काळ राहिली, तरी आपल्याला कंटाळा येतो.

गोष्टींना “विशेष” कप्प्यामध्ये टाकण्याच्या आपल्या व्यसनावर मात करण्यासाठी आपण या गोष्टींवर काम करायला हवं. “मला आत्ता वाटतंय ते खूप महत्त्वाचं आहे.” का? हे “महत्त्वाचं” या कप्प्यात का ठेवायचं? तर, गोष्टींना अनावश्यक मानसिक कप्प्यांच्या संदर्भात न पाहण्याचा प्रयत्न आपण करावा. अर्थात काही कप्पे उपयुक्त व आवश्यक असतात; त्यांच्याशिवाय आपल्याला भाषा समजणं शक्य होणार नाही. एकच शब्द उच्चारतानाही लोक भिन्न ढंगाने भिन्न ध्वनी काढतात आणि त्यांचा आवाज कमी-अधिक असतो, हे सगळं त्या शब्दाशी निगडित मानसिक कप्प्यामुळेच आपल्याला समजून घेता येतं.

त्यामुळे हे सर्व कप्पे फेकून देता येणार नाहीत. “काहीतरी विशेष”सारखे काही मानसिक कप्पे पूर्णतः व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे मदतीला येत नाहीत. याचं विश्लेषण करायला सुरुवात केल्यावर लक्षात येतं की, हे सगळं आपल्या मनोवृत्तीमध्ये असतं: आपल्याला विशेष म्हणजे काय याची व्याख्याही करता येत नसेल, तरी आपण काही गोष्टींना विशेष मानतो.

अशा प्रकारे “मी कोणतीही गोष्ट विशेष मानणार नाही” असं म्हणताना आपण केवळ आत्मनियंत्रण व शिस्त वापरत नसतो, कारण त्याची अंमलबजावणी करणं खरोखरच अवघड असतं. पण समजुतीद्वारे आपल्या लक्षात येतं की, हे सगळं केवळ मानसिक रचित आहे, त्यात खरोखरचं विशेष असं काहीच नाही.

सांकल्पनिक विचार समजून घेऊन त्याद्वारे मनाचं प्रशिक्षण

मन-प्रशिक्षणाद्वारे आपल्या मनोवृत्तीवर काम करण्याच्या अनेक पातळ्या आहेत. भिन्न मानसिक कप्प्यांद्वारे आपण गोष्टींचं आकलन करून घेऊ शकतो आणि आपल्या आकलनातील वस्तू आपण एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात हलवूही शकतो. त्यामुळे कोणाला “त्रासदायक, तक्रारखोर व्यक्ती” या कप्प्यात ठेवण्याऐवजी आपण “दुःखी, एकाकी व्यक्ती” या कप्प्यात ठेवलं, तर त्यातून त्या व्यक्तीशी वागण्याची आपली रीतच पूर्णतः बदलून जाते. त्या व्यक्तीला हे अथवा ते करणारा कोणताही अंगभूत घटक खुद्द त्या व्यक्तीमध्ये नाही, तर आपल्या मनोवृत्तीमुळे आपल्याला त्यांचं विशिष्ट आकलन होतं, त्याचा आपल्या अनुभवावर आणि वागण्यावर परिणाम होतो, हे आपल्या लक्षात येतं.

“विशेष”सारखे काही मानसिक प्रवर्ग अजिबात उपयोगाचे नाहीत. विशेष लोक असतात, विशेष प्रसंग असतात, हे सगळं खरं आहे. पण वाढदिवस किंवा नववर्षारंभाचा दिवस यांना इतकं विशेष मानलं जात असलं तरी ते किती बदलणारं असतं याचा विचार तुम्ही केला आहे का? ते इतकं विशेष का ठरतं? लोकांनी ते विशेष मानलंय इतकंच. एक जानेवारीबाबत खरोखरचं विशेष असं काहीच नाही आणि ही तारीख खगोलशास्त्रीय दृष्टीनेही कशाशी जोडलेली नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि आपल्याला सुरुवात ठरवता येत नाही: “हां! हा वर्षाचा पहिला दिवस.” पहिलं काहीच नसतं, त्यामुळेच प्रत्येक संस्कृतीचा आपापला नववर्षारंभ असतो. यात चिडण्यासारखं काही नाही किंवा हे मूर्खपणाचंही मानू नये, पण त्याबाबत अतिउत्तेजित व्हायचीही गरज नाही आणि त्याला अवाजवी महत्त्वही द्यायला नको.

मानसिक कप्पे व प्रवर्ग आणि निर्णायक वैशिष्ट्यं यांसह सांकल्पनिक विचार कसा कार्यरत असतो याचं हे प्राथमिक स्वरूप समजल्यानंतर आपण त्याचा गरज असेल तेव्हा वापर करू शकतो आणि गरज नसेल तेव्हा सोडून देऊ शकतो.

अखेरीस, आपण आपली मनोवृत्ती बदलतो व सुधारतो, तेव्हा त्यामागे काही प्रेरणा गरजेची असते व प्रचंड संयम गरजेचा असतो. वारंवार सराव करून आपण बदलाशी जितके अधिक परिचित होऊ, तितका हा बदल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अधिक स्वाभाविकरित्या येईल. आपल्याला दुःखी वाटेल तेव्हा आपण स्वतःला एवढीच आठवण करून द्यावी की, “अरे, मी फक्त मी, मी, मी असाच विचार करतो आहे.”

मनोवृत्तीचं प्रशिक्षण ही दीर्घ प्रक्रिया आहे, पण ती अतिशय मूल्यवानदेखील आहे.

सारांश

प्रत्येक दिवशी सकाळी उठताना आपलं एकच उद्दिष्ट असतं: आपल्याला अधिक चांगलं, अधिक आनंदी भविष्य हवं असतं. याबाबतीत आपण सगळे सारखेच असतो. “मी” विश्वाचा केंद्रबिंदू आहे असा विचार करण्याबाबतीतही आपण सगळेच समान असतो. याच वस्तुस्थितीमुळे अगणित समस्या उद्भवतात. स्वतःला बहुमोल मानताना आपण “मी”ची काळजी घेत असतो, त्यामुळे ते आकर्षक वाटते, पण प्रत्यक्षात ते दुःखाच्या दिशेने धावणं असतं, आणि आपल्याला आत्यंतिक अभिलाषा असलेल्या आनंदापासून दूर नेणारं असतं. आपण वास्तव- गोष्टी वस्तुतः कशा अस्तित्वात आहेत हे- समजून घ्यायला सुरुवात केली की, हे सगळं उलटं होतं. जीवनात चढ-उतार येतच असतात, आणि कायमच हे होत राहणार; यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपण स्वतःच्या मनोवृत्तीवर नियंत्रण ठेवू शकतो: आपण प्रत्येक क्षणाला, आपल्या अनुभवातील प्रत्येक गोष्टीला कसा प्रतिसाद देतो, त्यावर नियंत्रण ठेवता येतं. प्रयत्न करून आपण आपलं जीवन आनंदी करू शकतो, त्यात आपण खऱ्या अर्थाने स्वतःविषयी व इतरांविषयी काळजी करू, मग बाह्य परिस्थिती काहीही असो.

Top