बौद्ध धर्म आणि इस्लाममधील प्रेमभाव: तौलनिक अभ्यास

सर्व धर्मांकडे एक समान उद्दिष्ट असतं                                                             

सर्व धर्म प्रेम, संयम, क्षमाशीलता, आत्मकेंद्री व स्वार्थी वृत्तीवर मात हा एकसम संदेश देतात. ही अशी बाब आहे, जी सर्व धर्मांच्या शिकवणींमध्ये एकसमान असते आणि ती आंतरधर्मीय संवादाचा पाया असते. या मूल्यांच्या शिकवणीच्या पद्धती आणि तत्त्वज्ञान कदाचित भिन्न असेल, पण त्यांचं उद्दिष्ट समान असतं. जगातील सर्व धर्म व्यक्ती आणि समष्टीचं जीवनमान सुधारण्यासोबतच त्यांच्या जीवनात आनंद निर्मिती करण्याचं उद्दिष्टं बाळगतात. हा समान दुवा मानून आणि तत्त्वज्ञानातील वैविध्याचा स्वीकार करून, आज जगाला ज्याची सर्वाधिक गरज आहे, असा धार्मिक सुसंवाद कसा प्रस्थापित करता येईल, हा खरा प्रश्न आहे.   

जेव्हा आपण बौद्ध आणि इस्लामिक जगताच्या संदर्भातून पाहतो, तेव्हा हे दोन्ही धर्म भारत आणि मध्य व दक्षिणपूर्व आशियासारख्या जगातील अनेक भागांमध्ये ऐतिहासिक आणि समकालीन स्थितीतही परस्पर संवादी किंवा आंतरच्छेदित असलेले आढळतात. सध्या अनेक मुस्लिम स्थलांतरित युरोप आणि उत्तर अमेरिकेत स्थलांतरित होत आहेत. या समाज आणि संस्कृतींशी आपला जवळून संपर्क येत आहे. ते ज्यू आणि ख्रिश्चन लोकांशीच संवाद साधत नाहीत, तर बौद्ध धर्मियांशीही संवाद साधत आहेत. आज इथे असलेल्यांपैकी काही जण बौद्ध पार्श्वभूमी असणारे असू शकतात आणि या दोन्ही धर्मांच्या तुलनेत त्यांना कदाचित रस असू शकेल. 

आंतरधर्मीय सुसंवादाच्या संदर्भातून हा परमपूज्य दलाई लामा यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षण हा अशा सुसंवादाचा पाया असल्याचे ते सतत अधोरेखित करतात. जेव्हा लोक इतर धर्मांविषयी अनभिज्ञ असतात आणि बहुतांश वेळा अपप्रसाराची शिकार ठरतात, तेव्हा भीती किंवा गैरविश्वासाची भावना निर्माण होते. तेव्हा लोक त्या संपूर्ण अल्पसंख्याक धर्मगटाला, परमपूज्य ज्याला ‘लबाड’ म्हणतात, तसे समजू लागतात. सर्व समाज आणि धर्मांमध्ये हीच स्थिती असते. 

हे फार दुर्दैवी आहे; त्यामुळे धार्मिक सुसंवादासाठी शिक्षण हाच पाया आहे. शिक्षणाच्या आधारे परस्परांच्या तत्त्वज्ञानाप्रति आदरभाव निर्माण करणं शक्य आहे आणि आपल्यातील समान दुवा असणारे सकारात्मक गुण रूजवणंही शक्य आहे. हे सर्व प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेसारखे सार्वभौम गुण आहेत. त्यामुळे आपण हे दोन्ही धर्म प्रेमाच्या विकासाबद्दल काय म्हणतात, हे पाहण्यासाठी इस्लामपासून सुरुवात करत,या दोन्ही धर्मांचे तुलानात्मक निरीक्षण करू. 

इस्लामची मूलभूत तत्त्वे  

ईश्वराच्या अनुसरणाची प्रामाणिक अंगभूत प्रेरणा 

इस्लामनुसार ईश्वर, अर्थात निर्माता प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे. त्यानं स्त्रीपुरुषांना ईश्वराला समर्पित होण्याच्या किंवा ईश्वराच्या इच्छेनुसार वागण्याच्या प्रामाणिक प्रवृत्ती, कल किंवा नैसर्गिक प्रेरणेसह निर्माण केले आहे. आपल्या दृष्टिकोनातून कदाचित हे थोडं विचित्र वाटेल, पण आपण जैविक दृष्टिकोनातून पाहिल्यास, आपल्याला आपल्या आईने निर्माण केले आहे आणि त्यामुळे बाळात आईशी जोडलं जाण्याची नैसर्गिक प्रेरणा असते. आणि ते बाळ सस्तन असेल, तर ते निसर्गतः आईच्या स्तनांकडे ओढ घेईल आणि आवश्यक पोषणमूल्यं मिळवेल. आपल्या निर्मात्याच्या नजीक जाण्याची ही नैसर्गिक प्रेरणा आहे. 

त्यामुळे, इस्लाममध्ये आढळणारी ही प्रेरणा, थोडी अत्युच्च पातळीवरील असली तरी, आपल्या निर्मात्याबद्दलची ओढ आणि ईश्वरी इच्छेला शरण जाण्याची एखाद्या चुंबकासारखी प्रेरणा ही नैसर्गिक संदर्भातून पाहिल्यास तितकीही विचित्र नाही. आपण प्राणी जगताकडे पाहिल्यास, मूल आईचे अनुकरण करत असल्याचे आढळते. ही अंतःप्रेरणा असते आणि याबाबतच इथे चर्चा करण्यात आली आहे. 

शिवाय, ईश्वराने मानवाला स्वतंत्र इच्छा आणि बुद्धीसह निर्माण केले आहे. त्या बुद्धीच्या अंमलाखाली आणि स्वेच्छेने आत्मा ईश्वरी इच्छेचे पालन करू शकतो किंवा ईश्वरी इच्छेच्या अवज्ञेमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावनांना बळी पडू शकतो. ते फार आत्मकेंद्री ठरते. हे आपण लहान मुलांच्या विकासादरम्यानही अनुभवू शकतो. तिथेही स्वेच्छा आणि पालकांप्रतिची अवज्ञा असते. 

हे ईश्वराला निषिद्ध असलेल्या नकारात्मक वर्तनाच्या दिशेनं नेतं आणि परिणामी हृद्याभोवती काळे डाग जमा होतात व हृद्य काळवंडतं. त्यातून मुहम्मदाचा संदेश आणि एखाद्याचे हृद्य यामध्ये पडदा निर्माण होतो. एखाद्याचं हृद्य ईश्वरी सत्यासाठी बंद होतं, पण स्वेच्छा वर्तन आत्म्यानं ठरविलेलं असल्यानं आत्म्याला बुद्धीच्या स्वेच्छावर्तनावर काम करून हृद्यावरील डाग मिटवावे लागतात. एखादा बुद्धिमत्तेच्या मदतीनं ईश्वरी इच्छा नक्की काय आहे आणि काय नाही, याविषयीचा भेद करतो आणि ईश्वरी इच्छेला शरण जायचं की नाही, याबाबत त्याच्याकडे पर्याय असतो. 

या हृदय खुलं करण्याच्या प्रयत्नाला संघर्ष म्हटलं गेलं आहे. हाच “जिहाद.” शब्दाचा अर्थ आहे. इस्लाममध्ये अनेक पातळ्यांवर जिहाद शब्दाचा वापर वेगवेगळ्या स्वरूपात केला गेला असला तरी, त्याचा मुख्य अर्थ ईश्वरी इच्छेच्या अवज्ञेतून, नकारात्मक भावनांच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठीच्या अंतर्गत संघर्षाशी आणि लोभाचा प्रभाव आणि श्रद्धेचा अभाव टाळून नैतिक जीवन जगण्याशी संबंधित आहे.   

इस्लामची तीन परिमाणं                                                                                                                                       

ईश्वरी इच्छेचं पालन करणं म्हणजे काय? याचा अर्थ ईश्वराची प्रामाणिक आराधना. इस्लाममध्ये ज्याला तीन परिमाणं म्हटली जातात, त्यात याचा समावेश होतो. ही परिमाणं म्हणजे ईश्वरी इच्छेला, श्रद्धेला शरण जाणं आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इस्लाममध्ये ज्याला “श्रेष्ठता वा उत्कृष्टता.” म्हटलं जातं, ती संकल्पना.   

शरणागती

शरणागती म्हणजे अल्लाहशिवाय दुसरा ईश्वर नाही आणि मुहम्मद हा अल्लाहचा संदेशक वा प्रेषित आहे, या परिपूर्ण सत्याचा स्वीकार. याचा अर्थ अल्लाहचा कायदा शरिया माहीत असणं आणि त्याचं अनुसरण करण्याशीही संबंधित आहे. “शरिया” हा अरेबिक शब्द आहे, ज्याचा अर्थ जीवन जगण्याचा नैतिक मार्ग असा आहे. शरियात अधोरेखित केल्याप्रमाणे अल्लाहच्या इच्छेचं पालन करणं म्हणजेच नैतिक जीवन जगणं होय. यात दिवसातून पाच वेळा प्रार्थना करणं आवश्यक आहे आणि हा सामाजिक एकीकरणाचा अद्भुत शक्तिशाली स्रोत आहे. 

कडक शिस्तीच्या इस्लामिक समाजात, दिवसातून पाच वेळा सर्व काही थांबतं. थिच न्हाट हान्स प्लम गावामध्ये आमच्याकडे सचेतन करणारी बेल आहे, जी काही विशिष्ट वेळी वाजते आणि आम्ही जे काही करत असू, त्याबाबत सचेतन असण्याबाबत सुचित करते. हे अनेक पातळ्यांवर समजून घेतलं जाऊ शकतं, पण इथे फक्त एक छोटं अलिप्त गाव नाही, तर संपूर्ण समाज ईश्वरी इच्छेचं पालन करून नैतिक जीवन जगण्याची आठवण करून देण्यासाठी दिवसातून पाच वेळा थांबतो. 

इस्लामकडून काय शिकता येईल, हे जाणून घेण्यासाठी मी दलाई लामांच्या वतीने अफ्रिका आणि इस्लामिक जगतात थोडाफार प्रवास केला आहे. झांझिबारीमधली एक रंगतदार गोष्ट म्हणजे इस्लामच्या कडक शिस्तीचा वापर इथं अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी केला जातो. व्यसनी जीवनापेक्षा एखाद्याचा दिनक्रम फार व्यग्र आणि नैतिक अधिष्ठान असलेला कडक शिस्तीचा असेल, तर जीवनाला वळण देण्यासाठी हे फार उपयुक्त ठरते. एखादा व्यसनाधीन असेल, तर तो आयुष्याचं वळण हरवून बसतो. हे फार विचार करायला प्रवृत्त करणारं आहे, कारण तिबेटमध्येही ही समस्या पाहायला मिळते. जर व्यसनी लोकांना ज्यात प्रणाम आणि इतर गोष्टींचा समावेश असतो असे, तिबेटमध्ये ज्याला नगोन्द्रो म्हणतात, ते करावयास सांगितले, आणि एकदम शिस्तपूर्ण दिनक्रम दिला, तर ते उपयुक्त ठरू शकते. 

त्यामुळे अल्लाहच्या इच्छेचं पालन आणि नैतिक जीवनाचं अनुसरण म्हणजे:

  • दिवसातून पाच वेळा नमाज  
  • गरिबांसाठी कर भरणं, जे समाजाच्या भल्यासाठी जवळपास सर्व मुस्लिम करतात.
  • रमादान दरम्यान उपवास;हाही एक प्रकारचा जिहाद आहे, अन्न आणि पेयांबद्दलच्या आसक्तीतून बाहेर पडण्यासाठीचा अंतर्गत संघर्ष. या विशिष्ट काळात ही शिस्त पाळणं फक्त अन्न आणि मनोरंजनाच्या आसक्तीशी संबंधित नसून, ईश्वरी महिन्यात सचेतन जीवनाच्या दिशेने प्रवास करण्याशीही संबंधित आहे. 
  • यात यात्रेचाही समावेश आहे. इस्लाममधील धार्मिक स्थळांना भेट देऊन मुहम्मदाच्या जीवनातील काही घटनांची पुनर्उजळणी करणं. अर्थात, यामुळे त्यानं कुराणात सांगितलेल्या शिकवणींबाबत सचेतनता येते.  

श्रद्धा आणि श्रेष्ठता                                                                                                                                                      

दुसरं परिमाण असणारी श्रद्धा, म्हणजे इस्लामनं सांगितलेल्या मूलभूत सत्यांचा आणि अल्लाहचा शब्द असणाऱ्या कुराणाच्या अचूकपणाचा स्वीकार. 

तिसरं परिमाण आपल्या प्रेमासंबंधीच्या चर्चेशी फारच सयुक्तिक आहे. साधारणतः त्याचं भाषांतर “प्रेम,” असं केलं जातं आणि त्याचा अर्थ श्रेष्ठता असा आहे. चारित्र्य आणि ईश्वराची सेवा या दोन्हीमधील श्रेष्ठता. ईश्वराने सर्व मानवजातीला सर्वोत्तम चारित्र्य गुण आणि ईश्वरी सेवेच्या क्षमतेच्या श्रेष्ठतेसह निर्माण केलं आहे. ईश्वराला त्यानं मानवात निर्माण केलेल्या या श्रेष्ठतेबद्दल ओढ आणि प्रेम आहे. या श्रेष्ठ गुणांमध्ये प्रेम आणि इतरांची काळजी घेण्याच्या क्षमतेचा अंतर्भाव आहे. ईश्वरी सेवा म्हणजे ईश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींप्रति प्रेमभाव बाळगून व्यवहार करणं आणि असं वर्तन हे ईश्वराच्या आराधनेचंच एक स्वरूप आहे.  

हा प्रेमाबद्दलचा फार रंजक दृष्टिकोन आणि संकल्पना आहे. ईश्वराच्या निर्मितीवर प्रेम करणं, हा ईश्वराची सेवा करण्याचा मार्ग आहे आणि ईश्वराच्या निर्मितीची सेवा करणं ईश्वरानं आपणा सर्वात निर्माण केलेली श्रेष्ठता सिद्ध करण्याचा मार्ग आहे. प्रेमासाठी वापरण्यात येणाऱ्या एका अरबी शब्दाची अर्थछटा श्रेष्ठतेच्या जवळ पोहचण्याच्या भावनेशी संबंधित आहे, तर दुसऱ्या एका शब्दाची अर्थछटा इतरांसोबतच्या व्यवहारातील जवळिकतेच्या भावनेशी संबंधित आहे. कुराणावर आधारित शब्दांतूनच एखाद्याला फार काही शिकायला मिळू शकते. आपण प्रेमासाठी वापरात आलेल्या शब्दाकडे पाहतो, तर त्याची अर्थछटा अशी असतेः श्रेष्ठतेच्या जवळिकीची भावना आणि इतरांसोबतच्या व्यवहारात दर्शविलेली जवळिकतेची भावना. 

इतरांशी प्रेमानं वागणं हा स्वेच्छा व्यवहार आहे. असं वागण्याचा पर्याय निवडण्यासाठी लोक त्यांच्या बुद्धीचा वापर करू शकतात. ईश्वराशी जवळीक अनुसरण्यासाठी ते स्वतःच्या अंतर्गत प्रवृत्तीनुसार वागू शकतात. हे फार रंजक आहे. ईश्वराने आपल्याला निर्माण केले, आपल्या निर्मात्याच्या जवळ खेचण्यासाठी त्याच्या जवळ असे चुंबक आहे, आणि शिवाय इथे इतर प्रलोभनं व इतर गोष्टीही आहेत. त्या अंतर्गत प्रेरणेची पूर्ती करण्यासाठी ईश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग हा प्रेमातून आणि परस्पर सहकार्यातून व सेवाभावातून जातो. हे गरिबांसाठी कर भरण्याच्या संदर्भात असो किंवा मुस्लिम समाजातील इतर सामाजिक कार्याच्या माध्यमासंदर्भात असो. शिवाय, इथे सर्वात रंजक काय आहे तर, समग्र मानवजातीतील प्रत्येक सदस्य ईश्वराची निर्मिती आहे. इथे प्रत्येकाप्रतिचा समभाव आहे. प्रत्येकामध्ये ही प्रेरणा आणि अंतर्गत प्रवृत्तीने भरलेले हृदय आहे, जे प्रत्येक व्यक्तीला ईश्वराजवळ नेऊ शकते. 

शिक्षा देणारा न्यायाधीश ईश्वर आणि माफ करणारा करुणामयी ईश्वर

इस्मामधील ऩैतिकतेनुसार, ईश्वराचा सर्वांना समान न्याय असतो आणि शरियानुसार त्याच्या इच्छेचं पालन करणाऱ्यांवरच तो प्रेम करतो व अशाप्रकारे नैतिक जीवनाच्या दिशेने प्रेरित करतो. संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी तो त्याच्या इच्छेचा अनादर करून हानी पोहचवणाऱ्यांना शिक्षा करतो. त्यामुळे ईश्वराच्या सेवेसाठी आणि प्रेमाचं प्रतिक म्हणून मानवानं शरिया कायद्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. अशा रीतीने मुस्लिम समाजात कायदा आणि न्याय महत्त्वाची भूमिका बजावतात. 

आमच्या सर्व पाश्चिमात्त्य समाजातही यहुदी-ख्रिश्चन जगतातून आलेले जुने कायदेकानून आहेत. इथेही न्याय आणि मोबदला आहे;आम्ही कायद्याचं पालन केलं तर समाज आमच्यावर प्रेम करतो आणि आमची काळजी घेतो, पण आम्ही कायद्याचं पालन केलं नाही तर आम्हाला शिक्षा करतो. पाश्चात्य दृष्टिकोनातून ही सर्वस्वी अनोळखी परग्रहावरची संकल्पना नाही. 

जर एखादा या अंतर्गत संघर्षात गुंतला असेल, तर हा त्याच्या स्वकेंद्री वृत्तीविरोधातील जिहाद आहे आणि तो त्याला ईश्वरापासून व ईश्वराच्या प्रेमापासून दूर नेऊ शकतो, पण एखादा प्रामाणिकपणे पश्चाताप करत असेल, तर तो ईश्वराच्या क्षमेस पात्र होतो. ही इस्लाममधील फार मध्यवर्ती भूमिका आहे; ईश्वर करुणामयी आहे, जो कायम क्षमाशील असतो. ईश्वर पश्चाताप करू इच्छिणाऱ्या गैर कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या हृद्यात प्रवेश करतो आणि त्याला पश्चाताप करण्यास मदत करतो व नंतर त्याला क्षमा करतो.  

हे आपण बौद्ध धर्माच्या तुलनेतही पाहू शकतो; अनुतापाची भावना बाळगल्यास पश्चाताप होतो. आपल्या कृतीचा आपल्याला खेद होतो; आणि आपल्याला पश्चाताप होतो. एखाद्याने आपल्याला हानी पोहचवल्याने, आपण ज्यांना नुकसान पोहचवले असेल, अशा लोकांबद्दलचा आपल्या मनातील द्वेष आपण काढून टाकतो. नंतर आपण आपल्या गैरकृत्याची भरपाई म्हणून काहीतरी चांगले वर्तन करतो आणि आपल्याकडून पुन्हा गैरकृत्य घडणार नाही, असा संकल्प करतो. हे कुराणमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणेच आहे. 

शरिया आणि क्षमाशीलता 

शरिया कायद्यात क्षमाशीलतेचाही अंतर्भाव आहे. शरियाच्या या अलौकीक घटकाविषयी आपल्याला फारसं ऐकायला मिळत नाही. आपण फक्त निर्दयी शिक्षांविषयी ऐकतो, गुन्ह्यातील पीडित किंवा तिच्या कुटुंबाकडे पर्याय असतो. ते कायम कठोर शिक्षेची निवड करू शकतात किंवा भरपाई मिळवू शकतात. पूर्वी ती बकरी, उंट किंवा पैशाचा वा क्षमेच्या रूपात असायची. ते क्षमा करू शकतात. जर पीडित किंवा पीडिताच्या कुटुंबीयांनी गुन्हा करणाऱ्यास माफ केलं, तर त्यांना गुन्ह्यातून मुक्त केलं जातं. 

कायदेशीर संदर्भातला हा क्षमाशीलतेचा व्यवहारही ईश्वरी सेवेची सर्वोत्कृष्ट कृती आहे. शरिया कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातली ही रंजक बाब आहे. काही वेळा पाश्चात्य लोक गोंधळून जातात. इतका कडक कायदा असताना आणि क्षमाशीलतेच्या घटकाबाबत अनभिज्ञता असल्यानं, समाजाला त्याची का आवश्यकता असेल? आपण एक गोष्ट पाहायला हवी की, सोमालियासारख्या ठिकाणी जिथे समाज सरदार आणि अराजकांनी व्यापलेला आहे, तिथे लोकांना किमान एका सुव्यवस्थेची अपेक्षा असू शकते. त्यांच्या अशा संस्कृतीतून शरियाचा कायदा उदयाला येतो. त्यांच्याकडे तो असेल, तर त्यांना सुरक्षित वाटतं. त्यांना माहीत होतं की चोरी करणाऱ्याचे हात कापले जातील. तुरुंगवासापेक्षाही अशा शिक्षेमुळे चोरी करण्यापासून चोर परावृत्त होऊ शकतात. हे सुव्यवस्थेचं लोकांना आकर्षित करेल असं वचन आहे.  

अफ्रिकेत प्रवास करताना इथं इस्लामचा वेगाने प्रसार होत असल्याचं दिसू शकतं. आपण कदाचित विचारू, असं का? याचं कारण इथले लोक सांगतात की, इस्लाममध्ये समानतेची आणि बंधुत्वाची भावना आहे, जी सर्वांना समान वागणूक देते. ते जेव्हा पाश्चात्यांचा विचार करतात, ते वसाहतवादी शक्तींबाबत विचार करतात, ज्यात वसाहतवादी आणि अफ्रिकन्स यांच्यामध्ये बिलकूल समानता नव्हती. अफ्रिकन देशातील इस्लामच्या आकर्षणासंबंधीचा हा फार कळीचा मुद्दा आहे. 

जेव्हा लोक विश्वाबद्दल आणि मानवतेबद्दल प्रामाणिक प्रेम विकसित करतात, इस्लामनुसार ते प्रेम विश्वाबद्दल किंवा मानवतेबद्दल नसतं. इस्लामनुसार ते प्रेम ईश्वराबद्दल आणि ईश्वराने निर्माण केलेल्या श्रेष्ठतेबद्दल असतं. ही प्रेमामागील तात्विक विचारसारणी आहे. अशा रीतीने समानतेच्या तत्त्वावर प्रेम विकसित करणं, प्रेमाच्या व्यापक विकासाला अनुमती देतं. एक व्यक्ती एकाच व्यक्तीवर प्रेम करते, दुसऱ्या व्यक्तीवर करत नाही, असं नाही. जोपर्यंत लोक भल्या गोष्टींसाठी आणि श्रेष्ठतेसाठी आसुसलेले आहेत, तोपर्यंत त्यांचे प्रेम सर्वव्यापी असते. ईश्वराने प्रत्येकात हा सर्वोच्च गुण आणि चांगुलपणा निर्माण केला आहे. जर लोक क्रोध, लोभ किंवा क्रूरतेने वागत असतील, तर प्रथम त्यांना पश्चातापासाठी प्रेरित केले जाते आणि नैतिक जीवनाकडे परत आणले जाते. हा इस्लाममधील प्रेमाच्या संकल्पनेचा तात्विक आधार आहे. 

बौद्ध धर्मातील मूलभूत तत्त्वे 

जेव्हा आपण बौद्ध धर्माकडे पाहतो, बौद्ध धर्मात प्रेमविषयक फार भिन्न संकल्पना पाहायला मिळतात, पण दोन धर्मांमध्ये किती गोष्टी एकसारख्या आहेत, हे पाहणंही रंजक आहे. 

ईश्वर निर्मित नसलेले अनादी अंतर्गत बौद्ध स्वरूप                                                                                             

बौद्ध धर्मानुसार, सर्व जीवमात्र हे आरंभ नसलेले अनादी शुद्ध बुद्धतत्त्व असतात. ते त्यांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी पात्र करतं. इस्लामनुसार, शुद्ध अंतर्गत स्वरूप हे फक्त ईश्वरानजीक पोहचण्यासाठी किंवा काही सुफी धारणांनुसार ईश्वरात विलीन होण्यासाठी मान्यता देतं, पण प्रत्यक्ष ईश्वर होता येत नाही. पण बौद्ध धर्मात, हे शुद्ध अंतर्गत बौद्ध स्वरूप प्रत्येकाला बुद्धत्व प्राप्त करण्याची मान्यता देतं. ही एकाच घटकाबाबतची भिन्न तात्विक मतं आणि स्पष्टीकरणं आहेत. 

बौद्ध धर्मानुसार, आरंभ काळात कोणीही बुद्ध स्वरूपाची निर्मिती केलेली नाही. ते जसं आहे, तसंच ते नैसर्गिकतः आरंभहीन आहे. इस्लामनुसार, ते ईश्वराने निर्माण केलं आहे. इथे आपण भिन्न दृष्टिकोनातूनही पाहू शकतो, जर आपण विचारलं की ईश्वराला आरंभ आहे का, तर ईश्वर ही अनादी आहे. त्यामुळे अंतिम उत्तर म्हणून आपण आरंभहीन वा अनादी असल्याच्या मुद्द्यापाशीच येतो. पण बौद्ध धर्मानुसार, आपला कोणी निर्माता ईश्वर नाही. 

बौद्ध धर्मानुसार, लोकांमध्ये भल्याबुऱ्याचा भेद ओळखण्याची बुद्धिमत्त आणि अंतर्गत करुणेचे चांगले गुण असतात. बौद्ध आणि इस्लाममध्ये त्यात एकमत आहे आणि इतरांची काळजी घेणं, अस्तित्व टिकवण्याची प्रेरणा आणि इतर सजिवांबद्दलची काळजी या आपल्या अंतर्गत प्रेरणा आहेत, याला विज्ञानाचीही मान्यता आहे. यात कोणताही विरोधाभास नाही. आपल्या सर्वांकडेच भल्याबुऱ्याचा भेद करण्याची क्षमता असते. 

नैतिक शिस्त  

बौद्ध धर्मात, नैतिक शिस्त कोणती कृती वेदनादायी आहे आणि कोणती कृती आनंददायी या शहाणीवेवर आधारलेली आहे. ही बुद्धांची शिकवण आहे; त्यांनी इस्लामप्रमाणे हे नैतिकतेचे कायदे ईश्वराने निर्माण केले असल्याचं म्हटलं नाही. बौद्ध धर्मानुसार, भेदक्षम जाणिवेसह एखादा भल्याबुऱ्याचा भेद करून चिकित्सा करू शकतो. अशा रीतीने बौद्ध धर्मात बुद्धीचा वापर केला जातो, तर इस्लाममध्ये निराळ्या पद्धतीने ही संकल्पना मांडण्यात आली आहे. तिथे बुद्धीचा वापर हा सर्व जीवमात्रांवर प्रेम करण्यासाठी आणि नैतिक जीवन जगण्यासाठी ईश्वराच्या इच्छेचं पालन करायचं की नाही हे ठरवण्यासाठी बुद्धीचा वापर केला जातो.  

इस्लाममध्ये ईश्वराने नैतिक वर्तनाचे कायदे निर्माण केले आहे आणि तोच बक्षीस व शिक्षेच्या रूपात न्यायदान करतो. बौद्ध धर्मानुसार, विघातक वर्तनातून स्वाभाविकपणे वेदना मिळते, तर सकारात्मक विधायक वर्तनातून आनंद प्राप्ती होते. आपण अस्वस्थकारक भावना आणि अज्ञानाच्या प्रभावातून कृती केल्यास नैसर्गिक कार्यकारणभावातून वेदना निर्माण होईल; तर इस्लामनुसार, ईश्वर शिक्षा देतो. हा एकसारखाच परिणाम आहे, पण वेगवेगळ्या रीतीने स्पष्ट केला आहे. 

तसंच बौद्ध धर्मात, एखादा अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली वर्तन करण्यापासून स्वतःला रोखू शकला, तर ते विधायक समजलं जातं. जर एखाद्याने प्रेमाने आणि करुणाभावाने इतरांची मदत केली, तर त्यातून आनंद लाभेल. इस्लामिक दृष्टिकोनानुसार, चांगल्या वर्तनातून ईश्वराच्या आणि अंतर्गत शुद्ध स्वरूपानजीक पोहचता येतं, हा ईश्वराने दिलेला मोबदला असतो. हे सारखंच आहे, पण इथे कार्यकारणभाव कशा रीतीने काम करतो, हा प्रश्न आहे. हा समजण्यासाठी खरंच फारच कठीण मुद्दा आहे. बौद्ध धर्मात, आहे ते असं आहे, म्हटलं जातं आणि बुद्धांनी ज्या इतर गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आधारावर बुद्धांना माहितीचा वैध स्रोत मानलं जातं. इस्लाममध्ये ईश्वराने निर्माण केलं आहे आणि त्यामुळे ते अचूक आणि सत्य असल्याचं मानलं जातं.   

बौद्ध धर्मातील श्रद्धा आणि आश्रय वा शरणागती                                                                                              

बुद्ध हेच ज्ञानाचा वैध स्रोत असल्याची स्वतःला प्रचिती देण्यासाठी बौद्ध धर्मातील श्रद्धा ही कार्यकारणभावावर आधारलेली आहे. शेवटी, बुद्धांनीही त्यांच्या स्वतःच्या शिकवणींबाबत प्रश्न विचारून आणि चिकित्सा  करण्याविषयी सांगितलं आहे. तर इस्लामनुसार, एखाद्याला संपूर्ण समर्पण आणि श्रद्धा बाळगण्यास सांगितलं गेलं आहे. ते पूर्णतः भिन्न आहे. जेव्हा बुद्ध हेच ज्ञानाचा वैध स्रोत आहेत, याबाबत विश्वास वाढला की एखादा स्वतःच शरण जातो. शरणागती वा आश्रय म्हणजे अशी सुरक्षित दिशा, जी आपल्या जीवनात अंगिकारणं म्हणजे स्वतःला स्वतःच्या बुद्धस्वरूपाच्या नजीक आणणं होय. तेच आपल्याला हानीपासून आणि हरवलं जाण्यापासून संरक्षित करणार आहे. 

आपण इस्लामिक दृष्टिकोनातूनही हे समजावून सांगू शकतो, त्यासाठी आपल्या जीवनात तशी दिशा असायला हवी. शिवाय, इस्लामप्रमाणे बौद्ध धर्मात, आश्रय किंवा शरणागतीचा अर्थ बुद्धांची पूजा करण्याशी संबंधित नाही, तरीही अनेक लोक त्याकडे तशा दृष्टीने पाहण्याची शक्यता आहे. बुद्धांच्या शिकवणीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, ती अंधश्रद्धा नाही किंवा “बुद्धा, बुद्धा तू किती महान आहेस,” असं इस्लाममध्ये असलेलं समर्पणही नाही. 

आपण अधिक खोदून पाहिल्यास, हे अधिक रंजक होत जाते कारण ईश्वराला समर्पित होणं म्हणजे नक्की काय? याचा अर्थ आपल्याला सर्वज्ञान आहे आणि आपल्या भल्याचे काय आहे, याचा विचार करून आत्मकेंद्रीपणा आणि स्वेच्छेतून मुक्त होणं. बौद्ध धर्मात याबाबत काय सांगितलं गेलं आहे? तर हा आपण जगाचं केंद्रस्थान आहोत, आपण सर्वात महत्त्वाचे आहोत, अशा अहंभावातून स्वतःला मुक्त करण्याचा प्रवास आहे. 

हे पुन्हा आपल्याला काय करायची आवश्यकता आहे, त्याचंच वेगळे रूप आहे. ‘स्व’च्या या दृढ संकल्पनेसाठीच आपण शरणागत होणं गरजेचं आहे. बौद्ध धर्मात ‘स्व’ जाणीव नक्कीच आहे, पण ती इतकी दृढ आणि कायम योग्य असणारी, सतत प्रत्येकाचं लक्ष आकर्षित करणारी, अशा स्वरूपाची नाही. अशी वृत्ती आपल्याला आपल्या जीवनात अधिक संकटात टाकते. आपण याची जाणीव करून घेऊन तिचा त्याग करायला हवा. या पूर्णतः भिन्न तात्त्विक संकल्पना आहेत, पण त्यांचे परिणाम मात्र एकसमान आहेत. 

धर्माचा आश्रय आणि नैतिक शिस्तीचा आधार                                                                                            

“धर्म” म्हणजे बचावात्मक उपाययोजना, एखादी अशी गोष्ट जी वेदनेपासून दूर ठेवते. असं बुद्धांच्या शिकवणीतून सुचित करण्यात आलं आहे. शिकवण ही अशी गोष्ट आहे, जिचं स्वतःमधील अंतर्गत सत्याचा अविष्कार घडविण्यासाठी विश्लेषण केलं जातं. कुराण किंवा शरियासारखी ही एखादी निर्विवाद श्रद्धा नाही. धर्म हा काही ग्रंथ किंवा कायदा व्यवस्था नाही. चिनी भाषेत धर्माला कायद्याशी संबंधित शब्दप्रयोग केला जातो आणि ते चिनी परिप्रेक्ष्यातून व कन्फुशियन संस्कृतीच्या संदर्भातून बौद्ध धर्माकडे पाहतात, हे फार रंजक आहे.  

पाश्चात्य परंपरेतील यहुदी- ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात ज्या प्रमाणे कायद्याची भूमिका वठवली जाते, तशी भारतीय आणि तिबेटी बौद्ध परंपरेत कायद्याची कधीच कोणतीच मध्यवर्ती भूमिका नसते. ते वास्तविक असे कायदेही नसतात, ज्यांचं पालन किंवा अनुसरण केल्यानं आपण चांगली व्यक्ती ठरतो. आमच्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीत हे बायबलच्या पार्श्वभूमीवरच नव्हे, तर प्राचीन ग्रीक संस्कृतीतही पाहायला मिळते. जो कायद्याचं पालन करतो, तो चांगला नागरिक समजला जातो. एकतर कायदे ईश्वराने बनविलेले आहेत किंवा विधीमंडळाने बनविले आहेत, पण ते काही असलं तरी, नैतिक आचरणाची भूमिका मध्यवर्ती आहे आणि ती आज्ञाधारकतेवर आधारित आहे. 

उलट, बौद्ध धर्मात नैतिकता आज्ञाधारकतेवर अवलंबून नाही. ती पूर्णतः शुद्ध भेदक्षम जाणिवेवर आधारित आहे, ज्यात ही शहाणीव अंतर्भूत आहे की आपण विघातक वर्तन केले तर त्यातून समाजासाठी आणि स्वतःसाठीही अनेक समस्या निर्माण होणार आहेत. उदाहरणार्थ, कीटक मारणं: जेव्हा काहीतरी आपल्याभोवती भुणभुण करत असते, तेव्हा आपली सहज प्रवृत्ती ही त्याला चापट मारण्याची किंवा मारून टाकण्याची असते, याचे आपण विश्लेषण केल्यास, आपल्याला या सहज प्रवृत्तीचा पुनर्विचार करण्याची गरज असते. हे एखाद्या कुत्र्यासारखं असतं; आपण कुत्र्याला छेडलं, तर तो भुंकतो. आपण कुत्र्यासारखे आहोत का? आपल्याला न आवडणाऱ्या कोणत्याही गोष्टीबाबत आपली सहज प्रवृत्ती ही फेकून देणं, दुखापत करणं किंवा मारून टाकणं हीच असते, ना? तर मग, आपण पाहू शकतो की या विनाशकारी वर्तनामागे किंवा दुःख व समस्या निर्माण करण्यामागे एखादी शहाणीव असते. एखाद्या परक्या गोष्टीला हकलून देण्यानं आपल्याला निश्चितच लगेच मानसिक शांती लाभत नाही. 

आपण झोपायचा प्रयत्न करत असू आणि नेमकं तेव्हाच एखादा डास आपल्याभोवती भुणभुण करायला लागला, तर आपण किती अस्वस्थ होतो, या दृष्टिकोनाचा थोडा विचार करून पाहा; बहुतांशी लोकांना त्याला पकडावं किंवा मारावं वाटतं. तर अशा रीतीने आपण भेद करत असतो. ते काही डास मारणं कायदाविरोधी आहे म्हणून आपण करत नाही किंवा आपण तो डास मारला नाही, तर आपण चांगले नागरिक, चांगला मुस्लिम किंवा चांगला ख्रिश्चनही ठरत नाही. 

ही वेगळी संकल्पना आहे आणि हा नैतिकतेचा दृष्टिकोन आपल्याला आणखी वैचारिक खाद्य पुरवणारा आहे. आपल्या नैतिक वर्तनाचा आधार काय असतो? पुन्हा, एक वेगळं उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा मी बर्लिनमध्ये बौद्ध नैतिकतेबद्दल शिकवत होतो, मी माझ्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही चोरी का करत नाही. काहींनी उत्तर दिलं की नीच वर्गातील पुनर्जन्माच्या भीतीने, वगैरे. मी विचारलं की, खरंच हीच मूळ प्रेरणा आहे का. तर त्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. ते बाजूला ठेवून मी पुन्हा विचारलं की, “तुम्ही चोरी का करत नाही?”  शेवटी जे उत्तर समोर आलं ते होतं की चोरी करणं चांगलं वाटत नाही. हेच खरं कारण आहे. 

बौद्ध धर्म नेमकं हेच सांगतो. नैतिक वर्तनामागे अशा आत्मसन्मान आणि स्वत्वाच्या मूल्याची भावना असते की आपल्याकडे पुरेसा आत्मसन्मान आहे की आपण असे वागणार नाही. त्याचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या मूल्यांवर आणि सर्वच गोष्टींवर विपरित परिणाम होतो. बौद्ध धर्मात यालाच नैतिक वर्तनाचा आधार सांगितले गेले आहे. या आधारावर आणि आपल्या अद्भूत मानवी बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आपण भल्याबुऱ्याचा भेद करतो आणि त्यानुसार वागतो. आपण हानिकारक वर्तन करू इच्छित नाही कारण आपल्याकडे पुरेसा आत्मसन्मान असतो. बौद्ध धर्माने सादर केलेला हा अद्भूत मार्ग आहे. ही अवज्ञा नाही. अंतिमतः आपले वर्तन नैतिकच असेल, पण आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण बुद्धाला, धर्माला आणि नंतर संघाला शरण जातो.  

संघाला शरण जाणं: इस्लाममधील बंधुभाव आणि भगिनीभावाशी तुलना                          

संघ हा त्या आध्यात्मिक मार्गावर असलेल्यांचा समूह आहे आणि तो केवळ मठसमुदायाचं परंपरागत प्रतिनिधीत्व करत नाही, तर तो उच्च उन्नत जिवांचा समूह आहे. इस्लाममध्ये अशा स्वरूपाचं काही आहे का? कदाचित सर्व मुस्लिमांमधील बंधुभाव समुदायाचा आधारगट म्हणून काम करत असावा. बुद्धत्वाच्या मार्गावर प्रवास करणारे आणखीही आहेत, ही प्रेरणा देणं संघाचं प्रमुख काम आहे. बुद्धांचे सर्व गुण आत्मसात करणं कठीण आहे, पण तरीही त्यासाठी आसुसलेले अनेक लोक आहेत आणि त्यांनी त्यात प्रगती केली आहे आणि आपण एकटे नाही. अशी प्रेरणा समूह म्हणून आपल्याला आधार देणारी वाटते. 

इस्लाममध्ये सर्व मुस्लिमांमध्ये बंधुभाव आणि भगिनीभाव आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असा वा गरीब असा, धार्मिक यात्रेला जाताना सर्वजण एकसारखा वेष परिधान करतात. यात ते समानतेचे मूल्य आहे. 

बौद्ध धर्मात, जे आध्यात्मिक मार्गावर नाहीत त्यांच्याबद्दल कसलाही नैतिक न्यायनिवाडा नाही, हे फार रंजक आहे. त्यामुळे तिथं क्षमेचा किंवा त्यांचं धर्मांतरण करण्याचीही गरज उरत नाही. पण इस्लाममध्ये हे थोडं वेगळं आहे. 

अस्पष्ट बुद्ध स्वरूप: इस्लाम आणि सुफीजममधील हृद्यावरील बुरख्याच्या संकल्पनेतील साम्य                                      

बौद्ध धर्म सांगतो की आपण शुद्ध बुद्ध स्वरूप असलो तरी आपले मन वास्तवाच्या खऱ्या स्वरूपाविषयीच्या अज्ञानाने व्यापलेलं असतं. आपल्याकडे ही अस्पष्टता आहे, आणि बुद्ध स्वरूप अज्ञानाने व्यापलेलं आहे. हे थोडंसं इस्लाममधील मांडणी सारखंच आहे. यात अस्वस्थकारक भावनांविषयी सांगितलं गेलं आहे आणि ज्यांनी हृदय व्यापलेलं आहे आणि ते हृद्य व्यापणाऱ्या बुरख्याविषयी सांगतात. इस्लामची उपशाखा असणाऱ्या सुफीजममध्ये हा बुरखा फाडण्याविषयी सांगितलं गेलं आहे. या एकसारख्याच प्रतिमा आहेत. हे अज्ञान आत्मकेंद्रीपणा, अस्वस्थकारक नकारात्मक भावना आणि विध्वंसक वर्तनाच्या दिशेने घेऊन जातं. 

बौद्ध धर्मात प्रेम, करुणा आणि बोधिचित्त विकसित करून आणि वास्तवाची जाणीव करून घेऊन ही अस्पष्टता संपवणं किंवा आपल्या मूळ स्वरूपावरील पडदा दूर करणं शक्य आहे. बोधिचित्त म्हणजे असं मन जे स्वतःच्या ज्ञानप्राप्तीवर केंद्रित आहे, जी अद्याप झालेली नाही, पण बुद्ध स्वरूपाच्या आधारावर ती प्राप्त करणं शक्य आहे. हे तसे ईश्वरावर लक्ष केंद्रित करण्याहून फार निराळं नाही. ईश्वर आणि बुद्ध हे अर्थात निराळं असलं तरी, अंतर्गत शुद्ध स्वरूपावर लक्ष केंद्रित करण्याची ही कल्पना बौद्ध आणि मुस्लिमांनाही ज्या उद्दिष्टाच्या नजीक पोहचायचं आहे, त्यासाठीचा शक्तिशाली स्रोत म्हणून कार्य करते. 

इस्लामच्या तुलनेत बौद्ध धर्मातील प्रेम विकसित करण्याची संकल्पना                              

प्रेमाची व्याख्या                                                                                                                                      

बौद्ध धर्मानुसार प्रेम म्हणजे इतरांनी आनंदी व्हावं आणि त्यांच्याकडे आनंदी होण्यासाठीची कारणं उपलब्ध असावीत, अशी कामना होय. हे प्रेम प्रत्येकासाठी समानता आणि स्वतःसह प्रत्येकाला असलेला आनंदी होण्याचा अधिकार, या शहाणीवेवर आधारलेलं आहे. कुणालाच दुःख नको असते. आनंद प्राप्ती हेच जीवनाचे ध्येय आहे. आनंदाप्राप्तीसाठीच झाडे मोठी होतात आणि त्यांना सूर्यप्रकाश हवा असतो. जीवनातील आनंदप्राप्तीचं वर्णन करताना आपण कितीतरी काव्यात्म वर्णने करू शकतो. 

प्रेमाचा विकास                                                                                                                                     

बौद्ध धर्मात इतरांच्या आनंदाची कामना ही प्रत्येकाकडे बुद्ध स्वरूप असल्याने सर्व जिवमात्रांकडे आनंदी होण्याची क्षमता आहे, या जाणिवेवर आधारलेली आहे. आणि शिवाय आपल्या प्रत्येकाला आनंदी होण्याचा समान अधिकार आहे. इस्लाममध्येही याला साधर्म्य सांगणारी मांडणी आढळते. ती सुद्धा परस्परावरील अवलंबन आणि इतरांकडून मिळणारा मानसन्मान आणि प्रेम यावर आधारलेली आहे. इस्लाममध्ये इतरांकडून आपल्याला मिळणाऱ्या प्रेमावर भर नाही, तर ज्याने आपल्याला निर्माण केलं आहे, अशा ईश्वराकडून आपल्याला लाभणाऱ्या प्रेमावर भर आहे. हे प्रत्येकाच्या गुणांकडे वेगळ्या कोनातून पाहण्यासारखे आहे. 

बौद्ध धर्मात इतरांच्या आनंदाचा विचार करण्यातून प्रेम विकसित होतं. त्यांना ज्ञानप्राप्ती साध्य करण्यासाठी आपली मदत व्हावी, त्यासाठी आपण सक्षम असावं, यादृष्टीने आपण सतत प्रयत्न करत राहतो. इतरांवर प्रेम करणं किंवा त्यांची सेवा करणं ही बद्धाची आराधना नाही, पण इतरांवर प्रेम करणं आणि त्यांची सेवा करणं, ही इस्लामनुसार ईश्वराची आराधना आहे. तरीही, आपण इतरांची मदत करतो आणि परिणाम एकसारखाच असतो. 

इतरांवर प्रेम करण्यानं आपण स्वतः बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा विकसित करतो. त्याअर्थी आपण बुद्धत्व प्राप्त करण्याच्या नजीक पोहचतो, पण हे इस्लाममधल्याप्रमाणे नाही, ज्यात कदाचित ते स्वतः बुद्धाजवळ पोहचणं समजलं जाऊ शकतं. बुद्धत्वाचं उद्दिष्ट, स्वतः बुद्ध होणं आणि बुद्धांच्या जवळ पोहचणं यात फरक आहे. बौद्ध धर्मात बुद्धांवर त्यांच्या स्वतंत्र व्यक्तित्वाच्या अनुषंगाने लक्ष केंद्रित केलं जात नाही. बुद्ध हे गुरू म्हणून महत्त्वाचे आहेत, त्यांना निर्माता म्हणून पुजलं जात नाही. 

ईश्वराच्या तुलनेतील नैसर्गिक कार्यकारणभाव 

 इतरांवर प्रेम करण्यासाठी आपल्याला आधी आत्मस्तुतीतून बाहेर यावं लागेल. हे इस्लामप्रमाणेच आहे, आत्मकेंद्रीपणाविरूद्धचा आणि ईश्वराच्या अवज्ञेविरूद्धचा अंतर्गत जिहाद. तर बौद्ध धर्मात, आपल्या चुकीच्या वागण्याबद्दल किंवा अज्ञानी वागण्याबद्दल बुद्धांकडून क्षमायाचना करायची आवश्यकता नसते. आपण इतरांना विघातक वागताना किंवा नकारात्मक वर्तन करताना पाहतो, तर ते वाईट असतात म्हणून तसे वागत नसतात. त्याचं कारण ते अज्ञानाने गोंधळलेले असतात आणि ते काय करत आहेत व त्याचे परिणाम काय असू शकतात, याची त्यांना खरंच जाणीव नसते. आपण याचा करुणेसाठीचा आधार म्हणून वापर करतो. याचा अर्थ, आपण त्यांना क्षमा करत आहोत असा नाही, तर आपण त्यांना समजून घेत आहोत आणि तशा प्रकारे प्रेम व करुणा विकसित करत आहोत. 

त्यामुळे, विघातक वर्तनातून वेदना येते ती शिक्षेचा भाग नसते, तर नैसर्गिक कार्यकारणभाव असतो. आपण इतरांना शिक्षा करून ईश्वरी कायदा स्वतःच्या हाती घेत नाही. तिबेटमध्ये किंवा भारतात, निश्चितच बौद्ध समुहांमध्ये सुद्धा न्यायव्यवस्था होती; अर्थात, ती ईश्वराने निर्माण केलेल्या दैवी कायद्यावर आधारलेली नव्हती आणि आपण पृथ्वीवर ईश्वराने निर्माण केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करतो आहोत, असंही ते नाही. ते पूर्णतः भिन्न आहे. 

पश्चातापासंदर्भातील बौद्ध आणि इस्लाममधील समांतर धाटणी                                                                            

बौद्ध धर्मातही इस्लामप्रमाणेच पश्चातापाची संकल्पना आहे. आणि त्या दोन्हीमधील समांतरता पाहणंही रंजक आहे:  

  • दोन्हीमध्येही, आपण चुकांची जाणीव ठेवणं आवश्यक आहे, बौद्ध धर्मानुसार अज्ञानातून घडलेल्या चुका, इस्लामप्रमाणे अवज्ञेतून घडलेल्या नाही. 
  • इस्लामप्रमाणेच आपणही पश्चाताप करतो. 
  • आपण इस्लामप्रमाणेच चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, अशा रीतीने त्यांचं निराकरण करतो. 
  • जीवनात आपण जात असलेल्या सकारात्मक दिशांची पुष्टी करतो. हे ईश्वराकडून क्षमा मागण्यासारखे नाही, पण यात सकारात्मक गोष्टीची पुष्टी आहे. ईश्वराची क्षमा मागूनही, आपण पुन्हा त्या सकारात्मक मार्गावर परत येतो. 
  • शेवटी, आपण सद्वर्तनातून चुकांची भरपाई करतो. इस्लाममध्येही तसेच आहे. 

स्पष्टच आहे की, इस्लामप्रमाणे बौद्ध धर्मात अनेक गोष्टी समांतर आहेत आणि अनेक गोष्टी भिन्नही आहेत. शेवटी, दोन्ही धर्म प्रेम, करुणा, संयम, क्षमाशीलता याच गोष्टींची शिकवण देतात. जेव्हा आपण जगातल्या या दोन महान धर्मांमधील या समानता ओळखतो आणि त्यांचा सन्मान करतो, तेव्हा धर्मांमधील संवाद, धार्मिक सलोखा आणि परस्परांच्या शिकवणींची देवाणघेवाण यासाठीचा आधार तयार होईल. 

प्रश्नोत्तरे 

परस्परांकडून शिकणं 

माझ्या आठवणीनुसार, दलाई लामा इतर धर्मांसोबतच्या सुसंवादाविषयी बोलतेवेळी, प्रत्येक वेळी सुचवतात की आम्ही इतर धर्मांचे धर्मांतरण सुचवत नाही, तर त्यांच्याच धर्मांवरील श्रद्धेसाठी प्रेरणा देतो. शहाणीव वापरून त्यांच्या श्रद्धेकडे वेगळ्या मार्गाने पाहणं चांगलं आहे. या संवादाकडे तुम्ही कसं पाहता?

मी सांगितल्याप्रमाणे, दलाई लामांनी असंही सांगितलं आहे की, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या एकमेकांच्या धर्मांकडून शिकण्यायोग्य आहेत. उदाहरणार्थ, बौद्ध धर्म प्रेम आणि करुणाभाव विकसित करण्याच्या पद्धतींनी समृद्ध आहे. उदाहरणार्थ यातल्या चिंतन पद्धती, ते बौद्ध धर्मातून अनेक गोष्टी शिकू शकतात. आम्ही पाहिलं आहे की विशेषतः ख्रिश्चन मठांमधील लोक, ध्यानधारणा शिकण्यासाठी येतात, जेणेकरून त्याचा वापर ते त्यांच्या धार्मिक साधनेदरम्यान करू शकतील. 

दलाई लामा नेहमी सांगतात की विशेषतः तिबेटी बौद्धांनी ख्रिश्चन चर्चकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक सेवा शिकायला हव्या. हे विविध भौगोलिक कारणांमुळे तिबेटी मठांमध्ये विकसित होऊ शकलं नाही, जसं अनाथालयं, वृद्धाश्रमं, इस्पितळं उभारणं आणि इतर सामाजिक सेवा. आम्हाला वाटतं या गोष्टी आम्ही नक्कीच मदर तेरेसा यांच्याकडून शिकायला हव्या. 

ही अशी परस्पर देवाणघेवाण आहे. मी सांगितलंच आहे की मी झांझिबारीमध्ये अनुभव घेतला होता, ज्यात इस्लाम अमली पदार्थांचं व्यसन लागलेल्यांना बरं करण्यासाठी आध्यात्मिक साधनेचा वापर करत होतं. हे फार उपयुक्त आहे. अशा रीतीने धर्मांमध्ये धर्मांतरणाचा प्रयत्न न करता फार उपयुक्त देवाणघेवाण शक्य आहे. 

दलाई लामांना खरोखर ज्या गोष्टीमध्ये विशेष रस आहे, ती म्हणजे प्रत्येक धर्मातील गंभीर विचारवंतांबरोबर खाजगी बैठका घेऊन त्यांच्या अनुभवांच्या नोंदींची तुलना करणं. तसं घडलं तर ते फारच छान होईल. 

वैश्विक मूल्ये   

तुमच्या या इस्लामसोबतच्या विस्तृत तुलनेनंतर तुम्ही असे म्हणत असल्यासारखे वाटते की आपण स्वतःविषयी फार संतुष्ट राहता कामा नये आणि बौद्ध धर्मच सर्वात चांगला आहे, असं समजू नये. त्याअर्थी हे फारच सकारात्मक आहे कारण कोणतीही श्रद्धा ही आत्मनिर्भरतेकडे झुकलेली असते. त्यामुळे इस्लामसाठी दरवाजे खुले करणं हे इतरांसाठीही दरवाजे खुले करण्यासारखं आहे.

हो. मला हे अगदीच मान्य आहे. दलाई लामा म्हणतात, प्रत्येकासाठी योग्य असा धर्म नाही, जसं प्रत्येकासाठी योग्य ठरेल असं अन्न नाही. पण स्वतःसाठी काय योग्य ठरेल, योग्य मार्ग कोणता असेल, हे एखादा ठरवू शकतो. आपण दुसऱ्यांवर काही लादू शकत नाही. ही मूलभूत वैश्विक मूल्ये सर्व धर्मांमध्ये आढळतात आणि कोणी धर्माचे पालन करो न करो, ती सर्वांसाठी वैध आहेत. हेच सर्वात महत्त्वाचं आहे. परमपूज्यांना ज्याबद्दल काळजी वाटते, ती गोष्ट म्हणजे प्रेम, करुणा, संयम, क्षमाशीलता ही वैश्विक मूल्ये कशी चेतवता येतील, हा संवाद कसा पुढे नेता येईल आणि हे शैक्षणिक व्यवस्थेत कसं अंतर्भूत करता येईल. ही मूल्ये जगात रूजवण्याचा मार्ग म्हणजे ही मूल्ये तरूण मुलांना शाळेत असतानाच शिकवण्यास सुरुवात करणं. उदाहरणार्थ, ते इतकं सोपं असू शकत की, जर आपल्याला राग आला किंवा आपण त्रासलो, तर दहा पर्यंत आकडे मोजणं, श्वसनावर लक्ष केंद्रित करणं आणि भांडणापेक्षा चर्चेवर भर देणं. 

भारत आणि अमेरिकेतील काही शैक्षणिक तज्ज्ञ अशा प्रकारचा अभ्यासक्रम विकसित करत आहेत. आणि ज्याला दलाई लामा सर्व धर्मांप्रती आदर बाळगणारा धर्मनिरपेक्ष मार्ग म्हणतात, अशा मार्गाने तो शैक्षणिक व्यवस्थेत आणला जात आहे. 

इस्लाममध्ये ज्ञानप्राप्तीची संकल्पना आहे का?

जेव्हा तुम्ही इस्लाममधील ईश्वराला समर्पित होण्याच्या व्यवस्थेविषयी किंवा जाणिवेविषयी बोलता, इस्लाममध्ये ज्ञानप्राप्तीसारखी संकल्पना आहे का, आणि असेल तर ती कशी समजली जाते?

ईश्वराच्या नजीक जाण्याचा मुद्दा इस्लाममध्ये सर्वसाधारणपणे आढळतो, तर ईश्वरासोबत एकजीव होणं ही केवळ इस्लामचा उपगट असणाऱ्या सुफीजमची धारणा आहे. ज्ञानप्राप्तीची व्याख्या काय आहे, यावर ती अवलंबून आहे. जर आपण ती विशेषकरून बौद्धमार्गाने पाहिली, तर इतरही ती प्राप्त करण्याचं उद्दिष्ट बाळगतात, असं आपण म्हणू शकत नाही. माझ्या एका गुरूंनी हे फार समर्पकपणे मांडलं आहे: जर आपण ख्रिश्चन स्वर्गात जाण्यासाठी प्रार्थना करत असू, तर आपण बौद्ध स्वर्गात जाणार नाही आणि जर आपण बौद्ध स्वर्गासाठी प्रार्थना करत असू तर आपण ख्रिश्चन स्वर्गात जाणार नाही. 

प्रत्येक धर्मात एखादं उद्दिष्ट असतं, जो एखादा साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असतो, मग ते चांगली व्यक्ती बनणं असो, जी सर्वात नैतिक आहे, सर्वात प्रेमळ आहे किंवा आणखी काही, पण आपण असं म्हणू शकत नाही की तो मार्ग अनुसरल्यानं आपण इतर धर्मात सांगितली गेलेली उद्दिष्टं साध्य करू शकू. 

त्यांच्या स्वर्गाच्या संकल्पनेतच ज्ञानप्राप्तीचं अस्तित्व आहे, असं आपण म्हणू शकतो का?

जिवंत असताना, अर्थातच सर्वात चांगली व्यक्ती बनणं आहे आणि नंतर एक बारदो काळासारखा मधला टप्पा आहे, ज्यात पुढे काय घडणार ही भावना आहे, ज्यानंतर अंतिम निवाडा होणार आहे आणि हो, तिथंच स्वर्ग आहे. इस्लाममधील हे सर्वोच्च उद्दिष्ट आहे. 

आपण बौद्ध कालचक्र साहित्य पाहिल्यास, त्यात इस्लामचा उल्लेख आढळेल, जणू त्यांच्यात आधीपासूनच संवाद होता. काळाविषयी कालचक्र साहित्यात केवळ दोनच गोष्टींचा उल्लेख आहे, हे थोडं विचित्र वाटतं. त्यातली एक म्हणजे स्वर्ग आणि नरक चिरंतन आहेत, आणि त्यात नश्वरतेची संकल्पनाच नाही. बौद्ध दृष्टिकोनातून स्वर्गातील पुनर्जन्म दीर्घकालीन असतो, पण नंतर तो संपतो आणि पुन्हा नव्या पुनर्जन्मातील जीवन सुरू होते.  मांसासाठी केलेली जनावरांची कत्तल ईश्वराला समर्पित हलाल असल्याची मुस्लिम धारणा आहे, हा प्रकारही आश्चर्यकारक असल्याचा दुसरा उल्लेख कालचक्रात आढळतो. कारण जनावरांची कत्तल करताना ते “बिस्मिल्लाह, अल्लाहच्या नावाने,” म्हणतात, बौद्ध धारणेनुसार हे अल्लाहसाठी रक्ताचं दान असतं आणि ते योग्य नाही. हा अर्थातच इस्लाममधील आहाराच्या नियमांबाबतचा गैरसमज आहे. याशिवाय आणखी कोणत्या गोष्टीला आक्षेप घेण्यात आलेला नाही. यात निर्मात्याविषयीचा उल्लेख नाही. त्यातच खरंतर अनेक गोष्टी सामावल्या आहेत.  

प्रत्येक जण ज्ञानप्राप्ती करू शकतो का?

इथे अनेक ग्रंथ आहेत, ज्यात निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यात एक सूत्र असंही आहे, ज्यात म्हटलं आहे की असेही लोक असतात, ज्यांच्यात बुद्ध-स्वरूप नसतं. अनेक गोष्टी अशा असतात, ज्यात बदल होत असतो, पण मूळातच बुद्ध-स्वरूप नसल्यास ते बदलू शकत नाहीत. असा एक काळ होता, जेव्हा आपल्याकडे अशा विरोधाभासी संकल्पना होत्या. 

मी ज्या पद्धतीने त्याची स्पष्टीकरणं ऐकली आहेत, त्यानुसार त्यांच्यात बुद्ध-स्वरूप नसतं, असं काही नाही. सर्वात आधी, आपल्याला बुद्ध-स्वरूप म्हणजे काय, ते समजून घ्यावं लागेल. हे असे घटक आहेत, जे एखाद्याला बुद्ध बनण्यासाठी पात्र करतात आणि जे त्याला बुद्धांच्या विविध गुणांमध्ये परिवर्तित करतात. हे सकारात्मक उर्जेचं जाळं आहे, ज्याचं भाषांतर “गुणसंग्रह,” असं केलं जातं आणि ते सखोल जाणिवेचंही जाळं आहे, ज्याला “शहाणीव संग्रह.” संबोधलं जातं. करुणेवर आधारित आणि शहाणिवेच्या मदतीने मन ज्या रीतीने कार्य करतं, तशा सकारात्मक मार्गाने कार्य करण्याची सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाकडे असते. 

या सकारात्मक ऊर्जेच्या विरूद्ध नकारात्मक कृतीतून येणारी ऊर्जा ज्याला “नकारात्मक क्षमतांचे जाळे” म्हटलं जातं, अशी नकारात्मक ऊर्जाही असते. आपण नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवू शकतो, पण प्रश्न हा आहे की आपण सकारात्मक ऊर्जेपासूनही दूर जाऊ शकतो की नाही, ज्यामुळे आपल्याला बुद्धत्व मिळविणं अशक्य होईल. हा खरा प्रश्न आहे. आपण बऱ्याच सकारात्मक संभाव्यता गमावू शकतो की नाही, हा चर्चेचा विषय आहे, पण ती संभाव्यता कायमच तिथं असते. ही संपूर्ण चर्चा याविषयीच असते. 

चर्चेचा आणखी एक मुद्दा आहे, जर आपण अर्हत म्हणून ज्ञानप्राप्ती करू शकलो, तर तोच शेवट असेल की आपण पुढे जाऊन बुद्धत्व प्राप्त करू शकतो? जेव्हा ते म्हणतात की एखादा बुद्ध होऊ शकत नाही, तेव्हा त्यानं अर्हत होण्यालाच अंतिम मानलेलं असतं. 

त्याचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी अधिक संदर्भ आणि स्पष्टीकरणांकडे पाहायची गरज आहे. कुणी असंही म्हणू शकतं की, एखाद्या व्यक्तीची सतत मुक्ती मिळून आणि तरीही बुद्ध न होता आल्यानं निंदा केली जाऊ शकते, जसे ते स्वर्गातले गरीब अर्हत आहेत आणि त्यांच्याविषयी दया वाटावी, हे फारच कंटाळवाणं आहे. पण बुद्ध फार स्पष्टपणे पाहू शकतात की लोकांमध्ये वैविध्य असतं. आपण जेव्हा बुद्धांच्या जीवनाकडे पाहतो, ते इतर साधूंसोबत लोकांच्या घरी जात असत. त्यांना भोजनाची आमंत्रणे येत असत, त्यांना उत्तम भोजन दिलं जात असे आणि भोजनानंतर बुद्धांना शिकवणीसाठी आग्रह करण्यात येई. तेव्हा बुद्ध शिकवण देत असत, पण त्यांना आमंत्रित करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना समजेल अशी शिकवण देत असत. 

अशा रीतीने जर आपण सुत्रांच्या नावांकडे पाहिलं, अनेक सुत्रांना व्यक्तींची नावे आहेत, ज्या व्यक्तींना ते सूत्र शिकवलं गेलं आणि त्यांच्या नावावरून त्या सुत्राचं नामकरण झालं. प्रत्येक जण एकसमान पार्श्वभूमी किंवा शहाणिवेसह एकाच पातळीवर नव्हतं. त्यामुळेच इथे अनेक स्पष्टीकरणं आहेत. हे खरं शहाणपणाचं आहे.  

फार लोकांनी इस्लाममधून बौद्ध धर्मात धर्मांतरण केलेलं नाही

यहुदी किंवा ख्रिश्चन समुदायातील अनेक लोक बौद्ध धर्माकडे वळलेले दिसतात, पण इस्लाममधून दिसत नाहीत. यावर तुमचे विचार काय आहेत?

सर्वप्रथम इस्लामिक समुहानुसार एखाद्यानं इस्लामचा त्याग करणं फार वाईट शक्यता मानली जाते. काही समुहांमध्ये यासाठी कठोर शिक्षाही आहेत. दलाई लामांनी योग्य माहितीचं महत्त्व आणि धर्मांतर्गत सुसंवादाचा संदेश पोहचवण्यावर भर दिला आहे. मी मुख्यतः बौद्ध-मुस्लिम सुसंवादावर लक्ष केंद्रित केलं आहे आणि इस्लामिक जगतातील विविध भागात व्याख्यानं दिली आहेत. एकदा कैरो, इजिप्त येथे माझं व्याख्यान होतं, तिथे बौद्ध धर्मावरील व्याख्यानाला तीनशे विद्यार्थी स्वेच्छेनं आले होते. ते म्हणाले ते माहितीचे भुकेले आहेत आणि त्यांना शिकवण आत्मसात करायची आहे. 

काही मूलभूत बौद्ध शिकवणी इस्लामिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी परमपूज्यांनी मला फार प्रोत्साहित केलं आहे. आम्ही आत्तापर्यंत सहा इस्लामिक भाषांमध्ये ते आणलं आहे आणि लोक ते वाचत आहेत. आम्ही कोणता लेख अधिक लोकप्रिय आहे, हे पाहण्यासाठी आमच्या संकेतस्थळावरील विविध भाषा तपासत असतो.  उदाहरणार्थ अरबीमध्ये, “क्रोधाशी सामना कसा करावा.” हा लेख लोकप्रिय आहे. ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्याचा लाभ घेण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारायची गरज नाही. बौद्ध धर्मात क्रोध निवारणासाठी, भय संपवण्यासाठी आणि अशा अनेक गोष्टींसाठी अनेक परिणामकारक पद्धती आहेत. इराण आणि पर्शियामध्ये ध्यानधारणा कशी करावी यासंदर्भातील लेख प्रसिद्ध आहेत. इंडोनेशिया, जिथे मोठ्या प्रमाणात चिनी बौद्ध आणि मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे, तिथं दोन धर्मांमध्ये सुसंवाद स्थापित करण्याविषयीच्या लेखांमध्ये लोकांना अधिक रस आहे. 

स्पष्टपणे, इथे यातच रस आहे. शिवाय आम्हाला असंही आढळून आलं आहे की, पाकिस्तानात अनेक तरूण मुलं आहेत, जी हिंसा आणि दहशतवादाला खरंच वैतागलेली आहेत आणि आता ते फार झालं आहे, असा विचार करत आहेत. ते ज्यातून मानसिक शांती लाभेल, अशा गोष्टीच्या शोधात आहेत. जोपर्यंत आम्ही धर्मांतराचा उद्देश न बाळगता बौद्ध पद्धती सादर करतो, ते स्वीकारार्ह आहे. एखाद्याला इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माचा त्याग करायची गरज नाही, पण जगाला देण्यासाठी बौद्ध धर्माकडे भरपूर आहे आणि त्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. दलाई लामा जेव्हा सर्वांसाठी उपयुक्त असणाऱ्या वैश्विक मूल्यांचा प्रसार करतात, तेव्हा ते याच उद्देशानं करत असतात. 

जोपर्यंत आपण बौद्ध धर्माला केवळ या वैश्विक मूल्यांपुरतं मर्यादित दृष्टीनं पाहत नाही, जे बौद्ध धर्मासाठी अन्यायकारक ठरेल, तोपर्यंत ते ठीक आहे. बौद्ध धर्मातील ज्ञान, तिबेटी ज्ञान हा जागतिक वारसा आहे, त्यामुळे तो शक्य तितका शाश्वत आणि उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. माझ्यासह अनेक लोक या कार्यात गुंतले आहेत. 

शून्यत्व आणि पारंपरिक स्व  

या शिकवणीबद्दल धन्यवाद. मी आणि माझे सहकारी ही शिकवण ऐकण्यासाठी आठ तासांचा प्रवास करून आलो आहोत. तुम्ही सांगितलंत की एक ‘स्व’ असतो आणि सामान्यतः आपण मूळ अस्तित्वाच्या शून्यत्वाविषयी आणि ओळख शून्य ‘स्व’विषयी ऐकत असतो. तुम्ही यातील फरक स्पष्ट करू शकाल का?

बौद्ध दृष्टिकोनानुसार, एक स्व असतो. तो स्व नाही असं सांगत नाही, पण हा स्व शरीर, मन आणि भावनांवर अवलंबून असतो. या सर्व गोष्टींमध्ये सदासर्वकाळ परिवर्तन होत असतो. आपण असं म्हणू शकत नाही की स्व म्हणजे फक्त शरीर, फक्त भावना, फक्त बुद्धी किंवा आणखी काही. पण त्या आधारावर आपण हा “मी.” आहे असं म्हणू शकतो. आणि या सर्व भिन्न गोष्टी, ज्यावर स्व आधारलेला आहे, त्या सतत बदलत असतात. आपली मनोवस्था बदलत असते, आपलं शरीर सतत वाढत राहतं. आपण आपल्या शरीराकडे पाहिलं, तर शरीरातली प्रत्येक पेशी वेगळी आहे. प्रत्येक गोष्ट बदलते;अगदी आपण बाळ असल्यापासूनची एकही पेशी अशी नाही, जी बदलत नाही. स्व नक्कीच असतो, पण तो क्षण दर क्षण शरीर आणि मनानुसार बदलत असतो. पण असा स्व अस्तित्वात नाही, जो शरीर, मन किंवा भावनांपासून स्वतंत्र असेल. आणि जो शरीर आणि मनानुसार क्षण दर क्षण बदलत नाही. 

याचा अर्थ शाश्वतता अस्तित्वातच नाही का?

इथे आरंभही नाही आणि अंतही नाही, त्याअर्थी प्रत्येक व्यक्तिगत स्व हा अनंगत आहे. पण तो बदलत नाही, असं नाही. तिबेटमधील “रताग-पा” शब्द ज्याचे भाषांतर “स्थायी,” असं केलं जातं, तो द्विअर्थी वापरला जातो, ही खरी समस्या आहे. एक अर्थ कायमस्वरूपी असा आहे, आणि त्याला बौद्ध धर्मात मान्यता आहे. बुद्ध असण्यालाही आरंभ आणि अंत नाही. दुसऱ्या अर्थी ते कधीही बदलत नाही, पण स्व सुद्धा क्षण दर क्षण बदलत असतो. जरी मूल म्हणून असलेले तुम्ही आणि प्रौढ म्हणून असलेले तुम्ही तेच असला तरी आपण असं म्हणू शकत नाही की प्रौढ व्यक्ती आणि मूल यांची ओळख एकसारखीच आहे. तुम्ही बदललेले असता. त्या अर्थी स्व क्षणोक्षणी बदललेला असतो, पण तो अनंत काळासाठी असतो, त्यामुळं तो अनंत असतो. हा गोंधळ संस्कृत शब्दावरून घेतलेला तिबेटी शब्द द्विअर्थी वापरल्याने होतो.  

सुफीजमवरील हिंदू किंवा बौद्ध प्रभाव                                                                                                        

तुम्ही सुफीजमचा उल्लेख केला. मी कल्पना करू शकतो की बौद्ध धर्माला अनेक समांतर धारणा आहेत. त्यात मुख्यप्रवाहातील इस्लामशी त्यांचे तणावकारक संबंध असले, तरी ते इस्लामला जवळचे आहेत. काही लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. तुम्हाला यात काही ऐतिहासिक संबंध दिसतो का कारण माझ्याकडे मुख्य आशियातील उत्तरपूर्व पर्शियातील सुफीमास्टर्स आहेत. त्या परिसरात इस्लामचा प्रसार झाला, तेव्हा तिथं इस्लाम फारच कडवा होता. तुम्हाला तुमच्या संशोधनात काही ऐतिहासिक संबंध आढळले आहेत का? 

अफगाण, पाकिस्तान, भारत, काश्मीर परिसरात सुफीजमवर हिंदू धर्माचा स्पष्टपणे किंचित प्रभाव आहे. योगा आणि इतर अशाच गोष्टींच्या संदर्भात हा प्रभाव होता. या सुफीजममध्ये नामस्मरण आणि काही संज्ञा व नामांचे पुनर्उच्चार आहेत, जे हिंदू धर्मात आढळणाऱ्या मंत्रपठणासारखे आहेत. सुफीजमवरील प्रभाव नक्की हिंदू धर्माचा आहे की बौद्ध धर्माचा आहे, हा खरा मुद्दा आहे? पुरावे थोडे हिंदू धर्माकडे अधिक झुकणारे आहेत. अर्थात काही गोष्टी अशा आहेत, ज्या बौद्ध धर्माची आठवण करून देतात, हे सुफी स्वामींच्या मंदिराच्या बाबतीत अधिक आहे. काही लोकांना वाटतं की ते स्तुपासारखं आहे. तर ध्यानधारणेच्या पद्धती हिंदुधर्मातल्यासारख्या आहेत. 

सुफीजममध्ये अनेक रंजक गोष्टी आहेत. जेव्हा आपण प्रेमाविषयी बोलतो, ते प्रेमासाठी आणखी एक खास शब्द वापरतात, ज्याचा संदर्भ कुराणात सापडत नाही, त्याची अर्थछटा “सौंदर्य.” संकल्पनेच्या जवळची आहे. हे सौंदर्यविषयक प्रेम संगीतातून व्यक्त केलं जातं. सुफीजममध्ये याची फार मोलाची भूमिका आहे आणि हे बौद्ध धर्मात आढळत नाही. बौद्ध धर्मात मंत्रपठण आहे, पण ते काही बुद्धानजीक पोहचण्याचं साधन नाही. 

सुफीजममधील समांतर असणारे निराळे घटक पडताळून पाहण्याची गरज आहे. त्यात धारधारणा आणि मंत्रपठण आहे, गुरूसह समुहात राहणंही आहे, पण हे सर्व हिंदू धर्मातही आहे. असं म्हणणं थोडं अवघड आहे, पण मध्य आशिया हा बौद्ध, हिंदू आणि इस्लाम या तीन संस्कृतीचा परस्परसंवाद असणारं क्षेत्र आहे.  

मृत्यू प्रक्रियेची तुलना                                                                                                                                     

एखाद्याने मृत्युची तयारी कशी करावी, याबाबत कुराणमध्ये काय सांगितलं आहे, यावर तुम्ही काही सांगू शकता का? अशावेळी प्रकाशाची अनुभूती घेता येते का?

मला या गोष्टी परिचित नाहीत आणि मी कुराणमधील तज्ज्ञही नाही. मी कल्पना करू शकतो की हे केवळ ईश्वराचं स्मरण आहे. मृत्युप्रक्रियेविषयी कुराणात असलेलं स्पष्टीकरण मला माहीत नाही, जसं आपल्याकडील बौद्ध धर्मातील तंत्र शिकवणीत सांगितलं आहे. मी असं काही पाहिलेलं नाही, याचा अर्थ ते नाही असंही नाही. फक्त ते मी पाहिलेलं नाही, इतकाच त्याचा अर्थ आहे. 

मी विचारण्याचं कारण म्हणजे मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत दुबईत राहत होतो, आणि ते इस्लामिक संस्कृतीच्या फारच जवळंच आहे. पण वडिलांविषयी समर्पणाची भावना आणि नवऱ्याला पूर्णपणे शरण जाणं, या गोष्टी सोडल्यास मी यात महिलांविषयी काहीच पाहिलं नाही. तेव्हापासून किंवा अगदी आताही असे अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही आहेत, जे आजही तसेच समर्पित आहेत. पण जिथं मृत्युचा मुद्दा येतो, त्याबाबत मार्गदर्शन दिसत नाही. हे असं आहे जणू जीवनात जितकं चांगलं होता येतं तितकं व्हा आणि तुम्ही स्वर्गात जाल. पण तिथं पोहचणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे, त्यासाठी एखाद्यानं स्वतःला मरणासाठी कसं तयार करावं. मी ख्रिश्चन कुटुंबात वाढलो आहे, पण मृत्युसाठी स्वतःला तयार करण्यासंदर्भात जे बौद्ध तत्त्वज्ञानात सांगितलं गेलं आहे, त्याला समांतर असं ख्रिश्चन धर्मात काहीच नाही. 

बुद्ध सांगतात की मृत्युच्या तयारीसंदर्भातील सर्वोत्तम मार्ग म्हणजे शरणागती, आपण मार्गस्थ होऊ इच्छित असलेला मार्ग, ज्ञानप्राप्तीच्या उद्दिष्टाच्या दिशेचं बोधिचित्त आणि शिकवणींना आत्मसात करून, गुरूंच्या नजीक पोहचून, आध्यात्मिक मार्गावर मार्गस्थ होण्याबाबतची साधना. आपण बुद्धांचा किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूंचा विचार करत मरणाला शरण जातो. तसंच इस्लाममध्येही खरंतर समांतर धर्तीवर ईश्वराचा विचार करत मरणं स्वीकारणं आहे. 

इस्लाममध्ये मृत्युनंतरच्या जीवनासंबंधीच्या फार विशेष शिकवणी आहेत. जिवंत असताना तुमच्या भल्याबुऱ्या कामांचे हिशोब ठेवले जातात, आणि त्यानुसार मरणोत्तर न्याय केला जातो. त्यानंतर पुढे काय न्याय होणार आहे, हे ठरविणारा न्यायनिवाड्याचा दिवस येईपर्यंत त्या चांगल्या वा वाईट जागी पाठवलं जातं. त्यानंतर सगळे कब्रस्तानातून वर ईश्वरासमोर येतात आणि मग अंतिम न्यायनिवाडा होतो. त्यानंतर अर्थात एकतर अनंत स्वर्गात किंवा अनंत नरकात रवानगी होते. 

इस्लाममध्ये यासंदर्भातून विचार केला जाईल. एखादा सच्चा मुस्लिम असेल, तर तिथं पश्चातापावर अधिक भर दिला जाईल आणि त्याच्याकडून काही गैर कृत्य घडलं असेल, तर ईश्वराकडून क्षमायाचना केली जाईल. हे बौद्ध धर्मातही होतं. उदाहरणार्थ, एखाद्याने बोधिचित्त किंवा तांत्रिक शपथांचा भंग केला, तर मृत्युपूर्वी, तो त्या शपथांना नव्याने आत्मसात करण्याची इच्छा व्यक्त करेल, जेणेकरून त्याला नव्या ताज्या शपथांसह मरण स्वीकारता येईल. बौद्ध धर्मात ते अर्थातच आहे. मृत्युपूर्वी पश्चाताप आणि एखादाची पापं धुऊन काढण्याची ही समांतर कल्पना आहे. एखादा गंभीर धर्माचरण करणारा असेल, तर बौद्ध आणि इस्लाम धर्मात हे किंचित समांतर आढळून येईल. अर्थात, सर्व लोक तसे नसतात, पण एखादा असेल, तर तो असेच वागतो. 

आपल्याकडे जे आहे ते जाऊ न देण्यासाठी विरोध केल्यास काय होऊ शकते, याकडे आम्ही लक्ष पुरवितो. इथे अर्थातच शहादत असते आणि तो आणखी स्वतंत्र मुद्दा आहे. 

क्रोध व्यवस्थापन आणि निष्ठाविषयक संघर्ष

मी जवळपास ६०टक्के इस्लामिक विद्यार्थी असलेल्या ओस्लो येथील शाळेत शिकवते, या विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या प्रचंड क्रोधाविषयी तुम्ही मला काही सांगू शकाल का? इस्लामिक जगतात प्रचंड युद्धं सुरू आहेत आणि इथंही हा प्रचंड क्रोध पाहायला मिळतो. माझी मुलगी एका मुलीसह मशिदीत गेली, तर तिथं तिच्याविषयी प्रचंड वाईट बोललं गेलं आणि तिला वाईट वागवलं गेलं. इथं पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि सीरियातीलही दुसऱ्या पिढीतील असे लोक आहेत, जे त्यांच्या मातृभूमीत राहत नाहीत. अशावेळी मी माझ्या मुलीला काय सांगायला हवं? हे फारच कठीण आहे. तुम्ही या संताप आणि क्रोधाविषयी काय सांगाल?

जगातल्या या भागातून येणाऱ्या कुणालाही, मग ती दुसरी पिढी का असेना, तिथला रक्तपात पाहणं फार त्रासदायक आहे. त्यानं तरूण मुलं अर्थातच निराश होतात. त्यांच्यामध्ये आपल्या भावनांना हाताळण्याची क्षमता खरोखरच नसते. त्यामुळे ते क्रोधाचं जाहीर प्रदर्षण करतात. मुस्लिम किंवा आणखी कोणत्याही स्थलांतरित अल्पसंख्याक समुहांबाबतचा आपल्या समुहाप्रति निष्ठा हा प्रमुख मानसिक प्रश्न आहे. एकीकडे यजमान देश त्या देशातील मूल्यांबाबत निष्ठा बाळगण्यास सांगते, तर दुसरीकडे त्यांच्याकडे त्यांची स्वतःची संस्कृती आणि धर्म असतो, ज्याबद्दल निष्ठा ठेवणं त्यांला आवश्यक वाटत असतं. 

घटस्फोटितांच्या मुलांमधील विभाजित निष्ठेसारखं हे असतं. त्यांना आपण आईप्रति निष्ठावान आहे असं वाटलं, तर ते उलटपक्षी वडिलांप्रति बेईमान असल्यासारखं होतं. त्यामुळे दोघांप्रति निष्ठा प्रकट करता येईल, असा संगम कसा साधायचा हा प्रश्न असतो. उदाहरणार्थ, जर आपण म्हटले की एखाद्यानं यजमान देशाशी निष्ठा ठेवावी आणि मूळ संस्कृती किंवा धर्माशी ठेवू नये, तर या निष्ठा व्यक्त करण्याच्या प्रकरणात एखादा अजाणतेपणी त्याच्या मूळ संस्कृतीतील नकारात्मक घटकांप्रति निष्ठावान होऊ शकतो. हे संतापातून घडू शकतं. 

सैद्धान्तिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधील सकारात्मक गोष्टी ओळखून त्यांच्याप्रति ते निष्ठावान राहिल्यास ते उपयुक्त ठरू शकतं. आणि तेव्हा संघर्षाशिवाय दोन्ही संस्कृतींशी एकाच वेळी निष्ठावान राहणंही शक्य होऊ शकतं. हे किंवा ते, असं असता कामा नये. समाजात हे रूजवण्याची गरज आहे. युरोपातील काही समुहांमध्ये महिलांनी बुरखा घालणं गैर आहे आणि त्यांच्यादृष्टीने ते क्रूर आहे आणि त्यातून क्रोध वाढीस लागतो. 

बुरख्यात एवढी काय समस्या आहे? जर त्यांचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असेल, तर अमेरिकेत न्यायालयात केवळ एकमात्र परिस्थिती असेल, जिथं त्यांना बुरखा बाजूला करावा लागेल. किंवा कदाचित वाहन चालवत असताना करावा लागेल. 

आपण याची काळजी घ्यायला हवी की दुसऱ्या संस्कृतीतून आलेल्या लोकांची अशी कोणती मूल्ये आहेत, जी इथल्या संस्कृतीसाठी समस्या ठरणार नाहीत किंवा त्यातून संघर्ष ओढावणार नाही, आणि ती या समाजातही सुसंगत वाटतील. त्यातून त्या संतापाचा सामना करता येईल. मुलांना हे समजून घेणं अर्थातच कठीण ठरेल. कदाचित तुम्ही तुमच्या मुलीला विचारू शकता की तिला ते कठीण जातं आहे का, ती त्रासलेली किंवा क्रोधीत आहे का, आणि तिच्या म्हणण्याचा गैर अर्थ निघेल असं ती काही वाईट बोलली आहे का? ते जे बोलताहेत, त्यांना तो अर्थ अपेक्षित नाही आणि लोक निराशाजनक अवस्थेतून असं वागतात, हे समजून घेण्यासाठी तिला मदत करा. ते कदाचित फायद्याचं ठरेल, अर्थात तुमच्या मुलीचं वय काय आहे, त्यावर ते अवलंबून आहे. 

तुम्हा सर्वांचे आभार. तुमच्यासोबत बोलणं फार सुखावणारं होतं आणि आशा आहे की तुम्हालाही यातून विचार करण्याजोगं काही मिळालं असेल.  

Top